प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ देवकीचे बाळ बाई नंदाघरी आले…  ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

श्रावण महिना आणि आपले सण याचं अतूट असं नातं आहे. वर्षाचे अनेक सण या श्रावणातच येतात. त्यात श्रावण महिना हा शिवशंकराचा आहेच. श्रावण सोमवार असतोच. पुढे येणाऱ्या मंगळागौरी / भराडी गौर, वरद लक्ष्मी व्रत, श्रावणी शुक्रवार म्हणजे देवीची पूजा आहेच. पण यासोबतच श्रावणाचं आणि श्रीकृष्णाचं एक अतूट असं नातं आपल्याला दिसतं. अगदी दीपपूजेला जो जिवतीचा कागद आपण घेतो, त्यात सुद्धा कालियामर्दनाचं म्हणजेच पर्यायाने श्रीकृष्णाचे चित्र आहे. आज रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन म्हटलं की सुभद्रा, कृष्ण आणि द्रौपदी यांच्या संबंधातली एक चिंधीची गोष्ट आपल्याला आठवते. अगदी लक्षात येतं ते शामची आई या चित्रपटातलं गाणं. ते म्हणजे,

“भरजरी ग पितांबर दिला फाडून

द्रौपदीशी बंधू शोभे नारायण

किंवा पारंपारिक असं गीत – – –

हरी बंधू शोभे द्रौपदी बाईला

ही गाणी सर्वांच्या ओठावर आहेत. बहीण भावाच्या प्रेमाचा राखीचा सण अतिशय उत्साहात पार पडतो.

पुढे आठच दिवसात जन्माष्टमी येते आहे. नंतर दहीहंडी आणि गोपालकाला. म्हणजे पुन्हा भगवान श्रीकृष्ण आहेतच. हरिहराचं हे नातं असलेला श्रावण महिना. या महिन्यात फक्त चारच शनिवारी काय काय लिहायचं? मोठा प्रश्न आहे कारण विषय खूप आहेत आणि वेळ कमी. पण वेगळं असं काहीतरी लिहावं वाटतं, म्हणून हा लेखप्रपंच.

श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा श्रीकृष्ण जन्मोत्सव हा सकल हिंदूंचा एक पवित्र सण आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमीच्या मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर, कंसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार. कृष्णाचा जन्म अराजकाच्या प्रदेशात झाला. लोकांचे स्वातंत्र्य जिथे नाकारले गेले होते, तिथे झाला. सर्वत्र वाईट गोष्टी होत्या. सख्ख्या मामाकडूनच भाच्याच्या जिवाला धोका होता. सख्खी बहीण, देवकी बंदिवासात होती. जन्मापूर्वीच त्या बाळाच्या हत्येचे अनेक कट रचले गेले होते.

बाळाचा जन्म झाला आणि जन्मानंतर काही क्षणातच वसुदेवाने, यमुना ओलांडून मथुरे मधून कृष्णाला गोकुळात नेले. नंद – यशोदा यांनी कृष्णाचे पालन केले. दोन मातांचं प्रेम कृष्णाला मिळालं. अनेक लोक या दिवशी उपवास करतात. विविध प्रकारे पूजा करतात. कुठेकुठे परंपरागत फुलोरा असतो.

आज निसर्गाशी साम्य साधणारे अनेक सण आपण करतो. अगदी गणपती सुद्धा शाडूचाच हवा – इकोफ्रेंडली वगैरे शब्द आत्ता आत्ता आम्हाला कळले. पण ही सणांची पद्धत अतिशय पूर्वीपासूनच खेड्यापाड्यात इकोफ्रेंडलीच आहे. माझ्या माहेरी सांगायचं झालं, तर कृष्ण जन्माष्टमीचा सण तिथे मोठ्या धडाक्यात साजरा होतो. माझे वडील स्वतः गणपतीच्या मूर्ती करत असल्यामुळे, घरी माती तयार असायचीच. त्याचेच आम्ही गोकुळ बनवायचो. बाबा कृष्णाची सुरेख मूर्ती बनवायचे. इतर मुर्त्या बनवायला भावंडं त्यांना मदत करायची. आणि आजी सांगायची की, “आजच्या दिवशी जर मातीला हात लावला नाही तर पुढला जन्म गाढवाचा मिळतो. ” पण तिच्या अशा युक्तीमुळे पुढचा जन्म गाढवाचा नको म्हणून त्या माती पासून आम्ही काही तरी तयार करायचोच. नाहीच काही झालं तर किमान एक डोंगी / पाण्याचं टाकं तरी आम्ही तयार करायचो. मूर्तीकलेला अशाप्रकारे बालपणापासूनच प्रोत्साहन दिलं जायचं.

मग कृष्णाची पूजा व्हायची. संपूर्ण गोकुळाची पूजा करायची. लेकुरवाळं घर असल्याने सर्वांना पूर्ण उपास नसून धान्यफराळ असायचा. कृष्ण जन्मासाठी आई आणि पुढे वहिनी सुंठवडा तयार करून ठेवत. कारण त्या दिवशी सुंठवड्याचाच प्रसाद असायचा.

रात्री भजन असायचं. या भजनात पंचपदी झाल्यानंतर शक्यतो कृष्णाची गाणी म्हटली जायची. अनेक ठिकाणी कृष्ण जन्माची कहाणी सुद्धा वाचली जाते. काही ठिकाणी मध्यरात्री कृष्ण जन्मानंतर कृष्णरूप, याच्या बालरूपाला आंघोळ घातली जाते. नवे कपडे आणि दागिने घातले जातात. आणि नंतर त्याला पाळण्यात घालून झोके दिले जातात. स्त्रिया त्यांच्या घराच्या दारावर बाहेर लहान पावलांचे घराकडे चालत येणारे रांगोळीचे ठसे काढतात. हे कृष्णाच्या त्यांच्या घरातील प्रवासाचे प्रतीक आहे.

कृष्ण सगळ्यांना जवळचा का वाटतो? प्रत्येक मातेला आपलं मूल हे कृष्णा समान वाटतं. प्रत्येक बहिणीला आपला भाऊ हा कृष्णा समान वाटतो. प्रत्येक पत्नीला आपला पती हा कृष्णा सारखाच वाटतो. एवढेच काय? प्रत्येकच स्त्रीला कृष्णा सारखा एकतरी सखा असावा असं वाटू लागतं आणि आपण त्याची राधा असावी असंही वाटतं. कारण श्रीकृष्ण वाटाडे आहेत. मार्गदर्शक आहेत. तत्त्वज्ञ आहेत. नर्तक आहे / गायक आहे /वादक आहे. समाज सुधारक सुद्धा आहे. अशा या कृष्णाच्या रूपात आपण एकरूप होऊन जातो. आणि म्हणूनच कदाचित मुलगी सासरी निघताना तिला दिली जाते ती अन्नपूर्णा आणि सोबत बाळकृष्ण. तिच्या आयुष्यभरासाठी तिचा सोबती म्हणून.

म्हणूनच हा सण मोठ्या भक्ती भावाने आणि उत्साहाने सर्वत्र साजरा केला जातो.

माझ्या माहेरी रात्री बरोबर बारा वाजता कृष्ण जन्म केला जायचा. गुलाल उधळला जायचा आणि त्यानंतर कृष्णाच्या पाळण्याचं गाणं म्हटलं जायचं. कृष्णाचे अनेक पाळणे आहेत. पण त्याच्या सख्ख्या मातेला कृष्णाला पाळण्यात घालून झोका देता आला नाही आणि म्हणूनच जो पाळणा मला ठाऊक आहे तोच मी या ठिकाणी देत आहे.

देवकीचे बाळ बाई नंदाघरी आले

माय यशोदा गं देई पाळण्यात झोले ॥ धृ ॥

*

मांडीवरी जोजविते कुण्या माऊलीचा कान्हा

आई पण जागे झाले फुटे यशोदेला पान्हा

पिता अमृताच्या धारा बाळ झोपी गेले ॥१ ॥

*

गोकुळीच्या गवळणींनो दूध आणा वाटी वाटी

हळूहळू वाढे कान्हा भूक त्याची होई मोठी

रोप यादव वंशाचे दारी लावियेले ॥ २ ॥

*

आईबाप ठाव नाही माझ्या लाडक्या कृष्णाला

त्याच्या माऊलीच्या दैवी मथुरेची बंदीशाळा

त्याच्या काळजाची माया माझ्या उरी हाले ॥३ ॥

*

माय यशोदा ग देई पाळण्याचा झोले

हा पाळणा म्हणून झाला की, आरती व्हायची. सर्वांना सुंठवड्याचा प्रसाद दिला जायचा. इतरत्र सुंठवडा होत नसल्याने अनेकजण घरच्यांसाठी प्रसाद सोबत बांधून न्यायचे. या साऱ्या आठवणी माझ्याजवळ आहेत आणि कधीतरी वाटतं की हा कृष्ण जन्म पुन्हा एकदा माहेरी जाऊन अनुभवावा. कारण अजूनही त्याच पद्धतीने त्याच परंपरेने कृष्णजन्म तिथे भावांकरवी आजही होत असतो.

याचा दुसरा दिवस म्हणजे गोपालकाल्याचा. गोपालकाला हा वेगळा विषय आहे गोपालकाल्याचे किर्तन आणि गोपालकाल्याचं गाणं एक वेगळा विषय असल्यामुळे पुढल्या लेखात तो भाग येईल. आज मी इथेच थांबते. पुन्हा एकदा कृष्ण द्रौपदीच्या रूपातल्या सर्व भावा – बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या जन्माष्टमीच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा.

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
SADANAND AMBEKAR
0

जुन्या आठवणी आणि आपली संस्कृति दाखविणारा अतिशय सुरेख लेख।