श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “चिडणं किंवा चिडचिड…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

माणूूस चिडतो का? …… तर हो….. असच उत्तर येइल. कारण काय? ….. तर प्रत्येकवेळी कारण वेगळं असू शकेल. खरंतर चिडायला कोणतही कारण लागत नाही असं म्हणण्यापेक्षा कोणतही कारण चालतं. त्याला काही नियम अटी नाहीत. जागं असतानाची कोणतीही वेळ चालते. तारीख, वार, महिना, साल कोणताही चालतो. मुहूर्त बघावा लागत नाही.

उलट कोणी चिडलंतर……. हं…. झालं…. सापडला वाटतं मुहूर्त…… असं दबक्या आवाजातलं स्पष्ट बोलणं ऐकू येतं.

चिडणं ही सहज स्वाभाविक गोष्ट आहे. असं चिडणं कधी आणि कितीवेळ टिकतं हे सांगतायेत नाही. मीसुुध्दा चिडतो. मात्र काहीजण खूप कमीवेळा चिडतांना मी पाहिलं आहे. आणि त्यांचा चिडायचा काळ सुध्दा कमी असतो. अशा न चिडणार्या किंवा कमी आणि कमीवेळ चिडणा-यांच मला कौतुक वाटतं. पण चिडायला पाहिजे तिथेही न चिडणा-यांची मला चिड येते.

मी का चिडतो….. याची कारणं बघायला सुरुवात केली….. आणि लक्षात आलं की अरे……. यातली काही कारणं तर किरकोळ आणि शुल्लक आहेत. आणि या कारणांसाठी मी नक्की चिडतो कोणावर….. स्वतःवर की दुसर्‍यावर…..

मी का चिडतो…….

माझं ऐकल नाहीतर.

मला कारण नसतांना कोणाचं ऐकाव लागल तर.

मला एखादी गोष्ट जमली नाही तर.

मला ते वेळेत जमलं नाही तर.

माझ्या अगोदर दुसर्‍याला जमल तर.

दिलेली वेळ पाळली नाही तर. इ…….

यातही माझं ऐकलं नाही तर….. यात मी सांगतोय ते बरोबर का चूक याचा विचार काहीवेळा नसतो.

या सगळ्या वैयक्तिक गोष्टी आहेत. पण इथे मी जमेल त्या मार्गाने ती चिड व्यक्त करतो.

चिडण्याचे प्रकार असु शकतात. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक अशा प्रकारे ते सांगता येतील. चिडण्याला नातं असण्याची किंवा नसण्याची गरज नाही. उलट नातं नसेल तर चिडण्यात मोकळेपणा येतो.

वैयक्तिक चिडण्यात झालेल्या गोष्टीत चुक आपलीच आहे हे आपण कळत नकळत मान्य केलेलं असत. त्याच खापर फोडायला आपल्याला कोणीच सापडत नाही. कदाचित दोष द्यायलापण कोणी सापडत नाही म्हणून आपण गप्प बसतो.

कौटुंबिक चिडण्यात कुटूंबातच आपण कोणावरतरी किंवा कुणीतरी आपल्यावर चिडल्याच लक्षात येतं. आणि हे व्यक्त केलं जातं. हे व्यक्त करण्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतात. यात मोठ्याने बोलणं, आदळआपट करणं, किंवा काहिच न बोलता तोंड फुगवून गप्प बसणं. नाहीतर सहकार्य नाकारणं, किंवा ते न करणं. थोडक्यात कौटुंबिक चिडणं हे जहाल, मवाळ, असहकार, किंवा सविनय कायदेभंग या प्रकारच्या वेगवेगळ्या पध्दतीने व्यक्त करता येतं.

या शिवाय संसर्गजन्य चिडणं असत. यात जो संपर्कात येईल त्याला याची लागण होते. म्हणजे एकावर कोणी चिडलतर दुसर्‍यावर चिडून त्या चिडण्याची परतफेड करायची. आणि त्याची परतफेड दुसरा तिसऱ्याच माणसावर करतो. फक्त ते व्यक्त झालं पाहिजे. या प्रकाराला वडाच तेल वांग्यावर असही म्हणतात.

सामाजिक चिडण्याला काही ठराविक व सततची कारणं असू शकतील. शिस्तबद्ध असणारी बेशिस्त वाहतूक, खडतर रस्ते, भ्रष्टाचार, गुंडगीरी, शैक्षणिक क्षेत्रात घातलेला गोंधळ, क्षमता नसतांना दिलेली जबाबदारी. या विरोधात होणारी चिडचिड काहीवेळा व्यापक, संघटित असते. तर काहीवेळा तो शक्ती प्रदर्शनाचा भाग वाटतो. लग्नाच्या वरातीत कसं काही वरातीत सामील झालेले असतात. काही गंमत म्हणून पाहायला येतात. तर काही समोर दिसतयं म्हणून पाहतात. पण गर्दी असते. असं हे गर्दी खेचणार चिडणं आहे.

अशा गर्दीत समर्थक आणि विरोधक असू शकतात. आणि मग विरोधक विरोधात आहे हे दाखवण्यासाठी चिडतात.

मोर्चा काढणं, फलक रंगवण, घोषणा देणं अशा वेगवेगळ्या मार्गाने ते दाखवलं जातं.

काहीवळा चीडणं निरर्थक असतं, काहीवेळा त्याला अर्थ असतो. तर काहीवेळा अर्थ हेच कारण असतं.

चिडणा-या व्यक्तीला मुद्दाम चिडवणारे किंवा चिडायला लावणारेही असतात. पण मित्रांमधे, नात्यात असं चिडणं आणि चिडवणं बर्‍याचदा खेळीमेळीत घेतलं जातं. आणि हे कुठे थांबवायचं हे लक्षात येतं. ते तसं खेळीमेळीने घेतलं तर त्या चिडवण्यात आणि चिडण्यात एक मजा जाणवते.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted