श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “माणूस आणि मन” – लेखिका : डॉ. संयोगिता नाडकर्णी ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : माणूस आणि मन
– – माणसाची दृष्टी आणि मनाचा कोन
लेखिका: डॉ. संयोगिता नाडकर्णी
पृष्ठ: २६४
मूल्य: ३९९₹
☆ ☆ ☆ ☆
माझं चुकतंय का?
हा अहंकार आहे का?
माझी चूक नसताना मी का ऐकून घेऊ?
मला नाही जमत, काय करू?
शेवटी माझ्याकडेच यावं लागलं ना!
रागावल्याशिवाय कामं होत नाहीत.
यांना धडा शिकवल्याशिवाय कळणार नाही
मीच नेहमी का सहन करायचं?
होत कसं नाही… झालंच पाहिजे!
लोक काय म्हणतील?
मला काही फरक पडत नाही!
– – मी मी आणि मी! मीला सावरता येत नाही आणि आवरताही येत नाही… मीचं काही करता येत नाही, पण मीचं कोडं सुटलशिवाय पुढं जाताही येत नाही!
.. कोडं सुटणार कसं? मी कळला, तर कोडं सुटेल. मी कळेल कसा? मी कळवून घेण्यासाठीच हा पुस्तक प्रपंच! पण ‘प्रपंच’ म्हटल्याने घाबरून जाऊ नका. तो आपल्या मनाच्या गुंत्याइतका अवघड नाही. उलट गुंता सोपा करणारा आहे.
किचकट संज्ञा आणि कठीण आकृत्या म्हणजे मन नाही… आपलं वागणं म्हणजे आपलं मन! आपल्यासारखी वागणारी, विचार करणारी आणि रागावणारीसुद्धा माणसं आपल्याला या पुस्तकात भेटतील… अगदी आपण आपल्यालाच भेटू तशी!
– – आणि ती तशी का वागतात… खरंच ती मुळातून (की आपण) भित्री, चिडकी, बेरड, लबाड, नीरस असतात का? पृथ्वीच्या पोटाप्रमाणे मनाच्याही पोटात स्वभावाची काही रहस्यं दडली आहेत का? आणि असतील, तर ती सोडवायची कशी?
– – – या सगळ्या आणि याशिवाय इतरही अनेक प्रश्नांची उत्तरं आणि स्वत:ला समजून घेण्याचे साधे-सोपे मार्ग आपल्याला या पुस्तकात भेटतील.
ते आपल्याला चूक-बरोबर ठरवणारे नाहीत; उलट मित्रासारखे मन हलकं करणारे आहेत.
‘A simple, relatable guide to understanding your mind, emotions, and ego. Discover why you react the way you do—and learn to befriend yourself with compassion.’
जे कृष्णमूर्तींनी म्हटलं आहे, ‘Understanding is the beginning of change‘
अर्थात – ‘समजणं’ हीच बदलाची सुरुवात आहे.
आपल्याला कित्येकदा स्वतःत बदल हवा असतो, पण त्याचा मार्ग खूप वेळा माहीत नसतो. ‘काहीतरी चुकतंय’ किंवा ‘काहीतरी वेगळं हवंय’ अशी फक्त आपल्याला जाणीव असते. ह्या जाणिवेतून मानसशास्त्राचा जन्म होतो. मात्र मन समजायला तसं सोपं नाही. म्हणून मानसशास्त्र कित्येकदा क्लिष्ट वाटतं. त्यात शब्दांची गुंतागुंत दिसते. म्हणून इंटरनेटवरची एखादी संज्ञा समजून घेताना आपण अनेकदा गोंधळून जातो.
या गोंधळातून वाट काढून ‘मनाचं’ शास्त्र उलगडून दाखवणं, हा ह्या पुस्तकाचा हेतू आहे. त्यामुळे त्यात अनेक उदाहरणं आहेत. ह्या उदाहरणांशी जोडून घेऊन वाचकाला त्याचं किंवा इतरांचं मन समजायला जास्त सोपं जाईल.
‘आजकाल ‘संवाद’ बिघडत चालला आहे’ असं आपण म्हणतो. पण ‘संवाद’ सुद्धा मनातूनच येतो. ‘सांगणं’ आणि ‘ऐकणं’ यांमधून संवाद तयार होतो. सांगण्यापेक्षासुद्धा अधिक ऐकण्यातून संवाद मूळ धरतो. ‘ऐकायला’ मनाची तयारी लागते. ‘ऐकणारा’ जेव्हा ‘बोलणाऱ्या’च्या भूमिकेतून पाहू लागतो, तेव्हा ‘संवाद’ला आकार यायला लागतो.
मन आपल्या प्रत्येक कृतीवर प्रभाव टाकतं. त्यामुळे कुठल्याही बदलाची वाट ‘मना’तूनच जाते. मनाच्या या ‘वाटा’ समजाव्यात, म्हणून पुस्तकात वेगवेगळी ‘तंत्र’ दिलेली आहेत. ही ‘तंत्र’ तुम्हाला व्यवहारात नक्कीच मदत करतील; पण नुसत्या ‘तंत्रां’नी माणसाची मानसिक प्रगती होणार नाही. त्या ‘तंत्रां’ची पार्श्वभूमीही समजून घ्यावी लागेल. म्हणून हे पुस्तक ‘व्यक्तिमत्त्व विकास’ किंवा ‘जीवनाची गुरुकिल्ली’ यासाठी उपयोगी पडेलच, पण त्याहून अधिक स्वतःला “समजून” घेण्यासाठी ते दृष्टिकोन देईल.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






