सुश्री विभावरी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘आप्पाच्या गप्पा’ – लेखक: श्री. दिलीप जमखंडीकर ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

पुस्तक : आप्पाच्या गप्पा

लेखक: श्री. दिलीप जमखंडीकर

प्रकाशक: दिपाली जमखंडीकर

 

पुस्तकाची पहिली झलक (मुखपृष्ठ व अर्पणपत्रिका)

आकर्षक मुखपृष्ठ: पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत देखणे असून, त्यावरूनच पुस्तकाच्या नावाचा अर्थ सहज उलगडतो. गोष्टी सांगणारे ‘आप्पा’ आणि त्या गोष्टी ऐकणारे त्यांचे प्रेमळ, उत्सुक आणि हसतमुख नातवंडे या चित्रातून कौटुंबिक नाते अधोरेखित होते.

आदरयुक्त दर्शन व अर्पणपत्रिका: पान उलटताच महालक्ष्मी व प. पू. दादा महाराज यांचे दर्शन घडते. पुढील पानावर दिवंगत माता-पित्यांना आदरपूर्वक पुस्तक अर्पण केल्याची अर्पणपत्रिका दिसते.

प्रेरणास्रोत:

‘माझे प्रेरणास्रोत’ या भागात लेखकाने त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींचा अतिशय प्रेमळ शब्दांत उल्लेख केला आहे. तसेच पुस्तकात आवश्यक तिथे सुंदर कौटुंबिक छायाचित्रे जोडलेली आहेत.

पुस्तकातील प्रमुख विभाग

१. पूर्वपीठिका

यात वडिलांच्या हस्तलिखिताचा भक्कम आधार घेऊन लेखन केले आहे. ते इतके रंजक आणि जिवंत पद्धतीचे आहे की, वाचताना तो जुना काळ डोळ्यांसमोर उभा राहतो.

२. मनोगत

लेखकाने यात अतिशय प्रांजळ कबुली दिली आहे. साध्या आणि सरळ आयुष्याविषयी खूप आकर्षकपणे लिहीत असतानाच, जीवनाला दिशा देणारे अत्यंत थोर विचार यात मांडले आहेत.

३. मनातील मनापासून…

हे वाचताना प्रत्येक ओळ किती मनापासून लिहिली आहे, याची जाणीव पावलोपावली होते. प्रसंगांचे वर्णन इतके हुबेहूब आहे की आपण स्वतः त्या प्रसंगाचा एक भाग आहोत असे वाटू लागते.

बालपण, कोल्हापूरच्या आठवणी आणि रंजक प्रसंग

भोगावती नदीचा प्रसंग:

 निसर्गसौंदर्य पाहत असतानाच, अचानक सुंदर भोगावती नदीच्या पात्रात ८ वर्षांच्या दिलीपदादांच्या जीवावर बेतलेला प्रसंग अंगावर काटा आणतो. म्हशीच्या अंगावर घातलेली सायकल डोळ्यांसमोर दिसते.

निर्मळ विनोद: स्वतःच्या उंचीचे वर्णन वाचताना गंमत वाटते. स्वतःवरच विनोद करून एक निर्मळ मन कसे जतन करता येते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

शालेय जीवन व सकारत्मकता: 

सगळी शाळा आणि मजबूत मुलांचे काम पाहून ‘घोकंपट्टी वाचून बालपण आठवले’. ज्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या, त्यांच्याविषयी तक्रार करत बसण्यापेक्षा, त्या कमतरतांनी माणसाला कसे कणखर आणि धीट बनवले, हा सकारात्मक विचार मनाला भावतो.

भावनांची जपणूक: 

गाण्याची हौस कशी शमली हे वास्तव पण मनात कोणतीही खंत न बाळगता लिहिले आहे. ‘मोठ्यांच्या नजरेतील पातळ होणारी जरब हे त्यांचे प्रेम’ अशी सुंदर वाक्ये वापरून कटू अनुभवांची तीव्रता कमी केली आहे.

संस्कारांची शिदोरी: 

वडिलांनी ‘रेडिओ स्टार’ यांचे शास्त्रीय गायन गणपतीसमोर आयोजित करणे, ही आठवण कायमस्वरूपी जतन करण्यासारखी आहे. लहानपणी गोळा केलेल्या नोटा अशाच प्रसंगांतून नकळत मनावर चांगले संस्कार करून जातात.

कोल्हापूरचा काळ व शाळा प्रवेश: 

कोल्हापूरमधील विविध कार्यक्रम आणि तिथला तो सुवर्णकाळ लेखकाने सुंदर अनुभवला. शाळेतील पहिल्या प्रवेशाचे अनुभव अत्यंत रंजक आहेत. शाळेतील अनुभव आणि भाषणातील आज्ञा वाचून गंमत वाटते आणि त्या लहान वयात काय घडले असेल, याचा अंदाज येतो.

रेडिओचा स्कोअर: 

रेडिओवर ऐकून लिहिलेला स्कोअर वाचकाला थेट बालपणात घेऊन जातो. स्वतःमधील उणिवा इतक्या विनोदी पद्धतीने मांडल्या आहेत की त्यांचे रूपांतर सकारात्मकतेत होते आणि वाचताना चेहऱ्यावर हसू येते.

कौटुंबिक मूल्ये आणि बदलता काळ

व्यास बोळातील घर: या घराचे वर्णन अतिशय सुंदर आहे. सर्व प्रकारच्या गैरसोयी असूनही कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांवर असलेले अथांग प्रेम आणि ते कौटुंबिक पाश भौतिक सुविधांच्या पलीकडचे कसे असतात, हे लेखकाने फार छान मांडले आहे.

पिढ्यांमधील अंतर: 

एकमेकांची पुस्तके अनेक वर्षे अनेक भावंडांनी वापरणे ही आजच्या पिढीला अज्ञात असलेली पद्धत आपल्या पिढीने कशी अंगीकारली होती, याचे सुरेख वर्णन आहे.

जुन्या आठवणी व करमणूक: 

‘फोनचा उत्सव’ आणि त्यासंबंधीच्या आठवणींमुळे जुने दिवस आठवतात. ‘पु. लं. च्या व्यक्तिरेखा ऑफिसमध्ये सापडल्या असत्या’ हे वाक्य मनाला खूप आवडते.

क्रिकेट, सिनेमा आणि रेडिओ: 

शालेय जीवनातील क्रिकेट व सिनेमाचे किस्से छान आहेत. त्या काळातील हिरोंची वर्णने मस्त जमली आहेत. आपल्या पिढीसाठी वरदान ठरलेल्या ‘रेडिओ’चे वर्णन आणि त्यासोबतच दूरदर्शनची झालेली प्रगती व कार्यक्रमांची झालेली अधोगती याचे वास्तववादी वर्णन केले आहे.

संगीत आणि कला: 

संगीत नाटके बघण्याचा आनंद, संगीताची आवड आणि परिस्थितीची सांगड यांचे वास्तव दर्शन घडते. ‘छोटा गंधर्व’ यांची भेट म्हणजे लेखकाच्या संगीत व स्वरसाधनेला मिळालेले गोड फळच आहे.

सामाजिक जाणिवा व चमत्कार: 

माणसाची सामाजिक गरज अनुभवातून मांडली आहे. सामुदायिक उत्सव का व कसे आवश्यक असतात, याचे महत्त्व समजते. घरातील छोटे समारंभ ते आजचे ‘इव्हेंट’ यातील फरक स्पष्ट केला आहे. ‘प्लेग ते कोविड’ मधील अनुभव आणि ‘आईची दृष्टी परत येणे’ यांसारखे चमत्कार दर्शवणारे अनुभव थक्क करतात. वाईटातून चांगले कसे शोधावे, याची एक नवी दृष्टी हे लेखन आपल्याला देते.

काश्मीरची सहल: 

आपल्या सहलीचे आणि काश्मीरवर लिहिलेल्या कवितेचे वर्णन निसर्गाची आणि अध्यात्माची सुंदर माहिती देऊन जाते.

 स्वलिखित कविता (पुस्तकाचा दुसरा भाग)

पुस्तकाच्या दुसऱ्या भागात लेखकाच्या स्वतः रचलेल्या उत्कृष्ट कविता आहेत:

यात सुरुवातीला सर्व देवतांचे ध्यानरूपी आवाहन केले आहे.

त्यानंतर आई, वडील, पितर, गुरु, आरोग्य, कलाकार, मोबाईल, नातवंडे, कठीण काळ आणि रामनाम अशा सर्वसमावेशक विषयांवर अतिशय सुंदर कविता लिहिल्या आहेत.

हे सगळे विविध अनुभव लेखकाने आपल्या ‘उल्हास शब्दफुलांत’ अतिशय सुंदर रीतीने गुंफले आहेत. थोडक्यात सांगायचे तर, हे पुस्तक वाचताना लेखकाचा संपूर्ण ‘जीवनपट’ वाचकांच्या डोळ्यांसमोर जिवंतपणे उभा राहतो!

पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted