श्री दिवाकर बुरसे
विविधा
☆ ‘कोमल वाचा दे रे राम!’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
बोलण्याची क्षमता हे निसर्गाने मानवाला दिलेले विशेष वरदान होय. विकसित वाणी, तिन्ही काळाचा विचार करणारी अलौकिक बुद्धी व स्मरणशक्ती ही वरदाने केवळ मानवालाच मिळालेली आहेत. त्यातले ‘वाणी’ हे आपल्या इच्छा, भावना, विचार, गरजा व्यक्त करण्याचे एक अत्यंत प्रभावी साधन आहे.
तुम्ही बोलायला सुरुवात केली की, तुम्ही कसे आहात याचा परिचय जगाला होतो. तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातली सत्यता, विषयाचे गांभिर्य, विषयाचा व्यासंग, अनुभव, प्रामाणिकपणा, समोरच्या व्यक्तीविषयीचा आदर, आपुलकी सारे काही बोलण्यातून कळते. आपली नाती, व्यवसाय, सामाजिक व्यवहार या बोलण्यावरच अवलंबून आसतात.
समर्थांच्या मते बोलणे आणि बोलणारा कसा असू नये ते प्रथम समजून घेऊया.
अल्पमती आणी वादक l दीनरूप आणी भेदक l सूक्ष्म आणी त्रासक l कुशब्देकरुनि ll
कठिणवचनी कर्कशवचनी l कापट्यवचनी संदेहवचनी l दुःखवचनी तीव्रवचनी l क्रूर निष्ठुर दुरात्मा ll
न्यूनवचनी पैशून्यवचनी l अशुभवचनी अनित्यवचनी l द्वेषावचनी अनृत्यवचनी l बाष्कळवचनी धिःकारू ll
(दासबोध द. २ स. ३)
पुढे एके ठिकाणी समर्थ आपल्याला बोलणे हा विषय समजाऊन सांगताना म्हणतात….
बरें बोलता सुख वाटतें l हें तों प्रत्यक्ष कळतें ल आत्मवत परावें तें l मानीत जावें ll
कठिण शब्दें वाईट वाटतें l हे तो प्रत्ययास येतें l तरी मग वाईट बोलावें तें l काये निमित्त ll
आपणास चिमोटा घेतला l तेणे कासाविस जाला l आपणावरुन दुस-याला l राखत जावे ll
जे दुस-यास दुःख करी l ते अपवित्र वैखरी l आपणास घात करी l कोणियेकें प्रसंगी ll
पेरलें तें उगवतें l बोलिण्यासारिखें उत्तर येतें l तरी मग कर्कश बोलावें तें l काये निमित्त ll
आपल्या पुरुषार्थ वैभवें l बहुतास सुखीं करावें l परंतु कष्टी करावें l हे राक्षेसी क्रिया ll
दंभ, दर्प, अभिमान l क्रोध आणी कठिण वचन l हे अज्ञानाचे लक्षण l भगवद्गीतेंत बोलिलें ll
(दासबोध द. १२ स. १०)
बोलणे हे इतके महत्त्वाचे असूनही आपण आपले बोलणे अधिक चांगले करण्यासाठी विशेष प्रयत्न करत नाही. ब-याच वेळा आपला अहंकार आपल्याला तसे करू देत नाही.
‘आपलं जे आहे हे असंच आहे’, ‘माझा आवाजच मोठा आहे’ ‘मला अशीच सवय आहे’ ‘असं बोललं की मगच समजतं ‘ असे म्हणत आपण स्वतःचे समर्थन करतो. पण लक्षात घ्या, चांगले बोलणे प्रयत्नपूर्वक शिकावे लागते, आत्मसात करावे लागते आयुष्यभर याची साधना करावी लागते.
सुसंस्कृत वाणी हाच खरा अलंकार
वाणेक्या समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते
क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम् ll
अर्थः- वाणी संस्कृतियुक्त एकच नरा शोभा खरी देतसे
वाणी हीच अपूर्व भूषण सदा, नाशा दुजें जातसे ll
(राजा भर्तृहरिकृत नीतिशतक)
‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम लोक अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकण्यासाठी पहात- खरे तर ‘कान देऊन ऐकंत’ असंत. उत्तम शब्दसंग्रह, स्पष्ट शब्दोच्चारण, आवाजाचा चढ-उतार- लय इ. शिकायचे असेल, तर हा बच्चन महोदयांचा आवाज आणि त्यांची बोलण्याची शैली अभ्यासायलाच हवी. आवाजाची, बोलण्याची, वाणीची साधना, तपस्या याचे साक्षात उदाहरण म्हणजे अमिताभ बच्चन!काही शब्द त्यांच्या तोंडून ऐकले, की मग तसा उच्चार दुसरे कोणी करु शकत नाही हे हळूहळू कळत जाते.
सत्यार्थाने शब्द जगलेला माणूस शब्द उच्चारताना ते ज्या ऊर्जेने उच्चारतो त्यावरून त्याचा खरेपणा ओळखता येतो.
बोलण्याचा ध्वनी आतून, अंतःकरणातून उमटतो. माणसाच्या चेतनेला स्पर्श करुन बाहेर पडतो. माणूस म्हणून आपण जितके व जसे घडत जातो तसा, तितका आपला आवाजही सुंदर होत जातो. आशाताईंचे साधे बोलणेही गाण्याइतकेच सुश्राव्य का वाटते? कारण जगण्याची लढाई हसत लढलेल्या शक्तीची ती अभिव्यक्ती आहे!
एक प्रयोग करून पहा. सुंदर शब्दांची यादी करा आणि ती दररोज वाचा. सकारात्मक शब्दांची यादी लिहायची आणि वेळ मिळेल, तशी मोठ्याने वाचायची. सरावाने वाढवत जायचे हे आपले शब्दभांडार. सततच्या प्रयत्नाने हळूहळू आपल्या बोलण्यात ते शब्द येऊ लागतात. याने बोलणे चांगले होतेच पण सवयीने या विरुद्ध काही ऐकावेसे वाटतच नाही. नकळत आपल्या अभिरुचीचा स्तर उंचावत जातो.
आयुष्य बदलून टाकणारी ही शब्दांची साधना आहे. आपले शब्द जसे असतील, तशाच घटना, तशाच व्यक्ती आपण आकर्षित करत असतो. शब्द बदलले तर आयुष्यही बदलता येते हे ‘शब्दशः’ सत्य आहे!
सावकाश, स्पष्ट, भावपूर्ण, शक्यतो मृदु, हळू बोलणे या सवयी जाणीवपूर्वक लावून घ्याव्या लागतात. वाचनाने आपले विचार अधिक स्पष्ट, मुद्देसूद, प्रगल्भ होतात. आपल्याला नेमके व मोजके बोलण्याची कला अवगत होते.
काव्यवाचनाने कवितेतील भाव आणि शब्दयोजना समजून घेता घेता आपल्या बोलण्याची लय सुधारते. बोलण्यातला रुक्षपणा जातो आणि ‘ ये हृदयिचे तें हृदयीशी’ संवाद साधण्याची कला साध्य होते. यासाठी प्रकट वाचन, काव्यवाचन महत्त्वाचे आहे.
कानात प्राण आणून ऐकावे असे बोलणारी माणसे या जगात आहेत. आपल्याला ती शोधता-ऐकता आली पाहिजेत येवढेच.
बोलताना कटाक्षाने टाळायच्या गोष्टी म्हणजे तार स्वरात न बोलणे, पाल्हाळ न लावणे, अति संथ लयीत, समोरच्या व्यक्तीच्या सहनशक्तीची परीक्षा घेत रटाळ न बोलणे. वेळ ही संपत्ती असेल, तर अशा लोकांना वेळचोर का म्हणू नये? फोन, मोबाईलवर बोलण्याचे नियम हा तर चर्चेचा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल.
‘आपल्या’ माणसांशी बोलण्याने मनावरचा ताण हलका होतो. बोलणे म्हणजे निव्वळ शब्द नाहीत तर त्यामागे बोलणाराचे अनुभव, विषयाचे चिंतन, भावभावना, तळमळ असते. काही प्रसंगी तर मौन बाळगणे हेच सर्वात प्रभावी बोलणे ठरू शकते. ‘शब्दांवाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले’ असे होते.
वेळात वेळ काढून घराघरात, समाजात संवाद – सुसंवाद झाले पाहिजेत. माणसांमाणसातले अंतर बोलण्यानेच दूर होऊ शकते. नात्यातले, मनामनातले गैरसमज बोलून दूर करता येतात.
परिणामकारक कसे बोलावे हे या जगाच्या शाळेत शिकावेच लागते. हा जगण्याचा प्रवास अवघड असला तरी अशक्य मुळीच नाही.
सोबत कोणी बोलणारे मिळाले की प्रवास सोपा होतो.
तात्पर्य:- ज्याच्या वाणीमध्ये माधुर्य व गोडवा आहे, जो सदैव संयमित व विनयशील बोलतो, शब्द जपून वापरतो, आपले बोलणे सहज, अकृत्रिम, प्रवाही, यमकअनुप्रासादि अलंकार, समर्पक दृष्टांत, उदाहरणे, उद्धरणे, अवतरणे यांनी शृंगारतो, जग त्याच्या प्रेमात पडते व अशा व्यक्तीला अशक्य गोष्टी शक्य होतात!
वाणीचे आणि शब्दांचे महत्व व सामर्थ्य जाणून समर्थ रामरायाला विनवतात….
कोमल वाचा दे रे राम
बहुत पाठांतर दे रे राम
शब्द मनोहर दे रे राम
दास म्हणे रे सद्गुणधाम
उत्तम गुण मज दे रे राम!
*
llजय जय रघुवीर समर्थ ll
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






सुंदर!