श्री जगदीश काबरे
☆ “स्त्री नाही अबला.. ती आहे सबला” ☆ श्री जगदीश काबरे ☆
साथिंनो, स्त्रीया खरंच आहेत का अबला? या प्रश्नावर आपण आज विचार करणार आहोत आणि त्याचे उत्तरही शोधणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम जरा खोलात जाऊन आपण स्वतःलाच प्रश्न विचारूया की, स्त्रिया खरंच अबला आहेत काय? विचार केल्यावर आपल्याला काय उत्तर मिळते? आपण दररोज पाहत असतो की, त्या दिवसभर एकाच वेळी अनेक व्यावधानी कामे करत असतात. म्हणजे असे की गृहिणी असो वा नोकरी करणाऱ्या स्त्रिया सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही त्यांच्या कामाची यादी काढली तर ती पाहून एवढी सगळी कामे ह्या स्त्रिया एका दिवसात कशा पार पडतात, हा प्रश्न आपल्याला नक्की पडतो. समजा स्त्रियांनी एक दिवस सुट्टी घ्यायची ठरवले आणि ती कामे पुरुषाने करायची ठरवली तर पुरुषाची किती त्रेधातिरपीट उडेल, हे पुरुषाला चांगलेच माहित आहे. म्हणून मला असे वाटते की, स्त्रीया मुळातच सक्षम असतात. पण पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे स्त्रियांचे सतत दमन करण्यात आलेले आहे, त्यांना दुय्यम लेखण्यात आलेले आहे आणि त्या दमनापोटी स्त्रियांमध्ये एकप्रकारचा न्यूडगंड तयार झाला आहे. म्हणून त्या स्वतःला अबला समजू लागलेल्या आहेत.
नोकरी/व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत ही दुय्यमता थोडी गळून पडलेली दिसते. पण गृहिणीची तर अवस्था वाईट आहे. पुरुषसत्ताक व्यवस्थेतील ‘गृहिणी’ या शब्दाची मला सुचलेली व्याख्या अशी आहे की, ‘जिचे कष्ट आम्ही सहज गृहीत धरतो ती गृहिणी. ‘ म्हणूनच ‘तू काय करतेस? तू तर घरातच असतेस!’ असे उद्दामपणे नवरे अथवा घरातील कर्ते पुरुष बोलताना दिसतात. बऱ्याच घरामध्ये तिला असे गृहीत धरले जाते. पण स्त्री ही गरोदर राहते या शारीरिक एका फरकापलीकडे कुठल्याही बाबतीत ती पुरुषांपेक्षा कमी नाही. तेव्हा आपण सर्वांनी हे लक्षात ठेवायला हवे की, ‘स्त्री नाही अबला, तर ती आहे सबला. ‘कष्टाला कधीही स्त्रिया हार जात नाहीत. म्हणूनच आज जगात सर्व क्षेत्रांमध्ये – विशेषत: जी जी क्षेत्रे पुरुषांशी संबंधित समजली जातात – त्याही क्षेत्रांमध्ये स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत आणि आपले कर्तृत्व सिद्ध करताना दिसत आहेत. स्त्रीया आज सैन्यामध्ये अधिकारी, वैमानिक म्हणून, कुस्ती आखाड्यात, राजकारणात, पोलीस खात्यात कमांडो म्हणून अशा अनेक पुरुषी क्षेत्रामध्ये लीलया वावरताना दिसत आहेत. म्हणजेच, स्त्री नाही अबला… ती आहे सबला!
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढलेल्या आपल्याला दिसतात. यात जवळजवळ शंभर टक्के पुरुषांचे प्रमाण आहे. आता मला सांगा की, पुरुषाने आत्महत्या केल्यावर जी त्या घरातील निरक्षर स्त्री आहे तिच्यावर संपूर्ण घराची जबाबदारी अचानकपणे येऊन पडते. तिने आजपर्यंत कधीही बाहेरची कामे केलेली नसतात. तेव्हा सुरुवातीला ती जरी गडबडली, घाबरली तरीही अशा स्त्रिया नंतर खंबीरपणे आपले तेच शेत कसून आपल्या घराचे त्या उदरभरण करत असतात, ते त्यांच्या जिद्दी स्वभावामुळेच ना? आलेल्या संकटावर मात करण्यासाठी कष्टाळूपणाने त्या आपल्या जीवनाचे रहाटगाडगे ओढत असतात. यावरून आपल्या लक्षात येईल की, पुरुष संकटाला घाबरून एक वेळ आत्महत्या करेल, पण स्त्री मात्र करणार नाही. म्हणूनच मी म्हणतो, ‘स्त्री नाही अबला… ती तर आहे सबला!’
प्रत्येक स्त्री ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तिला तिचे आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. काय शिकावे, नोकरी करावी की नाही, लग्न करावे की नाही आणि केले तर कोणाशी करावे, मूल होऊ द्यावे की नाही आणि कधी होऊ द्यावे, काय खावे, काय प्यावे, कोणते कपडे घालावे, हे सगळे प्रश्न तिचे वैयक्तिक प्रश्न नाहीत का? मग त्यावर टीकाटिप्पणी करण्याचा कोणालाच काय अधिकार आहे? तिच्याकडे असलेल्या किंवा नसलेल्या गोष्टींवरून तिच्याशी भेदभावाने वागण्याचा काय अधिकार आहे? वैयक्तिक निर्णय घ्यायचा जसा पुरुषाला अधिकार आहे तसाच प्रत्येक स्त्रीलाही अधिकार आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. तिचे अनेक प्रश्नसुद्धा आहेत. त्या प्रश्नांशी ती एकटीच मूकपणे लढा देत असते. मग तिचे प्रश्न माहित नसतानाच जजमेंटल होण्याचा तरी कोणाला काय अधिकार आहे?
म्हणूनच मी पुन्हा एकदा सांगतो, स्त्री नाही अबला… ती आहे सबला! तेव्हा पुरुषांनो, स्त्रियांना दुय्यम लेखणारा पुरुषी अहंकार सोडा. त्यांच्याकडे फक्त उपभोग्य वस्तू म्हणून न पहाता व्यक्ती म्हणून आदर देत त्यांच्याशी समानतेने व्यवहार करा. मग पहा तुमचे जग किती सुंदर होते ते…!
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






सर खूपच छान विचार मांडून नारी जातीचा सन्मान केलात धन्यवाद!