प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ आम्ही चालवू हा पुढे वारसा… भाग- १ ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆ 

भूपाळी आणि ढोल दमामे गर्जती होते काकड आरती

नमस्कार. बघता बघता देवीचे नवरात्र संपले आहे. विजयादशमी झाली. उद्या कोजागिरी पौर्णिमा! या दिवशी गेले महिनाभर बसणारी भुलाबाई. या उत्सवाची सुद्धा सांगता होईल. परंतु हिंदू समाजाच्या चालीरीती अशा आहेत की, वर्षभर काही ना काही सण, उत्सव, परंपरा, कुलाचार हे सुरूच राहतात. महत्वाचं म्हणजे त्या प्रत्येक उत्सवात काव्य हे असतंच. त्याचप्रमाणे कोजागिरीपासून तर कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आकाश दिवा किंवा पाताळ दिवा लावण्याची सुद्धा आपल्याकडे परंपरा आहे. कारण याच मधल्या काळात दिवाळीचा सणही येत असतो.

या काळात स्त्रिया पहाटे उठून तुळशी समोर रांगोळीच्या द्वारे कार्तिक मास काढतात. यात राधाकृष्ण, तुळशीवृंदावन, चंद्र – सूर्य – शंख – चक्र – आवळीचं झाड – ३३ गोपद्म अशा अनेक आकृती असतात. लग्न होऊन सासरी आलेल्या छोट्या मुलींना या संस्कारांव्दारे चित्रकलेचं, वनस्पतीशास्त्राचं, अवकाशाचं शिक्षण परंपरेतून दिलं जायचं असं इथे म्हणता येतं.

याच काळातला अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे काकड आरती आणि त्यासाठी म्हटली जाणारी भूपाळी. अनेक मंदिरांमध्ये वर्षभर रोज भुपाळ्या म्हटल्या जातात आणि त्यानंतर आरती केली जाते. परंतु सर्वसामान्यपणे अश्विन शुद्ध पौर्णिमा ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत हा कार्तिक मास साजरा केला जातो. यात पहाटे उठून भूपाळीचा उत्सव साजरा होतो. अनेक भूपाळ्या म्हटल्या जातात. भूपाळी म्हणजे देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी गायला जाणाऱ्या पारंपरिक गीतांचा एक प्रकार आहे. मुळात ही सुद्धा एक कविता आहे. ही गीते शक्यतो भूप रागात बांधलेली असतात. जो सृष्टी निर्माण कर्ता, त्याची स्तुती करण्याच्या उद्देशाने म्हटल्या जातात. ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. रात्रीचा अंतिम प्रहर किंवा दिवसाचा पहिला प्रहर या दरम्यानच्या काळामध्ये सृष्टी निर्माता पालनकर्त्याच्या, भूप रागातील पद्य स्वरूपातील स्तुतीची आळवणी करून त्याला जागे केले जाते, तीच ही भूपाळी. होनाची बाळा यांची घनश्याम सुंदरा ही भूपाळी सर्व परिचित आहेच.

हिंदुस्थानातील पवित्र तीर्थक्षेत्रे म्हणजे यातील देवदेवतांना रोजच भूपाळी द्वारे जागविले जाते.

या भूपाळ्या अनेक संतांनी रचलेल्या आहेत.

त्यातली प्रथम श्री गणपतीची भूपाळी पाहूया!

*

उठा उठा सकळीक /वाचे स्मरावा गजमुख

रिद्धी सिद्धीचा नायक / सुखदायक भक्तासी

*

अंगी शेंदुराची उटी /माथा शोभतसे किरीटी

केशर कस्तुरी लल्लाटी / हार कंठी साजिरा

*

कासे पितांबराची धटी /हाती मोदकाची वाटी

रामानंद स्मरता कंठी / तो संकटी पावतो

*

भूपाळी ही सहसा चार चरणांची असते. याच्या प्रथम तिन्ही चरणात यमक साधलं जातं. शेवटची चौथी ओळ वेगळी असते. यात अक्षरे किंवा मात्रांचे बंधन नसते. मात्र मिळती जुळती अक्षरेच इथे घेतली जातात. शेवटच्या कडव्यात रचयिता जो कुणी असेल त्याचे नाव असते.

आज आपण काही भुपाळ्या बघणार आहोत. सृष्टी निर्माता, पालनकर्ता, आणि श्री शंकर या सर्वांसोबतच, आपली जी श्रध्दास्थाने आहेत, त्यांच्याही भुपाळ्या म्हटल्या जातात. त्यात तुळशी, गंगा, गाय, हेही विषय असतात. शिवाय संतांसाठीही अनेक भुपाळ्या रचलेल्या आढळतात.

श्रीरामाची भूपाळी

*

उठोनिया प्रातःकाळी / जपा रामनामावली

स्वये ध्यातो चंद्रमौळी / शैलबाळीसमवेत

*

राम योग्यांचे मंडणा राम भक्तांचे भूषण

राम धर्माचे रक्षण / संरक्षण दासांचे

*

रामे त्राटिका मारिली /रामे जानकी पर्णिली

रामे शिळा उद्धरिली /गणिका केली ती मुक्त

*

रामे पाषाण तारिले / रामे दैत्य संहारीले

रामे बंदी सोडविले / मुक्त केले सुरवर

*

रामे रक्षिले भक्ताची /रामे सोडविले देवासी

रामदासाचे मानसी / रामदासी आनंद ॥

या शिवाय

राम सर्वांगी सावळा / देह अलंकार पिवळा

नाना रत्नांचिया कळा / अलंकार शोभती ॥

ही सुद्धा श्रीरामांची भूपाळी प्रसिद्ध आहे.

*

एक गंगेची भूपाळी आपण बघूया!

उठोनिय प्रातःकाळी / वदनी-वदा चंद्रमौळी

श्री बिंदू माधवा जवळी / स्नान करा गंगेचे /स्नान करा गोदेचे ॥

*

स्नानदान जया अंतरी / घडेल भागीरथीच्या तिरी

कृपा करील त्यावरी / ऐसे महात्म्य गंगेचे

*

भागीरथीचे स्नान करा /हृदयी स्मरा गंगाधरा

चुकेल चौऱ्यांशी चा फेरा / ऐसे महात्म्य गंगेचे ॥

*

गंगा आहे स्वर्गावरती / पाताळी ते भोगावती

मृत्यूलोकी हे विख्याती ‘ ऐसे महात्म्य गंगेचे ॥

*

कृष्णा वेणा तुंगभद्रा / शरयू कालिंदी नर्मदा

भीमा भामा मुख्य गोदा /स्नान करा गंगेचे ॥

*

याशिवाय श्रीधराची / दशावताराची / पंढरीची / शंकराची अशा अनेक भूपाळ्या आहेत.

भूपाळ्या संपल्या की, ढोल दमामे गर्जती / होते काकडआरती

कार्तिक महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या महिन्यातच पहाटेच्या वेळी अनेक मंदिरातून होणाऱ्या काकड आरतीच्या निनादाने सर्व आसमंत निनादून जातो मृदुंगाच्या आवाजाने व भक्तगणांच्या आरत्या आळवणीच्या स्वरांनी वातावरण भक्तीमय होऊन जाते. यासंबंधी एक आख्यायिका सांगितली जाते. प्रजेला सळो की पळो करून सोडणाऱ्या महाक्रूर तारकासुराचा वध करण्यासाठी भगवान शंकराच्या पोटी कार्तिक स्वामींनी जन्म घेतला. या कार्यासाठीच त्यांचा जन्म झाला आणि तोही कार्तिक महिन्यात त्यांच्या नावावरूनच या महिन्याला कार्तिक हे नाव पडले आहे. या महापराक्रमी पुत्राचे स्मरण म्हणून काकड आरती केली जाते, असेही काही ठिकाणी म्हणतात.

काकड आरती ही हिंदू धर्मात विशेषतः महाराष्ट्रात पहाटेच्या वेळी देवाला जागृत करण्यासाठी केली जाणारी एक धार्मिक प्रथा आहे. काकडा उजळून ही आरती केली जाते. अनेक मंदिरांमध्ये विशेषता कार्तिक महिन्यात ही आरती होते आणि ती नित्यनेमाने होते जागे करणे हा याचा प्रमुख उद्देश आहे ही दिवसाची पहिली आरती मानली जाते. वारकरी संप्रदायात काकड आरतीला फार पूर्वीपासून महत्त्व आहे. काकड आरती वैयक्तिक तसेच सामुदायिक परंपरा आहे. दररोज किंवा विशिष्ट काळात म्हणजे कार्तिक महिन्यात ही पाळली जाते. कार्तिक महिन्यात कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे काकड आरती करण्याची प्रथा आहे. या आरतीपूर्वी विविध भजने /स्तोत्रे आणि भुपाळ्या म्हटल्या जातात. संत तुकाराम संत रामदास संत एकनाथ इत्यादी संतांनी काकड आरती रचलेल्या आहेत.

काकड आरतीला जाण्यापूर्वी भक्तगण स्नान संध्या करतात. सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने शरीर ताजेतवाने होते. मनात भक्तीरसाची निर्मिती होते. पापक्षालन होते. नंतर घरातील तुळशी वृंदावनाजवळ येऊन तुळशीची पूजा केली जाते.

उठा उठा साधुसंत /साधा अपुलाले हित

वाया जाईल हा नरदेह /मग कैसा भगवंत

उठोनिया वेगेसी चला जाऊ राऊळाशी /

तुळशी घालूनिया ओटा / विघ्ने पळतील बारा वाटा

तुळशी लावूनिया दिवा /उजेड पडेल सर्व देवा

तुळशी सारूनिया पाणी / होईल पातकांची धुनी

तुळशी लावूनिया गंध /उभा पाठीशी गोविंद

तुळशी लावूनिया कुंकू /उभी पाठीमागे सखू “

या पदानंतर भक्तगण टाळ मृदंगाच्या निनादात कृष्णाचा गजर करतात. हा गजर संपला की गावातून प्रभात फेरी काढली जाते. या योगे असं म्हणतात की वातावरणात भक्तीरस भरून राहतो.

काही ठिकाणी गावातून प्रभात फेरी काढून एक प्रकारची जनजागृती होते. तर काही ठिकाणी भक्तजन मंदिरात एकत्र होतात. सुरुवातीला भजने, भुपाळ्या म्हणतात. एक विठ्ठलाची भूपाळी –

उठोनिया पहाटे / विठ्ठल पहा उभा विटे

चरण तयाचे गोमटे /अमृत दृष्टी अवलोका ॥

जागे करा रुक्मिणीवरा / देव आहे निदसुरा

वेगे लिंबलोण करा / दृष्ट होईल तयासी ॥

पुढे वाजंत्री वाजती /ढोल दमामे गर्जती

होते काकड आरती / पांडुरंगा चरणी ॥

सिंह नाद शंखभेरी / गजर होत महाद्वारी

केशवराज विटेवरी / नामा चरण वंदितो ॥

आशा प्रकारे अनेक भूपाळया झाल्या नंतर आरतीला सुरुवात होते. जे मंदिर असेल त्याप्रमाणे अनेक आरत्या तिथे म्हटल्या जातात आणि नंतर काकड आरती केली जाते. आता हा काकडा कसा असतो तर शक्यतो पांढऱ्या, स्वच्छ नवीन वस्त्र घेऊन त्याच्या पट्ट्या काढून पीळ दिला जातो आणि नंतर एक ठराविक लांबीचा / कुठे बोटभर, कुठे वीतभर अशा काकडा तयार केला जातो. तो शुद्ध तुपात भिजवला जातो. प्रत्येकाच्या हातात निरंजन असेल असंच नाही. तर सगळे भक्त हा काकडा घेऊन उभे होतात. काकडा उजळतात आणि आरती सुरू होते हातात काकडा सुद्धा एका ठराविक पद्धतीने धरावा लागतो की, ज्यामुळे हातावर तूप सांडणार नाही. चटका लागणार नाही. काकडा संपत येत असताना तिथेच ठेवलेल्या एखाद्या ताटलीत शेवटी तो ठेवला जातो. अजूनही चांदण्यांचा अस्त न झालेला, सूर्योदय व्हायचाच आहे आणि तशात मंदिरात किंवा मंदिराच्या प्रांगणात काकडा उजळलेला दिसला की तारांगणातून एक एक तारका पृथ्वीवर आली की काय असा भास होतो. यावेळी कोणत्या आरत्या म्हटल्या जातात हे बघूया.

क्रमशः…

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted