विभावरी कुलकर्णी
🌈 इंद्रधनुष्य 🌈
☆ मोक्ष… भाग – २ ☆ विभावरी कुलकर्णी ☆
(पण आम्ही अगदी निग्रहाने, मनावर दगड ठेवून त्या सगळ्या मोहाकडे दुर्लक्ष केले. गर्दी इतकी अलोट होती, की एकमेकींचा हात सुटण्याची भीती होती. म्हणून आम्ही एकमेकींचे हात घट्ट धरून चालत होतो. मैत्रिणी एकमेकींना समजावत होत्या, “आधी दर्शन घेऊया. मग येताना निवांत खरेदी करू!” कारण पुढे काय वाढून ठेवले आहे, याची आम्हा कोणालाच कल्पना नव्हती.)
इथून पुढे – –
गर्दीच्या लाटांतून वाट काढत, ढकलले जात आम्ही कसेबसे मंदिराच्या मुख्य आवारात पोहोचलो. साधारणपणे आपण कोणत्याही मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळ चप्पल-बुटांचे जोड काढून ठेवतो. आम्हीही चपला काढणार होतो. पण त्या अथांग गर्दीचा अथांग पसारा पाहून आम्ही ठरवले, आधी जरा रांग कुठे आहे ते शोधूया, मग चपला काढू.
आणि आमचा हा निर्णय किती योग्य होता, हे पुढच्याच क्षणी कळाले!
दर्शन रांगेचा शोध घेता घेता, दर्शनापूर्वीच आम्हाला संपूर्ण मंदिराला एक भव्य प्रदक्षिणा घालावी लागली. वाटेत प्रत्येक दुकानदाराचा आग्रह सुरू होता, “मावशी, चप्पल इथे काढा, नारळ-फुल घ्या!” पण आम्ही त्या आग्रहाला बळी पडलो नाही. जर सुरुवातीलाच चपला काढल्या असत्या, तर उन्हात अनवाणी पायांनी संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालावी लागली असती.
मंदिराच्या मागच्या बाजूला ३० ते ४० दगडी पायऱ्या चढून वर जायचे होते. आता तिथे पायऱ्यांजवळ आल्यावर मात्र चपला कुठे काढायच्या, हा प्रश्न निर्माण झाला. गर्दीत चप्पल हरवण्याची भीती होतीच. अशा वेळी माझी नेहमीची ‘युक्ती’ कामी आली! तशी मी फारच धोरणी आणि हुशार आहे बरं का… (असा आपला स्वतः विषयीचा गोड गैरसमज)
मी माझ्या बॅगेतून एक प्लास्टिकची पिशवी काढली, चपला त्या पिशवीत टाकल्या आणि ती पिशवी स्वतःच्या खांद्याला अडकवून घेतली! माझी ही युक्ती पाहून मैत्रिणींनीही पटकन आपापल्या चपला पिशवीत भरल्या. चला, चपला हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची एक मोठी चिंता तर कायमची मिटली!
असा गोल-गोल वळसा घालून आल्यावर आम्हाला वाटले, ‘हाहा! आता दर्शन होणार!’ आम्ही एका छोट्या लाकडी दरवाजातून मंदिराच्या मुख्य आवारात प्रवेश केला. पण आत पाऊल ठेवताच देव आपल्यापासून किती दूर आहे, याची दाहक कल्पना आली!
आतमध्ये अथांग पटांगणात बांबूच्या भल्यामोठ्या काठ्या बांधून गोल-गोल फिरणाऱ्या शेकडो ओळी (Barricades) तयार केल्या होत्या. तो एक प्रकारचा चक्रव्यूहच होता! आम्ही त्या रांगेत उभे राहिलो. १० मिनिटे… २० मिनिटे… १ तास… २ तास… ३ तास उलटून गेले! तरीही त्या रांगा संपण्याचे नावच घेत नव्हत्या. आम्ही जसे पुढे जायचो, तशी नवीन रांग समोर उभी राहायची.
आता चपला पिशवीत असल्याने आम्ही अनवाणी होतो. पायाखाली छोटे-छोटे खडे टोचत होते. काही वेळाने आम्हाला त्या रांगा न संपण्याचे खरे गुपित कळले. गर्दीतली बरीच हुशार माणसे बांबूच्या काठ्यांच्या खालून सरपटत, रांग ओलांडून मधल्या मध्ये पुढच्या रांगेत शिरत होती! लोक सर्रास नियम मोडत होते. मग प्रामाणिकपणे रांगेत उभ्या असणाऱ्या आमचा नंबर कसा बरं लवकर लागणार?
पण त्या कंटाळवाण्या आणि त्रासाच्या रांगेतही अनेक गमतीजमती अनुभवायला मिळाल्या. रांगेत उभ्या उभ्याच अनोळखी लोकांशी गप्पा सुरू झाल्या. कित्येक वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या काही जुन्या मैत्रिणी तिथे अचानक भेटल्या. लहान मुले तर बांबूच्या खालून इकडून तिकडे पळण्याचा आणि रांगेत लपाछपी खेळण्याचा आनंद घेत होती. काही चतुर महिला तर आपल्या लहान मुलांना बांबूच्या खालून पुढे पाठवायच्या आणि “अहो, माझे लहान बाळ पुढे गेले!” असे सांगून मुलाच्या निमित्ताने स्वतःही ४-५ रांगा ओलांडून पुढे जायच्या!
आम्ही मात्र शांत होतो. आमच्या मनात एकच विचार सुरू होता ‘मोक्षदात्या कपर्दिकेश्वराच्या दर्शनाला चाललोय, तर थोडे कष्ट तर होणारच ना! ईश्वरप्राप्ती एवढी सोपी कुठे असते? ‘ या सात्विक मानसिकतेमुळे आम्ही त्या शारीरिक त्रासाचाही आनंद घेत होतो.
त्याच वेळी आमच्या रांगेत शेजारी एक अतिशय सात्विक, भाविक महिला भेटली. तिने मंदिराचे महत्त्व, तिथल्या वृक्षाची महती आणि दर्शनाने कशी ‘मोक्षप्राप्ती’ होते, यावर प्रवचनवजा भाषण सुरू केले.
ती अगदी भारावून सांगू लागली, “हे बघा बायकांनो! देवाच्या दारी रांगेत मधे शिरणे पाप आहे! देवाचे दर्शन घ्यायचे असेल तर शरीराला कष्ट सोसावेच लागतात. जेव्हा पायात खडे टोचतात, तहान-भूक व्याकुळ करते आणि शरीर थकते… तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या पापांचे क्षालन होते आणि ते दर्शन आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाते!”
तिने स्वतः आजवर कोणकोणत्या तीर्थक्षेत्री किती शारीरिक कष्ट सहन करून, उपाशी पोटी रांगेत उभे राहून दर्शन घेतले, याचे असे काही रंगवून रंगवून वर्णन केले, की आम्ही अगदी भारावून गेलो! आम्हाला वाटले, ही कुणी सामान्य स्त्री नसून प्रत्यक्ष मोक्षाचा रस्ता दाखवणारी साक्षात सात्विक मूर्तीच आहे. आम्ही तर तिच्या पाया पडायच्या विचारात होतो!
इतक्यात कुणाचा तरी धक्का लागला आणि आमचे लक्ष क्षणभर विचलित झाले. २-३ मिनिटांनी जेव्हा आम्ही त्या ‘मोक्षदात्री’ महिलेकडे पुन्हा पाहिले, तर ती गायब! आम्ही आजूबाजूला तिला शोधू लागलो. ‘अचानक ही कुठे गेली? ‘
काही वेळाने आमची नजर पुढे गेली आणि आमचा डोळ्यांवर विश्वासच बसेना! जी महिला आम्हाला एक मिनिटापूर्वी ‘कष्ट सोसून दर्शन घेतल्याने कसा मोक्ष मिळतो’ याचे ज्ञान पाजळत होती… ती स्वतःच बांबूच्या खालून अत्यंत शिताफीने सरपटत, ७ ते ८ रांगा ओलांडून, प्रामाणिक भाविकांना मागे टाकत कपर्दिकेश्वराच्या दर्शनासाठी बरीच पुढे निघून गेली होती!
तिचा तो ‘अद्भूत मोक्ष मार्ग’ पाहून आम्ही डोक्याला हात लावला आणि आम्हाला हसू आवरेनासे झाले!
बरेच बांबू ओलांडणाऱ्या लोकांचे धक्के सहन करत, पायात शेकडो खडे टोचवून घेतल्यानंतर, तब्बल ५ तासांच्या खडतर वाटचालीनंतर अखेर आम्ही कपर्दिकेश्वराच्या गर्भगृहाच्या समोर उभे राहिलो!
आणि… समोरचे ते दृश्य पाहताच आमचे भान हरपले!
गर्भगृहात महादेवाची ती अलौकिक, नयनरम्य तांदळाची पिंडी साक्षात तेजाने तळपत होती. एका चिमुकल्या लिंबावर संपूर्ण तांदळाची पिंडी अत्यंत कौशल्याने आणि श्रद्धेने तोललेली होती. त्या पिंडीचे दर्शन होताच, मनातील सर्व थकवा, पायांच्या वेदना आणि ५ तासांची पायपीट एका सेकंदात गायब झाली! ५ तासांच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले होते. डोळे भरून आम्ही त्या ‘मोक्षदात्याचे’ रूप मनात साठवून घेतले. हात आपोआप जोडले गेले आणि तोंडून शब्द बाहेर पडले “हर हर महादेव! कपर्दिकेश्वर महाराज की जय!”
दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. ५ तास सतत रांगेत उभे राहिल्यामुळे शरीर पूर्णपणे गळून गेले होते. सकाळी गाडीत ठरवलेली ती जत्रा, खरेदी, बांगड्या, भांडी… या कशाचीही आता इच्छा उरली नव्हती.
पण त्या गर्दीत एक चांगली गोष्ट घडली. परतीच्या वाटेवर रस्ता चुकण्याची किंवा चालण्याचे कष्ट करण्याची अजिबात गरज नव्हती! कारण भाविकांची ती अथांग गर्दीच मागून ढकलून ढकलून आम्हाला पुढे नेण्याचे काम करत होती! आम्हाला फक्त एकमेकींचे हात घट्ट धरून उभे राहायचे होते. गर्दीच्या त्या मानवी प्रवाहाने आम्हाला थेट मंदिरापासून २ किलोमीटर दूर असलेल्या पार्किंगपर्यंत आणून सोडले!
इतके तास दर्शनातच निघून गेल्यामुळे आणि शरीर थकल्यामुळे, इतर ठिकाणी फिरण्याचा किंवा कुठल्या दुसऱ्या मंदिरात जाण्याचा प्रश्नच उरला नव्हता. आम्ही सरळ गाडीत बसलो आणि घराची वाट धरली.
अशा प्रकारे, ओतूरच्या त्या मोक्षदात्या कपर्दिकेश्वराचे अद्भुत दर्शन, रांगेतील त्या ‘मोक्ष’ सांगणाऱ्या बाईची गंमत आणि तो संपूर्ण प्रवास आमच्या आयुष्यातील एक ‘अविस्मरणीय भावयात्रा’ बनून राहिली!
— समाप्त —
© विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





