मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “सत्यवान पौर्णिमा – एक नवीन क्रांतीचा धागा…” ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

माझा परिचय

मी सौ. तृप्ती श्रीकांत देव, भिलाई (छत्तीसगड) येथे वास्तव्यास असलेली गृहिणी आणि हौशी लेखिका आहे.

मला स्वयंपाक, वाचन आणि लेखनाची विशेष आवड आहे. खाद्यसंस्कृती, सामाजिक विषय, कौटुंबिक नाती आणि दैनंदिन जीवनातील अनुभवांवर मी ब्लॉग लेखन करते. कथा विश्व तसेच इतर विविध व्यासपीठांवर माझे लेख प्रकाशित होत असतात.

एखादा विषय मनाला भिडला की त्यावर सकारात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून लिहिण्याचा मी प्रयत्न करते. भिलाई वनवासी महिला संघटनेची सदस्य म्हणून सामाजिक कार्यातही माझा सहभाग आहे.

शब्दांच्या माध्यमातून सकारात्मक विचार, संस्कार आणि जीवनमूल्ये वाचकांपर्यंत पोहोचवणे हेच माझ्या लेखनाचे उद्दिष्ट आहे.

? जीवनरंग ?

☆ “सत्यवान पौर्णिमाएक नवीन क्रांतीचा धागा…तृप्ती देव

जून महिन्याची ती प्रसन्न सकाळ होती.

रात्रीच्या पावसाने धरतीने जणू हिरवागार शालू नेसला होता. अंगणात उभा असलेला वड अधिकच टवटवीत दिसत होता. त्याच्या पानांवर रेंगाळलेले दवबिंदू सकाळच्या कोवळ्या उन्हात मोत्यांसारखे चमकत होते. वाऱ्याच्या मंद झुळुकीसोबत ते थेंब अलगद खाली झेपावत होते, जणू निसर्ग स्वतःच आजच्या दिवसाची आरास करत होता. 

घरात मात्र एका वेगळ्याच उत्सवाची चाहूल लागली होती.

स्वयंपाकघरातून उकळत्या चहाचा सुगंध दरवळत होता. एका बाजूला फुलांची परडी, हळद-कुंकू, अगरबत्ती, फळं आणि वडाला अर्पण करायचा पवित्र दोरा प्रेमाने सजवलेला होता. सुमन नव्या कोऱ्या साडीत नटली होती. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज होतं. वटपौर्णिमा तिच्यासाठी केवळ सण नव्हता; तो आयुष्यभर जपलेल्या नात्याच्या श्रद्धेचा उत्सव होता.

 

तेवढ्यात पंधरा वर्षांची अन्वी डोळे चोळत बाहेर आली.

“आई, एवढ्या सकाळी काय करतेस गं?”

सुमनने हसत तिच्याकडे पाहिलं.

“आज वटपौर्णिमा आहे ना बाळा. वडाची पूजा करायची आहे.”

अन्वीने आळस देत विचारलं,

“म्हणजे आज पुन्हा उपवास?”

“हो.”

“संपूर्ण दिवस?”

“हो.”

“भूक नाही लागणार?”

सुमन हसली… “लागेल की. पण काही गोष्टी प्रेमासाठी केल्या जातात.”

अन्वी काही क्षण शांत राहिली.

“पण आई, तू हा उपवास नक्की कशासाठी करतेस?”

सुमनने सहज उत्तर दिलं, “तुझ्या बाबांना निरोगी, आनंदी आणि दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून.”

– – अन्वीने मान डोलावली. पण तिच्या मनात एक छोटासा प्रश्न घर करून बसला.

थोड्याच वेळात बाबा हॉलमध्ये चहा पीत वर्तमानपत्र वाचत बसले होते. अन्वी जाऊन त्यांच्या शेजारी बसली.

“बाबा, एक विचारू?”

“विचार.”

“आई तुमच्यासाठी उपवास करते ना?”

“हो.”

“मग तुम्ही आईसाठी काय करता?”

वर्तमानपत्रावरून नजर वर आली.– क्षणभर वेळ थांबल्यासारखा वाटला.

“म्हणजे?”

“म्हणजे आई देवाला सांगते की माझ्या बाबांना चांगलं आयुष्य दे. मग तुम्ही आईसाठी देवाला काय सांगता? तुम्ही तिच्यासाठी काय करता?”

अन्वीचा आवाज निरागस होता… ना तक्रार… ना राग… ना वाद.

– फक्त एक प्रश्न.

.. .. पण काही प्रश्न एवढे साधे असतात की ते थेट मनाच्या दारावर येऊन उभे राहतात.

अन्वी शाळेत निघून गेली. पण तिचा प्रश्न बाबांच्या मनात रेंगाळत राहिला.

दुपार झाली. घरात शांतता होती. उपवास असूनही सुमन सगळ्यांचं जेवण वाढत होती. आजीला औषधं देत होती. घर आवरत होती. संध्याकाळच्या पूजेची तयारी करत होती.

.. .. बाबा तिच्याकडे पाहत होते… वर्षानुवर्षे ते हेच पाहत होते.

.. .. पण कदाचित पहिल्यांदाच समजून घेत होते.

त्यांना अचानक जाणवलं—

खरंच…

ती माझ्यासाठी किती काही करते.

आणि मी?

मी तिच्यासाठी काय करतो? …. 

 

सुमन वडाची पूजा करून घरी परतली.

वडाभोवती फेऱ्या मारून, दोरा बांधून आणि मनोभावे प्रार्थना करून ती थोडी दमलेली दिसत होती.

घरात सगळे एकत्र बसले होते.

तेवढ्यात बाबा उठले.

त्यांनी सुमनसमोर एक छोटंसं ताट ठेवलं.

ताटात एक गुलाबाचं फूल होतं.

एक शुभ्र धागा होता.

आणि एक छोटीशी चिठ्ठी.

 

सुमनने आश्चर्याने विचारलं,

“हे काय आहे?”

 

बाबांनी तिचा हात आपल्या हातात घेतला.

“आज तू माझ्यासाठी व्रत केलंस. अनेक वर्षांपासून करते आहेस. पण आज आपल्या अन्वीने मला एक प्रश्न विचारला.”तृप्ती देव

 

घरात शांतता पसरली.

“तू माझ्या आयुष्यासाठी प्रार्थना करतेस… पण मी तुझ्यासाठी काय करतो? याचा मी कधी विचारच केला नव्हता.” .. .. सुमन निःशब्द झाली.

 

बाबा पुढे म्हणाले,

“आजपासून मीही एक व्रत करणार आहे.”

 

अन्वी उत्साहाने म्हणाली,

“म्हणजे बाबांची पण वटपौर्णिमा?”

 

सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

बाबांनी हलकेच मान डोलावली.

“हो… पण थोडी वेगळी.”

.. .. ते म्हणाले,

“आज मी तुझ्या हाताला हा संकल्पधागा बांधतो.”

 

.. .. त्यांनी सुमनच्या मनगटावर तो शुभ्र धागा बांधला.

“तू माझं आयुष्य वाढावं म्हणून देवाला साकडं घालतेस… पण आज मी एक वचन देतो… तुझ्या स्वप्नांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन… तुझ्या आरोग्याची काळजी घेईन… तुझ्या आनंदासाठी वेळ काढीन.

तुझं आयुष्य फक्त संसारात विरघळून जाऊ देणार नाही… तुझा सन्मान, तुझं अस्तित्व आणि तुझी स्वप्नं जपणं हेच माझं व्रत असेल.”

 

सुमनच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

इतक्या वर्षांच्या संसारात तिने अनेक भेटवस्तू पाहिल्या होत्या.

पण तिच्या मनाची, तिच्या कष्टांची आणि तिच्या अस्तित्वाची अशी दखल घेणारी ही पहिलीच भेट होती.

 

अन्वीने उत्सुकतेने विचारलं,

“बाबा, मग या नवीन व्रताचं नाव काय?”

 

बाबा हसले.

“सत्यवान पौर्णिमा.”

 

“का?”

“कारण सावित्रीने सत्यवानासाठी यमाशी झुंज दिली होती.

आता प्रत्येक सत्यवानाने आपल्या सावित्रीच्या आनंदासाठी, तिच्या सन्मानासाठी आणि तिच्या अपूर्ण स्वप्नांसाठी उभं राहायला हवं.”

 

.. त्या रात्री घरात कोणतीही मोठी घोषणा झाली नाही.

.. कोणतीही जुनी परंपरा मोडली नाही.

.. कोणताही नवा धर्म जन्माला आला नाही.

 

.. पण एका लहान मुलीच्या निरागस प्रश्नाने एका पुरुषाला खऱ्या अर्थाने सत्यवान बनवलं होतं.

 

वर्षानुवर्षे वडाच्या झाडाला बांधले जाणारे धागे तसेच होते.

.. पण त्या दिवशी एक नवीन धागा जन्माला आला होता.

.. कृतज्ञतेचा.

.. समानतेचा.

.. आदराचा.

 

खिडकीबाहेर उभा असलेला वडाचा वृक्ष मंद वाऱ्यावर डोलत होता.

त्याच्या पारंब्या जणू काळाच्या साक्षीदाराप्रमाणे या नव्या विचाराचं स्वागत करत होत्या.

 

सुमनने हातात बांधलेल्या त्या शुभ्र धाग्याकडे पुन्हा एकदा पाहिलं… वर्षानुवर्षे ती वडाला दोरा बांधत आली होती….. पण आज पहिल्यांदाच कुणीतरी तिच्या मनाला सन्मानाचा धागा बांधला होता.

 

कारण संसार केवळ एका व्यक्तीच्या त्यागावर उभा राहत नाही…

तो परस्परांच्या सन्मानावर, विश्वासावर आणि एकमेकांच्या स्वप्नांना दिलेल्या पंखांवर फुलत असतो.

खरी क्रांती परंपरा मोडण्यात नसते…

.. ती परंपरेला नव्या विचारांची पालवी फुटू देण्यात असते.

.. ती जुन्या श्रद्धा नाकारण्यात नसते…

.. तर त्यांना समानतेचा आणि कृतज्ञतेचा नवा अर्थ देण्यात असते.

 

पिढ्यान् पिढ्या जूनची पौर्णिमा आली की लोक सावित्रीची कथा सांगत आले…

.. यापुढे कदाचित त्या कथेसोबत एक नवीन कथा सांगितली जाईल.

.. .. .. त्या सत्यवानांची… ज्यांनी आपल्या सावित्रीच्या स्वप्नांनाही जगण्याचा अधिकार दिला.

आणि त्या दिवसापासून त्यांच्या घरात एक नवी सुंदर परंपरा सुरू झाली…

.. .. .. “सत्यवान पौर्णिमा”

.. ज्या दिवशी प्रत्येक सत्यवान आपल्या सावित्रीला एक वचन देतो—

“तू माझ्या आयुष्यासाठी प्रार्थना केलीस…

आता मी तुझ्या स्वप्नांसाठी जगण्याचा संकल्प करतो.”

(कथा आवडल्यास नाव न गाळता शेअर करावी ही विनंती.. हे माझे वैयक्तिक विचार आहेत ). 

© तृप्ती देव

भिलाई( छत्तीसगड)

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ उंचावर… भाग – २ ☆ गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ उंचावर… भाग – २ ☆ गौरी गाडेकर

(विकास-अश्विनी अरविंदकडे जेवायला गेले नाहीत, त्यासंदर्भात बोलायला विकास आणि अरविंद संध्याकाळी भेटले. आता पुढे……) 

संध्याकाळी विकासने अरविंदला अश्विनीविषयी सगळं सांगितलं – ती अख्खा दिवस टक लावून समोरच्या कन्स्ट्रक्शन वर्कर्सकडे बघत बसलेली असते. तिचा राग येतो;पण तिच्या चेहऱ्यावर निरागसता असते वगैरे.

“तू गावी असताना ती कशी वागायची? ” 

“खूप आनंदी, सर्वांशी मिळून मिसळून वागणारी मुलगी आहे ती. बाबांना फ्रॅक्चर झालं, त्यामुळे आमचं हनिमूनला जाणं कॅन्सल करावं लागलं, तेही समजून घेतलं तिने. ” 

“एवढ्या दिवसांत काही विचित्र गोष्टी लक्षात आल्या तुझ्या? ” 

“नाही रे. ” मग थोडा वेळ विचार करून विकास म्हणाला, “मी तिला म्हटलं, ‘आधीच लग्नात खूप खर्च झालाय, शिवाय घर सजवायचंय, तेव्हा आपण हनिमूनसाठी लांब कुठे नको जाऊया. जवळच माथेरान, महाबळेश्वरला जाऊया. ‘ ती म्हणाली, ‘जवळच्या ठिकाणी जायला हरकत नाही. पण माथेरान, महाबळेश्वर नको. तिथे डोंगर आहेत. ‘ नंतर मुंबईत आल्यावर स्टेशनचा ब्रिज चढताना घाबरली होती. माझा हात घट्ट धरला होता तिने. वर पोचेपर्यंत भिजून चिंब झाला होता तिचा हात. घरी आल्यावरही तिसरा मजला म्हटल्यावर थोडी नाखूष झाली होती. खिडकीतून खाली बघायला सांगितलं, तर टाळाटाळ केली… ” 

अरविंदने पुढचं ऐकायचं सोडून कोणालातरी फोन लावला, “किती वाजेपर्यंत आहेस तिथे? … मी लगेचच निघतोय. थांब मी येईपर्यंत. ” एका घोटात कॉफी पिऊन निघालासुद्धा. “बिल प्लीज तूच दे. मला उशीर होईल. “

विकासला त्याचा रागच आला. म्हणजे बिल द्यावं लागलं म्हणून नव्हे. तर आपलं एवढं महत्त्वाचं बोलणं अर्धवटच सोडून…

 

रात्री अरविंदचा फोन आला – “मघाशी तू सांगत होतास, तेव्हा मला भयगंडाची शंका आली. माझा एक मित्र सायकिऍट्रिस्ट आहे. त्याला मी फोन केला आणि तो क्लिनिकमधून निघण्यापूर्वीच त्याला गाठायचं, म्हणून घाईघाईने गेलो. माझी शंका खरी असावी, असं त्यालाही वाटतंय. उद्या सकाळची अपॉइंटमेंट मिळालीय. ऑफिसला रजा घेऊया. हे जास्त महत्त्वाचं आहे. उद्या सकाळी अश्विनीला घेऊन मला दादर स्टेशनवर भेट. ” 

 

त्या रात्री विकासच्या डोळ्याला डोळा लागला नाही. ‘असं काही खरंच असू शकेल का? पण एरव्ही तर ती… ‘ 

 

अश्विनी तशी नाइलाजानेच घराबाहेर पडली होती. स्टेशनचा ब्रिज चढावा लागू नये, म्हणून विकासने तिला टॅक्सीनेच दादरला नेलं. क्लिनिक सहाव्या मजल्यावर होतं. लिफ्टमध्ये अश्विनीने विकासचा हात घट्ट धरला होता, हे अरविंदच्या नजरेतून सुटलं नाही.

 

डॉक्टरांनी पहिल्यांदा विकासला आत बोलावलं, “अरविंदने मला जे सांगितलं, त्यावरून मला वाटतं, की तुमच्या पत्नींना ऍक्रोफोबिया असावा. ऍक्रोफोबिया म्हणजे उंचीचा भयगंड. माझ्या मते याचं कारण त्यांच्या बालपणात दडलेलं असावं. मी त्यांच्याशी बोलून त्याविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी अशा गोष्टी सुप्त मनात दडलेल्या असतात. त्या पेशन्टला आठवतही नाहीत. अशा वेळी हिप्नोथेरपीचा वापर करावा लागतो. ” 

विकासचा चेहरा आधीच पडला होता. आता तर त्याच्या डोळ्यांत पाणी आलं.

डॉक्टरांनी त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हटलं, “डोण्ट लूज होप, मिस्टर विकास. त्या नक्की बऱ्या होतील. आणि त्यांनी लवकर बरं व्हावं, म्हणूनच मी आजच हिप्नोथेरपीचा प्रयोग करणार आहे. अर्थात आवश्यकता असेल तरच. ” 

“तुम्हाला योग्य वाटेल, ते सर्व करा. पण माझ्या अश्विनीला बरं करा, डॉक्टर. ” 

 

डॉक्टरांनी अश्विनीशी बोलायला सुरुवात केली. त्यांचा शांत, आश्वासक सूर कानावर पडताच तिच्यावर आलेलं दडपण नाहीसं झालं. ती अरविंदशी ज्या मोकळेपणाने बोलत असे, त्याच मोकळेपणाने डॉक्टरांशीही बोलू लागली. मग डॉक्टरांनी तिला मुंबईत आल्यावर आई-वडिलांची आठवण येते का वगैरे विचारताच ती गप्पांच्या मूडमध्ये आली. त्यांनी तिला आताच्या, पूर्वीच्या बऱ्याच गोष्टी विचारल्या. पण ऍक्रोफोबियाचा उगम सापडेल, अशी कोणतीच माहिती त्यांना मिळाली नाही.

मग त्यांनी मधला पडदा ओढला. आता विकासला आणि अरविंदला अश्विनी दिसत नव्हती, पण तिचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं.

डॉक्टरांनी तिला दीर्घ श्वसन करायला सांगितलं. पायापासून डोक्यापर्यंतचा एकेक अवयव – पहिल्यांदा त्याला ताण देऊन मग रिलॅक्स करायला सांगितलं. हळूहळू ती संमोहनावस्थेत गेली.

डॉक्टर तिला म्हणाले, ” तू आता डोंगर चढत आहेस. कसं वाटतंय तुला? ” 

“नाही, नाही. मी डोंगरावर जाणार नाही. ” 

“का? ” 

“… ” 

“का नाही जाणार तू डोंगरावर? ” 

“का ते मला माहीत नाही, पण मी नाही जाणार. ” 

“ठीक आहे. नको जाऊस… हे बघ, अश्विनी. तू आता पाच वर्षांची आहेस. आई-बाबांबरोबर फिरायला चालली आहेस. कुठे जायला आवडेल तुला? ” 

“डोंगरावर. मी धावतधावत डोंगर चढणार. आई खूप घाबरते, मी धावायला लागले की. मग मला गंमत वाटते. ” तिचा सूर अगदी लहान मुलासारखा वाटत होता.

” आता तू थोडी मोठी झालीस हं, अश्विनी. समज सात वर्षांची. आता परत जा डोंगरावर. ” 

“नाही, नाही, मी नाही जाणार डोंगरावर, “भेदरलेल्या आवाजात अश्विनी म्हणाली.

” का ग? काय झालं? ” 

“तिथे तो घाणेरडा माणूस आहे. ” 

“हो? काय करतो तो? ” 

“तो आणि ती बाई… शी! नीट कपडेपण नाही घातले त्या दोघांनी. मी त्यांना बघितलं, हे कळल्यावर तो धावत आला. त्याच्या तोंडाला एवढी घाण येत होती! मला ओकारी आल्यासारखं वाटलं… आणि त्याची भीतीपण वाटली. त्याने मला उचललं आणि डोंगराच्या टोकाला नेलं. मला उंच धरून विचारलं, ‘खाली टाकून देऊ तुला? ‘ मी… मी.. घाबरले आणि… रडायला लागले. ‘चूप! गप्प बस. तोंडातून आवाज काढायचा नाही. आणि आम्हाला बघितलं, हे कोणाला सांगायचं नाही. विसरून जायचं सगळं. कळलं? विसरून जायचं! सगळं विसरायचं! नाहीतर डोंगरावरून खाली फेकीन. ‘ ” आणि अश्विनी रडायला लागली. एखादी लहान मुलगी रडावी तशी.

डॉक्टरांनी थोडा वेळ तिला रडू दिलं. मग ते म्हणाले, ” तुला माहीत आहे, बाळा, त्या माणसाचं पुढे काय झालं? त्याला ना पोलिसदादाने पकडलं आणि जेलमध्ये टाकलं. आणि मार मार मारलं. तो मेला आता. आता तो तुला त्रास द्यायला कधीच येणार नाही. ” 

“खsरं ss? ” 

“अगदी खरं. तेव्हा आता तुला डोंगरावर जायला काहीच हरकत नाही. जाणार आता डोंगरावर? ” 

” तो माणूस नक्की येणार नाही? ” 

“अजिबात नाही. मेला तो. मग जाणार तू डोंगरावर? तुला आवडतं ना डोंगरावर फिरायला? ” 

“हो! आई-बाबांबरोबर जाणार मी डोंगरावर. “

“आता मोठी हो. आणि नवऱ्याबरोबर जा डोंगरावर. जाणार ना? ” 

“हो. “बाहेर विकासाच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले.

“एक गंमत सांगू, अश्विनी मॅडम? खिडकीकडे जा आणि खाली बघा. ती माणसं, वाहनं कशी दिसतात, ते बघा. ” 

“खरंच, किती लहान दिसतात ना! आणि आपण आकाशातच आहोत असं वाटतं. मस्तच! ” 

 

पडदा बाजूला करून विकास आत आला आणि डॉक्टर, अरविंद कोणाचीही पर्वा न करता त्याने अश्विनीला मिठीत घेतलं.

– समाप्त –

©  गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “देणगी…!!!” – भाग ३ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “देणगी…!!!” – भाग ३ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

कॅम्पमध्ये एका चर्च बाहेर अर्धनग्न (हा शब्द लिहिण्यासाठी योग्य आहे म्हणून वापरला, अन्यथा अवस्था याहून वाईट होती)अवस्थेत बेशुद्ध पडलेला हाच तो…

गलीच्छ वागतो, काम करत नाही, प्रसंगी आई-वडिलांना शिवीगाळ आणि मारहाण करणारा हाच तो…

शेवटी आई बापालाच नालायक ठरवून, घराबाहेर पडून, भीक मागून – दारू पिऊन कुठेही पडणारा हाच तो…

… दोनेक वर्षे अंघोळ नाही – स्किन इन्फेक्शन – रस्त्यावर उघडे झोपणे – शुद्ध नाही – अंगावर किमान दोन इंचाचा मळ – घोंगावणाऱ्या माशांचे, हक्काचे पार्टीचे ठिकाण… हाच तो…

– – यापुढचे त्याचे वर्णन आता मुद्दाम करत नाही, वाचतानाही घृणा येईल…

दोन वर्षांपूर्वी मी याला जेव्हा पाहिले तेव्हा मला याचा राग आला नाही, वाईट वाटलं…!

बेफाट वाहणाऱ्या पाण्याला बांध घातला की ते संथ होतं…

बेफाट वाहणाऱ्या मनाला बांध घातला कि ते संत होतं…

याच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं, याला कुणी बांध घातलाच नाही… तू नालायक आहेस, निकम्मा आहेस, दारुड्या आहेस, जगण्याच्या लायकीचाच नाहीस, मरत का नाहीस, माझ्या पोटी हि असली अवलाद नको होती… अशा वाक्यांनी त्याचे खच्चीकरण केले गेले…!

सगळीकडून धिक्कारला गेलेला तो, हाच तो…

तू तो है अलबेला… हजारो मे अकेला… असं एकदा तरी, भले खोटं खोटं तरी, कोणीतरी त्याला म्हणायला हवं होतं… नेमकं तेच घडलं नाही आणि हा बिघडत गेला…!

लागल्यावर प्रत्येक वेळी औषधच लागतं असं काही नाही, प्रेमाची एक फुंकर सुद्धा पुरेशी ठरते…!

– – Diagnosis झाल्यावरच उपचाराची दिशा कळते. त्याची दुखरी नस मला समजली होती, उपचाराची दिशा नकळत ठरून गेली…

“ बाळा… माझ्या सोन्या… “ म्हणत मी जेव्हा त्याला धुंदीतून प्रथम उठवले होते, तेव्हा त्याने माझा हात पकडून डोळ्यातून अश्रू काढले होते… त्याला वाटलं पोलीस असतील आणि आता काठी मारतील…

झालं उलटंच…! मी त्याच्या डोक्यावर मायेनं हात ठेवला होता.

जागा झाल्यावर पहिल्यांदा त्याच्या ओठी शब्द आले, “ पप्पा तुम्ही इथे कसे…? “

– – डोळे उघडल्याबरोबर, समोर नसूनही जी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येते तीच आपली…!

वडिलांच्या तो अगदी जवळ आहे हे मला जाणवलं, माझ्यासाठी एवढासा धागा पुरेसा होता आणि तेव्हापासून मी त्याचा “पप्पा” बनण्याचा प्रयत्न करत गेलो.

मध्ये अनंत गोष्टी घडल्या, ज्या अत्यंत भावुक होत्या, त्या काही आता लिहीत नाही, लेख खूप मोठा होईल.

सर्वप्रथम त्याला हाताने अंघोळ घातली, ऍडमिट केले, पूर्णतः त्याला माणसात आणले.

पूर्ण बरा झाल्यानंतर, तो मला म्हणाला, ‘ सर तुमी मला पप्पा सारकेच आहात, मी तुमाला कोनच्या स्वरूपात परतफेड करू? ”

– – मी चातकासारखी त्याच्या याच शब्दांची वाट पाहत होतो.

म्हटलं ‘नक्की करशील परतफेड…?’

.. क्षणाचाही विचार न करता म्हणाला… ‘हां सर… ‘

“मग आता कामाला लाग, नोकरी मी शोधतो… “ त्याच्या डोळ्यात डोळे घालून पहात मी म्हणालो.

काही क्षणांचा अवधी घेऊन, पण निर्धाराने म्हणाला “ हो सर, करतो… “

… निम्मी लढाई मी येथे जिंकली होती…!

प्रसंग दोन

शनिपार परिसरात असलेले एक मोठे दुकानदार, नेहमी मला फोन करतात आणि म्हणतात,

‘डॉक्टर तुमाला मला डोनेशन द्यायचं हाय, पण साला या कामांमंदी मी अडकून जाते, आनी राहूनच जाते, तुमाला कंदी टायम गावला तर तुमी या ना दुकानी ‘

(आजवर अकरा वर्षाच्या कामाच्या आयुष्यामध्ये कोणालाही मी देणगी मागितली नाही, पुढे सुद्धा कधी मागणार नाही, पण समाज म्हणून आपण इतके मोठ्या मनाचे आहात, की न मागताच माझ्या झोळीमध्ये आपण इतकं काही टाकता, की मला कुठे जाऊन पदर पसरायची गरजच पडत नाही, यानिमित्ताने माझा प्रणाम आपणा सर्वांना)

– – यावेळी आवर्जून मी शेठजींकडे गेलो, मला पाहून त्यांना आनंद झाला, मी त्यांना म्हणालो, ‘सर बरेच दिवस डोनेशन द्यायचे म्हणत होतात, ते घ्यायला आज आलो आहे… ‘

‘क्या बात है, आवो ने पधारो… पधारो म्हणत त्यांनी माझं स्वागत केलं, ड्रॉवर मधील चेक काढला, जिभेला बोट लावून, मला न विचारताच त्यांनी एक चेक फाडला.

मी हात जोडून म्हणालो, ‘सर पैसे नको आहेत… ‘

‘मंग…? ’ ते गोंधळून म्हणाले…

‘दुकान मदली तुमाला पसंत येईल ती कोणचीबी गोष्ट घिवून जावा, कायी वांदा नाय सायेब… ‘

माझ्याही-वडिलांच्या वयाचे असणाऱ्या त्या शेठजींचे हात मी हाती घेतले, कपाळी लावले आणि म्हणालो, ‘माऊली इतके कामगार तुमच्याकडे काम करतात, माझ्या एका मुलाला काम द्या… तेच माझ्यासाठी डोनेशन…! ‘

सुरुवातीला त्यांना काही कळलं नाही… यानंतर सविस्तर सर्व गोष्टी त्यांना सांगितल्या…

यानंतर ते हसत म्हणाले, ‘काय तुमी बी वार्ता करते… पोराला उद्यापासून पाठवून द्या आणि हा चेक बी घेऊन जा… ‘

– – तो चेक पुन्हा कपाळाला लावत मी त्यांना म्हणालो, “या चेकवर जी आपण रक्कम लिहिणार होतात, ती रक्कम माझ्या मुलाला दर महिन्याला पगार म्हणून द्या… हेच माझं डोनेशन…! “

वडिलांच्या वयाचे… व्यवसाय करून अनुभव सिद्ध झालेले… सहजासहजी न बधणारे शेठजी…

यावेळी चष्म्याआड त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते…! त्यांचे भरलेले डोळे पाहून, आता माझ्या डोळ्यात पाणी येईल, त्याच्या आत मला दुकानातून बाहेर पडणे आवश्यक होते…!

‘निघतो‘ म्हणत, मी त्यांच्या पाया पडलो आणि निघालो…

जाताना ते म्हणाले “ पोराला द्या पाठवून, कामाला लावतो…! आणि हो… पुढल्या वर्षी डोनेशन आणखी वाढवून देईन… ” डोळ्यात पाणी घेऊन मी फक्त त्यांना नमस्कार करून निघालो.

यानंतर या मुलाला तिथे कामाला लावला, त्याने माझे नाव राखले, मनापासून काम केले, , घरी पैसे देऊ लागला, आई-वडिलांचा सन्मान करू लागला, आई-वडिलांनी मनापासून याला स्वीकारलं…

सुरुवातीला त्याच्या भेटी होत होत्या परंतु पुढे पुढे तो त्याच्या कामात व्यग्र झाला आणि मी माझ्या…

याला एक वर्ष लोटलं…!

प्रसंग तीन

शनिवार दिनांक 13 जून… परत शनिपार, सर्व कामं आटपली… निघालो…

मोटरसायकल वर बसलो आणि एका हँडसम दिसणाऱ्या मुलाने माझ्या मोटरसायकलला त्याची सायकल आडवी लावली…

.. पुढच्या स्पॉटवर जायचे असल्याकारणाने, गडबडीत मी त्या मुलाकडे नीट पाहिलेच नाही, नेहमीची मवाळ भूमिका घेत मी त्या मुलाला म्हणालो, ‘बाळा माझं काही चुकलं का? थांब मी गाडी मागे घेतो… ‘

‘हो सर लय चुकलं तुमचं…? ‘ तो गुरगुरला

मी चमकून पाहिलं… हा तोच शेठजींकडे कडे काम करणारा…!

‘अरे तु…? किती बदल झाला आहे… मी ओळखलंच नाही तुला बाळा…!

‘एका जाग्यावर बसत जावा ना वो सर, शोधून पाय आन सायकल थकली… ‘ तो हसत बोलला.

‘एका जागेवर बसलो असतो, तर तू भेटला असतास का रे नालायका…? ’ जुन्या गोष्टींची आठवण करून देत, बाप असल्याचा गैरफायदा घेऊन बोललो.

तो सुद्धा हसला…

‘सायकल कोणाची रे…? ‘

‘सर पगारातून नव्वी कोरी सायकल हत्या हप्त्यानं घेतली’ त्याच्या चेहऱ्यावर कौतुक आणि समाधानाचे भाव होते.

… मुळचा गोरापान, अंगावर छान कपडे आणि नवीन सायकल… माझी नजर या पोरावरून हटेना, वाटलं याला माझीच दृष्ट लागेल.

… या नंतर तो माझ्या जवळ आला, खांद्यावर डोकं ठेवून अचानक रडू लागला… त्याला सर्व जुन्या गोष्टी आठवत होत्या… ‘ सर तुम्ही नसते तर… ’ वगैरे वगैरे बोलू लागला, मी फक्त हसत त्याची पाठ थोपटत होतो…!

बोलता बोलता त्याने माझ्या खिशात काहीतरी टाकले…

मी सहज काढून पाहिले, ते पाचशे एक रुपये होते…

माझ्या सर्व गोष्टी माझ्या कमरेला अडकवलेल्या बॅगेत असतात, खिशात काहीही नसते, मग हे 500 रुपये आले कुठून?

मी त्याला म्हणालो, ‘अरे बाळा हे पाचशे रुपये माझ्या खिशात तू ठेवलेस का? हे माझे नाहीत… ‘

तो म्हणाला, ‘सर तुमचेच आहेत… ‘

‘म्हणजे…??? ‘

“ मागच्या महिन्यामध्ये, कामावर एक वर्ष पूर्ण झालं, माजी बडती झाली, पगार वाडला, मी तुम्हाला कदीपासून शोधतोय तुम्ही सापडले नाहीत, आज शेवटी हितं घावले… मला तुमाला डोनेशन का काय ते द्यायचे होते ना, बडतीच्या पैशातून…!!! ”

– – त्याचं वाक्य संपायच्या आधी माझ्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले. गाडीवरून उतरून मी त्याला घट्ट मिठी मारली.

‘बाळा किती मोठा झालास रे…? ‘ मला खूप काही बोलायचं होतं पण, हुंदक्यांच्या घाटाघाटा मधून शब्दांची गाडी पुढे सरकेना…!

– – घासातला घास काढून देऊन, “परतफेड” या शब्दाचा अर्थ, आज मला नव्याने समजला.

त्यातला एक रुपया माझ्या बॅगेत ठेवून, उरलेले पाचशे मी त्याला परत केले, आणि म्हणालो, ‘जेव्हा मला लागतील तेव्हा मी परत मागून घेईन तुझ्याकडून. ‘

पुण्यात राहणाऱ्यांना माहित आहे, शनिपार हा चौक किती गजबजलेला असतो, इतक्या गर्दीच्या ठिकाणी तो माझ्या आणि मी त्याच्या गळ्यात पडून रडत होतो, लोक थांबून कुतूहलाने पहात होते… काय चाललंय हे त्यांना कळत नसावं…! माझ्या डोळ्यातून सतत अश्रू ओघळत होते, आणि माझे डोळे पुसत तो निरागसपणे म्हणत होता, ‘सर तुमी नगा ना रडू, तुमाला रडताना पायलं की मलाबी लय रडू येतं मंग… ‘

– – एवढ्या गर्दीतही मला फक्त तो आणि तोच दिसत होता… आणि डोक्यात गाणं सुरू होतं, ये तो है अलबेला… हजारो मे अकेला…!!!

त्याचा निरोप घेऊन मी पुढल्या मुक्कामी निघालो, गाडीवर जाताना सतत त्याचेच विचार…

… सहज डोक्यात आलं, इतर कर्मचारी सोडून शेठजींनी याच मुलाला एका वर्षात बढती कशी बरं दिली असावी? आणि पगार सुद्धा वाढवला…? आणि झटकन मला शेठजींनी त्यावेळी बोललेलं वाक्य आठवलं,

‘आणि हो… पुढल्या वर्षी डोनेशन आणखी वाढवून देईन… ‘

– – सहज बोललेल्या त्या वाक्यात किती गहन अर्थ होता, त्याचा उलगडा मला आज एका वर्षानंतर झाला.

डोळ्यात पुन्हा पाणी आलं… मनातल्या मनात मी शेठजींच्या पायांना स्पर्श केला…!

… शेठजींनी या मार्गाने दिलेलं हे “डोनेशन” आणि माझ्या पोरानं दिलेली “देणगी” मनातल्या तळ कप्प्यात साठवून, मी निघालो श्रीमंत बाप होऊन…!

 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ उंचावर… भाग – १ ☆ गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ उंचावर… भाग – १ ☆ गौरी गाडेकर

लग्नाची तारीख ठरली, तरी विकास अजूनही काळजीतच होता. अरविंदच्या नजरेतून ते सुटलं नाही. ऑफिस सुटल्यावर अरविंद त्याला घेऊन रेस्टॉरंटमध्ये गेला. तिथेही विकास इडली चिवडत बसला होता.

शेवटी अरविंदने विचारलं, “एनी प्रॉब्लेम? सांगावंसं वाटलं, माझ्यावर विश्वास असेल, तर सांग. ” 

“आहे रे तुझ्यावर विश्वास. गेल्या दोन वर्षांची आपली मैत्री. पण तू मला सख्ख्या भावासारखाच वाटतोस. मुंबईत आल्यावर तुझाच मोठ्ठा आधार होता मला. ” 

“मग बोल ना. असा मनातच घुसमटू नकोस. ” 

“खरं सांगू? मी लग्नाचा विचार करायचो, तेव्हा मला वाटायचं, आपलं लव्ह मॅरेज व्हावं. म्हणजे एखाद्या मुलीशी ओळख, मग मैत्री, नंतर प्रेम अशा पायऱ्या चढत गेलं, तर आपलं नातं पक्कं होईल. पण अशी कोणी भेटलीच नाही रे. शेवटी आईने ठरवलेल्या मुलीशी लग्न करतोय. तशी चांगली आहे ती. दिसायला, वागायला.. ” 

“मग काय प्रॉब्लेम आहे? ” 

” मुंबईतली, नोकरी करणारी मिळाली असती, तर आर्थिकदृष्ट्याही बरं झालं असतं. ” 

“तुला खरं सांगू? सुनीता नोकरी करते. पण तिचा अर्धा-पाऊण पगार तिच्या नोकरीमुळे होणाऱ्या खर्चातच जातो. शिवाय मुलांकडे दुर्लक्ष होतं, ते वेगळंच. बघावं तेव्हा सुनीता दमलेली, वैतागलेली असते. त्यामुळे बायकोचं नोकरी करणं सुखाचं झालं असतं, हा विचार तू डोक्यातून काढून टाक. तशी ती शिकलीसवरलेली आहे. वाटलं तर ती करेलही नोकरी किंवा ट्युशन्स वगैरे करून…

त्यामुळे या काळज्या सोड आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्नं बघ. ” 

 लग्न झालं आणि विकास त्या काळज्या वगैरे सगळं विसरूनच गेला. आई येणार होती बरोबर, बिऱ्हाड लावून द्यायला, पण बाबांच्या हाताला फ्रॅक्चर झाल्यामुळे ही दोघंच मुंबईला आली.

 “बाप रे! एवढी उंच बिल्डिंग! इथे राहायचं आपण? “अश्विनीच्या प्रश्नाचं विकासला हसूच आलं.

“आमच्या गावी सगळी बैठी घरं. फार तर फार, वर एखादी माडी आणि गच्ची. पण आमचं घर तर बैठंच. ” अश्विनी स्वगत बोलल्यासारखं बोलली.

“अगं, आपली तर फक्त पाच मजल्यांचीच बिल्डिंग आहे. आता तर कितीतरी उंच बिल्डिंग्ज होताहेत. ” 

 ती घर बघून खूश झाली.

“अश्विनी, तिसऱ्या मजल्यावरून खालचा रस्ता किती छान दिसतोय बघ. ” 

” मग बघते. आधी सामान लावून ठेवते. ” 

थोड्या वेळाने विकासाच्या लक्षात आलं, आपल्याला येऊन जेमतेम दीड-दोन तासच झाले असतील, पण घराचं रूपच पालटल्यासारखं वाटत होतं. ब्रह्मचाऱ्याच्या मठीला घरपण आलं होतं. विकास खूश झाला.

“थोडे दिवस जेवणाचा डबा चालूच ठेवूया. ” 

“नको. कशाला? आता मी आलेय ना? मी करेन की स्वयंपाक. नाहीतरी तुम्ही ऑफिसला गेल्यावर मला उद्योग काय आहे? आपण आज सामान आणून ठेवूया. ” 

 दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांनी बरोबरच ब्रेकफास्ट घेतला. जाताना विकास डबा घेऊन गेला.

त्याला निरोप देऊन अश्विनी सोफ्यावर टेकली. तिची नजर खिडकीबाहेर गेली. समोर एका बिल्डिंगचं बांधकाम सुरु होतं. ते मजूर एवढ्या उंचावर काम करत होते! कोणी पडलाबिडला तर…! बाप रे! अश्विनीला घाम फुटला.

तिने खिडकीजवळ जाऊन मजले मोजले. हे म्हणाले होते – खालचा तळमजला, नंतर पहिला, दुसरा… असं मोजायला सुरुवात होते. म्हणजे हा पाचवा मजला होता. नुसता मजला म्हणजे त्याची जमीन बांधली होती. बाजूचा कठडा अजून बांधायचा होता. सगळे मजूर तन्मयतेने काम करत होते. बाप रे! ही माणसं वरून पडली तर..? तेवढ्यात तिच्या लक्षात आलं, त्यांच्या कमरेला बेल्ट होता आणि बेल्टला जोडलेल्या दुसऱ्या पट्ट्याचं टोक आत कुठेतरी बांधलेलं होतं. तिचा जीव भांड्यात पडला. नंतर बघितलं, तर बाजूला लावलेली जाळीही दिसली तिला. म्हणजे तसं संरक्षण होतं;पण ती जाळी तुटली तर…? शिवाय एखाद्याने पट्टा नीट बांधला नसेल तर…? किंवा पट्टा तकलादू असेल तर…? हे सगळे कामात एवढे मग्न होते, की एखादा पडला तर ह्यांच्या लक्षातही येणार नाही.

मग ती पापणीसुद्धा न मिटता त्यांच्याकडे लक्ष ठेवून बसली.

घरात सगळं काम पडलं होतं. पण घरातल्या कामापेक्षा या लोकांचा जीव जास्त महत्त्वाचा होता. ती तशीच पहारा देत बसून राहिली.

दुपारी त्यांची जेवणाची सुट्टी झाली, तेव्हा ती भानावर आली. भात, आमटी करायच्या भानगडीत न पडता तिने सकाळी केलेली चपाती, भाजी खाल्ली आणि परत ती ड्युटीवर हजर झाली.

संध्याकाळी विकास घरी आला, तेव्हाही ती समोरच्या बिल्डिंगवर देखरेख करत होती.

“काय केलंस अख्खा दिवस? कंटाळा नाही ना आला? ” 

पण तिने उत्तरच दिलं नाही.

“अश्विनी, मी तुझ्याशी बोलतोय. ” 

“काय म्हणालात? ” 

“लक्ष कुठे आहे तुझं? ”

“समोर ती बिल्डिंग बांधताहेत ना, कोणी पडलाबिडला तर, म्हणून लक्ष ठेवून होते. ” 

विकासचं लक्ष गेलं, सकाळी ठेवलेला पेपर, चहाचा कप, ताटल्या सगळं तसंच होतं.

“तू सकाळपासून बसली आहेस अशी? ” 

“हो. ” 

तेवढ्यात त्या मजुरांची ड्युटी संपली आणि त्यांनी खाली उतरायला सुरुवात केली. सगळे खाली उतरल्यावरच अश्विनी जागेवरून उठली.

मग तिने चहा केला.

अख्खा दिवस सावधपणे बसून बसून ती दमलेली दिसत होती.

मग रात्री विकासने बाहेरूनच जेवण मागवलं.

“कशाला बाहेरचं? मी केलं असतं ना काहीतरी, “ती म्हणाली खरी;पण आपल्या अंगात आता अजिबात त्राण नाही, हे तिला जाणवत होतं.

मग हे रोजचंच झालं. विकास घरी यायचा, तेव्हा अश्विनीच्या अंगात त्याच्याशी बोलायचंही त्राण नसायचं. विकास चिडायचा; पण अश्विनीच्या निरागस चेहऱ्याकडे बघून त्याला ओरडावंसंही वाटायचं नाही. दिवसभर नीट खात-जेवत नसल्याने, एकाच जागी बसून राहिल्याने, शिवाय मनावरच्या ताणामुळे तिची तब्येतही ढासळत चालली होती.

रविवारी अरविंदच्या घरी या नवपरिणीत जोडप्याला जेवायला बोलावलं होतं.

” मी नाही येऊ शकणार, अहो. तुम्ही एकटेच जा. मला समोर लक्ष ठेवायचं असणार ना! ” 

“रविवारी त्यांनाही रजा असते, ” विकासने ठोकून दिलं. तो थोडाच बघायचा, ते कधी काम करताहेत आणि कधी नाही, ते.

“मग मीपण येईन. ” 

“आपण सकाळी लवकरच निघूया. ” 

“चालेल. ” 

 पण सकाळी उठायला, तयारी करायला थोडा उशीरच झाला. तोपर्यंत समोरचं काम सुरू झालं.

“आता मी नाही येऊ शकणार. तुम्ही एकटेच जा. ” 

शेवटी विकासने अरविंदला कळवलं, अश्विनीची तब्येत बरी नसल्याने येऊ शकत नाही, म्हणून.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये विकास स्वतःहून अरविंदकडे गेला. “सॉरी यार! ‘ 

“सुनीता अपसेट झाली. ती दोन दिवसांपासून तयारी करत होती. ” 

“मला जाणीव आहे त्याची. आज ऑफिस सुटल्यावर कॉफी घ्यायला जाऊया. मला बोलायचं आहे तुझ्याशी. ” 

“एनिथिंग सिरीयस? ” 

“हो. संध्याकाळी बोलूया सविस्तर.”

– क्रमशः भाग पहिला   

©  गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ५ अनुवादित लघुकथा : हप्ता / एक दिवस बालदिवस / निर्लज्जपणा / आई.. एक गरज / सून बनली सुकन्या – मूळ हिन्दी लेखक : सेवासदन प्रसाद ☆ मराठी अनुवाद – जस्मिन शेख ☆

जस्मिन शेख

🌸 जीवनरंग 🌸

☆ ५ अनुवादित लघुकथा : हप्ता / एक दिवस बालदिवस / निर्लज्जपणा / आई.. एक गरज / सून बनली सुकन्या – मूळ हिन्दी लेखक : सेवासदन प्रसाद ☆ मराठी अनुवाद – जस्मिन शेख ☆

☆ १. हप्ता ☆

सुंदर आणि सुशिक्षित सपनाचे फक्त एकच स्वप्न होते की मुंबईमध्ये तिचे एक फ्लॅट असावे. आई-बाबांचे आयुष्य तर चाळीच्या कोठरीतच गेले. कसंतरी आपले शिक्षण पूर्ण करून तिने आपले स्वप्न साकार करण्यासाठी एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये नोकरी मिळवली. परंतु महागाईच्या लाटेने तिच्या स्वप्नावर पाणी फेरले. पगारातून बचत करणे शक्य नव्हते. फ्लॅट विकत घेणे आता केवळ एक स्वप्न बनून राहिले. सपनाची शेवटची आस होती ती म्हणजे तिचा भावी पती! तिला असा जोडीदार हवा होता की जो कमीत कमी एका फ्लॅटचा मालक असावा. परंतु तिथेही नशीब आडवे आले. आई-बाबांच्या पसंतीला तिला होकार द्यावा लागला. नवरा पण असा भेटला की जो फ्लॅट न खरेदी करू शकल्याच्या दुःखात दारूच्या व्यसनात बुडाला होता. इतरांचे अलॉटमेंट लेटर देताना सपना आतून आणखीन कुढत होती. नवऱ्याचा आधार पण न मिळाल्याने ती भरकटली.

काही दिवसातच सपनाची बढती झाली. कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाची ती आता पी. ए. बनली. तिच्या नावावर एक फ्लॅट अलॉट झाला. आई-बाबांना मुलीची प्रगती बघून अभिमान वाटू लागला. दारुडा नवरा आता महागडी दारू पिऊ लागला आणि सपना प्रत्येक महिन्याला मालकाच्या मिठीत हप्ते चुकवू लागली.

मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद: जास्मिन शेख

 ☆ २. एक दिवस बाल दिवस ☆

बंगल्याच्या बाहेर पडताच मंत्रीसाहेबांनी गार्डला विचारलं, “आज मैदानात एवढी शांतता का पसरली आहे? “

” साहेब, तुम्हीच म्हणाला होता की मुलांना तंबी दे की इथे क्रिकेट खेळायचे नाही. बंगल्याची काच चकणाचुर होऊ शकते. “

” हो, ते ठीक आहे, पण आज ‘बाल दिवस’ आहे. मीडियाची माणसं येणार आहेत. मी मांडव घालण्याची पण ऑर्डर दिली आहे. आज मुलांच्या पूर्ण टोळीला एकत्र कर. “

राजनीतीपासून कोसो हात लांब असलेली सारी चिमुरडी आनंदाने हजर झाली. वाटलं क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली. दिवसभर क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. संध्याकाळी रंगारंग कार्यक्रम पण झाला. मुलांना सन्मानित करण्यात आले. मंत्री साहेबांनी मुलांना क्रिकेट बॅट आणि बॉल भेट दिली. मंच वरून खाली उतरताना मंत्री साहेबांनी गार्डच्या कानात काहीतरी पुटपुटले.

समारोह संपन्न होताच गार्डने मुलांना कडक शब्दात चेतावणी दिली, “पुन्हा इथं दिसता कामा नये! ” 

मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद: जास्मिन शेख

☆ ३. निर्लज्जपणा ☆

अचानक धुवांधार पाऊस पडू लागला. लोक पावसापासून बचावासाठी एका चहाच्या टपरीत घुसले. जागा खूपच कमी होती. तरी पावसापासून वाचण्याचा असफल प्रयत्न करत होते.

थोड्या वेळानंतर एक तरुणी तिथे येऊन उभी राहिली. चिंब भिजल्याने तिचे कपडे शरीराला चिटकले होते. छातीवर ओढणी पण नव्हती. सगळ्यांच्या नजरा तिच्या चिंब शरीरावर रेंगाळू लागल्या. तरुणीला खूपच अवघडल्यासारखे वाटू लागले. आपल्या दोन्ही हातांचा दुपट्टा बनवून ती वृक्षस्थळांना झाकण्याचा अयशस्वी प्रयत्न करू लागली. तेव्हा वाऱ्याच्या झुळकेने उघडा पडलेला कमरेचा नग्न भाग कामुक नजरांचा शिकार बनला. पाऊस इतका जोरात पडू लागला की ती तरुणी इच्छा असून ही जाऊ शकली नाही.

एक मध्यम वयाची स्त्री सगळ्यांच्या नजरांना ओळखून होती. लोकांच्या कामूक मानसिकतेचा रागपण येत होता. तरुणी सभ्य लोकांत उभी होती वेश्यावस्तीत नव्हे!

परिस्थिती जेव्हा सहन करण्याच्या पलीकडे गेली तेव्हा ती तरुणीच्या समोर भिंत बनून उभी राहिली आणि प्रत्येकाकडे डोळे रोखून पाहू लागली. पराभूत नजरा लाजेने खाली झुकल्या.

मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद: जास्मिन शेख

☆ ४. आई… एक गरज ☆

 — दादा, एक वर्ष झालं आई तुझ्या जवळ राहिली. आता  माझ्या कडे पाठव.

— ठीक आहे. शिखा कशी आहे?

— बस वेळ झाली आहे आता. लवकरच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागेल.

— तुला शिखाच्या देखभालीसाठी आणि होणाऱ्या बाळाच्या पालनपोषण करण्यासाठीच आई हवी आहे.

— तू पण तेच केलस ना! पाच वर्षे आई एकटी गावाकडे राहिली, तेव्हा साधी विचारपूस सुद्धा केली नाहीस. मी पण मोठ्या बंधूच्या पदचिन्हाचे अनुकरण करत आहे.

— ठीक आहे. पाठवून देतो. बेबी आता जवळपास एक वर्षाची होईल. तुझी वहिनी सुद्धा आता चिडचिड करत आहे.

 वातावरणात दोन्ही भावांचे आवाज घुमू लागले.

 मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद

 मराठी अनुवाद: जास्मिन शेख

 9881584475 

☆ ५. सून बनली सुकन्या ☆

लक्ष्मी आपल्या सासरी खूप आनंदात होती. पतीचे प्रेम तर तिला भरपूर मिळत होतेच, सासू-सासर्‍यांनी देखील मुलीसारखी माया लावली होती. दोघे नवरा बायको कामासाठी बाहेर पडले तर सासू घरातील सर्व काम सांभाळात होती. जेव्हा लक्ष्मी ऑफिस मधून घरी परत येईल तेव्हा घरातील राहिलेले कामे पूर्ण करून घेई. रात्री सगळे एकत्र जेवायला बसत. मनीष पण आपल्या बायकोला कामात मदत करत असे. जीवन खूपच आनंदात जात होते.

अचानक एक दु:खद घटना घडली. मनीष ऑफिसमधून परत येत होता त्यावेळी वेगाने येणा-या ट्रकने स्कूटरला मागून जोरात धडक दिली. अपघात एवढा भयानक होता की मनीषचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आई-बाबांना मोठा धक्का बसला. आणि लक्ष्मीचे तर हाल पाहावेना. मनीषचे वडील एका पुतळ्यासारखे निर्जीव बनले होते. नंतर सगळे एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न करू लागले.

हळूहळू स्थिती सामान्य होऊ लागली. एके दिवशी लक्ष्मीचे आई-वडील भेटायला आले. लक्ष्मीच्या आईने त्यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला… आता मनीष तर नाही राहिला, पण तिच्या समोर तर पूर्ण आयुष्य आहे. लक्ष्मीला आम्ही सोबत घेऊन जातो आणि पुढे मागे दुसरे लग्न करून देतो.

त्यांची मागणी ऐकून दोघेही शांत बसले. नंतर लक्ष्मीच्या सासर्‍यांनी मान हलवूनच आपली सहमती दर्शविली. परंतु लक्ष्मी शांत बसली नाही. ती निडरपणे म्हणाली, ” आई, मी आता परत येणार नाही. आता हेच माझे घर आहे. मनीष नंतर यांची देखभाल कोण करेल? तुमच्याजवळ कमीत कमी तुमचा मुलगा तरी आहे. माझ्या भविष्याबाबत म्हणाल तर यांचे विचार सुद्धा तुमच्या विचारांशी मिळते- जुळतेच आहेत. योग्य वेळ बघून मी स्वतः माझा निर्णय घेईन. ” 

मुलीचं बोलणं ऐकून आई-वडील शांत राहिले आणि सासू-सासर्‍यांना आपल्या सुनेचा अभिमान वाटला. त्यांना भास झाला की, मनीषच पुन्हा जिवंत होऊन पुढे उभा राहिला आहे.

मूळ हिंदी कथा : सेवासदन प्रसाद

 मराठी अनुवाद: जास्मिन शेख

मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद: जस्मिन शेख

मिरज जि. सांगली मो 9881584475

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “नात्यांचं सांभाळणं…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “नात्यांचं सांभाळणं…” ☆ श्री मंगेश मधुकर

झालं असं की….

ऑफिसमधून रोजच्या वेळेपेक्षा लवकर निघून सुभाष मित्राच्या जनरल स्टोअरवर गेला.

“या कौन्सिलर, घरस्फोटाची भांडणं सोडवून झाली का?”बापूनं स्वागत केलं.

“गप रे, का उगाच छळतोस. जाम वैतागलोय”

“आज जास्त केसेस होत्या वाटतं”

“एकच होती. सगळा दिवस खाल्ला. सुशिक्षित जोडपं पण धुमाकूळ घातला. लग्नाला दोनच वर्ष झालेली पण एकमेकांविषयी पराकोटीचा द्वेष. जोरजोरात भांडत होते. लग्नाचं कर्ज अजून फिटलं नाही तोपर्यंत घटस्फोटाची वेळ आली. दोघांचाही ‘ईगो’ खूप स्ट्रॉंग. खूप समजावलं पण पालथ्या घड्यावर पाणी… ”

“या असल्या गोष्टी तू कधीपासून मनावर घ्यायला लागला. त्यांचं ते बघतील. ”

“ते आहेच रे. खरं सांगू. दररोज दुसऱ्यांची धुणी धुवून कंटाळा आलाय. ”सुभाष 

“इमोशनली विचार करतोयेस. याकडं फक्त नोकरी म्हणून बघ. ”

“इतकी वर्ष तेच तर करतोय तरीही त्रास होतॊ. सततच्या कटकटींचा आणि नकरात्मकतेचा परिणाम होतोच. नातं जोडण्याची जेवढी घाई तशीच तोडण्याची सुद्धा. आयुष्यभर सोबत असणारं जोडपी जगात नाहीत असं वाटायला लागलं. ”दोघं बोलत असताना एक वयस्कर जोडपं झेरॉक्ससाठी दुकानात आलं.

“दर येळेला नवीन कायीतरी मागत्यात” चिडलेले आजोबा पेपर पुढे करत म्हणाले.

“सरकारी काम आहे. कागदपत्र द्यावीच लागतात. ”बापू.

“ते बी खरं हाय. कोर्टाची पायरी चढलीये आता दम लागला तरी थांबता येणार नाही. ” 

“अजून किती येळा यायला लागल”आजीबाई 

“मला काय माहीत?”आजोबा खेकासले.

“माज्यावर उगा चिडायचं नाय?सांगून ठेवते. ”आजीच्या तत्काळ प्रतिक्रियेनं आजोबा वरमले.

“लग्नाला किती वर्ष झाली”बापूनं विचारलं.

“पन्नासला दोन कमी. ”

“कधी भाडणं झाली नाही”सुभाष.

“लई यळा, आत्ता पण झालं, म्हणून तर म्हातारी कावलीये”आजोबा हळू आवाजात म्हणाले.

“कितीबी हळू बोल्लं तरी मला ऐकायला येत. ”आजी फणकाऱ्यात म्हणाली.

“माहितीये. लय तिखट कानाची हायेस. सूनाबी ह्येच म्हंतात”आजोबांच्या बोलण्यावर आजी खुदकन हसली.

“तुमची जोडी भारीये” बापू म्हणाला तेव्हा आजीबाईंनी नाक मुरडलं.

“तर वो, माजी हिरोविन तवा बी झ्याक व्हती आणि आता बी.. अजूनही तिच्या गालावरची खळी… ”आजोबांनी आजीकडे पाहत डोळे मिचकावले तेव्हा आजी चक्क लाजली. अहाहा!! ते “लाजणं” फारच मनमोहक होतं.

“ए बाबा, आपलं काम कर. ते कागद दे. ”आजीनं विषय बदलला.

“कायची यवडी घाई, घरी तरी काय काम हाय. होऊ दे निवांत”आजोबा 

“सारखं यायला लागतंय ते बरंच हाय की.. या निमित्तानं नवरा-बायकोला फिरता येतेय, बोलता येतेय. ”बापू म्हणाला तेव्हा “या बया… ”म्हणत आजीनं कपाळावर हात मारला.

“ह्ये माज्या ध्यानातच आलं नाही. घरच्या गोतावळ्यात म्हातारीशी धडं बोलणं व्हत नाही. ही आयडिया बेस्ट!!आता लागू दे कितीबी येळ, फिकीर नाई. रोज येऊ. मस्त मजा करू”आजोबांनी म्हटल्यावर आजीच्या चेहऱ्यावर उमटलेले “भाव” लाजवाब. काही वेळानं आजी आजोबा निघून गेले. एकाच दिवशी टोकाचे अनुभव घेतलेला सुभाषचा मूड एकदम फ्रेश झाला. नाती तोडणं सोप्पंयं पण खरा आनंद ती टिकवण्यात आहे.

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन प्रवाह.. एकच स्पंदन..’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 जीवनरंग 🌸

☆ ‘दोन प्रवाह.. एकच स्पंदन..☆ श्री दिवाकर बुरसे

रात्र हळूहळू पृथ्वीवर उतरली होती.

आकाशात तारे डोळे मिचवावून एकमेकांना काहीतरी सांगत होते,

पण त्यांची भाषा अजूनही समजलेली नव्हती.

त्या शांततेत,

एक तरुण टेकडीवर बसला होता,

प्रश्नांनी भरलेला, उत्तरांच्या शोधात हरवलेला !

 

त्याने आकाशाकडे पाहिलं आणि विचारलं—

“हे सगळं नेमकं काय आहे?”

त्याच्या प्रश्नाला प्रतिसाद देत, कुठूनतरी दोन आवाज उमटले—

एक स्पष्ट, ठाम; दुसरा शांत, खोल.

 

“मी सांगतो, ” पहिला आवाज म्हणाला,

“मी विश्व उलगडतो —

कणांच्या नृत्यातून, ताऱ्यांच्या प्रवासातून.

मी तुला सांगतो—हे सगळं कसं घडतं।”

 

तरुणाने वळून पाहिलं—

त्याच्या समोर एक तेजस्वी व्यक्ती उभी होती,

डोळ्यांत जिज्ञासेची ज्योत.

“तू कोण?”

“मी— *विज्ञान*!”

 

इतक्यात दुसरा आवाज हळूच उमटला—

जणू वाऱ्याने मनाला स्पर्श केला

“आणि मी तुला सांगतो, ” तो म्हणाला,

“हे सगळं का आहे. ”

 

तरुणाने डोळे मिटले—

आणि त्याला एक शांत अस्तित्व जाणवलं,

अगदी स्वतःच्या आत आत.

 

“तू?”

“मी— अध्यात्म!”

 

क्षणभर तिघेही शांत बसले.

 

तारे वरून पाहत होते,

जणू या भेटीची साक्ष देत.

 

तरुण थोडा गोंधळला—

“तुम्ही दोघं वेगळं का बोलता?

एक ‘कसं’ सांगतो, दुसरा ‘का’…

मग खरं कोण?”

 

विज्ञान हसलं—

“मी तुला विश्वाचं चित्र दाखवतो,

पण त्या चित्राचा अर्थ…

तो कदाचित माझ्याही पलीकडे आहे. ”

 

अध्यात्म शांतपणे म्हणालं—

“मी तुला त्या अर्थाचा अनुभव देतो.

पण तो कसा घडतो—

हे मला शब्दात सांगता येत नाही. ”

 

तरुणाच्या मनात एक लहर उठली.

त्याने पुन्हा आकाशाकडे पाहिलं,

आणि मग..

 स्वतःच्या आत.

 

त्याला जाणवलं—

बाहेरचं विश्व आणि आतलं मन

एकमेकांपासून वेगळं नाहीत.

त्या क्षणी,

विज्ञान आणि अध्यात्म एकमेकांकडे पाहून हसले !

 

“आपण विरोधक नाही, ” विज्ञान म्हणालं,

“आपण दोन दिशांनी चालणारे एकच प्रवासी आहोत।”

“हो, ” अध्यात्म म्हणालं,

“तू प्रकाश देतोस, मी शांतता.

पण प्रकाशाला अर्थ देणारी शांतता,

आणि शांततेला दिसणारा प्रकाश—

दोन्ही एकत्रच पूर्ण होतात।”

 

तरुणाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली.

तो आता उत्तर शोधत नव्हता—

तो समजत होता.

त्याने डोळे मिटले,

आणि त्या क्षणी त्याला जाणवलं—

ना केवळ तारे दूर आहेत,

ना केवळ मन आत आहे;

दोन्ही एकाच स्पंदनाचे दोन स्वर आहेत !

 

रात्र अजूनही होती,

तारे अजूनही चमकत होते,

पण आता त्या तरुणासाठी

अंधार नव्हता—

कारण त्याने दोन प्रकाश शोधले होते—

एक बाहेर,

एक आत.

आणि त्या दोन्हींच्या संगमात

त्याला सापडलं—

एकच सत्य.

 

शेवट नाही…

कारण हा प्रवास थांबत नाही.

प्रश्न पुन्हा जन्म घेतात,

उत्तरं पुन्हा बदलतात.

पण आता भेद इतकाच—

तो एकटा नाही.

त्याच्यासोबत आहेत—

विज्ञानाचा प्रकाश

आणि अध्यात्माची शांतता !

आणि त्यांच्या मध्ये धडधडतंय—

एकच, अखंड स्पंदन !!

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देणाऱ्याने देत जावे ! ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ?

☆ देणाऱ्याने देत जावे ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

(विंदा)

गोष्ट १९६४-६५ सालातली. नागरजीभाई मेहता हे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या (पूर्वीच्या ठाणे – आत्ताच्या पालघर जिल्ह्यातील) बोर्डी गावातल्या शाळेतले शिक्षक – आज जरा ते चिंतामग्न होते. निवृत्ती जवळ आलेली. पण घरची आर्थिक घडी म्हणावी तशी नीट बसलेली नव्हती. चारही अपत्यांची शिक्षणं अजून पूर्ण व्हायची होती – अजून ती मार्गी लागायची बाकी होती. निवृत्तीनंतर ही गणितं कशी जुळणार? गुरुजी तर अगदी हवालदिल होऊन गेले होते.

शेवटी मनाचा हिय्या करून त्यांनी सोसायटीचे सर्वेसर्वा – सेक्रेटरी साहेबांना एक विनंती अर्ज पाठवून दिला. वयानुसार निवृत्तीकाळ आला आहे पण आर्थिक अडचणी लक्षात घेता मेहेरबानी करून एक वर्ष मुदतवाढ मिळू शकेल का अशी विनंती त्या पत्रात केली होती.

अर्ज विचारात घेतला गेला, गुरुजींचा व्यासंग आणि अनुभव लक्षात घेता, विशेष प्रकरण / case म्हणून संस्थेद्वारा एक वर्षाची मुदतवाढ देण्याची मंजूरी आली. गुरुजींना हायसे वाटले.

इथे नियतीने एक वेगळीच कलाटणी घेतली. संस्थेच्या कारकुनाने गुरुजींच्या अर्जाची प्रत शिक्षण मंत्रालयाला पाठवून दिली व मुदतवाढीचा अर्ज केला. कागदी घोडे त्यांच्या गतीने चालले व सरकारकडूनही गुरुजींच्या मुदतवाढीस मंजुरी आली. कारकुनाने ही बाब सेक्रेटरी साहेबांच्या कानी घातली.

दिवसामागून दिवस भराभर चालले होते. गुरुजींचे अध्यापनाचे काम नेहमीप्रमाणेच जोमात चालू होते. आणि तेव्हाच सेक्रेटरी साहेबांचा निरोप आला.

“मी सोसायटीद्वारा तुम्हाला एक वर्षाची मुदतवाढ मंजूर केली होती. या वर्षी सरकारनेच तुम्हाला मुदतवाढ दिली आहे. तुमचा या वर्षीचा पगार सरकारकडूनच येणार आहे, त्यामुळे तुम्ही सोसायटीला पुढच्या वर्षीच्या मुदतवाढीसाठी पुन्हा अर्ज करा. तुम्हाला सोसायटीतर्फे अजून एक वर्ष मुदतवाढ मिळेल. “

गुरुजी आनंदले. त्यांनी परत अर्ज केला. तो मंजूर झालाच पण कारकूनानेही परत सरकारकडून आणखी एका वर्षाचे extension मिळवले.

पुढची ४-५ वर्षे हा सिलसिला चालूच राहिला. गुरुजींच्या मुलांची शिक्षणं पूर्ण झाली, मुलं हाताशी आली आणि शेवटी गुरुजींनी स्वत:हून सेक्रेटरी साहेबांना पत्र लिहीले व आता निवृत्त होण्यासाठी परवानगी मागितली.

— —

१९९३ –

१९१८ साली स्थापन झालेल्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे ७५ वे वर्ष मोठ्या दिमाखात साजरे करायचे घाटत होते. त्यानिमित्ताने संस्थेच्या बोर्डी शाळेतील हयात असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजिलेला होता. मेहता गुरुजींनाही आमंत्रण गेले होते. मात्र गुरुजींचे ज्येष्ठ चिरंजीव झोनल सेक्रेटरींना प्रत्यक्ष येऊन भेटून गेले – आपण देऊ केलेल्या सन्मानाबद्दल आम्ही शतशः ऋणी आहोत, पण गुरुजी अंथरुणाला खिळून आहेत. ते इथे कार्यक्रमाला उपस्थित नाही राहू शकणार.

झोनल सेक्रेटरींनी हा निरोप सेक्रेटरी साहेबांना कळवला होता. सेक्रेटरी साहेबांनी त्यांची appointements diary पाहिली व बोर्डी झोनल सेक्रेटरींना एक निरोप पाठवला. ते स्वत: मेहता गुरुजींच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करणार होते.

मेहता गुरुजींच्या घरी निरोप पाठवण्यात आला. मुलाला आनंद झालाच पण गुरुजींना यातील काय कळणार असा प्रश्नही पडला. गुरुजींचे वय आता नव्वदीच्या पुढे गेले होते, गेले सहा महिने ते कोमा सदृश निपचित पडूनच होते. पण त्याने सेक्रेटरी साहेब येणार असा निरोप मात्र गुरुजींना सांगितला.

बोर्डीतील माजी शिक्षकांच्या सत्काराचा कार्यक्रम फारच हृदयस्पर्शी झाला. सेक्रेटरी व झोनल सेक्रेटरी आता गुरुजींच्या घरी – बोर्डीपासून ४०-५० किलोमीटर दूर – वलवाडा गावी निघाले होते.

गुरुजींच्या घरी ते पोचल्यावर मुलाने गुरुजींना सेक्रेटरी साहेब आले आहेत असं सांगितले मात्र, जणू जादूची कांडी फिरावी तसे गुरुजी उठून बसले. हात जोडून ते म्हणाले, “सोसायटीचे माझ्यावर अगणित उपकार आहेत, बोला मी आपली काय सेवा करू शकतो? “

ज्या सेक्रेटरी साहेबांनी आपल्याला नोकरीत मुदतवाढ दिली ते साहेब निवृत्त झाले आहेत, हे नवीन साहेब आहेत हा तपशील गुरुजींच्या ध्यानात येत नव्हता, पण सोसायटीचे सेक्रेटरी स्वत: आपल्या दारात आले आहेत हे मात्र त्यांना उमगत होते.

संस्थेला अजून खूप पल्ला गाठायचा होता. बोर्डी परिसरात अजून विज्ञान शाखेचे पदवी महाविद्यालय नव्हते. डिग्रीसाठी जवळचे सायन्स कॉलेज पालघरला – बोर्डीहून अजून पन्नास किलोमीटरवर होते. इतक्या दूर मुला मुलींना शिकायला पाठवायला अडाणी अशिक्षित पालक तयार नसत. जो भरवसा; जो विश्वास त्यांना गोखले एज्युकेशन सोसायटीवर होता तो त्यांना या दूरच्या कॉलेजबद्दल नव्हता. पण यामुळे अनेक मुला-मुलींची शिक्षणं बाराव्वीतच संपत. पुढील शिक्षणापासून ते वंचित रहात. ग्रामीण आदिवासी क्षेत्रातून आलेले हे बहुतेक सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी first generation learner होते. त्यांचे आई वडिल अशिक्षित / अल्प शिक्षित होते. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते गोखले एज्युकेशन सोसायटीकडे मोठ्या आशेने पहात होते.

करायचं खूप होतं, पण आर्थिक चणचण होती. सायन्स कॉलेजसाठी निदान ३०-४० लाख रुपयांची गरज होती. थोडीफार देणगी उभी रहात होती पण अपेक्षित रकमेच्या पासंगालाही तेवढे पैसे पुरत नव्हते. निदान काही खोल्या बांधून एखाद्या पदवी अभ्यासक्रमाचे तरी कॉलेज सुरू करता आले तर हवे होते.

सेक्रेटरी साहेबांच्या मनात क्षणार्धात हे सगळे विचार येऊन गेले पण आपण एका निवृत्त शिक्षकाच्या घरी आहोत याचे त्यांना भान होते. त्यामुळे अगदी थोडक्यात त्यांनी गुरुजींना सोसायटीच्या पुढच्या वाटचालीची – ध्येयधोरणांची कल्पना दिली. गुरुजींना आतपर्यंत काय पोचलं; किती पोचलं कळलं नाही, सेक्रेटरी साहेब स्वत: आपल्या घरी आले यातच ते कृतकृत्य झाले होते.

काही दिवसांनंतरची गोष्ट. झोनल सेक्रेटरी मेहता गुरुजींच्या प्रकृतीची विचारपूस करायला त्यांच्या घरी गेले होते. गुरुजी कमालीचे अशक्त झाले होते, बोलताही येत नव्हतं त्यांना. गुरुजींनी एक पाटी मागवून त्यांच्या मातृभाषेत – गुजरातीत – तमारू काम थई गयू – तुमचं काम झालं – असे लिहून दाखवले. सरांना काही रेफरन्स लागला नाही.

त्याच्या दुसऱ्या दिवशी, झोनल सेक्रेटरी आपल्या ऑफिसमध्ये बसले होते, शिपायाने निरोप आणला – वलवाड्याहून मेहता गुरुजींची मुले आली आहेत.

तीन मुलगे व एक मुलगी – चेहऱ्यावर अतिशय कृतज्ञता भावाने आत आले.

“सर, तुम्ही सेक्रेटरी साहेबांना घेऊन आमच्या घरी आलात, आम्ही आपले खूप आभारी आहोत. गुरुजी तर अजून त्याच धुंदीत आहेत. आपण संस्थेच्या सायन्स कॉलेजच्या स्वप्नाविषयी सांगत होतात. गुरुजींच्यातर्फे आम्ही एक छोटी भेट आणली आहे त्याचा स्वीकार करावा. “

झोनल सेक्रेटरी सरांनी पाकिट उघडून बघितले – त्या पाकिटात चाळीस लाख रुपयांचा एक चेक होता आणि समुद्राभिमुख अशा एका सुंदर इमारतीचा – ज्यात एक मोठा हॉल, क्लासरूम्स / वर्ग, प्रयोगशाळा, ऑफिस, असा सहा सात डिपार्टमेंटसना पुरेल अशा रचनेचा आराखडा होता. “सर, आपल्या कॉलेजसाठी चालेल ना हे डिझाईन? “

झोनल सेक्रेटरी सर स्तब्ध झाले. कविवर्य विं दा करंदीकरांच्या ओळी त्यांना आठवल्या –

देणाऱ्याने देत जावे,

घेणाऱ्याने घेत जावे.

घेता घेता एक दिवस

देणाऱ्याचे हात घ्यावे.

— —

१९९४

मार्च महिना – वृद्धापकाळाने जराजर्जर झालेले मेहता गुरुजी आज पुन्हा बोर्डीच्या समुद्रकिनारी आले होते. संस्थेच्या कॉलेजच्या भुमीपूजन समारोहासाठी – झोनल सेक्रेटरींना त्यांनी जे लिहून दिलं होतं – तुमचं कॉलेजचं काम नक्की होणार – ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी.

दुर्दैवाने भुमीपूजनानंतर थोड्याच दिवसांत गुरुजींनी देह ठेवला पण त्यांच्या मुलांनी ती वास्तू मोठ्या दिमाखात उभारून वडिलांचे नाव अजरामर केले.

— —

२०१९ – २०२०

१९९४ साली स्थापन झालेल्या बोर्डीच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या N B Mehta (Valwada) Science College चे रजत जयंती वर्ष आहे.

नैसर्गिक उजेड, समुद्राची साद, नारळीची झाडे अशा सोबतीने ३६० विद्यार्थ्यांसह single faculty असे मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या या कॉलेजमध्ये आता १५०० च्या जवळपास विद्यार्थी शिकत आहेत. कॉलेजमध्ये विविध विषयांत पदवी; पद्व्युत्तर शिक्षणतर आहेच पण दोन विषयांत PhD संशोधनासाठी मान्यताही मिळालेली आहे. आत्तापर्यंतच्या प्रवासात कॉलेजला महाराष्ट्र शासनातर्फे “जागर जाणिवांचा” हे जिल्हा स्तरावरील पारितोषिक व २०१२ साली मुंबई विद्यापीठाचा Best College – Rural अशा पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.

मेहता कुटुंबियांनी लावलेल्या इवल्याशा रोपाचा छान वटवृक्ष होत आहे आणि सावित्रीच्या लेकींना आणि लेकांना आता शिक्षणासाठी दूरवर पायपीट करावी लागत नाहीये.

 

© डॉ मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “डिलिव्हरी बॉय!!!” – भाग ३ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “डिलिव्हरी बॉय!!!” – भाग ३ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(सर्व काही असूनही काही लोक आनंदी नसतात, तर काहीच नसताना आजी समाधानी होती…!

ही टपरी म्हणजे तिचे शॉप होते…) 

इथून पुढे – – – 

या टपरीकडे पाहण्याचा आता माझा सुद्धा दृष्टीकोन बदलला… आता मलाही ते शॉपच वाटू लागले… दृष्टिकोनाचा फरक…!

चार काठ्यांपैकी, लहान बाळाच्या डोक्यावरून फिरवतात तसा हात त्यातल्या एका काठी वरून फिरवत ती म्हणाली, ‘इतकी वर्ष साथ दिली रे यांनी… यांना तू फेकायचं म्हणतोस…? ‘

या चार काठ्यांचे ऋण कसे फेडायचे? आधी फुटपाथ वर उघड्यावर राहत होते. घरातल्यांनी डोक्यावरचं छप्पर काढलं, पण याच चार बांबूंनी सावली दिली…

मी इथल्या लोकांना सांगून ठेवलं आहे, जेव्हा मी मरेन त्यावेळी तिरडी बांधताना याच चार बांबूंसह मला जाळा…!

माझ्या अंगावर काटा आला.

कृतज्ञता असावी तर अशी…

आजीची या कृतज्ञतेची भावना इतकी तीव्र आणि तीक्ष्ण होती की निर्जीव काट्यांना सुद्धा ती समजली असावी…

का कोण जाणे दर वेळी आलो की या काठ्या मला कायम झुकलेल्या दिसतात…!

तरीही अवसान आणून मी म्हणालो, ‘मी जिथे काम करतो तिथला साहेब चांगला आहे, मला तो बिनव्याजी कर्ज देईल, आपण हळूहळू कर्ज फेडू साहेबाचे… बघ तुझा फायदा होईल… आता आहे त्यापेक्षा आणखी जास्त सुख मिळेल…

मी खडा टाकत, चाचपडत, बुटाने जमीन टोकरत आजीशी खोटं बोललो…

कारण माझ्यातला भिक्षेकर्‍यांचा डॉक्टर काही माघार घेईना…!

वा रे वा तालेवार, आला मोठा कर्ज फेडणारा, असं म्हणून आजीनं छद्मीपणाने माझ्या तोंडासमोर गोल गोल हात फिरवला.

ती पुन्हा भाऊक झाली, तिच्या डोळ्यात पाण्याचे थेंब होते, ती म्हणाली, ‘ लेकरा या पांढऱ्या केसांनी आणि चेहऱ्यावरचे सुरकुत्यांनी जे मंत्र शिकवले ते आज तुला सांगते गाठ मारून ठेव’.

मी कान टवकारून ऐकायला लागलो 

खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली, ‘आयुष्यभर कोणाच्यातरी ऋणात रहा, पण कोणाच्या कर्जात राहू नकोस’… बघ… अर्थ कळतोय का…?

‘आयुष्यात जगताना दूरदृष्टी ठेवून जगावं… बाळा, दूरचं बघता यावं म्हणून निसर्गानं आपल्याला डोळे कपाळावर दिले आहेत, नाहीतर अंगठ्यालाच दिले नसते का…? … बघ समजतंय का…?

तीचे डोळे आता शून्याकडे लागले होते…

“शून्यातच कदाचित तिचा भूतकाळ असावा… “

बाळा, तू त्या काठ्यांबद्दल बोललास, ‘ अरे एखादं झाड फळ देत नसलं म्हणून काय झालं, सावली तर देतच की… म्हाताऱ्या माणसाला चालताना आधार देते ती ही काठीच असते… आपण ऋणात राहायचं असतं त्या सावलीच्या, मिळालेल्या त्या आधाराच्या…!

आंबा खाऊन लोक कोय फेकतात, अरे या कोयी वरच तर सगळा गर असतो… आणि कोय म्हणजे तरी काय तर बीज रे… या बीजाला काहीच किंमत नसते का रे? ती आकाशाकडे पाहत म्हणाली.

हे वाक्य तिच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित होतं हे मला कळायला वेळ लागला नाही 

तु म्हणालास शॉप नीट केलं तर आणखी फायदा होईल, ‘पण बेटा कायम लक्षात ठेव फायदा हा कायम खाली असतो, म्हणून त्याला “उचलावं” लागतं… वाकावं लागतं… वाकलास की संपलास…!

‘अरे वाकायचं, पण त्यांच्यापुढे, जे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात, जे आपलं शुभ व्हावं म्हणून आपल्या मागेपुढे शरीराने किंवा मनाने उभे असतात, त्यांच्यापुढे वाकायचं, नव्हे लोटांगण घालायचं… मग ते सजीव असोत का निर्जीव…! ‘

‘शुभचिंतक खूप असतात… परंतु एखाद्याचे शुभ होऊ नये म्हणून चिंता करणारेच जास्त असतात, हे कायम लक्षात ठेव बाळा’ 

अवाक होऊन मी हे सगळं ऐकत होतो…!

‘अश्रूंना काही किंमत नसते, किंमत असते अश्रू पुसणाऱ्याला… हा जो अश्रू पुसणारा आहे ना, त्याला देव समजायचं, आणि त्याच्यासमोर नतमस्तक व्हायचं बेटा’

मी नि:शब्द झालो, काय बोलावं मला पुढे कळेना.

शिक्षण फक्त वाचायला शिकवतं, आयुष्यात आलेले अनुभव जगायला शिकवतात हेच खरं…!

‘तू म्हणतोस शॉप आणखी मोठं करू, तुला सुख मिळेल… काही वर्षांनी वाटेल त्याला आणखी मोठं करू, हि महत्त्वाकांक्षा कधी संपणार आहे का…?

 सिकंदर सारखा सिकंदर, सुख शोधता शोधता शेवटी जाताना हाताच्या मुठी उघड्या ठेवून गेला, सर्व असूनही मी काहीही वर घेऊन चाललो नाही हे त्याला सांगायचं होतं, आपण कोण रे बेटा…?

सुख मानण्यावर असतं बेटा…

आधी रस्त्यावर उघड्यावर झोपत होते, मच्छर चावायचे, आता रस्त्यावरच मच्छरदाणी लावून झोपते, आता मच्छर चावत नाहीत हे सुख नाही का…?

पुर्वी इथपर्यंत येताना हातात सामानाचे डबे घेऊन चालत, उठत, बसत, कण्हत यायचे…

आता जोडलेले कितीतरी गिऱ्हाईक लोक मला रिक्षाने किंवा त्यांच्या मोटरसायकलीवर आजी आजी म्हणत जागेवर सोडतात… माझा त्रास किती कमी झाला…

हे सुख नाही का…?

डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असलेली पोरं रोज मला धंदा लावायला मदत करतात, माझं हे शॉप माझं नाही, ते त्यांचं समजतात हे सुख नाही का?

आई आजी काकू मावशी म्हणत रोज इथे लोक येतात, चार भिंतीच्या बाहेरही माझं एक कुटुंब आहे, हे सुख नाही का…?

माझ्या घरातल्या लोकांनी माझी जबाबदारी घेतली नाही, पण कोण कुठला तू गरिबा घरचा मुलगा… माझ्यासाठी तू कर्ज घ्यायला तयार झालास… हे सुख नाही का…?

बेटा सोन्या म्हणत इथल्या प्रत्येक माणसाला मी माझा मुलगा करून घेतला आहे, एकाच जन्मात इतक्या लोकांची आई होऊ शकले… हे सुख नाही का…?

अजून किती सुख मिळवायचं बेटा?

किती छोट्या छोट्या गोष्टीत आजी सुख शोधत होती.

सुखी माणसाचा सदराच आजीने माझ्या पुढे आणून ठेवला…

‘ बेटा कधीतरी कुठेतरी थांबावंच लागतं की, आयुष्यात पळताना ब्रेक कुठे लावायचं याचं भान राखता आलं पाहिजे सोन्या. नुसतं शिकलं म्हणून कोणी ज्ञानी होत नाही बेटा…

“काय करावं याचं भान म्हणजे ज्ञान… “

“आणि काय करू नये याचं ज्ञान म्हणजे भान… “

ऐकून मी स्तिमीत झालो…!

मी डॉक्टर, कधी काळचा अंतरराष्ट्रीय संस्थेचा महाराष्ट्र प्रमुख…

हि आजी रस्त्यावर वडापावची गाडी चालवते…

तरीही हुशार कोण शहाणं कोण यातला भेद आज समजला…

सुशिक्षित आणि सुसंस्कारित यामध्ये फरक असतो याची आजीने जाणीव करून दिली.

मी या माऊलीच्या पायाशी झुकलो, तिला नमस्कार केला.

खाली बसून मी वर तीच्या चेहऱ्याकडे पाहिले मला ती हिमालयाप्रमाणे उंचच उंच वाटली…!

मी तिला म्हणालो आजी तू हे शिकलीस कुठं…?

ती म्हणाली, पूर्वीच्या नववी पर्यंत माझं शिक्षण शाळेत झालं, थोडं वाचलं… बाकी जगाने न शिकवताच शिकवून दिलं…!

तोंडाला पदर लावत ती हसत म्हणाली.

पदराआडचं करुण हास्य बहुदा तिला मला दाखवायचं नसावं, मी समजून गेलो.

या स्वाभिमानी आजीला मी पुन्हा एकदा नमस्कार करून गाडीला किक मारली… तेवढ्यातूनही ती म्हणाली सांभाळून जा रे बेटा…!

यावेळी पाऊस नव्हता तरीही जुगलबंदी सुरू होती माझी आणि माझ्या डोळ्यांची…!

यानंतरही मी त्या बाजूला जायचो परंतु आजीच्या “शॉप” वर थांबायचो नाही, वडे करण्यात किंवा कोणाशी तरी बोलण्यात ती गुंग असायची.

मधल्या काळात मुद्दाम तिला भेटण्यासाठी चक्कर मारली, त्यावेळी आजीच्या शॉप ची जागा रिकामी होती.

मोटरसायकल थांबवून मी शेजारी आजी बद्दल विचारले, ते म्हणाले, ‘आजी गेली. ‘

कद्धी, मी जवळपास ओरडलो…

माझ्या पायाखालची जमीन सरकली…

तिथे छप्पर म्हणून असलेला फ्लेक्स नव्हता, फ्लेक्स ला टेकू देणाऱ्या त्या चारही काठ्या नव्हत्या…

अर्थातच त्यांची आहुती पडली असेल…

शॉप ओस पडले होते…

आजी, काकू, मावशी या शब्दांचा किलबिलाट तिथे नव्हता… झाडंच नाही तर पक्षी कुठून येणार…?

आता ती जाईल तिथे सोन्या बेटा म्हणत नवीन नाती निर्माण करेलच…

पण मी आणि माझ्यासारखे अनेक डिलिव्हरी बॉय पोरके झालो त्याचं काय…???

आजही मी त्या टपरीच्या / शॉपच्या रिकाम्या जागेभोवती फेऱ्या मारतो…

पण ती नसते… कुठेच नसते… कुठे कुठेही नसते…

तरीही काव काव करत मी घिरट्या मारत राहतो,

त्या जागेभोवती… पिंड शोधणाऱ्या त्या कावळ्यासारखा…!!!

– समाप्त –

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुला पावू दे.. आम्हाला खाऊ दे… ☆ मंजुषा सुनीत मुळे  ☆

मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ तुला पावू दे.. आम्हाला खाऊ दे ☆ मंजुषा सुनीत मुळे 

“ अगं आज दिवसभरात तू सकाळची पुरवणी पाहिलेली दिसत नाहीये.. ”

“ का हो.. काही विशेष बातमी आहे का? “ 

“ हो तर.. आणि खरं तर ती तूच मला सांगशील म्हणून वाट पाहात होतो मी. हे बघ.. नेहेमी ज्या हॉलमध्ये फक्त गार्डनचा सेल लागतो, त्याच हॉलमध्ये अजून मोठा सेल लागलाय म्हणे. “

“ बघू बघू.. “ –

– – मोदकासाठी सारण करत असलेल्या सविताबाई तशाच लगेच आल्या आणि अशोकरावांच्या हातातलं पेपरचं ते पान त्यांनी पट्कन ओढून घेतलं… “ सुवर्णा गॅस बारीक कर आणि सारण सारखं हलवत रहा.. आलेच मी.. “ असं म्हणत त्यांनी शेजारच्या टेबलावर ते पान पूर्ण उघडून ठेवलं…आणि खुर्चीत टेकल्या.

खूप मोठी पानभर जाहिरात.. इतर बातम्या न वाचण्याचा option नेहेमीच असतो त्यांना, पण साड्यांच्या सेलची जाहिरात म्हटल्यावर अथपासून इतिपर्यंत वाचलीच पाहिजे असा जणू दंडकच होता त्यांच्यासाठी….. त्या सेलमध्ये भारतात तयार होणाऱ्या सर्व प्रकारच्या साड्या असणार होत्या… त्याही

‘ आकर्षक ‘ डिस्काउंटसकट.. (आणि प्रत्यक्षात त्या साड्या आकर्षक असोत वा नसोत.. डिस्काऊंटला मात्र “आकर्षक” हे विशेषण असायलाच हवं असं बहुतेक संविधानातच लिहिलंय की काय या विचाराने अशोकरावांना हसू आलं)

ती जाहिरात पूर्ण वाचून झाल्यावर त्यांनी सुवर्णाला (कधी नव्हे ती) आपुलकीने हाक मारली.. “ अगं इकडे ये पटकन.. ही जाहिरात बघ.. “ 

– आणि कधी नव्हे ती एवढी प्रेमळ हाक ऐकून ‘ गॅसवरचं सारण शिजलंय नीट ‘ असं गृहीत धरून सुवर्णाने झटदिशी गॅस बंद केला आणि ती पळतच तिथे गेली …. आणि मग घड्याळाचे काटेही जणू फिरायचं विसरले. त्या सेलमधल्या अजून पाहिलेल्याही नसलेल्या साड्यांमध्ये दोघी अगदी हरवून गेल्या. (‘ मी मज हरपून बसले sss गं ‘ हे गाणं बहुतेक यांच्यासारख्या बायकांकडे बघूनच सुचलं असावं हा विचार मनात येऊन अशोकराव स्वतःशीच हसत तिथून उठले.) आणि दोघींचं चक्क एकमत झालं.. ठरलं – – “ उद्या सकाळी पटापट कामं आवरू आणि जाऊ हे प्रदर्शन बघायला.. “ (.. हे वाक्य तर गृहीतच धरलं होतं अशोकरावांनी. आता साडी-खरेदी या आत्यंतिक जिव्हाळ्याच्या विषयाबाबत सासू-सुनेत खडाष्टक योग डोकावणं कधीतरी शक्य होईल का? नाहीच … असं गृहीत धरून अशोकराव निर्धास्त झाले.)

ती पानभर जाहिरात बारकाईने वाचत वाचत पानाच्या शेवटच्या टोकाशी आल्यावर दोघीही एकदम दचकल्या…. एक लहानशी चौकट.. “ आज चंद्रोदय रात्री ८ वाजून ४७ मि. “ … आणि घड्याळाची टकटक अचानक सुरू झाली. चक्क आठ वाजून गेले होते, मोदकाचं सारण सोडलं तर सगळा स्वयंपाक व्हायचा होता.

सविताबाई नाईलाजाने उठल्या. ‘ ही चतुर्थी म्हटलं ना की ‘ असं स्वतःशीच पुटपुटत त्यांनी घाईघाईने गॅसवर कुकर चढवला … आणि उशीर झाल्यामुळे, कुकरला प्रेशर येण्याआधी त्यांचं ब्लड प्रेशरच बरंच वाढलं होतं. सुवर्णा खरंतर अगदी पटापट भाजी चिरत होती, पण त्या नादात “ कान्दा राहिला हातात आणि सुरी गेली की बोटात.. ‘ आई ग्ग ‘ ती कळवळली.. आणि कुकरची शिट्टी दोन ठिकाणी वाजली … सविताबाई तिच्यावर आधी एकदा खेकसल्या होत्याच.. “ अगं किती हा संथपणा.. आवर पटकन आणि लगेच तांदळाची पिठी काढ परातीत. ”.. आणि आता परत.. “ साधी भाजी चिरायलाही शिकून आली नाहीयेस का माहेराहून “.. त्यांचा टोन ऐकून ती घाबरली आणि तिचं बी. पी. घसरायला लागलं बहुतेक.. सून म्हणून नुकतीच तर आली होती ती त्या घरात … बावरून गेली एकदम.. कुठे काय ठेवलेलं असतं हेही कळलं नव्हतं अजून तिला.. कापलेलं बोट तोंडात धरलं आणि तांदुळाची पिठी समजून चुकून तिने मैदा काढला परातीत. पटकन भाजी फोडणीला टाकून सुनीताबाईंनी गॅसवर उकडीसाठी पाणी तापत ठेवलं आणि परात पुढे घेतली.. आणि झालं … तो मैदा पाहून त्यांचा संताप उतू जाणाऱ्या दुधासारखा अनावर झाला

…तोंडाचा दांडपट्टा सुरु होताच …. “ काहीच शिकवून पाठवलेलं दिसत नाहीये आईने.. साधा मैदा आणि पिठीतला फरक कळत नाही.. त्या डिग्र्या काय चाटायच्यात? उंडगी कुठली “ … बडबड करतच त्या स्वतः कपाटातला पिढीचा डबा काढायला गेल्या.. आणि सुनेकडे रागाचे कटाक्ष टाकण्याच्या नादात त्यांच्या हातून तो डबा चक्क धारातीर्थी पडला. “ आता कसा दाखवणार आहे मी मोदकाचा नैवेद्य.. की नुसतं सारण देवापुढे ठेवून म्हणू की बाबा हेच मोदक आहेत असं समज आणि पावन करून घे म्हणून ”.. आता आवाज अगदी टिपेला पोहोचलेला.. नेहेमीसारखाच.

…… धाड्कन आवाज ऐकून अशोकराव स्वैपाकघरात आले. बायकोच्या चेहेऱ्यावरचा उकळता संताप आणि सुनेच्या डोळ्यातून घळाघळा ओघळणारं पाणी पाहून सगळी परिस्थिती त्या अनुभवी नवऱ्याच्या लगेच लक्षात आली. भेदरून उभ्या असलेल्या सुनेला त्यांनी प्रेमळ नजरेनेच दिलासा दिला, आणि बायकोला म्हणाले … “ अगं असू दे.. होतं असं कधीतरी. हे बघ बाकी सगळा स्वैपाक झालाय ना… मग यावेळी मोदक राहू देत… गूळ खोबऱ्याचं सारण तयार आहे ना… आज त्याचाच नैवेद्य दाखव. मोदक राहू देत. गणपती काही संतापणार नाही तुझ्यासारखा. आणि तू आता पूजा करायला जा बघू.. सुवर्णा पट्कन पोळ्या करेल…” सुवर्णाने लगेच मान हलवली. सविताबाईंना ऐकण्याशिवाय पर्याय नव्हताच. तोंडाने बडबड आणि डोळ्यांनी तीक्ष्ण कटाक्ष टाकतच त्या पूजेसाठी देवघरात आल्या…अर्थात पूजा यांत्रिकपणे सुरू झाली.. गणपतीला त्याचं काही वाटलं नसावं कारण हा अनुभव काही नवा नव्हता त्याच्यासाठी… हा विचार अशोकरावांच्या मनात आल्याशिवाय राहिला नाही. पण आता ते एका वेगळ्याच कारणाने हळूच हसत होते.. ‘उद्याची यांची प्रदर्शन भेट मनातला राग आणि ते सारण पचेपर्यंत तरी पुढे ढकलली जाणार आणि तितके दिवस माझा खिसा सुरक्षित राहणार’या विचाराने. असो.

… देव बिचारे समजुतदार… झाली तशी पूजा करुन घेतली त्यांनी.. नेहेमीसारखीच मुकाट्याने … आणि त्या बाहेर आल्या… इतक्यात सुवर्णा सारणाची वाटी घेऊन समोर आली… ‘‘आई हाच नैवेद्य दाखवणार ना आज? कुठे ठेऊ? देवळातच नेऊन ठेवू? ” … झालं… सविताबाई पुन्हा तिच्यावर डाफरल्या…. आणि तसंही आता डाफरण्यासाठी खरं तर एखाद्या valid कारणाची गरजच नव्हती ना?

‘‘काय म्हणालीस? देवळात ठेवायला नैवेद्य? कुठल्या देवळात जायचंय? ” सुवर्णाने काही न बोलता देवघराकडे बोट दाखवलं…

‘‘बाई बाई बाई …कमाल झाली आता… अगं याला देवघर म्हणतात… देऊळ नाही… कितीदा सांगायचं तुला? ”

‘‘सॉरी आई… पण माझ्या माहेरी याला देऊळच म्हणतात… तेच आठवलं मला…”

‘‘आता विसरा माहेरची कौतुकं… देऊळ म्हणे… काय काय चुकीचं शिकवून पाठवलंय कोण जाणे आई-बापांनी…” आणि सविताचा संपत आलेला संयम आता पारच संपला… आणि बहुतेक गणपतीचाही संपलाच असावा. … 

विषय अनिर्बंध भरकटत चालला होता. एव्हाना मुलगा सुजीतही घरी आला होता. पण अशोकरावांनी लगेच त्याला बाजूला घेऊन परिस्थिती सांगितली. तो बिचारा वडलांवर गेलेला. गुपचूप खोलीत जाऊन कपडे बदलून आला आणि पानं घ्यायला लागला… सुवर्णा पुढे आली. तिला हातानेच थांबायची खूण केली. तोपर्यंत अशोकराव फक्त नैवेद्याची वाटी घेऊन देवघरात गेले आणि गणपतीची क्षमा मागत नैवेद्य दाखवून बाहेर आले. सगळ्यांनाच भूक लागली होती… सगळे गुपचुप जेवायला बसले… बाप्पालाही नक्कीच अगदी हुश्श झालं असणार.

….. आणि मी? सविताच्या घराच्या बरोब्बर समोर आमच्या घराचं दार ना! समोरच्या घरात मोठमोठ्याने बोलणं ऐकू आलं… मग मी घरात कशी बसून राहू शकते हो? मी माझ्या दारात उभी राहून कानोसा घेऊ लागले. शेजारीण म्हणून जणू आद्य कर्तव्य होतं ते माझं. पण ते भांडण एन्जॉय करण्यात माझा किती वेळ गेला कोण जाणे… आता समोर सारे कसे शांत शांत भासत होते… मग मीही नाईलाजाने घरात जायला वळले……

आणि.. आणि अचानक कुणीतरी माझ्या खांद्यावर थोपटलं… ‘‘चला… गॅसवरची भाजी करपून कोळसा झालाय तिचा आता…” मी दचकून वळून पाहिलं आणि घाबरलेच… चक्क बाप्पा उभा होता माझ्याकडे हसून बघत…

‘‘ झाली ना इतरांची भांडणं एंजॉय करुन? आणि काय गं.. इतकी मैत्री आहे ना तुझी त्या सविताशी? आणि स्वत:ला खूप प्रगल्भ विचारांची समजतेस ना? … म्हणजे अहंकारच बाळगतेस की त्यासाठी… मग जाऊन सांगायचंस ना तिला की तिच्या चिडचिडीला काहीच अर्थ नाही म्हणून. अगं मारे प्रवचने देतेस ना की… देव सर्वत्र आहे… देऊळ, देवघर, देवालय, मंदिर.. काहीही म्हटलं तरी देव तिथे असतो कुठे? ‘सर्वाभूती परमेश्वर’ असं शिकवतेस ना इतरांना…आणि देव फक्त भावभक्तीचा भुकेला असतो हेही सांगतेस की शहाजोगपणा करत.. ठेक्यावर गाणीबिणी गात. पण तुझा हा वस्तादपणा माझ्यापासून लपला नाहीये हे लक्षात ठेव कायमचं. … ‘इथे ज्ञान पाजळल्याबद्दल कुणी हार घालणार नाही… समोर तबकही नाही… मग कशाला पडायचं या भानगडीत? ’ असाच विचार केला असशील… बरोबर ना? … खोटारडी कुठली.. आता तरी सुधारा रे… देवाला काय आवडतं… मोदक… की खीर… की श्रीखंड…. हे तुम्हीच ठरवा.. तुम्हाला काय खावंसं वाटतंय त्यावरून.. भोज्याला शिवून यावं तशी नैवैद्याची वाटी देवासमोर ठेवायची आणि लगेच आणून आपल्या ताटात ठेवायची की झाली पूजा पूर्ण… असंच ना? नाही गं नाही… मनापासूनचा एक नमस्कार आणि मनातली समर्पण भावना एवढंच अगदी हवं असतं गं आम्हाला … असो… मी सांगतोय ते काहीच तुझ्या डोक्यात.. खरंतर मनात शिरत नाहिये हे कळलंय मला तुझा चेहेरा पाहून… मी तरी का तुझं भलं करायला चाललोय… जाऊ दे …. आदतसे मजबूर हेच कारण आम्हा भोळ्या भाबड्या देवांचं…. असो.. आता त्या सवितासारखा तणतणत का होईना पण करणार आहेस की नाही मला नैवेद्य दाखवण्याचा ‘उपचार’? अगं तुलाच जे्वायला उशीर झाला की चक्कर येते असं सांगून सगळ्यांच्या आधी जेवून घेतेस नेहेमी हे इतरांना नसलं तरी मला माहितीये हे विसरू नकोस. आणि हो.. नैवेद्याच्या ताटात ती करपलेली भाजी तेवढी वाढू नकोस हं प्लीज…कारण ती मला नाही तर तुलाच खावी लागेल ना मग? … नाहीतर उद्या बाईला दे…. मी त्याबद्दल काही बोलणार नाही आणि ती बाई बिचारीही काही बोलणार नाही.. माझीच मनापासून भक्ती करते ती. आणि हो… मला जेवायला घातलंस अशी भ्रामक आणि निरर्थक समजूत करून घेतांना म्हणायला अजिबात विसरू नकोस बरं …. “ देवा तुला पावू दे… आम्हाला खाऊ दे…” 

आणि बाप्पा दिसेनासा झाला…

 

© मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares