मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन अनुवादित लघुतम कथा : मातृधर्म / रेस / अधिकार आणि कर्तव्य – लेखक :डॉ. रमेश यादव ☆ मराठी भावानुवाद – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ तीन अनुवादित लघुतम कथा : मातृधर्म / रेस / अधिकार आणि कर्तव्य – लेखक :डॉ. रमेश यादव ☆ मराठी भावानुवाद – सौ. गौरी गाडेकर

♥ ♥ ♥ ♥ ♥

(१) – मातृधर्म

“कोणाचा फोन होता हो? “

“संजयचा होता. थोड्या दिवसांसाठी आईंला घरी घेऊन जाईन, म्हणत होता. त्यांची कामवाली बाई काम सोडून गेलीय. मुलांना बघायला कोणी नाही. “

” म्हणजे आईंना आता कामवाल्या बाईच्या जागी आमंत्रण आलं आहे. यांची मुलं मोठी होतील, तेव्हा आईंची गरज संपेल. त्यानंतर काय? वृद्धाश्रम…! आई माझ्या सासूबाई असतील, पण मला त्या सख्ख्या आईपेक्षाही जवळच्या आहेत. जवळपास पंधरा वर्षं त्या आपल्याबरोबर आहेत. आतापर्यंत कुठच्याही दिराला त्यांची आठवण नाही झाली. माझी काही असहाय्यताही नाही, की मी आईंना कामवाल्या बाईच्या जागी काम करायला पाठवीन. त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांना आपल्याजवळच ठेवीन. “

“रंजन, तू जॉब करत नाहीस; पण त्या दोघी तर नोकरीवाल्या आहेत ना! त्याही अडलेल्या आहेत! तू कशाला कीस पाडत बसतेस? संजयच्या घरी जायचं की नाही, हा निर्णय आईने घ्यायचा आहे. शेवटी धाकटा मुलगा आणि सुनेच्या हक्काचाही प्रश्न आहे! “

“ठीक आहे. पण इतक्या वर्षांत कोणत्याही दिराने दोन-चार दिवसांसाठी म्हणूनही स्वतःच्या घरी नेलं नाही त्यांना. आज कामवाली बाई नाहीय, तेव्हा त्यांना आई हवी. बाई मिळाली की आईला परत पाठवणार. हे तर मलाही लागू पडतं ना..! उद्या माझी मुलं मोठी होतील, तेव्हा तर प्रोफेशनल सुनांचा जमाना आलेला असेल. जोपर्यंत गरज असेल, तोपर्यंत ठेवतील. त्यानंतर आमची रवानगी वृद्धाश्रमात होणार. आपल्या शरीरात बळ आहे, तोपर्यंत आपल्याकडे लोक आपला हक्क मागतात. पण त्यानंतर काय? याला विवशता म्हणायचं की फालतू विचार? “

दरवाजाआड उभी असलेली आई सगळं ऐकत होती. ‘या काळात सासूच्या बाबतीत असे विचार करणारी सून मिळणं, हे माझ्या सत्कर्मांचं फळ आहे. ‘ स्वतःच्या तन-मनाचा सन्मान झाल्यासारखं वाटलं तिला. बाहेर येऊन तिने मोठ्या सुनेला जवळ घेतलं. तिचा मुका घेतला.

“बेटी, तुझं म्हणणं बरोबर आहे. पण हाताची सगळी बोटं सारखी नसतात. मी आई आहे ना…! “

आणि पाणावलेल्या डोळ्यांनी ती धाकट्या मुलाच्या-संजयच्या- घरी जायची तयारी करायला लागली.

मूळ हिंदी कथा : माँ का धर्म

♥ ♥ ♥ ♥ ♥

(२) – रेस – – – 

शाळेत स्पोर्ट्स डेचा शेवटचा दिवस होता. पुरस्कारवितरणही त्याच दिवशी होणार होतं. म्हणून काही पालकही तिथे उपस्थित होते.

नववीच्या रेसला सुरुवात झाली. सर्व स्पर्धक जीव तोडून धावत होते.

अंकित रेस जिंकला. तो जलद धावायचा. गरीब घरातून आला होता तो. तो जिंकल्यावर सगळ्यांनाच खूप आनंद झाला.

पण मंथन स्पर्धेत सहभागी असूनही धावलाच नाही. सगळ्यांनाच याचं आश्चर्य वाटलं.

“मंथन, यू आर बेस्ट रनर! धावला का नाहीस? काही प्रॉब्लेम आहे का? ” स्पोर्ट्स टीचरनी विचारलं.

” मी एकदम ठीक आहे, सर. रेसमध्ये भाग घ्यायची माझी मुळीच इच्छा नव्हती. मम्मी-पापांच्या दबावामुळे मी फिल्डमध्ये उभा राहिलो. बस्स…! “

” पण तू धावण्याचा प्रयत्नही केला नाहीस. इट्स व्हेरी बॅड! तुझे मम्मी-पापाही आले आहेत. किती वाईट वाटलं असेल त्यांना! मी खात्रीने सांगतो, तू धावला असतास, तर रेस जिंकला असतास. “

“जिंकलो असतो, तर काय झालं असतं? एक ट्रॉफी, प्रशस्तिपत्र किंवा पुरस्कार मिळाला असता. मला मानसिक शांती हवीय! चार वर्षांचा होतो, तेव्हापासून मी वेगवेगळ्या, अगदी कुठच्याही रेसमध्ये धावतोय. कधी गायन, कधी वादन, कधी स्विमर, ऍक्टर, क्रिकेट, ज्युडो-कराटे, चित्रकार, डॉक्टर, इंजिनिअर… आज हे, तर उद्या ते. रोज नवी स्वप्नं, नवी आव्हानं, नवे क्लास…! मम्मीच्या मैत्रिणींची मुलं जे जे करतात, ते सगळं मला करावं लागतं. माझी इच्छा आहे की नाही…. , नो वन केअर्स! ‘इट्स कॉम्पिटिशन टाईम’ म्हणत माझं बालपण माझ्यापासून हिरावून घेतलं गेलं. आता मला काहीही बनायचं नाहीय. इट्स फायनल! ” छातीवर लावलेला स्पर्धकक्रमांकाचा बॅच काढून त्याने फेकून दिला आणि तो ग्राउंडवर आडवा पडला. त्याच्याकडे बघून वाटत होतं, ज्वालामुखीतून लाव्हारस उसळतोय.

चौदा वर्षांच्या मंथनच्या मुखातून निघालेलं ते गंभीर बोलणं ऐकून सगळे लोक अवाक झाले आणि एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले.

अंकितने हात देऊन त्याला उठवलं आणि म्हटलं, “मंथन, मला माहीत आहे, तुला मला जिंकू द्यायचं होतं ना? “आणि त्याने आपल्या गळ्यातलं मेडल काढून त्याच्या गळ्यात घातलं.

“नाही दोस्ता, आंधळ्या स्पर्धेच्या या युगात वाट चुकलेल्या माझ्या मम्मी-पापांचे डोळे उघडण्याचा मी प्रयास करत होतो. आता मी तेच करणार, जे मला आवडतं, “असं म्हणत मंथनने जीवनातला नवा संरक्षक पवित्रा घेतला.

मूळ हिंदी कथा :रेस

♥ ♥ ♥ ♥ ♥

(३) – अधिकार आणि कर्तव्य

मुंबई सेंट्रलच्या बसस्टॉपवर खूप वेळ उन्हात उभी राहून ती तापली होती. अधूनमधून घाम पुसत मोबाईलवर मेसेजही पाठवत होती. अचानक तिच्या फोनची रिंग वाजली. ती चिडून बोलली, “एवढी काळजी आहे, तर गाडी घेऊन मला न्यायला का नाही आलास? मी उडत तर येऊ शकत नाही. बससाठी थांबलेय. बस कधी येणार, हे माझ्या हातात आहे का? “

तेवढ्यात समोरून बस आली. फोन बंद करून ती बसमध्ये चढली. खूप गर्दी होती. एकही सीट रिकामी नव्हती. त्या गर्दीतून वाट काढत ती पुढे गेली आणि तिने महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागांवर नजर फिरवली. तिने बघितलं, की एका आरक्षित सीटवर एक वृद्ध महिला व एक वृद्ध पुरुष बसले होते. जीवनाच्या या टप्प्यावर त्यांना एवढ्या प्रेमाने बोलताना पाहून बसमध्ये बसलेल्या अर्चनाला खूप छान वाटलं. नाहीतर वयाच्या या टप्प्यावर एकमेकांशी हसतखेळत मित्रत्वाने गुटर्रगू करणारी जोडपी कमीच असतात.

ती मुलगी पुढे गेली आणि म्हणाली, “अंकल, ही लेडीज सीट आहे. तुम्ही उठा. “

हे ऐकल्यावर दोघं चकित झाले. त्या तरुण मुलीच्या नजरेतला राग बघून ते वयस्क गृहस्थ म्हणाले, “होय बेटी. मला माहीत आहे. पण आम्ही चढलो, तेव्हा हीच सीट रिकामी होती. म्हणून एकत्र बसलो. हरकत नाही. मी उठतो. तू इथे बस. “

ते उठू लागले, तेव्हा ती वृद्ध महिला म्हणाली, “अहो, तुम्हाला बरं नाही. तुम्ही बसा, मी उठते. ” आणि त्या वृद्ध महिलेने आपली सीट त्या मुलीला दिली. सुरक्षित अंतर सोडून ती मुलगी सीटवर बसली. आता ती सतत फोनवर ‘त्याच्या’शी बोलत होती. तेव्हा समोरच्या सीटवर बसलेली अर्चना उठली आणि त्या वृद्ध महिलेला आपली सीट देत बोलली, “आई, तुम्ही इथे बसा. अतिजागृत महिला आता आपला आरक्षणाचा अधिकार बजावायला शिकल्या आहेत. ” शेजारी बसलेले लोक हसले. उगीच राईचा पर्वत व्हायला नको, म्हणून कंडक्टर पुढे गेला आणि ‘तिकीट-तिकीट’ म्हणून ओरडायला लागला.

या सगळ्याचा पत्ताच नसलेली ती मुलगी फोनवर आपल्या मित्राशी रोमान्सभऱ्या गप्पा मारण्यात गढली होती. ती साफ विसरून गेली होती, की आयुष्यात अधिकाराच्या जोडीने कर्तव्यंही बजावायची असतात!

मूळ हिंदी कथा : अधिकार और कर्तव्य

♥ ♥ ♥ ♥ ♥

मूळ तीन हिंदी कथा : लेखक :डॉ. रमेश यादव

मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माणुसकीची किंमत… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ माणुसकीची किंमत… ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

अमेरिकेतल्या एका आडबाजूच्या शहरातील आडबाजूला असलेल्या एका सामान्य हॉटेलात रात्रीच्या वेळी एक वृद्ध जोडपे शिरले. बाहेर मुसळधार पाऊस चालू होता. थंड वादळी वारे वहात होते. प्रचंड थंडी पडली होती. अशा या थंडीत हे वृद्ध जोडपे हॉटेलात शिरले तेव्हा थंडीने त्यांचे अंग थरथरत होते. कपडे पण थोडेसे पावसात भिजलेले होते. तसे त्यांचे कपडे सामान्यच होते. त्यावेळी हॉटेलच्या काऊंटरच्या मागे अगदी सामान्य असा दिसणारा एक निग्रो तरुण बसला होता.

‘आम्हाला आजची रात्र रहाण्यासाठी या हॉटेलात रुम मिळेल का? ’ त्या म्हाताऱ्या आजीबाईंनी थंडीत कुडकुडत त्या निग्रो तरुणाला विचारले.

‘सॉरी मॅम! आज हॉटेल मध्ये सगळ्या रुम्स फुल आहेत. एकही रूम शिल्लक नाही. ’ त्या निग्रो तरुणाने सांगितले पण सांगताना त्याचा चेहेरा असा झाला होता की हॉटेलात एकही रुम शिल्लक नाही हा जणू काही त्याचा अपराध असावा.

‘बघा ना काही जमते का? हवे तर दुप्पट पैसे घ्या. बिल नाही दिलेत तरी चालेल. ’ म्हातारबुवा म्हणाले.

थोडक्यात त्या रुमचे पैसे त्या निग्रो तरुणाने खुशाल खिशात घालावेत असे ते म्हातारबुवा सुचवत होते. पण तो निग्रो तरुण त्यामुळे काही बधेल असे वाटे ना.

‘हे बघा मी तुम्हाला माझी रुम देऊ शकतो. माझी रुम तशी छोटी आहे पण त्यात तुमची सोय होईल. मला जर 10 मिनिटे वेळ दिलात तर मी माझी रुम जरा आवरून येतो. तोपर्यंत मी तुम्हाला गरमागरम चहा आणुन देतो. त्यामुळे तुम्हाला थोडे बरे वाटेल’. असे म्हणुन तो निग्रो तरुण किचनमध्ये चहा करायला गेला आणि थोड्याच वेळात वाफाळलेल्या चहाचे दोन कप आणि कुकिज घेऊन आला आणि आपली खोली साफ करायला निघून गेला.

थोड्या वेळात तो निग्रो तरुण परत आला तेव्हा ते म्हातारबुवा आपल्या गाडीच्या डिकितुन एक जाडजूड बॅग काढत असताना दिसले. ‘थांबा मी तुम्हाला मदत करतो’ असे म्हणुन तो निग्रो तरुण पुढे आला आणि तो बॅग काढुन हॉटेलमध्ये घेऊन आला.

‘चला मी तुम्हाला तुमची रुम दाखवतो’ तो म्हणाला आणि त्या वृद्ध जोडप्याला आपल्या रुमपाशी घेऊन आला.

‘ही घ्या किल्ली! काही लागले तर मला हाक मारा! ’ तो निग्रो तरुण म्हणाला.

‘तू कुठे झोपणार? ’ त्या आजीबाईंनी विचारले.

‘तुम्ही काळजी करू नका! मी बाहेर हॉलमध्ये झोपेन. माझ्याकडे स्लिपिंग बॅग आहे! गुड नाईट! ’ तो निग्रो तरुण म्हणाला.

आजीबाईंनी खोलीचे दार उघडले. खोली तशी लहानशीच होती पण व्यवस्थित आवरून ठेवलेली होती. खोलीचे बाथरुम पण स्वच्छ करून ठेवले होते. खोलीचा हिटर चालू करून ठेवला होता. तसेच पलंगावर दोन इस्त्री केलेले नाईट गाऊन्स ठेवलेले होते. प्यायचे पाणी पण भरुन ठेवले होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी ते वृद्ध जोडपे फ्रेश होऊन बाहेर पडले. आता त्यांना निघायचे होते.

‘किती पैसे झाले? ’ त्या आजोबांनी वरचारले

‘पैशांचे आपण नंतर बघू. आधी चांगला ब्रेकफास्ट करा! मी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येतो. ’ असे सांगून तो निग्रो तरुण पॅन्ट्री मध्ये गायब झाला आणि थोड्याच वेळात ऑम्लेट, टोस्ट आणि गरम कॉफी घेऊन आला.

‘किती पैसे द्यायचे? ’ त्या म्हातारबुवांनी ब्रेकफास्ट झाल्यावर विचारले.

‘त्याचे असे आहे. मी तुम्हाला माझी खोली वापरायला दिली. ती काही हॉटेलची खोली नव्हती. त्यामुळे त्याचे पैसे काही नाहीत. ’ तो निग्रो तरुण म्हणाला.

‘असे कसे? बर मग चहाचे आणि ब्रेकफास्टचे किती पैसे द्यायचे’ त्या आजीबाईंनी विचारले.

‘मॅडम! मला आई वडील नाहीत. माझे आई वडील माझ्या लहानपणीच गेले. तुम्हाला पाहिले आणि मला माझे आई वडील आठवले. आज जर माझे आई वडील या हॉटेलमध्ये आले असते तर मी त्यांच्याकडुन चहाचे आणि नाष्त्याचे पैसे घेतले असते का? नाही ना! मग मला तुमच्याकडून पैसे नकोत’ तो निग्रो तरुण म्हणाला.

.. तो निग्रो तरुण काऊंटरजवळ गेला आणि आपल्या खिशातून काही पैसे काढुन हॉटेलच्या गल्यात टाकु लागला. म्हातारबुवा कुतुहलाने ते बघत होते. त्यांच्या लक्षात आले की त्यांनी जो चहा घेतला होता आणि ब्रेकफास्ट केला होता त्याचे पैसे तो निग्रो तरुण स्वतःच्या खिशातून हॉटेलच्या गल्यात टाकत होता.

ते वृद्ध जोडपे जायला निघाले. त्या निग्रो तरुणाने त्यांची जड बॅग त्यांच्या गाडीच्या डिकीत आणून ठेवली. तेवढ्यात त्याची नजर गाडीतील रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांकडे गेली. ‘थांबा मी तुम्हाला पाणी आणुन देतो. ’ असे म्हणुन त्याने त्या दोन्ही बाटल्या स्चच्छ करून पिण्याच्या पाण्याने भरून आणून दिल्या. ते वृद्ध जोडपे एकमेकांकडे बघत होते.

‘हे पहा आम्हाला या ठिकाणी जायचे आहे. आम्ही या गावात नवीन आहोत. आम्हाला कसे जायचे हे सांगायला थोडी मदत करणार का? ’ आजोबांनी विचारले.

‘थोडे थांबा’ असे म्हणुन तो निग्रो तरुण आत गेला आणि गावाचा नकाशा घेऊनच बाहेर आला. त्याने तो नकाशा आजोबांना देताना म्हणाला ‘आत्ता तुम्ही या ठिकाणी आहात. तुम्हाला येथे जायचे आहे. हा बघा हा रस्ता तुम्हाला सरळ तेथे घेऊन जाईल. ’ म्हातारबुवांनी बघितले. त्या निग्रो तरुणाने नकाशावर पेन्सिलने व्यवस्थित खुणा केल्या होत्या.

आजीबाईं त्या निग्रो तरुणाचे आभार मागताना म्हणाल्या. ‘तुझे नाव काय? तुझे बिझनेस कार्ड असेल तर मला दे. ’

‘सॉरी मॅम! माझ्याकडे बिझनेस कार्ड नाही कारण मी सध्या टेम्पररी नोकरीवर आहे. पण हॉटेलच्या बिझनेस कार्डवर माझे नाव लिहुन देतो. परत या बाजुला आलात तर आमच्या हॉटेलवर जरुर या! ’ असे म्हणत त्या निग्रो तरुणाने आपल्या खिशातुन हॉटेलचे बिझनेस कार्ड काढले, त्यावर पेनने आपले नाव लिहीले आणि ते कार्ड आजीबाईंना दिले.

पंधरा दिवस असेच गेले आणि त्या निग्रो तरुणाच्या नावाने एक भला मोठा लिफाफा पोस्टाने आला. तशी त्याला पत्रे वगैरे फारशी येत नसत. हा लिफाफा कोणाचा म्हणुन त्याने उघडुन बघितला. ‘ओ कॅफे’ हॉटेलचे लेटरहेड बघुन तो चमकला. ओ कॅफे ही त्याकाळची अमेरिकेतील अत्यंत नावाजलेली अशी हॉटेल्सची साखळी होती. अमेरिकेतील बहुतेक मोठ्या आणि महत्वाच्या शहरांमध्ये ही हॉटेल्स होती. बहुतेक हॉटेल्स पंचतारांकित होती. ओ कॅफे हॉटेल्समध्ये काम करायला मिळावे अशी अनेकांची इच्छा असायची.

ओ कॅफे हॉटेलकडुन कसले पत्र आले आहे हे बघावे म्हणुन तो पत्र वाचु लागला आणि उडालाच. त्याला चक्क इंटरव्ह्यूचा कॉल आला होता. त्याच्या शहराजवळच ओ कॅफेचे एक नवीन पंचतारांकीत हॉटेल सुरु झाले होते. तिथे त्याला इंटरव्ह्यूला बोलावले होते. पण आपण अर्ज केलेला नसताना आपल्याला इंटरव्ह्युचा कॉल कसा आला याचे त्या आश्चर्यच वाटत होते.

तो इंटरव्ह्युच्या दिवशी त्यातल्या त्यात चांगला पोशाख करुन आणि आपली फाईल घेऊन इंटरव्ह्यूला हजर झाला. या हॉटेलमध्ये आपल्याला वेटरची नोकरी मिळाली तरी पुष्कळ झाले असे त्याला वाटले. त्याने रिसेप्शन काऊंटरवर आपले इंटरव्ह्यूचे लेटर दिले. त्याला सांगण्यात आले की हॉटेलचे चेअरमनसाहेब स्वतः त्याचा इंटरव्ह्यु घेणार आहेत. त्याला आश्चर्यच वाटले. थोड्याच वेळात त्याला हॉटेलच्या सातव्या मजल्यावर असलेल्या चेअरमन साहेबांच्या ऑफीसमध्ये नेण्यात आले. त्यांचे ऑफीस चांगले भव्य होते. थोड्याच वेळात त्याला आत बोलावण्यात आले. तो चेअरमन साहेबांच्या भव्य केबिनमध्ये शिरला. त्याने समोर नजर टाकली आणि तो उडालाच.

चेअरमन साहेबांच्या डेस्कच्या मागे तेच वृद्ध जोडपे बसले होते जे त्याच्या हॉटेलमध्ये आले होते.

‘मी जॉन ओ किफे. या माझ्या पत्नी लिलियन ओ किफे. ओ किफे चेन हॉटेल्स आमच्या मालकीची आहेत. ’ ते आजोबा म्हणाले.

‘त्या दिवशी रात्री तू आम्हाला जी माणुसकीची वागणून दिलीस त्यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. हल्ली अशी माणुसकी बघायला सुद्धा मिळत नाही. ’ आजीबाई म्हणाल्या

‘मला तुझ्यासारखी माणुसकीची जाण असणारी माणसेच माझ्या हॉटेलसाठी हवी आहेत. मी या हॉटेलच्या जनरल मॅनेजर पदासाठी तुझा विचार करतो आहे. तू आमच्या हॉटेलमध्ये जनरल मॅनेजर म्हणुन जॉईन होशील का? ’ ओ किफे साहेब म्हणाले.

‘जनरल मॅनेजर? ’ तो निग्रो तरुण चांगलाच उडाला होता, ‘सर! पण मी या पदासाठी लायक आहे का? कारण माझे शिक्षण— ‘

‘आम्ही तुझी सर्व माहिती काढली आहे. ’ ओ किफे साहेब मधेच त्याला थांबवत म्हणाले,

‘घरच्या परिस्थितीमुळे तुला काही फारसे शिक्षण घेता आले नाही हे आम्हाला कळले. तसेच तुझ्या काळ्या रंगामुळे पण तुला कुठे चान्स मिळत नाही हे पण आम्हाला समजले. पण माणुसकी काही शिकवून मिळत नाही. ती उपजतच असावी लागते. आम्ही शरीराचा कलर, जाती, धर्म असा भेद करत नाही. आम्ही माणसातील गुणवत्तेला महत्व देतो. त्या दिवशी रात्री आम्ही तुझी परिक्षा घेत होतो. त्यात तू उत्तम मार्काने पास झालास. जेव्हा तु आमच्या चहाचे आणि ब्रेकफास्टचे पैसे तुझ्या खिशातुन हॉटेलच्या गल्यात टाकलेस तेव्हाच आमच्या लक्षात आले की तू नुसताच प्रामाणिक माणूस नाहीस तर उत्तम कॅरॅक्टर असलेला माणूस आहेस. आमच्या या हॉटलचा जनरल मॅनेजर म्हणून तुझे स्वागत असो! ’ ओ किफे साहेब म्हणाले आणि त्यांनी त्या निग्रो तरुणाशी शेकहॅन्ड केला.

कधी कधी माणुसकीची आणि कॅरॅक्टरची अशी पण मोलाची किंमत मिळते.

– – (एका सत्य घटनेवर आधारित) – – 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “नागरिक शास्त्र…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “नागरिक शास्त्र…” ☆ श्री मंगेश मधुकर

संध्याकाळची वेळ, हॉलमध्ये आजी टीव्हीमध्ये तर ममा आणि राही मोबाइलमध्ये गुंग. दारावरची बेल वाजल्यावर राहीनं दार उघडलं.

“हाय!! बेबी डार्लिंग” प्रसन्न हसत पपा घरात आले. आतमध्ये अंगावर येणारी शांतता होती. ममाकडे पाहिल्यावर काहीतरी घडल्याचं पपांच्या चटकन लक्षात आलं.

“काय झालं”

“तुमच्या लेकीला विचारा”

“मी काय केलं” राही 

“आज स्कूलमधून फोन आला होता.”

“हा ते होय. मला जे वाटलं ते केलं. तुला चिडायला काय झालं. ”राहीच्या बोलण्यावर ममा भडकली.

“एक मिनिट. नक्की काय प्रकार आहे ते सांग” पपा.

“मागच्या आठवड्यात वक्तृत्व स्पर्धेत मिळालेलं बक्षीस मॅडमनी परत केलं.”

“का?” पपा मोठ्यानं ओरडले.

“हळू, एवढं रिऍक्ट होण्यासारखी मोठी गोष्ट नाहीये. ”

“तुझ्यासाठी नसेल पण आमच्यासाठी आहे. लेकीचं पहिलं बक्षीस, फार अभिमानाची गोष्ट आहे” ममा 

“पहिल्या नंबरचं बक्षीस मिळवलं म्हणून सगळ्यांनी कौतुक केलं. तू सुद्धा खूप मेहनतीनं विषय मांडला आणि एकदम हा टोकाचा निर्णय.” पपा.

“कुठल्या धुंदीत होती काय माहिती?” ममा 

“ममा, उगीच काहीही बोलू नकोस”

“राही, बेटा तू चुकलीस. बक्षीस परत करण्याआधी आमच्याशी बोलायला हवं होतं. ”पपा.

“त्यानं काय झालं असतं”

“असं का बोलतेस.”

“राग येईल पण स्पष्टच सांगते की तुमच्यामुळेच मी प्राइज परत केलं. ”

“काय? ”ममा आणि पपा एकदमच ओरडले.

“हो”

“आम्ही असं काय केलं जे आम्हांलाच माहिती नाही. ”पपा 

“हो ना. आजकाल फार चुरुचुरू बोलायला लागलीयं”ममा.

“एक मिनिट, राही नक्की काय झालं म्हणून हा निर्णय घेतलास. आमच्याकडून काही चूक घडली असेल तर सांग. ” पप्पानी विचारलं पण राही काहीच बोलली नाही. ममा-पपा पुन्हा पुन्हा विचारत होते. राहीनं आजीकडे पाहील्यावर तिनं नजरेनंच बोलण्याची खूण केली.

“प्राईज मिळाल्यानंतर असे प्रसंग घडले की ज्यामुळे माझं कंफ्यूजन वाढलं. खरंच या प्राईजसाठी आपण योग्य आहोत का? असं वाटायला लागलं. ”

“म्हणजे. ”ममा 

“नक्की काय झालं. नीट सांग. ”पपा

“त्यादिवशी स्कूलला जाताना ममा हेल्मेट विसरली. मी आणून देते म्हटलं तर नको म्हणाली आणि एखादेवेळी नसलं तरी चालतं अस म्हणत गाडी घेऊन निघाली असं बऱ्याचदा झालंय. मी काही बोलले नाही पण नंतर चौकात रेड सिग्नल होता तरी ममानं गाडी थांबवली नाही. ”

“अगं, त्यावेळेला रस्ता मोकळा होता आणि आपल्याला उशीर झाला होता म्हणून.. ”

“सिग्नलवर फक्त वीस सेकंद बाकी होते. ”

“एवढ्या फालतू कारणासाठी बक्षीस परत केलंस. जाऊ दे. ते एवढं काही महत्वाचं नाहीये. आजकाल बरेचजण असंच वागतात. ”ममा.

“म्हणून नियम मोडायचा. आपल्याकडे कोणाला सिविक सेन्सचं नाही. अडाणी, शिकलेले सगळे सारखेच. ”

“काहीही बोलू नकोस. तोंड सांभाळ. ”ममा चिडली. राही आणि ममा यांच्यातली वादावादी वाढली तेव्हा पपा मध्ये पडले. “एक मिनिट, दोघीही गप्प बसा. राही, मी काय केलं ते सांग.”

“परवा आपण बाहेर गेलो तेव्हा गाडी चालवत मोबाईलवर बोलत होता नंतर पुलावरून जाताना सुकलेल्या फुलांची आख्खी पिशवी तुम्ही नदीमध्ये उलटी केलीत. ”

“त्याला सुकलेली फुलं नाही निर्माल्य म्हणतात. देवाला वाहिलेली फुलं, हार होते. ते पाण्यातच टाकायचे असतात” ममा.

“ते पूर्वी ठीक होतं पण आता आधीच नदी किती घाण झालीय. ती साफ करायचं सोडून आपण त्यात भर घालतोय. अशा अनेक चुकीच्या गोष्टी माहिती असूनही आपण करतो. सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं याचं भान कोणालाच नाही आणि नियम पाळणारा चेष्टेचा विषय बनतो. त्यातही सर्वात किळसवाणा प्रकार म्हणजे कसंही, कुठंही पचकन थुंकणारे, अशांच्या कानफाटात मारायची इच्छा होते पण??? ”

“मला एक कळत नाही. या गोष्टींचा आणि बक्षीस परत करण्याचा काय संबंध? ”

“ममा, ‘सिविक सेन्स’ वर बोलून प्राईज मिळाले परंतु नंतर आलेल्या अनुभवामुळे माझा गोंधळ वाढला. जर आईवडीलच चुकीचे वागत असतील तर नुसतं बोलण्याला काहीच अर्थ नाही म्हणून बक्षीस परत केलं. ”राही बोलायचं थांबली तेव्हा एकदम शांतता पसरली. ममा आणि पपाला काय प्रतिक्रिया द्यावी सुचत नव्हते. परिस्थिती बघून आजीनं पुढे येत म्हणाली “राही अभिनंदन!! योग्य निर्णय घेतलास. आमचा १००% टक्के पाठिंबा आहे. आधी आपण करायचे मग इतरांना सांगायचे हीच तर आपली शिकवण. सगळ्यांना नागरिक शास्त्र पुन्हा पुन्हा शिकवलं गेलं पाहिजे. लहान वयात तू हा विचार करतेस. वा!! फार छान!! ”आजीनं राहीची पाठ थोपटली.

“येस, यू आर राइट, मी आणि ममा चुकलो. यापुढे असं करणार नाही. तुझं म्हणणं पटलं. दुसरा पाळत नाही म्हणून मी सुद्धा चुकीचं वागणार हे बरोबर नाही. स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्यांनी आधी सार्वजनिक नियम पाळलेच पाहिजेत.”

“सॉरी!! यापुढे काळजी घेईन. खरंतर नागरिक शास्त्र आयुष्यभर उपयोगी पडणारा विषय फक्त शाळेत 20 मार्कांपुरता राहिलाय ”ममा.

“राही, एक काम करू. तू स्पर्धेत बोललीस त्याचा व्हिडिओ करून व्हायरल करू. नागरिक शास्त्र जाणीव जागृतीच्या कामात आपला खारीचा वाटा…. ”पपांचे बोलणं संपायच्या आत ममा आणि राही एकदमच म्हणाल्या “ग्रेट आयडिया!!”

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पराधीन… भाग – २ ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

सौ. राधिका भांडारकर 

? जीवनरंग ?

☆ पराधीन… भाग – १ ☆ सौ. राधिका भांडारकर

(शोभा साठी तर साराच अंधार होता. स्वमग्न सायली आणि अपंग नवरा. देव एकाच माणसाला इतकी दुःखं का देतो?) – इथून पुढे —- 

ताईला सहज आठवलं. सर्व भावंडात शोभा देखणी होती. काहीशी नाजूकही होती. पप्पा तिला ‘चमेली’ म्हणायचे. पप्पांची फार लाडकी. सारी भावंड तिला ‘लाडावलेलीच’ म्हणायचे. तिनेही पप्पांना बजावून सांगितले होते, ” पप्पा मी काही ताई सारखी नोकरी वगैरे करणार नाही बरं! मला श्रीमंत, जमीनदार, सुखात ठेवणारा नवरा हवा. ”

भैय्यासाहेबांचं स्थळ अगदी तसंच होतं. घरदार, शेतीवाडी, गोधन असलेलं. भैय्या साहेबांचा स्वभावही खूप मनमिळाऊ, समंजस, सर्वांची काळजी घेणारा असाच होता. शोभा चांगल्या घरात पडली याचं पप्पांसकट सर्वांनाच समाधान होतं.

पण दैव जाणिले कुणी?

सायलीच्या जन्मानंतर जीवन जणू ढगाळलंच. ती ऑटिस्टिक आहे हे स्वीकारायलाही खूप महिने लागले. ती मंदबुद्धी नव्हती पण नॉर्मल नक्कीच नव्हती. वयाप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक माईलस्टोन वर ती अडखळत होती. बुद्धी, शरीर याची संगती नव्हती. मात्र मुलगी म्हणून वाढत असतानाचे शारीरिक नियम निसर्गाने पाळले होते. ती ऋतुमती झाली. तारुण्याच्या खूणा अंगावर उमटू लागल्या. पण हे तारुण्य मोरपिशी नव्हतं. ते विकृत भासत होतं. त्या तारुण्यात स्वप्नांची पिसं नव्हती. भुताटकीचा नाच होता. तिच्या अंगावर चढणाऱ्या गोलाईने शोभाचं उर धडधडत होतं.

एकदा तिला स्वप्नही पडलं होतं… ‘अजस्त्र गिधाडांच्या टोळीने सायलीला उंच आकाशात उचलून नेलं. ’ 

घामाघूम होऊन शोभा झोपेतून उठली. सायली शेजारी शांत झोपली होती. झोपेतच शोभाने सायलीला घट्ट पकडले आणि म्हटले, ” बाळा! माहित नाही हे जग तुझ्यासाठी कसं असेल? पण आता आपलं दोघींचं एकच जग. त्या जगात फक्त तू आणि मी. ”

ताईच्या मनात जेव्हा या आठवणी उतरल्या तेव्हा तिला वाटलं एकाच आई-बाबांच्या पोटी जन्माला आलो आपण, एकाच अंगणात खेळलो, वाढलो पण शोभाच्या नशिबाने अशी थट्टा का मांडली? पूर्वजन्मीची कर्म, भोग, देणी घेणी हे संकेत खरे आहेत का? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? तो नियंता? ज्याच्या हाती जीवनाची सारी सूत्रं आहेत. शेवटी हेच खरं आपण सारेच पराधीन आहोत, कठपुतळी समान आहोत. ”आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना”

सायली.. ईश्वराने बनवलेलं एक ॲब्सट्रॅक्ट माॅडेल. पण त्यातही मन होतं. भावना होत्या. त्या व्यक्त करण्याची क्षमता नसेल पण त्यांचं अस्तित्व होतं. सायलीच्या खोलीत भैय्यासाहेबांचा फोटो होता. त्या फोटोशी ती गप्पा करायची. असंबद्ध बडबड करायची. शोभाला कुणी बोललं, शोभा रडली तर तिला आवडायचं नाही. ते ती कधी आरडाओरड करुन हातवारे करुन व्यक्त करायची.

तिच्याजवळ एक बाहुली होती. कधी असं वाटायचं त्या बाहुलीत ती स्वत:ची प्रतिमा पाहते. त्या बाहुलीवर ती प्रेमही करायची तर कधी तिचा राग राग करायची. सायलीच्या वागण्याचं हंसुही यायचं आणि करुणाही वाटायची.

शोभाची मृत्यूशी अखेरची झुंज चालू होती. विनय आला होता. शोभाचे दीर— जाऊ आले होते. तेही आता वयस्कर झाले होते! थकले होते. काळ इतका लोटला होता की एक पिढी सरली होती. आता पुढच्या पिढीचे पर्व सुरू होतं.

सगळ्यांपुढे प्रश्न होता शोभानंतर आता सायलीचे काय?

विनय म्हणाला,” सायली सारख्या मुला मुलींची काळजी घेणारी भारतात काही केंद्रं आहेत. तारांगण या संस्थेची माहिती मी काढली आहे.

शोभाचे दीर म्हणाले, “गावाकडची काही पडीक जमीन आम्ही नुकतीच विकली आहे. त्यातून येणाऱ्या पैशांचा आम्ही सायली साठी ट्रस्ट करणार आहोत. सायलीचा संपूर्ण खर्च तिच्या शेवटापर्यंत ट्रस्टमार्फत होईल. ”

शोभाचा शेवटचा क्षण आणि सायलीचे उर्वरित भविष्य हे दोनच विषय सर्वांच्या मनात घोळत होते. या विषयावर जे काही ठरवायचं ते त्यांना नंतर नसतं का पार पाडता आलं? पण कदाचित आज सर्वजण एकत्र आहेत. उद्याचं काय माहित? सारेच विखुरतील.

पण या सगळ्या उहापोहात फक्त विनयच्या लक्षात आलं की सायली कुठेच दिसत नाहीय. गेली कुठे? ती एकटी जिना उतरून कुठेही जात नाही. पण आता या वेळेस ती घरात नाही हे सत्य होतं. मग ती गेली कुठे?

एक वेगळीच धावपळ सुरू झाली. शोधाशोध. रस्तोरस्ती, गल्लोगल्ली, मंडईत, मंदिरात, उद्यानात सर्वत्र. सायली कुठेही सापडली नाही. पोलीस चौकीत तक्रार नोंदवली. तपासचक्रं सुरू झाली.

शोभाचा श्वास मंद होत चालला होता. एकीकडे ताईने मृत्युंजयाचा जप चालवला होता.

॥ ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥ 

आणि दुसरीकडे सायलीची शोधाशोध. मध्यरात्री पोलिसांचा फोन आला.

विनयच हॉस्पिटलमध्ये गेला. पांढर्‍या चादरीत देह गुंडाळला होता.

मखमलीच्या तळ्यात पोलीसांना एक मृतदेह सापडला होता. विनयने चेहऱ्यावरची चादर हळूहळू उचलली.

तो निरागस, निर्विकार, निश्चेष्ट चेहरा सायलीचा होता!

शवविच्छेदनाच्या अहवालात “अपघात”अशी नोंद होती. सापडलेल्या वस्तुंमध्ये सायलीची बाहुली होती. तिचा पार लोळागोळा झाला होता.

त्याच क्षणी अतिदक्षता विभागातून परिचारिकेचा संदेश आला.

“ सॉरी! शी इज नो मोअर. ”

शोभा गेली. मुक्त झाली. शोभाच्या आयुष्यात एकच गोष्ट मनासारखी झाली होती. त्या अनोळच्या जगात शोभा आणि सायलीने हातात हात घालून प्रवेश केला होता.

लोकांसाठी ही जरी शोकांतिका असली तरी शोभाच्या दृष्टीने ही एक तिच्या आयुष्यात घडलेली फार मोठी सुखांतिका होती. तिच्यासाठी असा शेवट सकारात्मक होता. आता तिचा आत्मा मुक्त झाला असेल. नियतीच्या दृष्टीने सायलीने घेतलेला या जगाचा निरोप म्हणजे एक समर्पित दान होतं. तिच्या जन्मदात्रीसाठी.

या इहलोकात प्रश्न एकच होता. का आपण जाणाऱ्याची, त्याच्या मागे उरणार्‍यांची चिंता करतो? याला त्याला, नशिबाला दोष देतो? जर तर करतो? कोणाचा दोष असतो?

दोष ना कुणाचा

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…

– समाप्त –  

©  सौ. राधिका भांडारकर

वाकड, पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पराधीन… भाग – १ + संपादकीय निवेदन – सौ. राधिका भांडारकर – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. राधिका भांडारकर 

💐 अ भि नं द न 💐

‘आम्ही सिद्ध लेखिका संस्था‘ पुणे जिल्हा शाखा यांच्यातर्फे ‘१ मे २०२५ – महाराष्ट्र दिना’ निमित्त घेण्यात आलेल्या कथा स्पर्धेत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री राधिका भांडारकर यांना त्यांच्या “पराधीन” या कथेसाठी प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

आपल्या समूहातर्फे राधिकाताईंचे हार्दिक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.💐

आजच्या व उद्याच्या अंकात वाचूया ही पुरस्कारप्राप्त कथा पराधीन – दोन भागात.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? जीवनरंग ?

