सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ होईल ना सगळं नीट? : लेखिका: सुश्री धनश्री दाबके ☆ सौ. अंजली दिलीप गोखले

माझ्या दोन्ही डिलिव्हरीज अगदी सुरळीत पार पडल्या. पहिल्या वेळेला थोडा जास्त वेळ लागला इतकंच. कुठच्याच प्रकारची शारीरिक कॉम्प्लिकेशन्स नसल्याने दोन्ही वेळेला गुटगुटीत बाळ घेऊन मी सुखरूप घरी आले. पहिल्या वेळेला आई बरोबर होती आणि दुसऱ्या वेळेला सासूबाई. पण दोघींनीही सारखीच माया, ममता आणि आधार दिला.

पुढचे दोन अडीच महिने माझी व बाळाची इतकी छान काळजी घेतली गेली की शरीराने आईपण झटकन स्वीकारलं. पण आईपणाची मानसिक कॉम्प्लिकेशन्स जी त्यावेळेपासून सुरू झाली ती आजतागायत अजूनही तशीच आहेत.

डिलिव्हरीनंतर रोज संध्याकाळी आई मला, बाळाला मांडीवर घेऊन रामरक्षा आणि अथर्वशीर्ष  म्हणायला लावायची. खरंतर हे दोन्ही लहानपणीच आईने शिकवलेलं होतं. पण आईचं न ऐकण्याच्या मधल्या गुलाबी काळात ते जरा मागे पडलं  होतं. आता आई झाल्यावर बाळावर संस्कार करता यायला हवे, त्यासाठी ते तुला आधी म्हणता यायला हवं असं म्हणून आईने माझ्यावर परत नव्याने संस्कार केले. तेव्हा वाटायचं की हीचं आईपण अजूनही संपत नाहीये. माझं  तर आत्ताच सुरु झालंय.  ‘होईल ना सगळं नीट माझ्या बाळाचं?’

‘होईल ना सगळं नीट?’ या प्रश्नाने तेव्हापासून जे मनात घर केलंय, त्याचा आजतागायत अंबानींना सुद्धा लाजवेल असा मोठ्ठा बंगला तयार झालाय. आणि तरीही ‘वाढता वाढता वाढे’ अशी त्याची गत आहे.

मला वाटतं ‘होईल ना सगळं नीट?’ हे प्रत्येक आईने तिच्या पाचवीला पुजलेलं पालुपद असावं आणि त्यामुळेच त्यावरचं उत्तर तिला कधीच मिळत नसावं.

दोन्ही मुलांनी पटापट मोठं होऊन आता आपापल्या आयुष्याच्या रथाचं सारथ्य स्वतःकडे घेतलेलं आहे. मोठ्याचं  शिक्षण संपून नोकरी सुरू झालेली आहे. धाकटा  नुकताच युके मधल्या ए लेव्हल्सची (म्हणजे भारतातल्या बारावीची) परीक्षा पास करून त्याला हव्या त्या लांबवरच्या युनिव्हर्सिटी मध्ये पुढच्या शिक्षणासाठी निघाला आहे. म्हणजे मुलांना हवा तो मार्ग आणि त्यासाठीचा योग्य वेग त्यांनी पकडलेला आहे. मला आता फक्त दिमाखात मागच्या सीटवर बसायचं आहे. पण नेमकं तेच जमत नाहीये.

लेक तर मोठा झालाय, पण पंधरा वर्षांपूर्वी  त्याला नर्सरीत सोडतानाची मी आणि आज त्याला युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये सोडतानाची मी तशीच आणि तिथेच उभी आहे. कारण आई म्हणून मी मोठी झालेलीच नाहीये.

कधी मला सोडून न राहिलेला धाकटा, एकटा तिकडे कसा राहील? सगळं नीट मॅनेज करेल का? जेवण खाण्याचे कसं करेल? सगळं सांभाळून इतका भलामोठा अभ्यास कसा करेल? हे आणि असे अनेक प्रश्न माझ्या मनातल्या बंगल्यावर मजलेच्या मजले चढवत आहेत.

आई चिल मार, एवढी काय काळजी करतेस, मी राहीन ग नीट, अजून एक महिना आहे अशी समजूतीची वाक्य सध्या मी सकाळ, संध्याकाळ ऐकते आहे.

‘तू आता मनाची तयारी कर’ असं घरातले तिघेही मला आणि काही अंशी स्वतःलाही सांगत आहेत. पण काही गोष्टींची तयारी कधीच पूर्ण होत नसते. त्यावर ‘go with the flow’ हा एकच उपाय असतो. कितीही ठरवलं तरी मन आणि त्याच्या तालावर फितूर होऊन डोळे भरून येतातच.

“अगं बघता बघता चार वर्ष जातील” काल माझ्या मूडचा अंदाज घेऊन नवरा म्हणाला. त्यावर धाकटा म्हणाला “हो बघता बघता चार वर्ष जातील आणि मग आई डीग्री तर मिळाली आता माझं करीअर नीट होईल ना याची काळजी करेल.” त्याचं हे म्हणणं मात्र मला मनोमन पटलं आणि नकळत चेहऱ्यावर स्माईल उमटलं.

मुलाला जन्म देतांना नाळ तोडण्यासाठी एक्सपर्ट डॉक्टर आईसोबत असतात. पण तेच मूल मोठं झाल्यावर दुसऱ्यांदा तोडायची नाळ मात्र आईला स्वतःलाच डॉक्टर होऊन तोडावी लागते जे अजिबात सोपं काम नाही. पण हे तुला कसं रे कळणार, असा मनोमन विचार करुन मी पुढच्या कामात मनाला गुंतवायचा प्रयत्न सुरु केला.

लेखिका: सुश्री धनश्री दाबके

© सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
2 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted