श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “संतांची चरित्रे” – पुस्तकांचा संच लेखक : माधवराव आप्पाजी मुळे / ल. रा. पांगारकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : संतांची चरित्रे ४ पुस्तकांचा संच.

१. श्री नामदेव चरित्र : रू. २५०/-

२. श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र आणि ग्रंथ विवेचन : रू. २००/-

३. संत तुकाराम चरित्र : रू २५०/-

४. एकनाथ चरित्र : रू २००/-

सव्वाशे वर्षे झाली या संतांच्या चरित्रांना प्रकाशित होऊन! माधवराव आप्पाजी मुळे आणि ल. रा. पांगारकर यांनी १२५ वर्षांपूर्वी लिहिलेले चार संतांचे चरित्र:

पुस्तक पहिले 

संत नामदेव महाराज चरित्र !

लेखक: माधवराव आप्पाजी मुळे

पृष्ठ:२५६ 

औंढा नागनाथ मंदिर ज्यांच्यासाठी स्वतःची दिशा बदलून घेते, ज्यांच्या रचना गुरू ग्रंथ साहेब मध्ये समाविष्ट आहेत, ज्यांच्या दर्शनासाठी जगभरातून शीख बांधव नरसी येथे येतात, अशा संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचे हे चरित्र!

ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया ।।

नामा तयाचा कंकर । तेणे केला हा विस्तार ।।

जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।

बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।।

संत बहिणाबाई यांनी लिहिलेला अभंग महाराष्ट्रीय संताचे कार्याचे यथार्थ वर्णन करणारे आहे. संत ज्ञानेश्वर यांनी वारकरी पंथाला सुसंघटित केलं. त्याचा पाया घातला…. पण त्याला विस्तृत करण्याचे कार्य मात्र संत नामदेवांनी केलं. हे तत्वज्ञान भारतभर जावे म्हणून देशाटन केलं. संत बहिणाबाई नामदेव महाराज यांना बांधकाम पूर्ण करणारा, त्याला आकार देणारा किंकर म्हणून त्यांचा उल्लेख करतात. संत ज्ञानदेव आणि संत नामदेव यांच्या मध्ये जो स्नेहभाव होता तो वाचताना आपल्याला कळवळून आले नाही तर नवल! अकृत्रिम प्रेम काय असते? संत संगत काय असते?

संत परंपरेतील सर्वात वडीलधारे संत नामदेव !दीर्घायुषी ! वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन देशभर प्रवास करणारे संत नामदेव पंजाबमध्ये ही गेले. त्यांच्या रचना “गुरूग्रंथ साहेब” आहेत. अशा संतांचे हे चरित्र!गुरू नानक, संत कबीर अशा श्रेष्ठ संताशी त्यांच्या भेटी आणि झालेला संवाद या चरित्रात आहे. हा फार महत्वाचा भाग आहे.

हे चरित्र वाचताना अनेक अभंग यात आलेले आहेत. ते अभंग स्वतः च त्या त्या घटना सांगणाऱ्या आहेत. त्यामुळे चरित्र आणि अभंग असा सुंदर ग्रंथ वाचकाला मिळतो.

शतकोटी कवने केली असे त्यांच्या बाबत म्हटले जाते. त्यांच्या अभंगांत समकालीन चरित्र आहेत. इतर संतांची माहिती आहे. त्या सगळ्या अभंगाचा अभ्यास करून लेखकाने नामदेव महाराज यांचे अतिशय रसाळ आणि सुरेख पण वास्तवदर्शी चरित्र तयार केलं आहे.

*****

संतचरित्रे लिहिण्यासाठी आवश्यक असलेली मनोभूमिका पांगारकरांच्या ठायी होती. उत्कट भक्तिभावामुळे ते संतांच्या जीवनाचे व कार्याचे मर्म सहृदयपणे समजून घेऊ शकले. चरित्राची साधने ते परिश्रमपूर्वक जमवत. संतांच्या जीवनातील आणि काव्यातील दोष दाखविणे त्यांना मान्य नव्हते. संतांनी केलेल्या चमत्काराच्या पारंपरिक कथांवर अविश्वास दाखविणे त्यांना योग्य वाटत नसे. श्री ज्ञानेश्वर, तुकाराम व एकनाथ महाराज या संतांची चरित्रे त्यांनी लिहिली. कोणाही सत्पुरुषाचे वर्णन ते नम्रभावाने करीत.

ल. रा. पांगारकर यांनी १२५ वर्षांपूर्वी लिहिलेले संत चरित्र ल. रा. पांगारकर उर्फ लक्ष्मण रामचंद्र पांगारकर हे संतचरित्रे लिहिण्यासाठीच जन्माला आले होते असे म्हणतात. हे विधान अतिशयोक्तीचे नाही याची प्रचीती त्यांनी लिहिलेले संत तुकारामांचे चरित्र वाचताना येते. तुकाराम महाराजांचे चरित्र लिहिताना त्यांनी अगदी रामेश्वर भटासदेखील झुकते माप दिले आहे. ल. रा. पांगारकर यांनी त्यांचा गौरव केलेला आहे. ‘आतां प्राकृत भाषेंत अधिकारसंपन्न शूद्रालाही धर्मरहस्य सांगायला हरकत नाहीं. कारण धर्मरहस्य भगवत्कृपेनें कोणत्याही जातीच्या शुद्धचित्त मनुष्यांत प्रगट होतें. ही गोष्ट सिद्ध करून देण्याला तुकोबाचा छळ होऊन ते त्यांत यशस्वी व्हावयास पाहिजे होते व या छळाचा कस होण्याचा मान रामेश्वरभटास मिळाला!’ अशा शब्दांत रामेश्वरभट्टांची भलामण केली आहे.

पांगारकरांच्या चिकित्सक वृत्तीचा परिचय करून घ्यायचा असेल तर त्यांचे मोरापंत चरित्र पाहावे, तुकाराम चरित्र पाहावे. प्राचीन वाङमयाचा विचार करताना पांगारकरांची दखल घेतल्याशिवाय पुढे जाता येण्यासारखे नाही. त्यांनी प्राचीन मराठी वाङमयाचे अत्यंत आवडीने आणि समरसतेने अध्ययन केले. मराठी भाषा आणि इतिहास यांचा व्यासंग करून, आपल्या लेखणीचा आणि वाणीचा प्रभावी वापर करून, जनमानसात या विषयांची गोडी निर्माण करण्याचे महान कार्य त्यांनी आमरण केले. त्यांना अनेक चाहते, मित्र लाभले. भगवंतांच्या स्मरणात त्यांनी नेहमीच गोडी मानली. आयुष्यभर ग्रंथरचनेचा हव्यास अडचणी सोसून रसिकतेने केला.

पुस्तक दुसरे 

संत तुकाराम चरित्र

पृष्ठ : ३४६ 

ह्या ग्रंथाची इमारत कोणत्या आधारांवर उभारली आहे याचा उलगडा करणे अवश्य आहे. पहिला आणि मुख्य आधार म्हणजे तुकोबांचे अभंग हा होय. तुकोबांचे चरित्र त्यांच्या अभंगातच उत्कृष्ट लिहिले गेले आहे. त्यांचे अंतरंग, त्यांचा अभ्यास, त्यांचे अनुभव, त्यांचे उपदेश त्यांच्या अभंगात इतक्या स्पष्ट रीतीने प्रकट झाले आहेत की दुसऱ्या कोणालाही ते तसे वर्णन करून सांगता येणार नाहीत. अभंगंचे परिशीलन आणि मनन जितक्या आस्थेने, आवडीने व आदराने करावे तितके महाराज आपले हृदय उघडे करून दाखविण्यास तयार आहेत. परंपरेचे साह्य मात्र अवश्य धेतले पाहिजे.

ह. भ. प. पांगारकरांनी ‘आठ वर्ष’ मेहनत घेऊन लिहिलेले हे तुकारामचरित्र प्रथम 1920 साली तत्कालीन इंदूर संस्थानचे अधिपती सवाई तुकोजीराव होळकर यांनी दिलेल्या देणगीतूनच छापले होते. त्या काळी, संस्थानिकांच्या मदतीशिवाय अशी कामे होणे अशक्यच होते व आजही असे काम कठीणच आहे म्हणून गेल्या १०० वर्षात कोणत्याच प्रकाशकाने हे चरित्र छापण्याचे धाडस केले नाही यात नवल नाही. पण, वारकरी मंडळींच्या वाढत्या प्रतिसादामुळे दुसऱ्याच आवृत्तीपासून हे चरित्र कायमच उपलब्ध ठेवण्याचे ठरविले आहे आणि याप्रमाण आणखीही संतचरित्रे छापण्याचा वरदा प्रकाशन चा मनोदय आहे.

पुस्तक तिसरे – 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र आणि ग्रंथ विवेचन – 

पृष्ठ:२०४ 

ज्ञानेश्वर माऊलीचे हे रसाळ चरित्र वाचून मराठी माणसाचे हृदय हेलावून येईल. जाने ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला आहे, त्याला तर या चरित्रातील अक्षरे अमृतालाही सजनी जिंकत आहेत असे वाटेल. सर्वसामान्य व्यक्तीला हे चरित्र पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटेल. ज्ञानेश्वर हे मराठी संतांचे शिरोमणी! त्यांच्याविषयी अनेक संतांनी आपल्या अभंग त्यांची स्तुती केलेली आहे. हे अभंग ही लेखकाने ग्रंथाच्या शेवटी एकत्रित दिलेले आहेत.

पहिल्या प्रकरणांमध्ये आपल्याला संत ज्ञानेश्वर जन्मापूर्वीचा काळ म्हणजेच महाराष्ट्रातील पार्श्वभूमी समजते. यात महाराष्ट्राचा राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक इतिहास समजतो. मराठी माणसाला, राजा रामदेवराय यादव हे परिचित आहेत. पण यात यादव कुळाचा तपशील मिळतो. अनेक ग्रंथ रचनाकरांचा तपशील मिळतो. उदा भास्कराचार्य.

दुसरे प्रकरण कुलवृत्तान्त आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्वज, यांचे माता पिता रुक्मिणी व विठ्ठलपंत यांचा विवाह, त्यांचा संन्यास रामानंदस्वामींचा अनुग्रह इत्यादीची माहिती मिळेल. याच प्रकरणांमध्ये संन्याशाच्या पोटची मुलं आणि त्यांचा छळ आलेला आहे.

असे एकेक प्रकरण सविस्तर आणि व्यापकपणे दिलेले आहे. प्रत्येक प्रकरणात गरजेनुसार अनेक अभंग रचना आहेत. त्या संदर्भ किंवा प्रमाण म्हणून वापरल्या आहेत.

पुस्तक : चौथे 

संत एकनाथ चरित्र

पृष्ठ:२२२ 

गृहस्थाश्रमात राहून नाथांनी ब्रह्म स्थिती अभंग ठेवली! गृहस्थी जीवन अर्थात प्रपंच आणि अध्यात्मिक जीवन अर्थात परमार्थ या दोन्हीचा सुरेख मेळ घालण्याचे अत्यंत कठीण कार्य नाथांनी आपल्या जीवनात केलेले आहे.

शांतीब्रह्म या नावाने ओळखले जाणारे संत एकनाथ गृहस्थ जीवनातील आदर्श! शालीवाहन राजाची राजधानी पैठण नाथांमुळे आज महाराष्ट्राला माहिती आहे.

संस्कृत इतकीच प्राकृत ही महत्त्वाची आहे, असे सांगणारे संत एकनाथ माणसामाणसातील भेद मानत नसत. देश भ्रमण करताना काशी येथील ब्राह्मणांनी नाथांचा अतोनात छळ केला. पण नाथांच्या सद्वर्तन आला भुलून पुढे त्यांचा जय जयकार केला.

भागवत धर्माचा प्रसार नाथांनी केला. अभंग गवळणी भारुड यामाध्यमातून नाथांनी समाजामध्ये जागृती निर्माण केली. नाथांनी रचलेल्या आजही जगभर मागणी असते.

दासोपंत आणि नाथांचे भेट त्याच प्रमाणे नाथांनी ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन कसे घेतले याचेही या चरित्रामध्ये वर्णन वाचायला मिळते.

 – – – – 

ही माहिती आणि पुस्तकेही आपल्या परिचित वाचकांना, कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, मराठी विषयाचे विद्यार्थी यांना आवर्जून पाठवू! 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted