श्री मंजिरी येडूरकर
विविधा
☆ मेजर थॉमस कँडी ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆
तुम्हाला माहित आहे कां, 19 व्या शतकापर्यंत मराठी लिपी मध्ये विरामचिन्हेच नव्हती. विरामचिन्हे ज्याने सुरू केली तो ब्रिटिश होता. जेव्हा बोली भाषेचं लिपीत रूपांतर झालं तेव्हा कोणत्याही लिपीत विरामचिन्हे नव्हती. संस्कृत सर्वात प्राचीन समजतो पण त्यात देखील दंड सोडल्यास कोणतीही विरामचिन्हे नाहीत. जसं जसं टंकलेखन सुरू झालं, छपाई सुरू झाली तसं तसं प्रथम इंग्रजी लिपी मध्ये विरामचिन्हांचा वापर सुरू झाला. भारतात इंग्रजांचे राज्य सुरू झाल्यानंतर टंकलेखन व छपाई यासाठी मराठी लिपी तितकी योग्य नाही असे लक्षात आले. त्यावेळी मराठी भाषेमध्ये जे काही बदल केले गेले त्या बदलांचे श्रेय एक इंग्रज अधिकारी मेजर थॉमस कँडी याच्याकडे जाते. याचा जन्म इंग्लंड मध्ये 13 डिसेंबर 1804 रोजी झाला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत थॉमस व त्याचा जुळा भाऊ जॉर्ज दोघांनी भारतीय भाषांचा अभ्यास केला. त्यांची नियुक्ती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये क्वार्टर मास्टर म्हणून झाली व ते दोघे 1922 ला भारतात आले. इन्फंट्री रेजिमेंट मध्ये भाषांतर कार म्हणून काम करू लागले.
त्याच वेळी मॉल्सवर्थ हा इंग्लिश – मराठी डिक्शनरी चे काम करत होता. त्याला मदत करण्यासाठी 1930 मध्ये जॉर्ज ला पाठवले. पण मॉल्सवर्थ आजारी पडल्यामुळे 1936 मध्ये तो मायदेशी इंग्लंडला रवाना झाला. पुढे थॉमस, जॉर्जच्या मदतीला आला व ती डिक्शनरी 1840 च्या दरम्यान पूर्ण झाली. 1838 मध्ये जॉर्जने आर्मीची नोकरी सोडली व तो ख्रिश्चन धर्मासाठी काम करू लागला. ‘ख्रिस्ती धर्म कसा उत्पन्न झाला व कसा पृथ्वीवर वाढला’ हे मराठीतील पुस्तक जॉर्जने लिहिले. 1854 मध्ये जॉर्ज इंग्लंडला परत गेला. कांहीं काळानंतर मॉल्सवर्थ पुन्हा भारतात आले आणि त्यांनी परत दुसरी मोठी इंग्रजी– मराठी कोशाची वाढवलेली आवृत्ती तयार केली. त्यांचाही मराठीचा गाढा अभ्यास होता. ते ही नंतर इंग्लंडला परत गेले. थॉमस मात्र अखेरपर्यंत भारतातच राहिले.
त्यांनी महाराष्ट्रातील समाज, भाषा परंपरा व संस्कृती यांचा अभ्यास केला. त्यांची नियुक्ती महाराष्ट्रातच झाली असल्याने त्यांनी मराठी भाषा, मराठी साहित्य व दैनंदिन कामकाजातील मराठी यांचा अभ्यास केला. मराठी भाषेत व्याकरणाची शास्त्रीय चौकट बांधण्याचे काम त्यांनी केले. शब्दांचे व्युत्पत्तीशास्त्र तपासले, वाक्यरचनांचे प्रकार निश्चित केले. सर्व विषयांची पाठ्यपुस्तके, ख्रिश्चन शाळांसाठी मराठीत बनवून, छापून घेतली. कित्येक इंग्रजी पुस्तकांचे मराठीत भाषांतर केले, जसे ‘इंडियन पिनल कोड’, ‘सिव्हिल प्रोसिजर कोड’. अनेक मराठी अनुवाद करणाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे त्याची मुख्य सरकारी भाषांतरकार म्हणून ब्रिटिश सरकारने नेमणूक केली. महाराष्ट्रात कामकाज मराठीत चालायचे पण कागदपत्रांमध्ये भाषा ही गोंधळलेली होती, ठाम शब्दरचना नव्हती व अति संस्कृतनिष्ठ होती. त्याने भाषेला संक्षिप्त, स्पष्ट नमुन्यात, अभिव्यक्ती मधील अनिश्चितता टाळून नवीन रूप दिले. अहवाल, परिपत्रके आज्ञा, कार्यवृत्ते कशी लिहावीत याचे नियम बांधून दिले. मराठी भाषा मुद्रण व टंकलेखन करण्यायोग्य व्हावी म्हणून काही अक्षरांची पुनर्रचना केली. अक्षररूपांचे नमुने तयार केले. संयुक्त अक्षरांची सुलभ विभागणी केली. प्रशासकीय शब्दांची शुद्धता निश्चित केली.
थॉमसने मराठी भाषेत सर्व प्रथम विरामचिन्हांचा वापर सुरू केला. विरामचिन्ह हे शब्दाच्या पुढे लगेच आले पाहिजे मध्ये रिकामी जागा असू नये पण विराम चिन्हा नंतर एका अक्षराची रिकामी जागा सोडून पुढचा शब्द लिहावा, तसेच स्वल्पविराम, अर्धविराम कुठे द्यावा, सिंगल कोट, डबल कोट कधी द्यावा या सर्व गोष्टींचे त्याने नियम तयार केले. मराठी भाषेचा असा विज्ञाननिष्ठ अभ्यास करणारा हा पहिलाच इंग्रज गृहस्थ होता. त्याने ‘विरामचिन्हांची भाषा’ हे पुस्तक लिहिले.
मराठी कोशाचे काम करताना त्यावेळी पुण्याच्या पाठशाळेतील अनेक विद्वान पंडितांचे त्यांना सहाय्य लाभले. कोशाच्या कामानंतर त्यांनी आपले सर्व लक्ष मराठी पाठ्यपुस्तके व इंग्रजी ग्रंथांचे सुगम भाषांतर यावर केंद्रित केले. इतरांनी केलेल्या भाषांतरात सुधारणा व दुरुस्त्याही केल्या. मराठी भाषेस आधुनिक वळण लावण्यात त्याचा फार मोठा वाटा आहे. आधुनिक मराठीच्या ग्रांथिक शैलीवर त्याचा फार मोठा ठसा आहे. मराठी कोश रचना व व्याकरण यावर त्याचे प्रभुत्व होते. वाक्यरचनेतील शैथिल्य व अनियमितता काढून तिला बंदिस्तपणा आणण्याचे श्रेय त्यांनाच द्यावे लागेल. आपल्या दृष्टीने इंग्रजी – मराठी कोश हे तर त्यांचे चिरंतन कार्य आहे. याशिवाय त्यांनी नीती बोधकथा, नवीन लिपी धारा, विरामचिन्हांची परिभाषा, वाचन पाठमाला, बालमित्र, हिंदुस्थानातील इंग्रजांच्या राज्यांचा इतिहास इत्यादी ग्रंथ लिहिले. त्यांनी कांहीं काळ पुणे संस्कृत कॉलेज मध्ये सुप्रिटेंडंट म्हणून, डेक्कन कॉलेज मध्ये प्रिन्सिपल म्हणून काम केले. अशा या कर्तृत्ववान व्यक्तीने अखेरपर्यंत मराठीचा अभ्यास, मराठी भाषेचा विकास हेच ध्येय ठेऊन काम केले. अखेर 24 फेब्रुवारी 1877 ला महाबळेश्वर येथे देह ठेवला.
☆
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