☆ पराधीन… भाग – १ ☆ सौ. राधिका भांडारकर

शोभाला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीने प्रयत्न चालू होते. तिच्या हृदयाची क्षमता दहा टक्क्यावर आली होती. मॉनिटरवरच्या आलेखावरून फिरणारा तो हिरवा प्रकाशाचा ठिपका धोक्याच्याच सूचना देत होता. शोभाचे सारे चैतन्यदायी घटक हळूहळू उतरत होते. व्हेंटिलेटर वर असूनही तिला श्वास घेणं प्रचंड त्रासदायक होत होतं आणि तिची छाती जोरजोरात उडत होती.

ताईला कळुन चुकलं होतं की शोभाला आता निरोप द्यायची वेळ आली आहे, या यातनांमधून शोभाला फक्त मृत्यूच सोडवू शकत होता. ताईला हे सत्य पटत होतं पण कितीही झालं तरी धाकट्या बहिणीने आपल्या आधी जावे हे सत्य स्वीकारणे तिला कठीण जात होते. शिवाय शोभाच्या जाण्याने काही नवीन प्रश्न उपस्थित होणार होते ते वेगळेच. सायलीचे काय?

खूप दिवसांपूर्वी शोभा ताईला म्हणाली होती, ” आयुष्यभर देवाने माझ्या पदरात नकारात्मक दानच टाकले. आता मात्र देवाजवळ माझं एकच मागणं आहे. माझं काही बरं वाईट व्हायच्या आधी सायलीने या जगाचा निरोप घ्यावा. कोण करेल ग तिचं? कोण जबाबदारी घेईल तिची? आणि सायली ही माझीच जबाबदारी नाही का? ती मी अशी कशी कुणावर सोपवू शकेन? ”

बोलता बोलता तिला हुंदके आवरत नव्हते.

कोपऱ्यात एका टेबलावर सायली बसली होती. स्वतःशीच हसत होती, काही बडबडत होती. जणू काही आईचं दुःख, तिचं अश्रू गाळणं या साऱ्यांच्या पलीकडे तिचं वेगळं जग होतं.

त्यादिवशी ताईने शोभाला समजावले. मोठ्या बहिणीच्या मायेने तिला जवळ घेतले. पाठीवर थोपटले.

“अग! असं का म्हणतेस आणि तुला कशाला काही होईल? तू असे विचार करू नकोस. शेवटी आपल्या हातात काय आहे? माणूस हा पराधीन आहे. जे ईश्वराच्या मनात असेल तेच घडेल पण एक लक्षात ठेव जो चोच देतो तो चाराही देतो. तू विश्वास आणि श्रद्धा ठेव. ”

भैय्यासाहेब गेल्यानंतर ताई, शोभा आणि सायलीला स्वतःच्या घरी घेऊन आली होती.

“आता तुम्ही इथेच रहा. मीही तर एकटीच असते. विनयला मी सांगितलं आहे आणि त्याची काहीच हरकत नाही. ”

तसं पाहिलं तर सगळ्यांचीच आयुष्यं एकमेकात गुंतलेली. स्वतंत्र तरीही गुंतलेली. काही वर्षांपूर्वीच ताईच्या पतीचे निधन झाले होते. ताईला एकच मुलगा. विनय. तो अमेरिकेत स्थायिक. बाबा गेल्यानंतर ताई काही महिने विनय सोबत अमेरिकेत राहिलीही पण तिने जाणले की असे इथे परदेशात कायम राहणे मानसिक दृष्ट्या तिला शक्य नव्हते. विनयला तिने न दुखवता पटवूनही दिले

खरं म्हणजे जो तो आपापले आयुष्य जगत असतो. टप्प्याटप्प्यावर बदललेल्या आयुष्याची घडी सावरत असतो. पुढे जात असतो. भविष्यात काय घडणार हे कुठे ज्ञात असतं?

भैय्यासाहेब गेले. शोभा आणि सायलीचा आधार ढासळला. तशा त्या अनाथ नव्हत्या, शोभाच्या सासरची माणसं तशी जबाबदार आणि समंजस होती. जरी ती नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने विखुरलेली होती तरी कुणीही सायलीला आणि शोभाला नाकारलं नव्हतं, डावललं नव्हतं. पण ताईने आपणहून शोभाला मदतीचा म्हणण्यापेक्षा मायेचा, अपार विश्वासाचा, आधाराचा हात दिला. त्या दोघींचं एक प्रकारचं केविलवाणेपण ताईच्या काळजाला कुठेतरी चिरून जात होतं.

तेव्हापासून ताई, शोभा आणि सायली यांचं एकत्र जीवन सुरू झालं.

सोपं नव्हतं. प्रत्येकाचे आपापल्या आयुष्याचे कम्फर्ट झोन होतेच. आता एका निराळ्या समूहात आयुष्याची नवी सुरुवात करताना त्रास हा होणारच होता. शिवाय सायलीची स्वमग्नता हा त्यातला सर्वात दुबळा भाग होता. शोभाला सायलीची सवय झालेली होती. तिच्या वागण्या बोलण्यातला विचित्रपणा, तिचे कधी घसरणारे तर कधी प्रखर झालेले मानसिक कल, शोभाला सायलीच्या जन्मापासून तसे अंगवळणी पडले होते. आणि शेवटी शोभा एक “आई” होती. सायली तिच्या रक्तामांसाचा गोळा होता.

मावशी या नात्याने ताईला सुद्धा सायलीचा ऑटिझम ज्ञात होताच पण दूर असणं आणि सहवासात राहणं यात खूप फरक होता.

सायलीला तिच्या कुठल्याही वस्तुंना हात लावलेला चालत नसे. तिचे कपडे, तिच्या वस्तू, चपला अगदी केसाला लावायच्या पिना सुद्धा कोणी जागेवरून हलवल्या तर ती प्रचंड क्रोधित व्हायची. तिला सतत टीव्ही लागायचा. तिने लावलेला चॅनल कोणीही बदलायचा नाही. आवाज सहन न झाल्यामुळे तिला न विचारता जर टीव्ही बंद केला तर तिचा पारा चढायचा. शेवटी ती असाधारण आहे, वेगळी आहे, तिला कळत नाही, विचार करण्याची क्षमता तिच्यात नाही असा विचार करून, सायलीलाच केंद्रस्थानी ठेवून सारे व्यवहार करणं क्रमप्राप्त होतं.

एक दिवस ताई शोभाला म्हणाली,

“शोभा चूक तुझी आहे. अगं! अशा मुलांसाठी वेगळ्या शाळा असतात तिथे का नाही तू तिला घातलेस? तिथे ती काही शिकली असती. वेळीच तुम्ही दोघांनी हा विचार का नाही केला? ”

“ताई तिच्यासाठी जे जे करता येईल ते सगळं आम्ही केलं होतं ग! तिच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणून आम्ही दुसऱ्या मुलाचाही विचार केला नाही पण नशिबाचे फासे उलटेच पडले. ”

शोभाचा आवाज रडवेला होत गेला, डोळे वहायला लागले.

सायली भिंतीला टेकून ताठ उभी होती, तिचे डोळे वटारलेले होते. चेहऱ्यावर विचित्र भाव होते. तिला पाहताच ताईने संवाद तोडला. विषय बदलला.

ताईला का माहित नव्हत्या शोभाच्या आयुष्यातल्या घडलेल्या घटना?

भैय्यासाहेबांना लोकल गाडीत चढताना झालेला तो भयाण, जीवघेणा अपघात! त्यातून ते वाचले तरीही पूर्ववत कधीच झाले नाहीत. कायमचे अपंगत्व आले, नोकरी सोडावी लागली.

थोडीफार सेव्हींग्ज, साचलेले प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे, घरून शेतीतून येणाऱ्या उत्पन्नाचा हिस्सा आणि पुढे उरलेलं लांबलचक आयुष्य.

शोभा साठी तर साराच अंधार होता. स्वमग्न सायली आणि अपंग नवरा.

देव एकाच माणसाला इतकी दुःखं का देतो?

– क्रमशः भाग पहिला 

©  सौ. राधिका भांडारकर

वाकड, पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाणी… भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

 

? जीवनरंग ?

☆ पाणी… भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(देवबा नातवांकडे आला. थंड पाण्याची बाटली पाहून नातवंडही आनंदली. त्यांनी झडप घालूनच बाटली हिसकावून घेतली आणि तोंडाला लावली. देवबानेही दुसरी बाटली उघडली आणि आपला कासावीस झालेला जीव शांत केला.) – इथून पुढे —-

पॅसेंजर आली. प्रचंड गर्दी होती पण दाटीवाटीने का होईना देवबा आणि त्याच्या नातवांना बसायला जागा मिळाली. खिडकीतून उतरतीचं ऊन अंगावर येत होतं. छताचा पंखा मोठमोठ्याने आवाज करत गरम हवा फेकत होता. दोनतीन स्टेशन्स गेली असावीत देवबाला परत तहान लागल्यासारखं वाटू लागलं. या बाटलीतल्या पाण्याने तहान शमत नाही वारंवार लागते हे त्याच्या लक्षात आलं. आता विहिरीचं पाणी प्यायलो असतो तर दोन तास तरी तहान लागली नसती. त्याने मनाला आवर घातला. असं जर वारंवार पाणी प्यायलो तर भुसावळ येण्याच्या आधीच पाणी संपेल आणि मग ते विकत घेण्याशिवाय पर्याय रहाणार नाही हे त्याला पक्कं ठाऊक होतं. आणि पाण्यासाठी पैसे खर्च करण्याइतका तो नक्कीच श्रीमंत नव्हता. त्याच्याकडे आता फक्त दोनशे रुपये होते. भुसावळला उतरलं की मुलीच्या घरी नेण्यासाठी काहीतरी खाऊ घेणं, तिच्या घरापर्यंत रिक्षाला लागणारं भाडं, भुसावळ ते मुर्तिजापूर पॅसेंजरचं भाडं, मुर्तिजापूरहून त्याच्या गावाला लागणारं एस. टी. चं भाडं यात ते दोनशे रुपये संपून जाणार होते. देवबा गरीब असला तरी स्वाभिमानी होता. जावयाकडे कधीच त्याने एक रुपयाही मागितला नव्हता आणि आताही त्याच्यापुढे हात पसरणं त्याला कधीच आवडलं नसतं.

“आबा पाणी ” नातू म्हणाला तशी पिशवीतून एक बाटली काढून त्याच्या हातात देत तो म्हणाला

” दादू आता घोट घोट पाणी पीजो रे भाऊ. नंतर कुठंबी पाणी मिळणार नाही ” 

नातवाने मान डोलावली आणि बाटली तोंडाला लावली. घोट घोट कसलं घटाघटा पाणी पिऊन त्याने ती अर्धी संपवली. त्याचं झाल्यावर नातीने उरलीसुरली बाटलीही संपवून टाकली. देवबाने कपाळावर हात मारुन घेतला. खरं म्हणजे त्यांना पाणी पितांना पाहून त्यालासुध्दा पाणी प्यायची तिव्र इच्छा होत होती. पण कसंबसं त्याने इच्छेला दाबून टाकलं.

शेगांव आलं तसा कचोरीवाला डब्यात शिरला. “गरम कचोरी, दसमें तीन, दसमे तीन” त्याच्या सोबतच कचोऱ्यांचा खमंग वास डब्यात शिरला. पोरं आता भुकेली झाली असतील त्यांना कचोरी घेऊन द्यावी का? असा विचार त्याच्या मनात आला खरा पण आपल्याजवळ फक्त दोनशे रुपये आहेत याच्या जाणीवेने तो चुप बसला.

” आबा मले कचोरी “नात म्हणाली. आता नातू चुप थोडीच बसणार होता.

“आबा मलेबी कचोरी” 

कचोरीवाला आला तसं देवबाने नाईलाजाने त्याच्याकडून दहा रुपये देऊन तीन कचोऱ्या घेतल्या. तीनही कचोऱ्या त्याने नातीच्या हातात दिल्या. तिने एक भावाला देऊन एक स्वतःकरता ठेवली आणि तिसरी कचोरी देवबासमोर धरली.

“आबा कचोरी” तिचा समजुतदारपणा पाहून देवबाला हसू आलं. त्याने तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवला.

” दादूला देजो बेटा. नाहीतर तुम्ही दोघं अर्धीअर्धी खाऊन घेजा” कचोरी परत करत देवबा म्हणाला. पोरांनी कचोऱ्या खाल्ल्या आणि शेवटच्या बाटलीतलं पाणी अर्ध संपवून टाकलं. नाही म्हणता देवबानेच पाणी अर्ध असतांना त्यांच्या हातातून बाटली हिसकावून घेतली.

गाडीने नांदूरा सोडलं तसा देवबा बसल्याबसल्या पेंगायला लागला. खुमगांव बुर्ती गेलं तशी त्याला कसल्याशा आवाजाने जाग आली. एका लहान पोराचा तो रडण्याचा आवाज होता. त्याने डोळे उघडून पाहिलं तर एका भिकारणीच्या कडेवरचं पोरगं किंचाळत होतं.

“देरे दादा थोडं पाणी, पोरगं लई कावरंबावरं झालंय तहानेनं. देरे दादा, देवं माय. लई पुण्य मिळेल दादा” 

भिकारीण गयावया करत होती. लोकांसमोर हात पसरत होती.

देवबाने समोरच्या प्रवाशांकडे पाहिलं, कुणीच पाणी द्यायला तयार दिसेना. उलट लोक आपापल्या बाटल्या लपवत होते. आणि तेही चुकीचं नव्हतं. या प्रचंड उष्म्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य असतांना कोणं त्या भिकारणीला पाणी देणार होतं?

” बाबा दे रे पाणी पोऱ्याले” ती भिकारीण देवबाकडे पहात म्हणाली. देवबाला त्या पोराचं रडणं सहन होईना. न रहावून त्याने पिशवीतली बाटली काढली. पण हाय रे दैवा. बाटली खिडकीतून येणाऱ्या उन्हाने गरम झाली होती. ते गरम पाणी द्यायला देवबाला बरं वाटेना. तेवढ्यात “पानी बोतल “चा आवाज डब्यात घुमला. आणि पुढच्याच क्षणाला पाणी बोतलवाला समोर उभा राहिला.

“कित्येकी है बोतल? ” देवबाने विचारलं

” पच्चीसकी”

“बाहर तो बीस की मिलती है “

” स्टेशनपे मिलती होगी, गाडीमें पच्चीसकी है. दू? “

देवबा अडखळला. पंचवीस रुपये जास्तच होते. पाणी विकणाऱ्याचा त्याला संताप आला. भिकारणीने त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहिलं. तिच्याकडेवरचं पोरगं रडतच होतं. भिकारणीच्या उजव्या बाजुला त्याच्या नातीच्याच वयाची पोरगी उभी होती. तहानेने तिचाही चेहरा कासावीस झालेला दिसत होता. त्याने निर्णय घेतला.

” दो. एक दो ” खिशातून शंभरची नोट काढून त्याने पाणीवाल्याला दिली. पाणी वाल्याने एक बाटली काढून भिकारणीच्या हातात दिली. लगेच तिने झाकण उघडून कडेवरच्या पोराच्या तोंडाला लावली. तहानलेलं पोरगं घटाघटा पाणी पिऊ लागलं. देवबाच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू पसरलं.

” आबा आपल्यालेबी बाटली घेजो” नात म्हणाली तसा देवबा पाणीवाल्याला म्हणाला

“और एक बोतल दे दो”

भिकारणीच्या कडेवरच्या पोराने अर्ध्याच्या वर बाटली संपवली मगच ते शांत झालं. मग तिच्या पोरीने बाटली घेतली आणि उरलंसुरलं पाणी पिऊन टाकलं.

” अजून एक बोटल दे रे बाबा. मलेबी लई तहान लागलीये “

देवबाने विचार केला आणि पाणीवाल्याला अजून एक बाटली भिकारणीला द्यायला सांगितली

” बाबा कहाँ जा रहे हो ” पाणीवाल्याने देवबाला विचारलं

“भुसावल”

“तो और एक ले लो ना. भुसावल आठ बजे पहुचेगी गाडी. साथमे बच्चे है, एक बोतलसे थोडेही काम चलेगा! “

तो बरोबर म्हणतोय हे देवबाच्या लक्षात आलं पण फक्त पाण्यासाठी शंभर रुपये खर्च करायचं त्याला मानवत नव्हतं. पण पुढे पाणी नाही मिळालं तर?

“दे दू बाबा? “

देवबाला काय उत्तर द्यावं ते कळेना.

” हां देऊन टाका ” नात मध्येच म्हणाली तशी देवबाच्या उत्तराची वाट न बघता पाणीवाल्याने बाटली देवबाच्या नातीच्या हातात दिली आणि तो निघून गेला. देवबाने खिशातून पैसे काढून पाहिले. फक्त नव्वद रुपये उरले होते. पुढच्या खर्चाचं गणित कसं सोडवावं हे त्याला कळेना. पण तेवढ्यात त्याला भिकारणीच्या पोराचा पाणी पिऊन तृप्त झालेला चेहरा आठवला आणि त्याच्या मनातली रुखरुख कमी झाली.

मलकापूर गेलं. गाडीतली गर्दी आता कमी झाली होती. सहा वाजत आले होते. जीवाची लाहीलाही करणारा उष्मा आता कमी झाला होता. देवबा विचार करत होता. आता नव्वद रुपयात काहीच होणार नव्हतं. जावयाकडे पैसे मागावेच लागणार होते. जावई श्रीमंत नसला तरी देवबाला पाचशे रुपये सहज देऊ शकला असता. ‘ ठिक आहे मनाला पटत नसलं तरी मागू. आजपर्यंत कधी मागितले नव्हते आता मागू. पोरीला शरमल्यासारखं होईल. तिला समजावून सांगता येईल. आणि आपण तर फक्त उसने मागणार आहोत. घरी गेलो की पाठवून देऊ परत ते पैसे. पण आज जे मनाला समाधान मिळालं ते काय कमी होतं? ‘

“बाबा हे घे तुह्ये पैसे”

त्याने चमकून वर पाहिलं. मघाची भिकारीण समोर उभी होती. तिच्या समोर पसरलेल्या हातात एक, दोन, पाच रुपयाची नाणी होती. देवबा आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिला. भिकाऱ्याने दिलेली भिक सन्मानाने परत करावी हे तो आयुष्यात पहिल्यांदाच बघत होता.

” नको नको. राहू दे”

” बाबा तुबी काय पैसेवाला दिसत नाही. पण तुले माणुसकी हाये. घे. भीक मागून जमा केलेत”

देवबाला काय करावं सुचेना. ते पन्नास रुपये घेऊनही त्याला पैसे मागावेच लागणार होते. पण त्याच्यासारख्या फाटक्या शेतकऱ्याला ते पन्नास रुपयेही कमी नव्हते. त्याची नजर आता समोर बसलेल्या आपल्या नातवाकडे गेली आणि तो भिकारणीला म्हणाला

” राहू दे बेटा. नातवांना पाणी पाजण्याचे कुणी पैसे घेतं का? “

” लय मोठ्या मनाचा हाये बाबा तू. देव भलं करो तुह्यं”

ती निघून गेली तसा देवबा हसला. भिकाऱ्याच्या आशिर्वादाने तो मालामाल होणार नाही हे त्यालाही माहित होतं. पण त्या आशिर्वादामागची खरी भावना त्याच्या ह्रदयाला भिडली होती.

रात्री आठ वाजता तो भुसावळला उतरला. स्टेशनच्या बाहेर येऊन त्याने मुलीसाठी पन्नास रुपयाचं फरसाण घेतलं. तिच्या घरी जाण्यासाठी त्याने रिक्षा थांबवली. रिक्षावाल्याला पत्ता सांगितला

” चाळीस रुपये ” रिक्षावाला म्हणाला

देवबा हसला. थोड्याच वेळात तो कफल्लक होणार होता. पण का कुणास ठाऊक त्याला काळजी वाटत नव्हती. दिवसभरातल्या माणुसकी आणि कृतज्ञेच्या प्रसंगांनी त्याचं मन भरुन गेलं होतं

– समाप्त –

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाणी… भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

 

? जीवनरंग ?

☆ पाणी… भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

तिकीट काढून देवबा मुर्तिजापूरच्या स्टेशनमध्ये घामाघूम होत शिरला तेव्हा दुपारचे तीन वाजून गेले होते. मे महिन्याची ती दुपार. हवेत भयंकर उष्मा होता. अंगाची लाहीलाही होत होती. प्लॅटफाॅर्मवरच्या बाकावर त्याने नातवांना बसवलं. गर्मीमुळे त्यांचेही चेहरे सुकून गेले होते. भुसावळकडे जाणारी पॅसेंजर लेट झाली होती आणि तिला यायला अजून अर्धा तास अवकाश होता. थोडं पाणी प्यावं म्हणून त्याने पिशवीतली बाटली काढली तर ती रिकामी. ती ठेवून त्याने दुसरी बाटली काढली तर तीही रिकामीच. चमकून त्याने दहा वर्षाच्या नातीकडे पाहिलं तशी ती म्हणाली

” दादूने पिऊन टाकलं सगळं पाणी “

त्याने रागाने नातवाकडे पाहून विचारलं

“व्हय रं बेटा? “

नातवाने निरागसपणे मान डोलावली. त्याच्या चेहऱ्यावर केविलवाणे भाव उमटले. आजोबा आता मारतो की काय अशी भिती दाटून आली. देवबा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून वरमला. त्याचा स्वतःचाच जीव तहानेने कासावीस होत होता. ही तर लहान मुलं होती. बसमध्ये देवबाचा डोळा लागलेला असतांना दोघा मुलांनी पाण्याचा थेंब न थेंब संपवून टाकला होता. त्यांच्यावर रागावून काहीच फायदा नव्हता. देवबाने रिकाम्या बाटल्या घेतल्या आणि तो प्लॅटफाॅर्मवर पाण्याचा शोध घेऊ लागला. पण एकाही नळाला थेंबभरही पाणी नव्हतं. त्याने समोरच्या प्लॅटफाॅर्मवर नजर टाकली. तिथल्या नळांनाही पाणी दिसत नव्हतं. स्टेशनमास्तरच्या ऑफिससमोर उभ्या असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला त्याने विचारलं

” बाबूजी पाणी हाये का कुठं? लेकरासाठी पाहिजे हुतं “

कर्मचाऱ्याने त्याला वरपासून खाली बघितलं आणि म्हणाला

” बाबा मागल्या वर्षी पाणी पडलं होतं का? “

देवबाने नकारार्थी मान हलवली

” मंग कसं राहिन पाणी? आम्हांलेबी इथे प्यायले पाणी नाही. तुले कुठून दिवू? आमीबी बाहेरुन मागवतो. जाय त्या कॅन्टीनमधी लागो तितकं पाणी हाये” कँटीनकडे हात दाखवत तो म्हणाला. देवबा मोठ्या आशेने तिकडे गेला.

” बाबू पाणी हाये का? “

कॅन्टीनमधल्या माणसाने पटकन फ्रिजमधून पाण्याची बाटली काढून त्याच्यासमोर ठेवली

“बीस रुपया”

” बीस रुपये? नाय. मले लेकरांसाठी थोडंसंच पाणी… “

त्या माणसाने ताबडतोब बाटली उचलून फ्रिजमध्ये ठेवली.

“खुल्ला नही है पानी बाबा. बाहर जाओ, हाॅटलमें मिल जायेगा”

जिन्याने देवबा बाहेर आला. रोडावरच्या हाॅटेलमध्ये त्याने बाटली दाखवत पाणी मागितलं

” बाबा चाय पिना है तो पिलो. पानी नही मिलेगा. बोतल दे दू? बीस रुपयेकी है ” हाॅटेलमालकाने विचारलं.

देवबाने नकारार्थी मान हलवली आणि तो दुसऱ्या हाॅटेलवर गेला. तिथून तिसऱ्या. चहाच्या टपऱ्याही त्याने सोडल्या नाहीत. पण कुणीच त्याला पाणी दिलं नाही. बाटली विकत घ्यावी का असा प्रश्न त्याला पडला. पण त्यासाठी वीस रुपये खर्च करणं त्याच्या जीवावर येत होतं. देवबा म्हणजे शेतकरी माणूस. दोन एकरच्या कोरडवाहू शेतीचा मालक. शेजारच्या शेतातल्या विहिरीचं पाणी विकत घेऊन तो आपली शेती करायचा. मागच्या वर्षी पावसाने डोळे वटारले, धरणातलं, नद्यानाल्यातलं, जमीनीतलं पाणी सुकलं तशी ती विहिरही कोरडी पडली. निवडणुका आल्या की पाणीपुरवठ्याच्या योजनांच्या घोषणांचा पाऊस पडायचा पण मंत्रालयात जाहीर झालेला निधी सरपंचापर्यंत येतायेताच संपून जायचा. उन्हाळा आला की टॅंकर लाॅबी सक्रिय व्हायची. त्यात सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षनेतेही आपले खिसे भरगच्च भरुन घ्यायचे. गावं मात्र तहानलेलीच रहायची. कुणालाही निवडून द्या आपल्या नशिबात पाण्यासाठी मरमरच आहे हे सत्य गावाने आता स्विकारलं होतं. अर्थात देवबालाही हे माहीत झालं होतं. पाण्याचा तुटवडा झाला की तो दुसऱ्याच्या शेतावर जाऊन मजुरी करायचा. त्यातून त्याच्या पदरी दोन मुली, मुलगा नव्हता. कष्टाची आणि काटकसरीची देवबाला आणि त्याच्या बायकोला कायमची सवय जडली होती. मुलींच्या लग्नाचं त्याच्याही डोक्यावर कर्ज होतंच. पण मुली सासरी सुखाने नांदताहेत हीच त्याच्यासाठी समाधानाची बाब होती. शाळांना सुट्या लागल्या तसं भुसावळला रहाणाऱ्या धाकट्या मुलीने आपल्या मुलांना देवबाकडे सोडलं होतं. मुलांना गावात करमेनासं झालं म्हणून देवबा त्यांना भुसावळला सोडायला चालला होता. खरं तर देवबालाही त्यांनी रहावं असं वाटत नव्हतं. पाण्याचा प्रश्न बिकट झालेला. दहादहा दिवस पाण्याचा टँकर गावात यायचा नाही. आला की त्यावर मरणाची गर्दी व्हायची. दोन चार हंडे मिळाले की टँकर संपून जायचा. तेच मिळालेलं पाणी जपून वापरावं लागायचं. त्यातून नातवंडं दिवसभर पाणी मागत रहायची. मग देवबा सायकलवरुन

आठ किलोमिटरवरच्या ओळखीच्या शेतकऱ्याकडून विकत पाणी आणायचा. पण आता त्याचं वय झालं होतं. तेवढ्या श्रमाने तो प्रचंड थकून जायचा.

तो रिकाम्या बाटल्या घेऊन स्टेशनवर परतला. तहानेने त्याचाही जीव कासावीस झाला होता. नातवांजवळ तो आला तसं नातीने त्याला विचारलं

“आबा पाणी नाय मिळालं? दादू परत पाणीपाणी करतोय. मलेबी तहान लागलीये”

दोन्ही नातवांचा रडवेला चेहरा पाहून पाणी कुठून तरी आणावंच लागेल या विचाराने देवबा उठला. तेवढ्यात त्याची नजर थोड्याच अंतरावर बसलेल्या कुटुंबाकडे गेली. साताठ जणांच्या घोळक्यात एक मोठा वीस लिटरचा जार त्याला दिसला. पण त्या लोकांच्या कपड्यावरुन ते मोठ्या घरातील लोक आहेत हे देवबाला समजत होतं. कुठल्यातरी एक्स्प्रेस गाडीची ते वाट बघत असावेत. त्यांना पाणी मागणं देवबाला उचित वाटेना. ते नाहीच म्हणणार हे नक्की होतं. सध्या कोण कुणाला पाणी देतंय त्यातून देवबा असा फाटका शेतकरी माणूस. समोर उभं तरी करतील की नाही देव जाणे.

“आबा पाणी पाहिजे” नातवाने त्याच्या हाताला स्पर्श करुन सांगितलं. त्याने नातवाकडे पाहिलं तर तोही त्या जारकडे बोट दाखवत होता. आता हिंमत दाखवावीच लागणार होती. त्याने एक बाटली पिशवीत टाकली आणि एक बाटली घेऊन तो तिकडे गेला. ती माणसं काहीतरी इंग्रजीयुक्त मराठीत बोलत होती. देवबाला तिथून पळून जावंसं वाटू लागलं. तो घुटमळला आणि परत नातवांकडे जायला निघाला. पण पाणी तर नेणं आवश्यकच होतं. काय करावं त्याला सुचेना

“काय बाबा काय पाहिजे? “कुणीतरी विचारलं

” दादा जरा पाणी पाहिजे हुतं. लेकरं लय तहानलीयेत” 

तो एका माणसाला म्हणाला. तसे सगळेजण एकमेकांकडे बघायला लागले. त्यांचंही बरोबरच होतं. अशा भयंकर उष्म्यात आपलं पाणी दुसऱ्याला देणं म्हणजे स्वतःवर नामुष्की ओढवून घेण्यासारखंच होतं.

” अरे तिथे कँटीनमध्ये लागो तितक्या पाण्याच्या बाटल्या मिळतात. तिथून घ्या ना ” एक बाई चिडून म्हणाली

” बाबा हे पाणी आमचं स्पेशल पाणी आहे. उकळून थंड केलेलं. ते आम्हांलाच पुरणार नाही. तुम्हांला कसं देणार? “

एक माणूस म्हणाला तसा अवघडून देवबा परत जाण्यासाठी वळला.

” थांबा बाबा” 

देवबाने पाहिलं मध्यभागी बसलेला एक शेठजीसारखा माणूस त्याच्याकडेच बघत होता. देवबा थांबला तसा तो इतरांकडे बघत तो म्हणाला

“अरे पाणी विकत घेण्यासारखी बाबांची परीस्थिती असती तर ते आपल्याकडे पाणी मागायला आले असते का? आणि तहानलेल्याला पाणी पाजण्याइतकं पुण्य दुसरं नाही. बाबा किती जण आहात तुम्ही? “

” तीन जण “तीन बोटं दाखवत देवबा म्हणाला. त्या माणसाने खिशातून शंभरची नोट काढून एका तरुण मुलाला दिली आणि म्हणाला

“जा. बाबांना त्या कँटीनमधून तीन पाण्याच्या बाटल्या घेऊन दे”

देवबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. आंधळा मागतो एक देव देतो दोन अशी त्याची मनःस्थिती झाली. तो त्या तरुण मुलासोबत कँटीनकडे गेला. मुलाने थंड पाण्याच्या तीन बाटल्या त्याला विकत घेऊन दिल्या.

” दादा लय उपकार झाले”

देवबा म्हणाला तसा तो मुलगा समाधानाने हसला. देवबा नातवांकडे आला. थंड पाण्याची बाटली पाहून नातवंडही आनंदली. त्यांनी झडप घालूनच बाटली हिसकावून घेतली आणि तोंडाला लावली. देवबानेही दुसरी बाटली उघडली आणि आपला कासावीस झालेला जीव शांत केला.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोगऱ्याची वेणी – ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ मोगऱ्याची वेणी — ☆ श्री प्रदीप केळूसकर

सुमती चाळीतील आपल्या बिऱ्हाडी आली.. दार बंद करताना तिची नजर समोरील अलिशान बंगल्यातील स्त्रीवर पडली. चेहेऱ्यावर हलकस हसू आणत सुमतीने आपल्या चाळीतील घराचा पुढचा दरवाजा बंद केला.

समोरच्या बंगल्यातील ती सुंदर बाई तिला बऱ्याचवेळा दिसायची. या कॉलनीत एका रस्त्याच्या एका बाजूला चाळी होत्या आणि विरुद्ध बाजूला अलिशान बंगले होते. सुमतीची तळमजल्या वरची जागा, तिच्या बरोबर समोर हा मुजुमदार यांचा बंगला. बंगल्याच्या पोर्च मध्ये त्यान्च्या पाच सहा अलिशान गाड्या दिसायच्या. चार पाच नोकर घरात दिसायचे.. शिवाय ड्रायव्हर होतेच. मुजुमदार हे मोठे उद्योगपती. त्त्यांचे मीरा भाईंदर भागात मोठे रेडिमेड कपडाचे युनिट होते आणि बांद्रा दादर मध्ये शोरूम्स.

अर्थात हे तिला तिच्या नवऱ्याने अमितने सांगितलेले. तिचे लहानपण कोकणात गेलेले, माहेरी गरिबी, मोन्टेसरिचा कोर्स केल्याने मुंबईत लग्नानंतर तिला मोन्टेसरीत नोकरीं लागलेली. नवरा अमित ठाण्याला वागळे इस्टेट मध्ये एका औषध कंपनीत. ती सकाळी सातला घराबाहेर पडायची, त्याच्या आधी जेवणाचे डबे करुंन जाई.. नवरा अमित नऊ वाजता डबा घेऊन बाहेर पडे. तिची शाळा सुटली म्हणजे ती बारापर्यत घरी येई.

दुपारी बारानंतर ती एकटीच असायची. जेऊन झाले की रेडिओ लावायची.. बातम्या.. हिंदी गाणी ऐकायची. आजूबाजूला बऱ्याच जणांनी टीव्ही घेतले होते पण त्यानी अजून घेतला नव्हता.. तसे दोघांचे पगार कमी होते आणि अमितच्या घरी पैसे पाठविणे आवश्यक होते.

सुमतीला आपल्या समोरच्या बंगल्यातील स्त्रीचे कौतुक वाटे. सकाळी ती शॉर्टपॅन्ट घालून खेळायला जाई.. कधी ड्रायव्हरसह बाहेर जाई किंवा मस्त कपडे घालून गार्डनमध्ये बसलेली असे. आजूबाजूला नोकरवर्ग फिरत असे. मुजुमदार कवचितच दिसत. बऱ्याचवेळा रात्रीची ती दोघे बहुतेक पार्ट्याना जात. उशिरा घरी येत.

अशीच एका सोमवारी ती नेहेमीप्रमाणे शाळेतून आली आणि खोलीचा दरवाजा उघडता उघडता समोरच्या बंगल्यातील कुत्री मागाहून तिची साडी ओढू लागली, दचकून तिने मागे पाहिले तर कुत्री आणि तिच्यापाठोपाठ एक नोकर धावत आला.. त्या नोकराने ती कुत्री उचलली एव्हड्यात समोरची मालकीण पण गेटकडे आली. तिच्याकडे पहात म्हणाली 

“कुछ तक्लीफ नही हुई ना..

“नही तो..

“आवो ना.. घर. शरबत लेते हॆ..

“नहीं.. नही..

“आवो ना.. हमेशा देखती हूं सामने.

मगर पहचान नही..

तिच्या परतपरतच्या आग्रहाने सुमती त्या बंगल्याच्या गेटमधून आत गेली. तिने सुमतीला हॉलमध्ये नेलं.. त्या हॉलमधील श्रीमंती पाहून ती चाट पडली.. महागडे झुंबर.. गालीचे.. फार्निचर.. पेंटिंग्स. नोकर..

“बैठो.. क्या नाम तुम्हारा..

“सुमती..

” मै साधना.. साधना मुजुमदार.. हमारे गारमेंट्स के युनिट्स है और शो रूम्स है.

“हा.. मेरे पतीने बोला है मुझे..

“क्या करते है तेरे पती? नौकरी करते है क्या?

“हा.. ठाणामे एक कारखानामे..

“और तुम?

“मै टीचर हूं.

“मै देखती हूं, तुम पुरा दिन काम करती हूं.. कोई नौकरांनी नही है क्या?

“नही.. हमारे इतमी कम सॅलरी मे..

” कितना कमाते हो तुम दोनो मिलके?

“पचीस हजार..

“बस.. इतनही.. कैसा मॅनेज कर लेते हो तुमलोग..

“नौकरीमे कितना मिलेगा.. नया नया नौकरी है.. और गाव भेजना पडता है… इनके घर..

“मेरे हजबन्ट मुझे पाच लाख देते है.. लेकिन वो भी मुझे कम लगते हैं.. हर चार दिन पार्टी होती हैं.. पिकनिक्स हॆ.. मॉल पर्चेसे है..

“तुम्हारे बच्चे..

“हमने डून के स्कुल रखें है उन्हे..

“ठीक आहे.. मी जाते..

“ऐसी कैसी जायेगी.. कुछ लेना पडेगा.. क्या लेगी.. चाय कॉफी.. कोल्ड..

“नको. जाते मी.. जेवायचय..

“लेकिन लेना तो पडेगा.. पहली मुलाकतं तुम्हारी..

“कुछ कोल्ड.. औरंज ज्युस..

बाजूलाच उभा असलेला नोकर चटकन आत गेला आणि मस्त ग्लासात ज्यूस घेऊन आला. ज्युस पिता पिता साधना म्हणाली

“ये देखो सुमती.. थोडे पैसे मे कभी खूष नही होनेका.. खूशीके लिये पैसा चाहिये.. और वो आस्मानसे नही गिरेगा.. हजबंटको बोलो पैसा कमावो.. ये वीस तीस हजारमे कुछ नही होता..

“चलते मी..

म्हणत सुमती आपल्या घरी आली.

सुमतीने जेवण गरम केल आणि जेवायला बसली.. पण आज तिच्या डोक्यात साधना होती.. तिची वाक्ये परत परत तिला ऐकू येत होती..

“तुम्हारे घरमे नौकरांनी नही हॆ क्या? अकेली कितना काम करेगी.

“ये देखो सुमती,.. हजबंटको बोलो पैसा कमावो.. ये वीसतीस हजार मे कुछ नही होता ‘…..

 तिच्या मनाची कुतरओढ होत होती… जन्मापासून कोकणात लहान गावात.. वडिलांचे लहानसे हॉटेल.. त्यात काय होणार? पेज घेऊन दिवस काढले. लग्नानंतर या चाळीत.. आज श्रीमंती काय असते आणि वैभव काय असते ते पाहिले. असले वैभव आपल्या नशिबात नाही.. साधना नशीबवान.. किती गाड्या त्यापण परदेशी.. नोकरचाकर.. क्लब्स, पार्ट्या.. पिकनिक्स.. परदेशी ट्रिप्स.. मुले डूनच्या शाळेत..

साधना म्हणते ते खरे, अमित कसली नोकरीं करतो? असली नोकरीं करून कधी सुखसोयी मिळतील काय? अजून घरात टीव्ही नाही.. कोण कामाला ठेवलं तर परवडत नाही.. अमितने धडपड करायला हवी.. धंदा करायला हवा..

विचार करता करता पाच वाजले.. आता सहा वाजता अमित यायची वेळ झाली.. त्याआधी रात्रीचे जेवण.. उद्याच्या डब्याची तयारी.. भाजी मोडून ठेवायला हवी.. दळण चक्कीवार द्यायला हवं.. कपडे धुवायला हवेत.. एक का दोन.. हजार कामे.

साडेसहा वाजता अमित आला. रोज अमित आला की ती चहा करायची… मग चहा घेताघेता गप्पा दिवस भराच्या.. तो कंपनीतील गमतीजमती सांगे.. ती ऐके.. मग ती शाळेतील गोष्टी सांगे.. हा वेळ त्त्यांचा छान जायचा.

आज अमित आला तरी सुमतीने लक्ष दिले नाही.. ती पीठ चाळीत बसली. ती गप्प आणि दमलेली पाहून अमित म्हणाला..

“आज दमलीस की काय?

चिडून सुमती म्हणाली..

” एकटे माणूस दमणार नाही काय? अमितच्या लक्षात आले.. सुमती खरेच दमली आहे नाहीतर ती चिडणारी नाही..

“खरे आहे.. तुला एकटीला खुप काम पडते.. नोकरीं करून घरातील सर्व.. आपण एखादी बाई बघू तूझ्या मदतीला… “

“बाई परवडणार आहे का आपल्याला? आपले पगार ते किती?

अमितच्या लक्षात आले, सुमती खरोखर चिडली आहे आज.. नाहीतर या आधी ती अशी कधी बोललेली नाही..

“होय.. खरे आहे.. पगार काय एकदम वाढत नाही.. पण खर्च कमी करू शकतो आपण.. मी माझे खर्च कमी करतो.. म्हणजे कंपनीतील चहा बंद.. कपडे बाहेर इस्त्रीला देणे बंद.. रिक्षा बंद.. दाढी बाहेर करणे बंद.. कधी कधी मित्रासमवेत एखादी बिअर व्हायची ती बंद.. नवीन कपडे बंद. असे पैसे वाचवले की घरकामला बाई ठेऊ शकतो आपण.. नव्हे ठेऊयाच.. तू आजूबाजूला येणाऱ्या बाईकडे लक्ष ठेव आणि तिला यायला सांग.

सुमतीच्या मनात आले.. आपल्या साठी आपले छोटे मोठे खर्च बंद करू शकणारा आपला नवरा साधा आहे बिचारा.. कधी आवाज वाढवून बोलणार नाही… आपण त्याच्यावर उगाच चिडलो.

रात्री जेवताना तिने नवऱ्याला मुजुमदार यांच्या घरी गेल्याचे सांगितले आणि त्यान्च्या वैभवाचे आणि साधनाचे वर्णन केले

रोज सारखी तिला झोप येईना.. तिच्या डोळ्यासमोर मुजुमदरांचा बंगला.. गाड्या.. उंची फार्निचर येत राहिले. हिऱ्याच्या अंगठ्या घातलेली आणि फलांचा ज्युस पिणारी साधना दिसत राहिली.. मॅसिडिझ गाडीतून फिरणारे मुजुमदार दिसू लागले..

दुसऱ्या दिवशी तिचे शाळेत लक्ष लागेना.. जेवण गोड लागेना.. कसले काम करावेसे वाटेना.

अमितच्या लक्षात आले.. सुमतीने मुजुमदरांचा बंगला पाहिला त्या पासून ती अस्वस्थ आहे.. कदाचित तशी श्रीमंती तिला हवी असेल.. पण आपल्या पगारात तिला कसली सुखे देणार?

शनिवारी अमित लवकर घरी आला.. तिला म्हणाला

“चल, आज थोडे फिरून येऊ.. नवीन पार्क झाला आहे.. तो पाहू.. बाहेरच जेऊ.

ती पण खूष झाली… किती दिवसात गाडीने नाहीच पण पायी पण फिरायला गेलो नाही.. तिने तयारी केली आणि दोघे फुटपाथवरुन हातात हात घेऊन चालू लागली.. काळोख पडू लागला होता आणि रस्ते गाड्यानी.. माणसानी भरून वहात होते.. वाटेल कपड्याची, दागिन्याची दुकानें दिसली की तिचे आसूसलेले डोळे पुढे जात नव्हते.

पार्क मध्ये जाण्यासाठी त्याना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जायचे होते.. म्हणून ती सिग्नलजवळ थांबली.. सिग्नल लागला म्हणून अनेक गाड्या थांबल्या होत्या.. सिग्नल मिळण्याची वाट पहात होत्या.. एवढ्यात तिचे लक्ष एका मार्सिंडीज कडे गेले.. ती गाडी तिला ओळखीची वाटली.. वाकून पाहिले तर मुजुमदारसाहेब मागील सीटवर होते आणि त्यान्च्या अंगाला खेटून एक टंच तरुणी त्यान्च्या खांद्यावर डोके टेकून होती..

तिने अमितला हाताने गाडीतील मुजुमदार आणि तरुणी दाखवली.

“तो बघ मुजुमदार त्या पोरीसोबत.. मजा मारतोय.. बिचारी साधना.. घरात त्याची वाट पहात असेल..

“साधना काही वाट पहात नाही त्याची.. ती एखाद्या तरुण मित्राच्या मिठीत असेल यावेळी..

‘काय? सुमती किंचाळली..

“होय.. हॆ हायफाय जीवन असेच असते.. परत कधीतरी तुला साधना पण दिसेल अशीच..

सिग्नल लागला तशी दोघे पलीकडे गेली.. पार्कच्या कोपऱ्यावर एक फुल वाला गजरे, वेण्या घेऊन बसला होता. अमितने त्या गजरेवाल्या कडून एक मोगरीची वेणी विकत घेतली आणि तिथेच सुमतीच्या केसात माळली.

दोघे पार्क मध्ये गेली.. हिरवळीवर बसली.. भेळवाल्या कडून भेळ घेऊन खाल्ली.. बर्फचा गोळा संपवीला.

 काळोख पडू लागला तशी दोघे निघाली. आता सुमती गप्प गप्प होती.. मुजुमदरांचे अंतरंग तिला कळले होते.. त्या मानाने आपण किती नशीबवान.. आपला नवरा आपल्यासोबत आहे.. घरात कामाला बाई ठेवायची म्हणून आपली काटकसर करू लागलाय… चहा बाहेर पिणे बंद केले.. दाढी, इस्त्री बाहेरचे बंद..

रात्री ती नेहेमीसारखी गप्पा मारत जेवली. अमितने तिला भांडी घासायला, ओटा पुसायला मदत केली.. भांडी स्टॅन्ड वर लावली.

रात्री झोपायला गेली.. तेंव्हा तिच्या मनात परत साधनाचे विचार येत राहिले.. कसले सुख आणि कसले काय? नवरा दुसऱ्याबाई बरोबर.. आपण?

त्यापेक्षा आपण सुखी.. पैसे कमी असले तरी एकमेकाबद्दल विश्वास आहे.. प्रेम आहे.. आज पार्क मध्ये जाताना मोगऱ्याची वेणी घेऊन दिली.. एवढेच नाही सर्व लोकांसमोर केसात माळली.

बाजूला झोपलेल्या अमितबद्दल तिच्या मनात प्रेम दाटून आले.. तिने केसातील मोगऱ्याची वेणी छातीशी धरली आणि ती शांत झोपी गेली.

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आऊटसायडर … — भाग -२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ आऊटसायडर … — भाग – २  ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(पण तुम्हाला अशी विधवा मुलगी सून म्हणून चालेल का? मला तुमच्या बरोबर रहायचं आहे. पण तुम्ही नको म्हणालात तर मग मी सुभाषशी लग्न नाही करणार. ” – – कृपाचे डोळे पाणावले.) – इथून पुढे — 

चहा घेऊन कृपा निघून गेली. सुभाष आईबाबांजवळ बसला.

“आई, ही खूप चांगली मुलगी आहे. किती लहान वयात एकटीला रहावं लागतंय ग तिला. अमिता आणि कृपा मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे आई. मी अमिताच्या वेळी केली ती चूक पुन्हा करणार नाही. कृपाशी लग्न करून मी नक्की सुखी होईन आई. मी ओळखतो तिला.”

मीना मोहनने होकार दिला आणि तिचे आईवडील आणि हे चौघे असे अगदी घरातल्या घरात लग्न करून कृपा सुभाषच्या घरात आली.

कृपा घरात आली आणि मीनाच्या घरात सुख नांदायला लागलं. कृपा आली आणि घर हसायला लागलं.

तिचा मृदु आर्जवी स्वभाव, सगळ्याना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती, कामसूपणा नीटनेटकेपणा मीनाला आनंद देऊन जाई.

कृपाला दिवस गेले आणि या आनंदात आणखी भर पडली. तिला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं झालं मीनाला. कृपाला मुलगा झाला आणि मीना मोहन कृतकृत्य झाले. सुभाष कृपाचा सुकृत आजीआजोबांच्या छायेत मोठा होऊ लागला.

सुकृत दोन वर्षांचा झाला आणि कृपाच्या लक्षात आलं, गेले काही दिवस सुभाष अस्वस्थ आहे, त्याचं चित्त जागेवर नाही.

रात्री कृपाने विचारलं, “ काय झालंय सुभाष? ऑफिसमध्ये तर सगळं ठीक आहे की. का आहेस अस्वस्थ? मला सांगण्यासारखं नाहीये का ?”

सुभाष म्हणाला, “ नाही ग कृपा. मी काही तरी लपवून ठेवतो का तुझ्यापासून? गेले काही दिवस मला रोज अमिताचे मेल येतात. ‘ मला तुला भेटायचं आहे. माझं चुकलं. आपण परत एकत्र येऊ. मला पुन्हा संसार करायचा आहे तुझ्याशी. ’ ”

कृपाने स्थिर नजरेने सुभाषकडे बघितलं. “ मग तुझं काय म्हणणं आहे सुभाष? तिला सांगितलं आहेस ना, आता माझं लग्न झालंय आणि आपल्याला एक मुलगा सुद्धा झालाय हे? अजून तू गुंतला आहेस का तिच्यात?”

सुभाष म्हणाला, “ नाही ग कृपा. माझा जीव गुंतलाय तो तू आणि सुकृत मध्ये. पण ही म्हणालीय मी घरी येणार आहे तुझ्या. मी अस्वस्थ झालोय कृपा. मला ती यायला नकोय. कायद्याने रीतसर घटस्फोट झालाय आमचा. तरीही पुन्हा हे वादळ का? माझ्यावर विश्वास आहे ना कृपा तुझा?”

कृपाने त्याला जवळ घेतले… ” सुभाष, खुशाल येऊ दे तिला आपल्या घरी. मी बघते काय करायचं ते. तू निर्धास्त रहा. माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? मग झालं तर. कळवून टाक अमिताला की अमुक अमुक दिवशी तू जरूर ये. , फक्त त्या दिवशी तू आईबाबा कोणीच घरी राहू नका. मावशीकडे जा तुम्ही दोन दिवस. चालेल ना? मी सगळं नीट करीन सुभाष. आपला संसार मी मोडू देणार नाही. तू कळव तिला की कृपा तुझी वाट बघतेय. तू जरूर ये. ”

ठरलेल्या दिवशी कृपाच्या दाराची बेल वाजली. दारात अमिता उभी होती

“ये ग अमिता. आत ये ना. मी कृपा. सुभाषची बायको आणि आमचा मुलगा सुकृत शाळेत गेलाय. ये ना. ”

कृपाने अमिताचं हसतमुखाने स्वागत केलं.

अमिता सोफ्यावर बसली. समोरचं पेंटिंग न्याहळत म्हणाली, छान आहे हे. ” कृपा म्हणाली आवडलं? मी केलंय हे. मला खूप आवड आहे पेंटिंगची. पण या नोकरीपायी फारसं जमत नाही हल्ली. ”

अमिता म्हणाली, “छान ठेवलं आहेस तू घर. ” मग तिने चाचरत विचारलं, सुभाषचे आईबाबा कुठे आहेत?”

कृपा हसून म्हणाली, “ अग ते सगळे मावशींच्या फार्म हाऊसवर गेलेत दोन दिवस. तू आरामात बस ग. मग जेवूया आपण. मी रजा घेतलीय आज तू येणार म्हणून. ”

अमिता म्हणाली, ” नंतर जेवू आपण. पण माझं खूप चुकलं. मी आततायीपणे घटस्फोट घेतला सुभाषशी. पण इतकी वर्षे तिकडे एकटी राहिल्यावर मला आता पुन्हा संसार करायचा आहे. तोही सुभाषशीच. मला माहीत आहे, तो किती गुंतला होता माझ्यात ते.. अजूनही मला बघताच त्याच्या माझ्याबरोबरच्या मागच्या सुंदर आठवणी नक्की जाग्या होतील. मला माझी चूक सुधारायची आहे. मी पुन्हा लग्न करीन सुभाषशी. ” अमिता खात्रीने बोलत होती.

कृपा हसली म्हणाली, “अमिता, अजूनही तू होतीस तशीच उथळ राहिलीस बघ. निर्दयपणे तू सुभाषशी मांडलेला सोन्यासारखा डाव उधळून टाकलास. त्याच्या मनाचा विचार केलास का तेव्हा? उध्वस्त होणार होता तो. मी सावरलं त्याला तेव्हा. अग, संसार म्हणजे पोरखेळ का आहे? अग बाई, त्या लहान मुली देखील मांडलेली भातुकली जीव ओतून खेळतात. किती मन गुंतते त्यांचे त्या लुटुपुटीच्या खेळात सुद्धा. , तू तर खरा मांडलेला डाव निर्दयपणे उधळून टाकलास. आणि आता परत तो मांडू म्हणतेस? तोही त्याच सुभाषशी? तू आपण होऊन या घराचा उंबरा ओलांडलास अमिता. मी तुझी जागा घ्यायला तेव्हाही नव्हते आले… चल जेवता जेवता बोलूया. भूक लागली असेल ना?”

कृपाने अमिताला किचन मध्ये नेलं.

“ बस इथं. आज मी केलाय स्वयंपाक. नाहीतर हल्ली आमच्याकडे मावशी येतात दोन्ही वेळा स्वयंपाकाला. आईना होत नाही हल्ली काम फारसं.

कृपाने अमिताचे पान वाढले… तिच्या आवडीच्या अळू वड्या, सार, आणि गुलाबजाम पानात वाढले होते.

“ जेव सावकाश. “ आपलं पान वाढून घेत कृपा म्हणाली. अमिता संकोचली.

“ जेव ग पोटभर. मैत्रीण तर होऊ शकते ना मी तुझी? बाकीचे सोड. ”

बाहेर हॉलमध्ये आल्यावर कृपा म्हणाली, ” अमिता, तू आता या घरात उपरी आहेस. तुझे स्थान तू हाताने गमावलेस. आता ते तुला पुन्हा कसं मिळेल? कबूल आहे तू रुपगर्विता आहेस. सुंदरच आहेस. मी सामान्यच आहे तुझ्यापुढे दिसायला. पण लक्षात ठेव, रूप फार दिवसाचं नाही. गुण महत्वाचे. तू पुन्हा सुभाषला या रूपाचा जोरावर जिंकून घेशील हा भ्रम आहे तुझा. आता तू फक्त आउटसायडर आहेस या घरात. सुभाष आता माझा नवरा आणि आमच्या गोड मुलाचा पिता आहे. तू पाहुणी आहेस अमिता इथे.

पाहुण्याने चार दिवस यावं, पाहुणचार घ्यावा आणि निघून जावं. घरचा यजमान होण्याची अपेक्षा धरू नये. ”

.. कृपा शांतपणे बोलत होती. “ पुन्हा असा वेडेपणा करू नकोस. यायचं तर फक्त माझी मैत्रीण म्हणून ये. पण या घरची स्वामिनी मी आहे अमिता. सल्ला ऐकणार असलीस तर ऐक. अजूनही वेळ गेलेली नाही. इतकी हुशार देखणी मुलगी तू, लग्न कर आणि सुखी हो. लहान मुली करतात तसा हाच बाहुला मला हवा असा हट्ट करू नकोस. तो तुझ्यापासून कैक योजने लांब गेलाय अमिता. नव्हे, तूच दूर लोटलास त्याला. ”

कृपाने दरवाजा उघडला… 

“ सुखात रहा अमिता आणि आपल्या सुखाची नवी वाट शोध. नक्की मिळेल तुला. ”

अमिताचे डोळे भरून आले. कृपाला गच्च मिठी मारत ती म्हणाली, “ किती शहाणी आहेस कृपा तू.

मी हरले कृपा. सामान्य असूनही तू जिंकलंस सुभाषला आणि मला हरवलंस. ”

… अमिता वेगाने दार बंद करून बाहेर पडली.

– समाप्त –  

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आऊटसायडर … — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

 

☆ आऊटसायडर … — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

सुभाष गेले पंधरा दिवस अत्यंत अस्वस्थ होता. त्याच्या मनाची सगळी शांतता ढवळून निघाली अगदी. त्याला कारणही तसंच घडलं. गेले महिनाभर त्याला सिंगापूरहून अमिताचे सतत मेल, फोन येत होते. त्याचं सुखी आयुष्य अगदी ढवळून निघालं या मेल्स आणि फोन्स ने.

मागचे दिवस आठवले सुभाषला. किती सुखात जगत होता सुभाष. मध्यमवर्गीय रहाणी, लहान कुटुंब आणि सुखी दोनच भावंडे. लहान सुभाष मोठी ताई गीता. सुभाषचे वडील जरी साध्या नोकरीत होते तरीही आईही शिक्षिका होती आणि त्या दोघांनी आपल्या गुणी मुलांना कधी काही कमी पडू दिलं नाही. फाजील लाड केले नाहीत आणि अगदी डोक्यावरही बसवलं नाही मुलांना. गीता आणि सुभाष अभ्यासात चांगले होते. , गीता कॉमर्सला गेली. आपल्या इच्छेप्रमाणे तिने मास्टर्स डिग्री घेतली आणि एका चांगल्या टॅक्स कन्सल्टंटच्या फर्म मध्ये छान जॉब करायला लागली.

यथावकाश गीताने आपलं आपण लग्न ठरवलं. इतक्या चांगल्या मुलाला आईवडील का नकार देतील? घरबसल्या छान जावई चालत आला. गीताच्या आईवडिलांनी अगदी हौसेने लग्न करून दिले. गीता आनंदात सासरी नांदायला लागली.

सुभाष अत्यंत चांगले मार्क्स मिळवून इंजिनिअर झाला. त्याला एका सॉफ्टवेअर कंपनीत चांगला जॉब मिळाला.

आई म्हणाली ”सुभाष, आता तुझं लग्नाचं बघायला लागू या ना? छान पगार मिळतोय तुला. नुकताच फ्लॅटही बुक केला आहेस. आता नाव नोंदवायचं का? तुझी तू कोणी बघितली आहेस का ? मोकळेपणाने सांग हो. ”

सुभाष म्हणाला, ”नाही ग आई. माझी काही हरकत नाही मुली बघायला. तुम्हाला योग्य वाटतील त्या मुली मी बघेन. माझा विश्वास आहे तुझ्यावर. ”

मोठ्या उत्साहाने मीनाताईंनी सुभाषचं नाव विवाहमंडळात नोंदवलं. चांगल्या मुली सांगून येऊ लागल्या सुद्धा. त्या दिवशी मीनाची बहीण मधुरा सहज भेटायला आली.

“काय ग मीना, काय म्हणते मोहीम सुभाषची?” हसून तिनं विचारलं.

“चालू आहे, बघतोय मुली. ”

“ बघतेस का एक मुलगी? छान आहे दिसायला. नवीनच आलेत आमच्या बिल्डिंगमध्ये. मला फारशी माहिती नाहीये हं. बघ तू सगळं नीट. ” पत्ता फोन देऊन मधुरा निघून गेली.

पुढच्या आठवड्यात मीना आणि सुभाष मुलगी बघायला गेले. सुरेखच होती पल्लवी दिसायला. छान नोकरी होती, बोलायला चांगली वाटली. सुभाषला आवडली पल्लवी.

त्याच्या दुसऱ्याच दिवशी साठ्यांची अमिता त्याला भेटली. हेही स्थळ विवाह मंडळातूनच आलं होतं. अमिता अतिशयच स्मार्ट, मॉडर्न आणि पहिल्याच भेटीत इम्प्रेशन पडेल अशीच होती.

सुभाष म्हणाला, ”आई मला फार आवडली अमिता. ती पल्लवी छान आहेच पण ही जास्त स्मार्ट आहे. आपण हिलाच होकार कळवूया. ”

मीना विचार करून म्हणाली.. “सुभाष, नीट विचार कर. मला ही ओव्हर स्मार्ट वाटतेय. अशा मुली संसाराला जरा कमी महत्व देतात असं माझं मत आहे. पल्लवी योग्य मुलगी वाटते मला तुझ्यासाठी. बघ. शेवटी संसार तुला करायचा आहे. ” सुभाष अमिताला चार वेळा भेटला. आणि त्याने तिला होकार द्यायचे ठरवले. पल्लवीच्या घरी, क्षमस्व असा नकार कळवण्यात आला.

एकुलती एक लाडात वाढलेली, कुठेही तडजोड करायला तयार नसणारी अमिता गोखल्यांच्या घरात सून म्हणून आली. सुभाष तर तिच्या रुपाला इतका भुलून गेला होता की तिचे दोष त्याला खटकेनात.

उशिरा उठायचं, तयार डबा घेऊन ऑफिसला जायचं. कामात सासूला मदत करायची असते हे ती लक्षातच घ्यायची नाही. पुन्हा आपल्या पगाराचे ती काय करते हे तिने सुभाषला कधीही सांगितलं नाही. अफाट खरेदी, सतत बाहेर खाणे, शॉपिंग हेच आयुष्य होते तिचे.

एकदा सहज म्हणून मीना तिच्या आईला भेटायला गेली. बोलता बोलता म्हणाली ”अहो, आता अमिताच्या लग्नाला सहा महिने झाले. अजूनही ती उपऱ्यासारखीच रहाते घरात. आमच्याशी तिचा संवादच नसतो. बाकी काम, भाजी काही सामान आणणे हे तर लांब राहिलं. ”

अमिताच्या आई म्हणाल्या, ” अहो, अलीकडच्या मुली या. मिळवत्या. त्यांच्याशी जमवून घ्यावं लागतं मीनाताई. आम्ही तिला लाडात वाढवली आहे. ती इथे तरी कुठे काम करायची? दमून जाते हो ऑफिस मध्ये काम करून. ”

मीना हताश होऊन घरी आली. नवऱ्याला म्हणाली, ” बघा. काय बोलल्या विहीणबाई. मलाच चार शब्द सुनावले. कठीण आहे बरं आपलं आणि सुभाषचं. जे जे होईल ते ते पहावे. ”

चार महिने असेच गेले.

एक दिवस अमिता उत्साहाने घरी आली. हे सांगतच की “ मला सिंगापूरला छान जॉब मिळालाय. मी पुढच्या महिन्यात तिकडे जॉईन होणार आहे. ” 

थक्क होऊन सुभाष आणि त्याचे आईबाबा बघतच राहिले.

“ अग पण मग तू एकटीच जाणार का तिकडे? मग सुभाषचं काय?”

बेफिकिरीने ती म्हणाली, ” मला संधी मिळतेय तर मी जाणार. सुभाषने यावं तिकडे आणि करावा प्रयत्न की. मिळेल की त्यालाही चांगला जॉब तिकडे. ”

सुभाष संतापून म्हणाला, ” मी अजिबात माझा हा उत्तम जॉब सोडून तिकडे येणार नाही. मूर्ख आहेस का? हातचं सोडून पळत्याच्या मागे धावायला मी मूर्ख नाहीये. तूही नीट विचार केला आहेस का अमिता? उगीच इथला जॉब सोडून तिकडे एकटीने जाऊ नयेस असं वाटतं मला. ”

अमिता म्हणाली, ”वाटलंच होतं मला. बस इथेच. मी जाणार. नवीन क्षितिज मला खुणावतंय तर मी ही संधी घेणारच. मी आईकडे जातेय आता. मला खूप तयारी करायचीय जायची. मग मी तिकडूनच एअरपोर्ट वर जाईन. येणार असलास तर ये भेटायला. माझ्या जायच्या डिटेल्स कळवीन तुला. ”

थक्क होऊन मीना आणि मोहन तिच्याकडे बघतच राहिले. अशुभाची पाल चुकचुकली मीनाच्या मनात. ठरल्यावेळी अमिता सिंगापूरला निघून गेली. सुभाष तिला पोचवायला एअरपोर्टवर गेला होता. अतिशय उद्विग्न होऊन तो घरी परत आला.

आयुष्यच बदललं त्या दिवसापासून सुभाषचं. लग्नाला वर्ष झालं नाही तोच हे खेळ सुरू झाले आपल्या नशिबाचे, असं मनात आलं त्याच्या. अमिताचे उत्साहाने भरलेले फोन, फोटो व्हिडिओ यायचे सुभाषला. सुरुवातीला तू ये ना इकडे म्हणणारी अमिता आता त्याला फोनही करेनाशी झाली. तिचा सिंगापूरलाच कायम रहाण्याचा निर्णय तिने माहेरी आणि सासरीही कळवला.

सुभाष संतापला. तिच्या आईवडिलांना भेटला. ते म्हणाले, “ उलट तूच तिकडे जायला हवंस सुभाष. चांगला जॉब मिळव आणि सुखात रहा तिकडे. पण तू जर तिकडे जायला तयार नसलास तर मात्र अमिता तुला घटस्फोट द्यायचा विचार करतेय. आम्हीही तिच्या पाठीशी कायम उभे रहाणार. ” 

सुभाष म्हणाला”, हो का? मग मलाही हवाय घटस्फोट तुमच्या लाडावलेल्या मूर्ख लेकीपासून. बस झालं आता. ”

तो तिरीमिरीने घरी आला आणि आईवडिलांना हे सगळं सांगितलं. मीना मोहन हताश झाले हे ऐकून. कमाल आहे हो या मुलीची.

“आई, यावर मला अजिबात चर्चा नकोय. तूही जाऊ नकोस आता तिच्या माहेरी. मला आवडणार नाही तू गेलीस तिकडे तर. ” मीना गप्प बसली. आपल्या मुलाच्या नशिबात काय आहे हेच तिला समजेनासे झाले.

अमिता भारतात आली आणि भरपूर मनस्ताप देऊन अखेर सुभाषला घटस्फोट देऊन पुन्हा सिंगापूरला निघून गेली.

दरम्यान बऱ्याच गोष्टी घडल्या. ऑफिस मधल्या कृपाला एक दिवस सुभाष घरी घेऊन आला.

“आई ही माझी कलिग कृपा देशमुख. मी हिला बरीच वर्षे ओळखतो. मला लग्न करायचंय हिच्याशी. ”

कृपा मीनाजवळ बसली आणि म्हणाली, “सुभाषच्या आई, मला थोडं बोलायचंय तुमच्या सगळ्यांशी. माझे मिस्टर चार वर्षांपूर्वी अपघातात गेले. मी इथे एकटीच रहाते. माझे आईवडील औरंगाबादला असतात.

मी आणि सुभाष एकमेकांना खूप वर्षे ओळखतो. पण ते फक्त टीम लीडर आणि मी सबॉर्डीनेट स्टाफ असं आमचं नातं आहे. आम्हाला सुभाष सरांची पत्नी निघून गेली, तिने घटस्फोट घेतला हे ऐकून माहीत होतं. मागच्या महिन्यात सुभाष सरांनी मला लग्नाबद्दल विचारलं. माझा निशांतशी फक्त पाच वर्षे संसार झाला हो. अचानकच एका कार अपघातात त्याचे निधन झाले. मलाही सुभाष सरांशी लग्न करावेसे वाटते.

पण तुम्हाला अशी विधवा मुलगी सून म्हणून चालेल का? मला तुमच्या बरोबर रहायचं आहे. पण तुम्ही नको म्हणालात तर मग मी सुभाषशी लग्न नाही करणार. ” कृपाचे डोळे पाणावले.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares