श्री जगदीश काबरे
विविधा
☆ “डॉक्टर्स डे : आत्मपरीक्षणाचा दिवस…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
डॉक्टर्स डे : पहिली बाजू
दरवर्षी १ जुलै रोजी साजरा होणारा डॉक्टर दिन हा केवळ डॉक्टरांचा गौरव करण्याचा दिवस नसून, आरोग्य व्यवस्थेच्या एका मूलभूत विरोधाभासाकडे लक्ष वेधणारा दिवसही आहे. समाजाला निरोगी ठेवण्यासाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या डॉक्टरांच्या स्वतःच्या आरोग्याची अवस्था अनेकदा चिंताजनक असते. इतरांना दीर्घायुष्याचा सल्ला देणारे अनेक डॉक्टर स्वतः मात्र अनियमित जीवनशैली, प्रचंड मानसिक ताण, अपुरी झोप आणि सततच्या कामाच्या ओझ्यामुळे विविध असंसर्गजन्य आजारांना बळी पडत आहेत. त्यामुळे डॉक्टर दिन हा केवळ अभिनंदनाचा नसून आत्मपरीक्षणाचाही दिवस ठरला पाहिजे.
वैद्यकीय व्यवसाय हा इतर अनेक व्यवसायांपेक्षा वेगळा आहे. येथे प्रत्येक निर्णय एखाद्या व्यक्तीच्या जीवन-मरणाशी संबंधित असतो. त्यामुळे डॉक्टरांवर सतत मानसिक दबाव असतो. आपत्कालीन सेवा, रात्रपाळ्या, दीर्घकाळ चालणाऱ्या शस्त्रक्रिया, रुग्णांच्या नातेवाईकांच्या अपेक्षा, न्यायालयीन प्रकरणांची भीती, वाढती स्पर्धा आणि प्रशासनाचा दबाव या सर्वांचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. अशा परिस्थितीत स्वतःसाठी वेळ काढणे अनेक डॉक्टरांना शक्य होत नाही. यातील सर्वात मोठी विसंगती म्हणजे डॉक्टर आपल्या रुग्णांना ज्या आरोग्यदायी सवयींचा आग्रह करतात, त्याच सवयी त्यांना स्वतः पाळता येत नाहीत. वेळेवर जेवण, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, ताणाचे व्यवस्थापन आणि कुटुंबासाठी वेळ या गोष्टी त्यांच्या दैनंदिन जीवनातून अनेकदा हरवून जातात. परिणामी उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, नैराश्य, बर्नआऊट आणि काही वेळा आत्महत्येसारख्या गंभीर समस्या वाढताना दिसतात. आधुनिक वैद्यकीय संशोधनही सातत्याने सांगते की दीर्घकालीन ताण आणि अपुरी विश्रांती यामुळे शरीरातील दाह, हार्मोनल असंतुलन आणि जैविक वृद्धत्व वाढते, ज्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या आरोग्याचा प्रश्न हा केवळ वैयक्तिक नसून सार्वजनिक आरोग्याचा विषय आहे. निरोगी डॉक्टरच अधिक प्रभावीपणे रुग्णसेवा करू शकतो. म्हणूनच डॉक्टरांनी स्वतःच्या आरोग्याला दुय्यम न मानता व्यावसायिक जबाबदारीचा एक भाग मानले पाहिजे. त्याचबरोबर रुग्णालय व्यवस्थापन, शासन आणि समाज यांनीही डॉक्टरांना योग्य कामाचे तास, पुरेशी विश्रांती, मानसिक आरोग्य सहाय्य आणि सुरक्षित कार्यपरिसर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
कोविड-१९ महामारीने या वास्तवाला अधिक ठळक केले. त्या काळात डॉक्टरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा केली. अनेकांनी कुटुंबापासून दूर राहून हजारो जीव वाचवले, तर काहींनी स्वतःचे प्राण गमावले. या अनुभवाने डॉक्टर हा केवळ व्यावसायिक नसून समाजाचा अत्यावश्यक आधारस्तंभ असल्याचे सिद्ध झाले. मात्र अशा समर्पित सेवेनंतरही त्यांच्यावर होणारी हिंसा, अविश्वास आणि अपमान ही आरोग्य व्यवस्थेसाठी अत्यंत घातक बाब आहे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वास कमी झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण उपचार प्रक्रियेवर होतो.
डॉक्टर दिनाचा खरा संदेश म्हणजे डॉक्टरांचा सन्मान केवळ शब्दांनी किंवा पुष्पगुच्छांनी न करता त्यांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा करून, त्यांच्याविषयी विश्वास आणि संवेदनशीलता निर्माण करून आणि त्यांच्या आरोग्याचीही तितकीच काळजी घेऊन व्यक्त करणे. कारण स्वतः निरोगी असलेला डॉक्टरच समाजाला अधिक सक्षम, सुरक्षित आणि निरोगी भविष्य देऊ शकतो.
डॉक्टर्स डे : दुसरी बाजू
डॉक्टरकी हा व्यवसाय नसून सेवा आहे, असे आपण नेहमी म्हणतो. “वैद्यो नारायणो हरिः” असे म्हणत भारतीय संस्कृतीने डॉक्टरला देवासमान स्थान दिले. परंतु आज वास्तव वेगळे दिसते आहे. रुग्णालये अनेक ठिकाणी सेवेची मंदिरे न राहता उद्योगालये बनू लागली आहेत. काही डॉक्टरांवर व्यापारी वृत्तीचा प्रभाव वाढताना दिसतो. अर्थात अपवाद सगळीकडेच असतात. हजारो डॉक्टर आजही प्रामाणिकपणे आणि सेवाभावाने काम करत आहेत. मात्र डॉक्टरकीच्या व्यवसायात ज्या अनिष्ट प्रवृत्ती वाढत आहेत, त्यांची परखड चिकित्सा करणे आवश्यक आहे. या समस्येची सुरुवात रुग्णालयातून होत नाही; ती घरातून सुरू होते. मुलगा किंवा मुलगी डॉक्टर व्हावी, ही इच्छा अनेक पालकांची असते. ही इच्छा मुलाची आवड, क्षमता किंवा सामाजिक जाणीवेतून निर्माण झालेली नसते; तर ती प्रतिष्ठा, पैसा आणि सामाजिक दर्जा मिळवण्याच्या आकांक्षेतून निर्माण झालेली असते. ‘डॉक्टर झाला म्हणजे आयुष्यभर पैशाची चिंता नाही, तो खोऱ्याने पैसा ओढेल’, ही समजूत अनेक कुटुंबांमध्ये आजही जिवंत आहे. त्यामुळे डॉक्टरकीकडे सेवेची नव्हे तर श्रीमंतीचा शॉर्टकट म्हणून अनेकदा पाहिले जाते.
याच मानसिकतेतून वैद्यकीय प्रवेश परीक्षांमध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण होते. काही विद्यार्थी प्रामाणिक मेहनतीने यश मिळवतात, पण काही पालक पैसा वापरून पेपरफुटी, गैरव्यवहार किंवा कॅपिटेशन फीच्या माध्यमातून प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा शिक्षणाची सुरुवातच पैशाच्या बळावर होते, तेव्हा अशा लोकांकडून नैतिकतेची अपेक्षा करणे कठीण होते. कोट्यवधी रुपये खर्च करून मिळवलेली पदवी अनेकांच्या दृष्टीने सामाजिक जबाबदारी नसून आर्थिक गुंतवणूक बनते. या गुंतवणुकीवर परतावा मिळवण्याची मानसिकता पुढे डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्याच्या वैद्यकीय व्यवसायातही उतरते. मग काही ठिकाणी कमिशनसाठी रुग्णांना विशिष्ट तपासणी केंद्रात पाठवले जाते, अनावश्यक चाचण्या सुचवल्या जातात, आवश्यकता नसताना रुग्णालयात ऍडमिट व्हायला सांगितले जाते, गरज नसताना शस्त्रक्रिया केल्या जातात, महागडी औषधे लिहून दिली जातात. अशाप्रकारे रुग्णालयातील प्रत्येक उपचाराकडे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहिले जाते. स्त्रीभ्रूणहत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्येही काही डॉक्टर सहभागी झाल्याच्या घटना समाजाने पाहिल्या आहेत. अशा घटना केवळ कायद्याचा भंग नाहीत; त्या वैद्यकीय नैतिकतेच्याही पराभवाचे प्रतीक ठरतात.
प्रश्न फक्त डॉक्टरांच्या चुकीच्या वागण्याचा नाही तर प्रश्न असा आहे की त्यांना तसे वागण्यास पोषक व्यवस्था कोणी निर्माण केली? महागडे वैद्यकीय शिक्षण, शिक्षणाचे खासगीकरण, अपुरी सरकारी वैद्यकीय महाविद्यालये, कमकुवत नियम, भ्रष्टाचार आणि पैशाच्या बळावर नियम वाकवण्याची संस्कृती यामुळे आरोग्यसेवेच्या क्षेत्रात व्यापारीकरण वाढले. अनेकदा गैरप्रकार उघडकीस येतात, चौकशा होतात, पण प्रभावशाली व्यक्ती, पैसा आणि राजकीय संरक्षण यांच्या आधारे प्रकरणे दडपली जातात. त्यामुळे प्रामाणिक डॉक्टरही संशयाच्या भोवऱ्यात अडकतात. या संपूर्ण प्रक्रियेत समाजाची मानसिकताही तितकीच जबाबदार आहे. आपण मुलाला डॉक्टर झाल्यावर ‘किती लोकांचे प्राण वाचवशील?’ हा प्रश्न विचारत नाही; तर ‘किती कमवशील?’ हा प्रश्न विचारतो. विवाहासाठी डॉक्टर मुलगा किंवा मुलगी म्हणजे मोठे स्थळ मानले जाते. कारण त्यामागे आर्थिक गणिते असतात. म्हणजेच समाज स्वतः डॉक्टरकीला सेवेपेक्षा उत्पन्नाचे साधन मानतो आणि नंतर डॉक्टर व्यापारी झाले म्हणून त्यांच्यावर टीकाही करतो. हा विरोधाभास समाजाचा दुटप्पीपणा उघड करतो.
याचवेळी ग्रामीण भागात, सरकारी रुग्णालयांत, आदिवासी क्षेत्रांत आणि आपत्कालीन सेवांमध्ये शेकडो डॉक्टर अत्यंत कमी साधनसामग्रीत आणि मोठ्या ताणाखाली काम करत आहेत, हे विसरून चालणार नाही. कोविड महामारीत अनेक डॉक्टरांनी स्वतःचे प्राण धोक्यात घालून सेवा दिली. त्यामुळे काहींच्या गैरवर्तनामुळे संपूर्ण वैद्यकीय समुदायाला दोषी ठरवणे अन्यायकारक ठरेल. परंतु गैरप्रकार करणाऱ्यांना अपवाद म्हणून दुर्लक्षित करणेही तितकेच चुकीचे ठरेल. कारण ही प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. म्हणूनच प्रश्न दोषी कोण? असा नसून व्यवस्था अशी का बनली? असा आहे. याचे उत्तर बहुआयामी आहे. पालकांची अवास्तव महत्त्वाकांक्षा, शिक्षणाचे व्यापारीकरण, शासनाचे अपुरे नियंत्रण, वैद्यकीय शिक्षणातील आर्थिक विषमता, नियामक संस्थांची निष्क्रियता आणि समाजाचा पैशाला दिलेला सर्वोच्च मान, या सर्व घटकांनी मिळून ही परिस्थिती निर्माण केली आहे. डॉक्टर हा या व्यवस्थेचा एक भाग आहे; पण व्यवस्था घडवणारा समाजही त्यात तितकाच या परिस्थितीला कारणीभूत आहे.
म्हणून उपायसुद्धा सर्वांनी मिळूनच शोधावा लागेल. त्यासाठी सर्वप्रथम वैद्यकीय शिक्षण परवडणारे आणि गुणवत्ताधारित झाले पाहिजे. कॅपिटेशन फीची संस्कृती संपली पाहिजे. नैतिकतेचे शिक्षण वैद्यकीय अभ्यासक्रमाचा केंद्रबिंदू झाले पाहिजे. अनैतिक डॉक्टरांवर कठोर आणि जलद कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर प्रामाणिक डॉक्टरांना संरक्षण, सन्मान आणि योग्य वातावरण मिळाले पाहिजे. समाजानेही डॉक्टरकीच्या पेशासंबंधीची आपली व्याख्या बदलली पाहिजे. ‘पैसा कमावणारा डॉक्टर नव्हे, तर विश्वास कमावणारा डॉक्टर घडविणे’ हेच खरे डॉक्टरांचे ध्येय असायला हवे. कारण ज्या दिवशी डॉक्टरकीचा व्यवसाय पेशा न राहता पूर्णपणे धंदेवाईक व्यापार बनेल, त्या दिवशी सर्वात मोठे नुकसान डॉक्टरांचे नाही, तर देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाचे होईल. आरोग्य हा बाजारातील माल नसून मानवी हक्क आहे आणि हा हक्क टिकवायचा असेल, तर डॉक्टरकीच्या पांढऱ्या कोटामागे लपलेल्या व्यापारी मानसिकतेवर समाजाने आणि शासनाने तितक्याच धैर्याने बोट ठेवले पाहिजे… पायबंद घातला पाहिजे आणि समाजाचेही दुटप्पीपणाने वागणे थांबवले पाहिजे.
© श्री जगदीश काबरे
(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)
jetjagdish@gmail. com
मो ९९२०१९७६८०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





