श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ भारतीय सैनिकांचा बंधुभाव… जगावेगळा! – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
☆
सातवी इयत्तेत असतानाच त्याने मनात पक्के ठरवले… फौजेतच जायचं. त्यासाठी शारीरिक क्षमता उच्च दर्जाच्या लागतात, हे समजल्यावर तर रोज व्यायामाचा धडाका सुरु केला! गावातले अनेक तरुण फौजेत होतेच. त्यांच्या पावलांवर पाऊल टाकायचे होते.
१९९९ मध्ये भारत-पाक कारगिल युद्ध झाले आणि त्यानंतर भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणात सैन्यभरती सुरु झाली. इथवर त्याच्या वयाची सोळा वर्षे पूर्ण झाली होती. घरून वडिलांचे प्रोत्साहन होतेच. वडील तो भरतीसाठी निघाला की त्याच्या हातावर दोन हजार रुपये ठेवीत. आणि हरियाणाच्या बाहेरच्या राज्यात भरती असली की पाच हजार. पण ते वयच काहीसे अल्लड होते. बंगळूरु येथे होणार असलेल्या भरतीसाठी गेलेला असताना हा पठ्ठ्या चक्क सिनेमागृहात जाऊन बसला आणि एकाच चित्रपटाचे सलग तीन खेळ पाहून आला… तोवर इकडे भरतीसाठी त्याचे मित्र गेटच्या आत दाखल झालेले होते… याला काही प्रवेश मिळाला नाही! पण या लष्करी केंद्रावर त्याने PARA SF चे जवान पाहिले… त्यांचा रुबाब पाहिला आणि मग बस्स… आयुष्यात असाच गणवेश पाहिजे… असा प्रण केला.
पुढच्याच महिन्यात अजयकुमार भारतीय सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले! प्रशिक्षणादरम्यान एक पाय मोडला… बरं होण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि प्रशिक्षण पूर्ण केलेच. आणि काहीच कालावधीत त्यांनी त्यांचे PARA COMMANDO बनण्याचे स्वप्न पूर्ण केले! ही फार मोठी झेप होती!
अजयकुमार यांचा स्वभावच जणू free style. संथ आयुष्य त्यांना आवडतच नसे. सुदैवाने त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये नेमणूक मिळाली आणि एका बहादूर सैनिकाची कारकीर्द सुरु झाली! बर्फाळ प्रदेशात प्रचंड आव्हानात्मक प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर अजयकुमार अतिरेक्यांशी लढण्यासाठी सज्ज झाले होते.
सैनिकी दल कोणत्याही मोहिमेवर निघताना त्या दलाचा वाटाड्या ही मोठी जबाबदारी असते. अजयकुमार आणि महाराष्ट्राचे प्रवीण पाटील हे कमांडो स्काउटच्या कामासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत!
खांद्यावर एम. एम. जी. , अंगावर पस्तीस किलो युद्ध साहित्य घेऊन मैलोनमैल चालण्याची सवय करून घ्यावी लागली!
दहा अतिरेकी, त्यांचे पाच कमांडर, असे एकूण पंधरा जण होते. त्यांच्या मागावर जाण्याचे आदेश मिळाले. या पहिल्याच मोहिमेत दोन अतिरेक्यांना टिपण्याची संधी मिळाली! काही वर्षांत सात मोहिमा यशस्वीरीत्या पार पाडल्या… एकूण तीस-पस्तीस अतिरेक्यांना यमसदनी धाडण्यात सहभागी होता आले! दोन दिवसाची मोहीम असताना त्याच ठिकाणी नाऊ दिवस थांबावे लागले. जवळचे अन्न संपल्यावर झाडाची पाने, वनस्पती खाऊन दिवस काढले! आणि तीन अतिरेकी टिपले!
पुढे पुढे तर परिस्थिती अशी होती की, ‘ऑपरेशन’ मिला मतलब भगवान मिल गया! म्हणजे सातत्याने अतिरेकी विरोधी कारवाया आपल्याला करायला मिळाव्यात, देशाचे शत्रू आपल्या हातून मारले जावेत.. अशी सैनिकांची आंतरीक इच्छा असे!
हवालदार अजयकुमार सिंग यांची ही सैनिकी वाटचाल सुरु होती. जवळजवळ सात-आठ वेळा ते मृत्यूला हुलकावणी देऊन परत आले होते. आणि एके दिवशी….
देखण्या, तरण्याबांड मुलाचा नडगीखालून तुटलेला पाय पाहून ती माऊली जागेवरच मूर्च्छा येऊन कोसळली! बापाची प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वीच देऊन झाली होती… त्यामुळे आज तो शांत होता आणि सुनेकडे पहात होता. सारं घर सुन्न होऊन स्तब्ध होऊन बसलं होतं. प्रत्येकाच्या मनातला प्रश्न निराळा होता….!
खरं तर आपला लेक ज्या नोकरीत आहे, त्या नोकरीत हे असं काही घडणं साहजिकच होतं, हे आई-वडील, पत्नीला ठाऊक होतंच. त्यांच्या गावात, आसपासच्या परिसरात, नात्यांत असे अनेक तरुण त्यांनी पाहिले होतेच… आणि त्यांच्या गावात दोन पुतळेही उभारलेले होते… युद्धात कामी आलेल्या सैनिकांचे!
“बेटा, तू जिंदा लौट आया… यही मेरे लिये बहुत है! इस बुढे बाप में इतनी तो ताकद है की तुम्हें बिठा के खिला सकुं… जब तक मेरी जान में जान होगी तब तक! ” म्हाताऱ्याने बोलता बोलता त्याचा इरादा आणि मर्यादा सांगून टाकल्या आणि दुसरीकडे पहात डोळे पुसून घेतले!
हे शब्द ऐकताच मरणालाही न भिणारा तो बहादूर तरुण मनातून थरथरला… आणि दुसऱ्याच क्षणी पेटून उठला! परावलंबित्व आणि तेही म्हाताऱ्या आई-वडिलांवर? एक पाय नसला म्हणून काय झालं….. दुसरा पाय, दोन हात आणि एक काळीज तर आहे शाबूत!
आणि हा काही त्याला आताच यावेळी सुचलेला विचार नव्हता…. ज्यावेळी पाय तुटून पडलेला पाहिला… त्याचवेळी जीव बचावल्याचे समाधान होतेच… म्हणजे आणखी काही शत्रू यमसदनी पाठवण्याची संधी! आणि उर्वरीत शरीर आणि मुख्य म्हणजे मेंदू शाबूत राहिला याचेच कौतुक जास्त होते त्याच्या मनात!
बारा विशेष सैनिकांची एक तुकडी शत्रूसाठी अगदी सीमेनजीक सापळा रचून बसली होती सात-आठ दिवस. पण हाती काही लागले नाही… शिकारीला जाऊन काहीच न मिळणं ही किती निराशाजनक गोष्ट असते.. हे कसलेल्या शिकाऱ्यांनाच समजू शकते.
मग तळावर परतण्याचा आदेश प्राप्त झाला. तळपायांना आलेले मोठमोठे फोड, सुजलेली बोटं, भिजलेली शरीरं घेऊन हे शूर माघारी फिरले जड पायांनी. आठ दिवसांनी पूर्ण ताटभर अन्न मिळणार होतं. पहिला घास तोंडात घातला आणि खबर आली…. शिकार टप्प्यात आलेली आहे… मारली पाहिजे!
आता हे बारा जण तर तिथून सुट्टी मिळून शांत क्षेत्रात आरामासाठी जायचे होते… पण ते दुसऱ्या दिवशी. म्हणजे नियमानुसार आज ते मोहिमेवर जाऊच शकत होते. मोठ्या साहेबांनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करून पाहिला… पण त्यांना मनातून ठाऊक होतं…. ही पोरं आता काही थांबणार नव्हती! ‘ऑपरेशन मिल गया… समझो भगवान मिल गया’ अशी यांची धारणा असते! आपण किती अतिरेकी शोधून मारले या संख्येचा सैनिकांना मोठा अभिमान असतो!
“चलो, फटाफट! ” म्हणत अगदी काहीच मिनिटांत दल सज्ज झाले! सोबत घ्यायचे अन्न वजनाने हलके आणि शस्त्रं जड निवडण्यात आली. दोन दिवसांची पायपीट करायची होती. पाकिस्तानी सीमेच्या अगदी नाकाजवळ जाऊन कारवाई करायची होती. या आधीही यांनी अनेक शिकारी केल्या होत्या, आणि तिथल्या कार्यकालात हा स्कोअर आणखी वाढवूनच सुट्टीवर जाण्याचा सर्वांचा निश्चय होता.
सीमेवर काही ठिकाणी तिथल्या भौगोलिक रचनेनुसार भारत-पाक सीमाचौक्यांतले अंतर काही ठिकाणी खूपच जास्त तर काही ठिकाणी खूपच कमी आहे. त्यामुळे काही सैन्यचौक्या आणि त्यांतील माणसं उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसतात. त्यांचे बोलणेही ऐकू येते! त्यामुळे इथे डोळ्यांत अधिक तेल घालावे लागते. भारताच्या चौक्यांत किती माणसे आहेत, ते किती जागरूक आहेत, याचा अंदाज पाकिस्तान सैन्य नेहमीच घेत असते.
पाकिस्तानला भारताच्या हद्दीत अतिरेकी घुसवायचे होते तिथून. कारण त्यांना वाटत होते की, त्यांच्या समोर असलेली चौकी फारशी जागरूक नाही! काही ठिकाणी तर चक्क बनावट चौकी असते… म्हणजे केवळ सांगाडा असतो… तिथे कोणीही नसते… आणि हे दोन्ही बाजूंचे सैनिक करीत असतात! म्हणून ते रात्रीच्या काळोखात सलग तीन दिवस अगदी जवळ येऊन त्या चौकीवर दगड मारून पहात होते… अंदाज घेत होते… आणि आपण काही कारवाई करण्याच्या आत त्यांच्या सीमेत पळून जात होते. ते तीनदा आले म्हणजे पुन्हा एकदा कधीतरी येतीलच, अशी आपल्या अधिकाऱ्यांची खात्री होती!
आपले सैन्यपथक रात्रीच्या अंधारात पाकिस्तानी सीमेच्या अगदी हाकेच्या अंतरावर जाऊन लपून बसले. दिवसा अजिबात हालचाली करता येत नाहीत. चिखल, पाऊस, थंडी.. एकाजागी शांत बसून राहायचे, आणि रात्र पडली की शत्रूच्या वाटेकडे डोळे लावून बसायचे. खाद्यपदार्थ शिजवायचे नाहीत… कारण वास जाईल त्यांना. मग कच्ची मॅगी चावून खायची… सोबतीला काजू, बदाम असले तर उत्तमच.. अन्यथा खाणे हा उपक्रम अगदीच अनिवार्य असतो म्हणून करायचा… खरं ध्येय एकच… शत्रूच्या नरडीचा घोट घेणे!
शत्रूला इथून यायचे असेल तर एकच सोयीची वाट होती. एका उथळ ओढ्यातून येणारी. त्यांच्या उजव्या बाजूला उंच डोंगर होता आणि डाव्या बाजूला खोल दरी. आपले सैनिक आपल्या सैन्यचौकीच्या खालच्या बाजूला जाऊन बसलेले होते. एका तुकडीचे तीन गट केले गेले. अतिरेकी आलेच तर त्यांना पाकिस्तानी बाजूला असलेल्या सगळ्यात शेवटच्या तुकडीने पुढे जाऊ द्यायचे. मधल्या तुकडीने त्यांच्यावर हल्ला चढवायचा आणि त्यातून ते मागे फिरले तर मागची तुकडी आहेच आणि पुढे निसटून गेले तर पुढेही आपली माणसं सज्ज बसलेली असतीलच!
सीमेवर दोन्ही सैन्यांनी भूसुरुंग पेरून ठेवलेले असतातच. पण ज्या अर्थी ते लोक आपल्या चौकीपर्यंत येत होते म्हणजे त्या रस्त्यावर भूसुरुंग नसलेली जागा त्यांनी शोधून ठेवल्या असाव्यात. आता त्याच रस्त्यावर सुरुंग पेरून ठेवणे गरजेचे होते. पण खोदून भूसुरुंग लावणे धोक्याचे होते. त्यासाठी लांब केबल असलेला आणि लांबून कार्यान्वित करण्याजोगा सुरुंग लावण्याची योजना झाली. हे सुरुंग अंधार पडल्यावर लावायचे… आणि सकाळी लवकर काढून घेऊन यायचे असे ठरले. कारण दिवसा त्याचा काही उपयोग नव्हता. शत्रू आला तर डोळ्यांनी दिसणारच होता!
हे काम सतत सहा दिवस झाले. गेल्या दिवसांत सलग तीन रात्री येऊन गेलेला शत्रू या सहा दिवसांत एकदाही आला नाही! हे वाट पाहणे किती जीवघेणे असेल, याची कल्पना करता येणार नाही!
अजय सिंग यांच्याकडे सुरुंग लावण्याचे काम सोपवले गेले होते… कारण या कामात ते अगदी कुशल झालेले होते. इतक्या वर्षांचा अनुभव पाठीशी होता. पण यादिवशी काही वेगळेच घडत होते. सुरुंग लावायला निघालेल्या अजयकुमार यांना त्यांच्या साहेबांनी दोन वेळा थांबवले होते… पहिल्या वेळी “अजून अंधार व्हायचा आहे! ” म्हणून दुसऱ्या वेळी “काहीतरी खाऊन जा! ” असं सांगत.
शेवटी त्या रात्री अजय सिंग पुढे निघाले. सोबत सहकारी होताच. सुरुंग लावायच्या जागेजवळ पोहोचले तेवढ्यात त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना जोरदार लाथ मारून दूर ढकलून दिले. अजय सिंग यांचा पाय एका वायरवर पडणारच होता तेवढ्यात सहकाऱ्याने पाहिले. त्या वायरचे दुसरे टोक पालापाचोळ्यात लपवून नेत एका झाडाच्या फांदीवर एका मिठाईच्या डब्यात पोहोचवले गेले होते. पाकिस्तानात बनवलेल्या गुलाबजामूनचा डबा होता. त्यात एक किलो स्फोटके भरलेली होती! दोघांनी मिळून ती स्फोटके निकामी केली.
आता अजय सिंग क्लेमोर नावाचा सुरुंग लावायला सज्ज झाले. हा सुरुंग शत्रूच्या बाजूला त्यातून उडालेली स्फोटके जातील अशा रचनेचा असतो, आणि त्याला दूर अंतरावरून कार्यान्वित करता येते. अजय सिंग यांनी याही वेळी अचूक क्लेमोर लावला आणि ते माघारी आले.
ती रात्र काहीही न घडता उलटून गेली. आता मात्र खूप कंटाळा आला होता सर्वांना! आज शनिवार. मागे झालेली चकमक शनिवारीच झाली होती. म्हणजे बजरंग बलींच्या आशीर्वादाने आज निश्चित contact होगा! अशी सर्वांचीच खात्री होती.
आजचीच रात्र इथे थांबायचे ठरले. नाहीतर उद्यापासून मोहिम थांबवण्याचे आदेश प्राप्त झालेले होते. सायंकाळचा सूर्य बुडाला आणि इकडे सर्वांनी मोहिमेवर निघायची पुरती तयारी केली. याजागी पुन्हा यायचे नाही, त्यामुळे मागे कोणत्याही खुणा राहता कामा नयेत, याची व्यवस्था केली.
अजय सिंग क्लेमोर लावण्याच्या ठिकाणाकडे दबकत निघाले. अजय सिंग यांना आज स्फोटक लावण्याची जागा काहीशी निराळी भासली. त्यांनी लावलेला डेटोनेटर तिथून हलवला गेल्याचा संशय आला. कदाचित सहकारी सैनिकाने चुकून तसे केले असावे असे क्षणभर त्यांना वाटले.
अजय सिंग गुडघ्यात वाकून खाली बसलेले होते. त्यांच्या शेजारी असलेल्या एका झाडाचे जमिनीवर आलेले एक जाडसर मूळ अगदी जवळच होते… आणि एक जोरदार स्फोट झाला…!
अजय सिंग यांच्या पायांखाली शत्रूने पेरून ठेवलेल्या भूसुरुंगाचा भयावह स्फोट झाला. झाडाच्या जमिनीवर आलेल्या मुळाने बरेचसे स्फोटक अडवले होते पण तरीही अजय सिंग यांचा उजवा पाय घोट्याच्या थोडासा वर तुटून दूर जाऊन पडला..! आणि हा स्फोट झाल्या झाल्या गोळीचा आवाजही कानी पडला. याचाच अर्थ शत्रू जवळच दडून बसला आहे….! आता इथून निसटून मागे जायला पाहिजे.. अन्यथा संपूर्ण पथकाचा जीव धोक्यात निश्चित येणार!
– क्रमशः भाग पहिला
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





