श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “छोट्या अणूची मोठी गोष्ट” – लेखक : श्री दिलीप बर्वे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : छोट्या अणूची मोठी गोष्ट
लेखक : श्री दिलीप बर्वे
पृष्ठे : १०४
मूल्य: १७०₹
श्री. दिलीप बर्वे आपल्या मनोगतात म्हणतात….
“ लहानपणी ‘भीमरूपी महारूद्रा… ‘ हे समर्थांनी रचलेले मारुती स्तोत्र तोंडपाठ असे. त्यात मारुतीचे वर्णन – “अणूपासून ब्रह्मांडा एवढा होत जातसे. ” ही ओळ म्हणतांना मला कुतूहल वाटे.
आईला विचारलं की ‘अणू म्हणजे काय गं?’ – ‘अरे, म्हणजे सूक्ष्म अगदी लहान आणि ब्रह्मांड म्हणजे अतिशय मोठा, प्रचंड ‘
नंतर जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजात अॅटम इलेक्ट्रॉन वगैरेचा अभ्यास सुरू झाला. अॅटमचे विघटन केले तर प्रचंड ऊर्जा निर्माण होते हे ही अभ्यासात आले.
दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा, नागासाकीवर अणुबॉम्ब अमेरिकेने टाकला आणि अक्षरशः ब्रह्मांड हादरून गेले. (तेव्हा लक्षात आले की समर्थ किती थोर होते. अणूचा संबंध ब्रह्मांडापर्यंत जोडला होता.)
हिरोशिमा-नागासाकी अणू स्फोटाला आज मितीला ८० वर्षे होत आली. आजही अणू शब्द उच्चारला तरी सामान्य माणसाला भीती वाटते.
मात्र आपण लक्षात घ्यायला हवे की आताचे युग हे अणुयुग आहे. अणूपासून सुटका नाही. घाबरून लांब जाऊन चालणार नाही.
मुबलक वीज हवी तर अणुशक्ती, वाळवंटात शुद्ध भरपूर पाणी हवे तर अणू, चांगली भरघोस पिके हवीत, रसदार भरपूर फळे हवीत, तर अणू अनेक दुर्धर रोगांवर निदान, उपचार हवे असतील, तर अणू थोडक्यात अणुशक्तीला शरण जायला हवे. अणूची भिती काढून टाकायला हवी.
जैतापूरला जगातले सर्वात मोठे अणुवीज केंद्र सुरू व्हायचे आहे, प्रकल्पाचा करार होऊन १५ वर्षे होऊन गेली. पण अजूनही प्रकल्प कागदावरच आहे. कारण सामान्य जनतेला वाटणारी भिती.
जपानने अणूचा विध्वसंक अनुभव घेतला. पण भिती बाजूला ठेवून त्याच जपानमध्ये २५ पेक्षा जास्त अणुवीज केंद्र कार्यरत आहेत. हे लक्षात घ्यायला हवे.
शास्त्रीय जगतातील बहुतेक सर्व अणुशास्त्रज्ञ आता ‘शांतते करिता अणू’ या प्रकरणाच्या वाचनाने मनातील भिती निश्चित जाईल अशी मला आशा आहे. “
– – – या पुस्तकाच्या लेखकांचे वरील मनोगत वाचल्यावर पुस्तकाचा आणखी वेगळा परिचय करून देणे मला गरजेचे वाटत नाही.. बरोबर ना ? अतिशय आवश्यक असणारी ही माहिती सर्वांना असायला हवी असे वाटते.. लहानथोर सर्वांनी हे पुस्तक जरूर वाचावे असे मी नक्कीच म्हणेन.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







खरंच ! विज्ञानाचा गंध नसलेल्या आमच्यासारख्या अडाण्यांना प्राथमिक माहिती मिळते.
नेमकं कोणतं पुस्तक वाचावं असं वाचकांना वाटतं त्यावेळी असा पुस्तक परिचय कामी पडतो व असं आटोपशीर पुस्तक सार वाचून वाचक वाचनास प्रवृत्त होतो.
अभिनंदन.