सौ. अर्चना सुरेश देशपांडे
विविधा
☆ “लक्ष्मण रेषा आपली आपली…” ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆
लक्ष्मण रेषा म्हणजे काही नियम, मर्यादा यांचे पालन करणे म्हणजे ठराविक मर्यादा ओलांडू नये.
साधारणपणे चाळीस वर्षांपूर्वी शाळेत पाचवी ते सातवी पर्यंत मुलींना फ्रॉक किंवा स्कर्ट घालण्याची मुभा असायची पण त्यानंतर साडी नेसणे सक्तीचे होते. माता, गुरु आपल्यावर संस्कार करत म्हणजेच आपले जीवन सुखमय, निर्वीघ्न व्हावे यासाठी ती लक्ष्मण रेषाच होती. त्याकाळी नियम काटेकोरपणे पाळले जात.
आता मात्र या नियमाकडे दुर्लक्ष केले जाते. हल्ली हवे तसे पोशाख केले जातात. पूर्वी गुडघ्यावर फाटलेली पॅन्ट घातली तर दारिद्र्याचे लक्षण समजले जायचे पण हल्ली फॅशनच्या नावाखाली सर्रास गुडघ्यावर फाटलेल्या पॅन्ट घालून मुले मुली वावरताना दिसतात.
पूर्वी संध्याकाळी मुलांनी सातच्या आत घरी यावे असा नियम होता. घरी आल्यावर तिन्ही सांजेला शुभम करोति, मारुती स्तोत्र, रामरक्षा यांचे पठण पुढे करत त्यानंतर पाढे असा क्रम होता. हल्ली मुले केव्हाही घरी येतात, पाढे येतच नाहीत मग राम रक्षा वगैरे दूरच! आले की मुले जेवणाचे ताट घेऊन टीव्ही समोर बसतात किंवा मोबाईल मध्ये डोके खूपसून असतात. त्यामुळे संवाद कमी झाले आहेत, नातेसंबंध दुरावले आहेत.
बोलताना सुद्धा मर्यादा पाळायला हवी. “शब्द कधी वज्राहून कठोर तर कधी फुलाहून कोमल असतात” याचे भान ठेवले पाहिजे. कटू शब्द मनावर ओरखडे उठवतात. हल्ली प्रत्येकाचा इगो आड येतो. , त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे म्हणून स्त्री असो वा पुरुष असो बोलताना शब्द जपूनच वापरले पाहिजेत. खरचं जगताना प्रत्येकाने आपापली लक्ष्मण रेषा आखून घेतली पाहिजे.
द्रौपदीने स्वयंवराच्या वेळी कर्णाचा अपमान केला. नसता, दुर्योधनाला “अंधे का पुत्र अंधा “असे वर्मावर घाव घालणारे वाक्य बोलली नसती तर द्रौपदी वस्त्रहरण झाले नसते, युद्धही टाळले असते. तसेच सीतेने लक्ष्मणाने आखून दिलेली रेषा ओलांडली नसती तर रामायण घडले नसते. म्हणून
“लक्ष्मण रेषा बंधनांची
आपणच आखावी
स्वैर मनाला लगामाची
संवय घालून घ्यावी”.
सौ. अर्चना देशपांडे, पुणे
लेखक – अज्ञात.
प्रस्तुती – सौ. अर्चना सुरेश देशपांडे
पुणे
मो. ९९६०२१९८३६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈






खूप छान.
लक्ष्मण रेषा तर दूरच तीला पावित्र्याची व संभाव्य संकटाची किनार होती.
आता साधा बंध सुध्दा नको असतो कुणाला.
कुटुंबाची वा समाजाची काही शिस्त असते ह्याचेच भान हलविले आहे आता.
वंदेमातरम् सुप्रभातम्
शुभेच्छा शुभचिंतन.
9225705884