श्री जगदीश काबरे
विविधा
☆ “गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
गुरुपौर्णिमा हा दिवस पारंपरिक अर्थाने गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा मानला जातो. परंतु बदलत्या काळात गुरु या संकल्पनेकडे नव्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. ज्ञान हे आज एका व्यक्तीच्या मक्तेदारीत राहिलेले नाही. पुस्तके, प्रयोग, संवाद, संशोधन आणि तंत्रज्ञान यांमधून ज्ञानाचे असंख्य स्रोत उपलब्ध झाले आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्याला केवळ आज्ञाधारक शिष्य बनविण्यापेक्षा विचार करणारा, प्रश्न विचारणारा आणि नवनिर्मिती करणारा नागरिक बनविणे अधिक महत्त्वाचे ठरते.
पारंपरिक गुरुशिष्य परंपरेने भारतीय समाजाला मोठी सांस्कृतिक परंपरा दिली असली तरी तिच्या काही रूपांमध्ये गुरुचे वचन अंतिम मानण्याची प्रवृत्ती वाढली. अशा वातावरणात शंका विचारणे, मतभेद मांडणे किंवा प्रस्थापित विचारांना आव्हान देणे हे अनेकदा अनुचित मानले गेले. अशा विद्यार्थ्याला उद्धट, दुर्वतनी समजले गेले. परिणामी, ज्ञानाचे चिकित्सक आकलन करण्याऐवजी ते स्वीकारण्यावर भर राहिला. गुरुशिष्य परंपरेचा सगळ्यात वाईट परिणाम म्हणजे प्रश्न विचारण्याची सवय कमी झाली की नवनिर्मितीची शक्यतादेखील कमी होते, हा आहे. याउलट शिक्षकमित्र ही संकल्पना शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नात्याला अधिक लोकशाहीवादी आणि सर्जनशील स्वरूप देते. शिक्षकमित्र विद्यार्थ्याला तयार उत्तरे देत नाही; तो योग्य प्रश्न विचारायला शिकवतो. तो विद्यार्थ्याच्या शंका ऐकून घेतो, त्याच्या विचारांना दिशा देतो, चुका करण्याची आणि त्यातून शिकण्याची मोकळीक देतो. अशा वातावरणात विद्यार्थी केवळ माहितीचा संग्रहकर्ता राहत नाही, तर ज्ञानाचा शोध घेणारा संशोधक बनतो. विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य आणि समाजपरिवर्तन या सर्व क्षेत्रांतील मोठे शोध प्रश्न विचारण्याच्या धैर्यातूनच जन्माला आले आहेत.
एकविसाव्या शतकातील शिक्षणाचे उद्दिष्ट आज्ञाधारक अनुयायी घडविणे नसून स्वतंत्र विचार करणारे, विवेकशील आणि सर्जनशील व्यक्तिमत्त्व घडविणे हे असले पाहिजे. त्यामुळे गुरुपौर्णिमा साजरी करताना केवळ व्यक्तिपूजेला महत्त्व देण्याऐवजी जिज्ञासा, चिकित्सक विचार, मुक्त संवाद आणि ज्ञानाच्या सततच्या शोधाला प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकाची गरज आहे. म्हणूनच भविष्यात गुरुपेक्षा शिक्षकमित्र ही संकल्पना अधिक उपयुक्त ठरणारी आहे, कारण ती विद्यार्थ्याला अंधानुकरणाची साखळी तोडण्यासाठी विचारांचे बळ देते. त्यामुळे परंपरेचा आदर राखत, पण आधुनिक काळाच्या गरजेनुसार शिक्षणाचे आणि गुरु म्हणवल्या जाणाऱ्या शिक्षकांचेही स्वरूप बदलण्याची वेळ आता आली आहे हे निश्चित. म्हणून मला वाटते की, गुरुशिष्य या नात्यापेक्षासुद्धा शिक्षकमित्र हे नाते जास्त महत्त्वाचे आहे. कारण गुरुशिष्य परंपरेत ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ याप्रमाणे गुरु आज्ञा प्रमाण मानली जाते. शिष्य शंका आणि प्रश्न विचारत नाही. त्यामुळे नवीन काही निर्माण करू शकत नाही. गुरुने दिलेले ज्ञान घोकंमपट्टी करून विद्वान झाल्याचा त्याच्यात आभास निर्माण होतो. त्या उलट शिक्षकमित्र या नवीन परंपरेत विद्यार्थी शंका विचारतो, प्रश्न विचारतो आणि आपल्या विचारांना शिक्षकमित्राच्या सहाय्याने निश्चित दिशा देतो. त्यामुळे काहीतरी नवीन करण्याची उर्मी त्याच्यात संचारते.
एवंच कधीतरी पारंपारिक विचारांच्या पलीकडे जाऊन आधुनिक काळानुसार आपण विचार करायला सुरुवात करणार आहोत काय, हा प्रश्न या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे.
© श्री जगदीश काबरे
(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)
jetjagdish@gmail. com
मो ९९२०१९७६८०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






