श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “ द अल्टिमेट इन्व्हेस्टर” – लेखक : आशिष मुळे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक :  द अल्टिमेट इन्व्हेस्टर “…

गोष्ट जन्मजन्मांतरीची

जन्मजन्मांतरीच्या वैचारिक गुंतवणूकीची गोष्ट 

लेखक : आशिष मुळे 

प्रकाशक : मिहाना पब्लिकेशन्स, पुणे 

काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की काही अवांतर वाचन करणे शक्य नव्हते. त्यानंतर वाचनासाठी वेळ उपलब्ध झाला. पण वाचायचे इतके राहिले होते की कुठून सुरुवात करावी हे समजानेसे झाले होते. त्यामुळे आवडीचा विषय–कविता– आणि त्यासंबंधीचे साहित्य वाचायला घेतले. पण बरेच वर्षे कादंबरी मात्र वाचनात आली नव्हती. आणि अचानकपणे एक नवी कोरी कादंबरी हातात आली. कादंबरीही नवीन आणि लेखकही नवीन. तरीही ती वाचण्याचा योग येईना. अखेर काही दिवसांपूर्वी वाचून झाली. मात्र मनाला एक गोष्ट पटेना. ती म्हणजे लेखकाची म्हणजे श्री. आशीष मुळे यांची ही पहिलीच कादंबरी आहे. एखाद्या अनुभवी लेखकाने कथानक गुंफत जावे, नवीन पात्रे त्यात वाढत जावीत, मूळ कथानकाशी एकरूप व्हावीत आणि कथानक अगदी शेवटपर्यंत उत्सुकता वाढवणारे होत जावे… ही भट्टी नव्या लेखकाला जमू शकते हे आशिष यांनी दाखवून दिले आहे. फक्त त्यासाठी संपूर्ण कथानकाचा आवाका आणि त्यातून व्यक्त करायचा असलेला आशय प्रथम लेखकाच्या मनात स्पष्ट असायला हवा. श्री आशिष मुळे यांना ते साधले आहे याबद्दल शंका नाही.

श्री आशिष मुळे

खरं तर ही एक कादंबरी नसून एकात एक गुंफलेल्या दोन कादंब-या आहेत. एकीकडे राघव आणि सायली, शिरीन यांची कथा आणि त्याच वेळेला हळूहळू फुलत जाणारी निम आणि नादिया यांची कथा. दोनही कथानकांना पोषक असे वातावरण, त्यानुसार पात्र निर्मिती आणि त्याला उचित ठरेल अशी भाषाशैली… त्यामुळे प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. शिवाय निसर्ग, शहरी वातावरण, हिमालयाचे वर्णन, संवादाची भाषा या बाबतीत अचूकता आहे आणि या सगळ्याला आध्यात्मिक विचारांची असलेली किनार! दोन्ही कथानकांमध्ये समतोल साधून मूळ सूत्र सुटू न देता कथानक वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

आवश्यक त्या ठिकाणी गंभीरपणे व्यक्त केलेले विचार हे लेखकाच्या परिपक्व विचारांचे प्रतिबिंब आहे. उदाहरणार्थ, सागराला उद्देशून काढलेले उद्गार पहा :

“माणसाचा दुराभिमान आणि अहंकार क्षणात नाहीस करण्याचं आणि त्याच्या क्षुद्रपणाची जाणीव करून देण्याचं सामर्थ्य फक्त तुझ्यातच आहे “. किंवा

“आदमी बादशाह नहीं है, वक्त बादशाह है |” हे वाक्य.

तर दुसरीकडे, ‘ दारुडा माणूस सगळं विसरत असला तरी स्वतःच्या घरी व्यवस्थित कसा काय पोचतो? ” असा मजेशीर पण खरा प्रश्न त्यांना पडतो. पुढे बिलावाला यांच्या मृत्यूच्या प्रसंगी राघवच्या तोंडी आलेले

“मृत्यू थांबवण्याचं काम विज्ञान करु शकत असेल पण मृत्यू टाळण्याचं नाही. ” हे वाक्य आपल्याला नकळत एका सत्याची जाणीव करून देते. इनव्हेस्टसंबंधी ‘ बेसीक रुल ‘ राघवच्या तोंडून सांगताना लेखकाच्या अंगभूत व्यावसायिक विचारांची दिशा दिसून येते. तसेच अध्यात्माविषयी आचार्यांनी मांडलेले विचार हे लेखकाच्या अध्यात्म विषयक चिंतनाचे प्रकटीकरण आहे हे जाणवते.

कादंबरीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात लेखकाने केलेले वर्णन, विवेचन, संवाद वाचल्यानंतर महाभारतातील पांडवांच्या अखेरच्या प्रवासाच्या वर्णनाची आठवण होते. या अखेरच्या लिखाणात दोन जन्मांची घातलेली

सांगड अत्यंत कठीण पण कौशल्यपूर्ण आहे. गुंतवणूक संबंधी असलेल्या आपल्या व्यवसायाचा प्रत्यक्ष अनुभव, चिंतनशीलतेची जोड, मातोश्रींकडून आलेले लेखनाचे कौशल्य, जगण्याकडे पाहण्याचा चौकटी पलीकडचा दृष्टिकोन या सर्वांच्या घुसळणीतून मिळालेले ‘ रिटर्नस’ म्हणजे *द अल्टिमेट इन्व्हेस्टर.. गोष्ट जन्मजन्मांतरीची*.. असे म्हणणे उचित ठरेल असे वाटते.

अशाच वैशिष्ट्यपूर्ण लेखनासाठी शुभेच्छा!

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted