श्री दिवाकर बुरसे
विविधा
☆ ‘सीमोल्लंघन आणि सीमावरोधन’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
कोणे एके काळी आपल्या देशात ‘कालो वर्षति पर्जन्यः, पृथिवि सस्यशालिनि, देशोयं क्षोभरहितो, ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः’ अशी अवस्था होती. जो तो सुखी समाधानी, चारित्र्यवान, शीलवान, मर्यादाशील, विनयशील, धनवान, गुणवान, निरोगी व दीर्घायुषी होता. सर्वांचे वर्तन शास्त्राला धरून असे. कोणी शास्त्रमर्यादांचे उल्लंघन करण्यास धजावत नसे. कुणी केलेच तर तो स्वतःच त्याचे प्रायःचित्त घेई.
त्याकाळी निसर्ग समृद्ध होता. वृक्षराजी फळाफुलांनी सदा बहरलेली असे. वन्यजीवन पशु, पक्षी, कीटकांनी गजबजलेले होते. अरण्यपशूंना क्षुधाशांतीसाठी, मृगयेसाठी कधीही नगरात प्रवेश करण्याची आवश्यकता पडत नसे. नागरीकांनी कधीही विनाकारण अरण्यप्रदेश आक्रमिले नाहीत. जो तो आपापल्या मर्यादांचे कधीच उल्लंघन करीत नसे. जगा आणि जगू द्या या सूत्राप्रमाणे माणसाचे वर्तन असे.
राजे प्रजाहितक्ष होते. ते प्रजेला अपत्यवत वागवीत. त्यांच्या संरक्षणाचे, शिक्षण, व्यवसायाचे दायित्व राजा व त्याचे प्रशासन स्वतः स्वीकारीत. प्रत्येकाला त्याच्या योग्यतेप्रमाणे शिक्षणाचा अधिकार होता. शिक्षण अद्ययावत असे. देशभर शिक्षणक्रम आणि गुरुकुलपद्धती समान होती.
विद्वानांना राजाश्रय व जनाश्रय होता. त्यांचा मान राखला जात असे. ऋषिमुनी वैज्ञानिक होते. त्यांचे विज्ञान पर्वावरणाला पूरक असून ते विकसित होते. धातू, खनिजे, कायचिकित्सा, शल्यचिकित्सा, गणित, ज्योतिष, भूमिति, त्रिकोणमिति, रसायनविद्या, वास्तुशास्त्र, साहित्य, संगीत, कला पूर्ण विकसित होत्या. या कलाशास्त्रांना समाजात मान होता. समाज सुशिक्षित व विज्ञाननिष्ठ होता. भौतिक सधनता व समृद्धी होती. समाजात अंधश्रद्ध नव्हत्या. करप्रणाली होती पण सुसह्य होती.
निसर्ग शुद्ध होता. औषधी आपल्या गुणांनी परिपूर्ण होत्या. पुष्ट गोधन होते. दूधदुभत्याची रेलचेल होती. राजकोष रत्ने, शस्त्रे, अस्त्रे, वाहने, धनधान्य, चंदनादि सुगंधी द्रव्ये, मध, लवणे, औषधी, विविध वस्त्रे, मृगजिने सुवर्णादि अलंकारांनी ओसंडून वहात होते. सर्वसामान्य नागरिकही सुवर्णलंकार घालून निर्भयपणे मिरवीत असत.
स्त्रिपुरुष सभ्य होते. स्त्रियांना समाजात व परिवारात मानाने वागवले जात असे. सर्व व्यवहारात स्त्रियांचा सहभाग असे. जीवनक्रम चार आश्रमात विभागलेला असे. लोक त्याचे काटेकोर पालन करीत. युवासंघ बलशाली व सभ्य होते. वृद्धांचा आदर केला जाई. वृद्ध, जेष्ठ व्यक्ती घरचे भूषण असे. त्यांची कधीच उपेक्षा होत नसे. भ्रष्टाचाराला स्थान नव्हते.
व्यापारी आपापला उद्यम प्रामाणिकपणे करीत. जगभर त्यांचा लौकिक होता. भूमी व जलमार्गाने त्यांच्या वस्तूंचे जगभर वितरण होई. थोडक्यात ह्या आपल्या भारत देशात सर्वत्र सुजलां सुफलाम् होते! कोणीही दैनंदिन जीवनात आपापल्या मर्यादा कधीही ओलांडित नसत. कोणतेही सीमोल्लंघन सहसा निषिद्ध होते!
वरील वर्णन कपोलकल्पित नाही. कोणे एके काळी भारतीय जीवन असे होते याची अनेक प्रमाणे वाङमयात उपलब्ध आहेत. या समृद्धीशांतीचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे मर्यादांचे काटेकोर, कठोर पालन.
पण ही कोणे एकेकाळची गोष्ट झाली. पुढे पुढे त्यात परिवर्तन होत गेले. सतत होणारी परकीय आक्रमणे हे त्याचे प्रधान कारण. ही आक्रमणे अतिशय प्रखर व पाशवी होती. आक्रमणे करणारे हिंस्र, अशिक्षित, गुन्हेगारी प्रवृत्तीचे, जीवनमूल्यहीन, रानटी होते. त्यांनी अनन्वित अत्याचार केले. ही आक्रमणे देशावर होती, देशातल्या नागरिकांवर, त्यांच्या संपत्तीवर, स्त्रियांवर, पशुधनावर तर होतीच पण इथल्या सुसंस्कृतीवर, ज्ञानावर, कलाकौशल्यांवर आणि धर्मावर होती. सहस्र वर्षांच्या या गदारोळात इथल्या सर्व व्यवस्था, परंपरा कोलमडून पडल्या. याचा परिणाम असा गंभीर झाला की इथला माणूस स्वतःचा सत्य परिचयही हरवून बसला!
इतरांप्रमाणे तो ही बदलला. सर्व मर्यादा उल्लंघू लागला. बघता बघता सर्वच अस्ताव्यस्त, अव्यवस्थित, अमर्याद आकारहीन झाले.
आता आम्हाला कोणतीही मर्यादा नकोशी झाली आहे. आम्हाला अनिर्बंध जीवन जगायचे आहे. आम्हाला आहार-विहार, भक्ष्य-अभक्ष्य, निद्रा-मैथुन, शिष्ट-अशिष्ट वर्तन, व्यवसाय, विवाह, यातले कोणतही संकेत पाळायचे नाहीत. साधे नागरी रहदारीचे नियम व बंधनेही नकोत. चौकाचौकात लावलेले हिरवे-तांबडे दिवे, झेब्रा क्राँसिंग, पादचरी मार्गांचे पट्टे आम्ही मानत नाही. कुठूनही, कसेही, केव्हाही आम्ही जाऊ, तुम्ही कोण आम्हाला आडवणारे? ही आमची वृत्ती. आम्ही रांगेत नाही उभे राहणार, आम्ही पुढे घुसणार. आम्ही पैसे देऊन कामे करवून घेणार. तुम्ही ज्याला भ्रष्टाचार म्हणता तो आमच्यासाठी शिष्टाचार आहे. अशी सर्वांची वागण्याची त-हा झालीय!
विज्ञान, तंत्रज्ञान याच्या मदतीला धाऊन आले आहे. जीवनाचा हेतू आणि जीवनमूल्ये हरवली आहेत. उपभोग वाढू लागले आहेत, अमर्याद झाले आहेत. अंधश्रद्धा वाढल्या आहेत. जातीपातीत आणि धर्माधर्मात समाज विभागला जाऊ लागला आहे. उपभोगांच्या तृप्तीसाठी आम्ही हाती जे लागेल, सापडेल ते लुटू लागलो आहोत. नैसर्गिक साधनसंपत्ती उधळू लागलो आहोत, ओरबाडू लागलो आहोत. स्वार्थापायी नाती विसरतो आहोत. स्त्री ही उपभोग्य वस्तू झालीय. आई, बहीण, पत्नी, काकू, सून, मुलगी ही नाती विसरत चाललो आहोत, आमची कर्तव्ये विसरत चाललो आहोत. आम्ही सर्व सीमांचे उल्लंघन करू लागलो आहोत. त्यासाठी कोणताही मार्ग आम्हाला वर्ज्य नाही. आम्ही कुठल्याही थराला जायला तयार आहोत.
ज्ञानसाधनेऐवजी भोगविलासामागे धावू लागलो आहोत. आम्हाला स्वैर, मुक्त, भोगी जीवनशैली हवी आहे. कामतृप्तीसाठी आम्हाला केवळ मादी हवी आहे, मग ती तीन वर्षांची बालिका असो वा सत्तर वर्षाची वृद्धा! आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीच नव्हे तर आता कुटुंबपध्दती उध्वस करीत आहोत. विवाहापेक्षा ‘लीव्ह इन रिलेशनपद्धती’ आम्हाला सोईची वाटू लागली आहे. शारीरिक श्रम टाळण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. बसल्याजागी हवंय सगळं आपल्याला.
या हव्यासापोटी आम्ही सर्व मर्यादा ओलांडत आहोत. पण लक्षात असू द्या अमर्याद उपभोग आम्हाला शीघ्रगतीने विनाशाकडे घेऊन जात आहे. आपण पकडलेली अमर्याद गती आपल्याला गर्तेत खेचत आहे.
आता तरी आपण आत्मचिंतन करायला हवे. कोरोनाने या गतीला रोखण्याचा प्रयत्न केला काहिसा. सात-आठ महिने आपण सारे स्थानबद्ध होऊन पडलो होतो. आपल्या स्वैराचाराला बंधने आली होती. सीमांचा अवरोध झाला होता काहीसा. या काळात प्रत्येकाचे काही आत्मचिंतन झाले आहे. त्यातून हे समजले आहे की काही तरी चुकले आहे, चुकत आहे.
मला वाटते, आता तरी आपण स्वतःला सावरायला हवे. काही मर्यादा पाळायला हव्यात. नीतिनियमांचे उल्लंघन टाळायला हवे. स्वतःपुरते न पाहता इतरांचाही विचार करायला हवा. भ्रष्टाचार संपवायला हवा. अंधश्रद्धा गाडायला हव्यात. माणूस म्हणून जगायलाच हवं. स्वतःवर काही बंधने घालून घ्यायलाच हवीत. आपण या विजयादशमीच्या निमित्ताने सीमोल्लंघन करण्याऐवजी सीमावरोध करायला हवा. आपणहून स्वतःभोवती काही सीमा आखायला हव्यात. दिशाहीन जीवनाला सावरायला हवे. देशाला, मानवतेला पुन्हा पूर्वीचे संपन्न, सुसंस्कृत, सभ्य, जीवन प्राप्त करून द्यायला हवे.
चला, या दसऱ्याच्या दिवशी आपण व्यक्तिगत व सार्वजनिक पातळीवर सीमोल्लंघन करण्याऐवजी सीमावरोधन करण्यासाठी वचनबद्ध होऊ या. मी सर्वांना असे विनम्र आवाहन करतो. द्याल मला साथ?
विजया दशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏🏽
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






