श्री प्रसाद साळुंखे  

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “अंधाराच्या पारंब्या” – लेखक : श्री जयवंत दळवी ☆ परिचय – श्री प्रसाद साळुंखे ☆

पुस्तक : अंधाराच्या पारंब्या

लेखक : जयवंत दळवी 

मुंबईहून पुण्यात एका ऑफिसच्या मीटिंगला जात होतो. तेव्हा चहा नाश्ता करण्यासाठी म्हणून एका फूडमॉलमध्ये थांबलो. तिकडे पहिल्या मजल्यावर एका पुस्तकांच्या दुकानात काही नवी जुनी पुस्तकं चाळली. म्हणजे वरवरच पहिली आणि खात्रीशीर लेखक किंवा दर्जेदार प्रकाशनं पाहून काही जुनी पुस्तकं विकत घेतली. त्यात ही सोनं सापडलं. जुनं म्हणून नव्हे, तर कुठल्याही काळात सोनं हे सोनंच. ही कादंबरीही अगदी तशीच कालातीत कलाकृती.

१९७२ साली जयवंत दळवी यांची अंधाराच्या पारंब्या ही कादंबरी पहिल्यांदा ‘ अनुराधा ‘ या दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाली. पुढे १६ सप्टेंबर १९९५ साली या कादंबरीची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली.

या कादंबरीवर आधारित ‘ बॅरिस्टर ‘ हे नाटकही अमाप लोकप्रिय झालं. पण माझी आठवण आहे साधारण २००३ च्या सुमारासची. तेव्हा अल्फा (आताचं झी) मराठीवर ‘ पिंपळपान ‘ नावाची एक दर्जेदार मालिका लागायची. ही मालिका मला अफाट आवडायची. विशेषतः अतुल कुलकर्णी यांनी साकारलेली ‘ बॅरिस्टर ‘ ही भूमिका. कादंबरी वाचताना वाटलं की मधली वर्षे झरझर सरत चाललीत, आणि अगदी तसाच अस्वस्थतेकडून अस्वस्थतेचा प्रवास आपण अनुभवतोय.

यात दाखवलेला काळ साधारण इ. स. १९२० च्या सुमारासचा. तत्कालीन महाराष्ट्रीय ब्राह्मण समाजाच्या काही जुनाट रूढींचा मागोवा या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला घेता येतो. त्याकाळी सभोवताल हळूहळू बदलायला सुरुवात झाली होती. म्हणजे बॅरिस्टर सारखी सुशिक्षित, विलायतेतून शिक्षण घेऊन आलेली मंडळी त्यांची सौंदर्यदृष्टी, जीवन समरसून जगण्याची स्वच्छंदता, कौतुक करायची, वैचारिक विरोध दर्शवायची स्पष्टवक्तत्ता एकीकडे. आणि भाऊरावांचा देवभोळेपणा, निरागसता, रूढींना धर्माला चिकटून राहण्याची वृत्ती, बॅरिस्टरांबद्दल आदरयुक्त भिती, बॅरिस्टरातल्या स्वभावात दडलेल्या लहान मुलावर जीवापाड माया हा लटका संघर्ष वाचायला रंजक वाटतो, क्वचित प्रसंगी अस्वस्थ करून सोडतो.

यातली एकेक पात्र जयवंत दळवी यांनी खरोखर लाजवाब रंगवली आहेत. बॅरिस्टरांच्या स्वच्छंद पण संवेदनशील स्वभावाचे पैलू, भाऊरावांच्या रूढी परंपरा बाबतच्या ठाम भूमिका आणि त्यातूनही दुसऱ्या वैचारिक प्रवाहाला दिलेला आदर, राधाक्कातल्या नववधूची स्वप्न, मानवी हेतूंची चाचपणी आणि एक अबोल घालमेल, विशेष कौतुक वाटतं ते मावशीबाईंचं, दैवाने लहानपणी दिलेल्या वैधव्याचा आणि समाजाने त्याचवेळी दिलेला कुरूपतेचा शाप भोगून, दिवसभर जीव कामात गुंतवणं आणि हसतमुख रहाणं, ही अन्यायाची मूक स्वीकृती, शरणागती आपल्याला अंतर्मुख करते. म्हणूनच मावशीबाईंचा लहानपणीच्या आठवणीतला विधवा केशवपनाचा प्रसंग राधाक्कासोबतच आपल्यालाही मूळातून उन्मळून टाकतो.

दुसरीकडे तितकाच सतावतो, कादंबरीभर गूढ कायम ठेवतो तो वाड्याला लागलेला खुर्चीत बसायचा शाप. घरातल्या धडधाकट कर्त्या पुरुषानं अचानक एक दिवशी डोळ्यात थंड वेडसर झाक घेऊन एकटक जमिनीकडे पहात बसणं, ही कल्पनाच श्वास कोंडण्याइतपत, जीवाची घालमेल होण्याइतपत अंगावर येते.

भाऊराव आणि त्यांची नववधू राधाक्का या वाड्याला चार सुखाचे क्षण देऊन क्षणभराचं घरपण देतात. म्हणजे बघा मालक घर बांधतो पण भाडोत्री घरपण देतात. पैशांनी वाडा बांधता येतो पण घरपण भावनेच्या नात्यांनीच तयार होतं. अर्थात भाऊराव आणि बॅरिस्टर यांचं नातं भाडोत्री आणि मालक या सदरातलं टिपिकल व्यवहारी कधीच नव्हतं. तर दुसऱ्या बाजूला बॅरिस्टर आणि राधाक्का यांच्यातलं नातंही अस्फूट, सौम्य आणि मर्यादांच भान ठेवून उमलू पहात होतं. नात्यांचा हा सारा प्रवास खरोखर वाचण्याजोगा आहे.

बऱ्यापैकी लोकांनी ही कादंबरी वाचली असेलच. प्रेमाची परिणीती कशात होते? याला कधी कधी काहीच अर्थ नसतो, कारण शेवटी तो प्राक्तनाचा भाग असतो. पण त्या आठवणींचा ताळेबंद आयुष्यभर जोखत बसणं हेही त्या प्रेमाचं यशच नाही का? असेच अनेक तिमिरपंथी प्रश्न घेऊन आपल्यातल्या माणसाला चाचपडतात या ‘अंधाराच्या पारंब्या’

परिचय : श्री प्रसाद साळुंखे

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9664027127

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted