अरुणा मुल्हेरकर
विविधा
☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २७ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
पंढरपूरचे वर्णन
संत तुकारामांच्या पाच हजाराहून अधिक अभंग असलेल्या या गाथेत आपण त्यांनी हाताळलेले विविध विषय आजपर्यंत पाहिले, त्यावर विचार केला आणि जमेल तेवढा अभ्यास केला. पंढरपूर हे तुकारामांचे माहेर, माऊली विठ्ठलाचे निवासस्थान! माहेर कोणाला प्रिय नसते? तुकाराम महाराजांनाही ते अत्यंत प्रिय! अशा त्यांच्या या माहेराचे वर्णन महाराजांनी अनेक अभंगातून केल्याचे गाथा वाचताना लक्षात येते. अशाच माहेरच्या वर्णनाच्या आणि मोठेपणाच्या काही अभंगांचा आपण आज परामर्श घेऊया.
पांडुरंग कुठे, कसा आणि कशासाठी उभा आहे, हे तुकाराम महाराज सामान्य माणसाला सांगत आहेत. ते म्हणतात,
आता उघडी डोळे/ जरी अद्यापी न कळे/
तरी मातेचिया खोळे/ दगड आला पोटासी/
मनुष्य देह ऐसा निध/ साधीलते साधे सिद्ध/
करुनी प्रबोध/ संत पार उतरले//
नाव चंद्रभागे तिरी/ उभी पुंडलिकाचे द्वारी
* कर धरूनिया करी/ उभा उभी पालवी*//
* तुका म्हणे फुकासाठी/ पायी घातलीया मिठी*/
होतो उठा उठी/ लवकरीच उतार//
या अभंगातून सामान्य संसारी माणसाला ते डोळे उघडायला सांगतात. तुला काहीच कसे कळत नाही, खरोखरच तुझ्या आईच्या पोटी तू दगड म्हणूनच जन्माला आलास का? असा प्रश्न त्याला विचारतात. ते म्हणतात, ” अरे तुला माणसाचा जन्म मिळाला आहे, त्याचा तू सदुपयोग का करून घेत नाहीस? या देहात तुझी सिद्धी करून घेशील ती तुला साधेल, ” असा बोध करून संत स्वतः विवेक करून संसाराच्या पार उतरले आहेत. तुला तरायचे असेल तर एक नौका आहे, ती चंद्रभागेच्या तिरावर पुंडलिकाच्या दारात कमरेवर हात ठेवून उभी आहे, आणि ती सर्वांना उभ्या-उभ्याच बोलावीत आहे. या नौकेला कोणत्याही प्रकारचे भाडे मोजावे लागत नाही. एकनिष्ठ भावाने देवाच्या पायाला मिठी घातल्यास या भवसिंधुतून पार पडता येते. ” थोडक्यात काय तर पंढरपुरासी, चंद्रभागेच्या काठी पांडुरंग प्रपंचाची नौका पार करून देण्यासाठी भक्तांच्या सेवेला हजर आहे.
महाराजांचा विठ्ठल चरणी किती हा दृढ विश्वास आहे, हे या अभंगातून सहज समजते.
रे नामाची भरली पेठ/ वाहती वाट मार्ग/
वघेची येती वाण/ अवघे शकुन लाभाचे//
अडचणी केल्या दुरी/ देण्या उरी घेण्याच्या/
तुका म्हणे जोडी झाली/ ते आपुली आपणा//
या अभंगात पंढरपूरचे वर्णन करताना महाराज म्हणतात–
पंढरी ही भक्तांना इनाम म्हणून मिळालेली पेठ आहे. या पेठेत भक्तांचे थवेच्या थवे आहेत, तिकडे जाण्याचे मार्गही भक्तांनी भरलेले आहेत
(आषाढी- कार्तिकी वारीचा यात संदर्भ असावा) या पेठेत सर्व काही उपलब्ध आहे. लाभाचे शकून भक्तगणांना होतात. भक्तांच्या देण्या घेण्याच्या सर्व अडचणी दूर केलेल्या आहेत.. लाभ करून घेतला, जे जे या पंढरपुर क्षेत्री गेले, त्या सर्वांना फायदा झालेला आहे.
अनुपम असे कार्तिकी वारीचे वर्णन तुकाराम महाराज या अभंगात करतात.
कार्तिकीचा सोहळा/ चला जाऊ पाहू डोळा*/
आले वैकुंठ जवळा/ सन्निध पंढरीये//
पीक पिकले घुमरी/ प्रेम न समाये अंबरी/
अवघी मातली पंढरी/ घरोघरी सुकाळ//
चालती स्थिर स्थिर/ गरुड टकयांचे भार/
गर्जती गंभीर/ टाळ श्रुती मृदुंग//
मिळाली या भद्र जाती/ कशा आनंदे डुलती/
शूर उठावती/ एक एक आगळे//
नामामृत कल्लोळ/ वृंदे कोंदली सकळ/
आले वैष्णव दळ/ कळी काळ कापती//
आज करिती ब्रह्मादिक/ देखुनी वाळवंटीचे सुख/
धन्य धन्य मृत्यू लोक/ म्हणती भाग्याचे कैसे//
स्मरण मुक्ती वाराणसी/ पितृ ऋण गया नासी/
धार नाही पंढरीसी/ पायापाशी विठोबाच्या//
तुका म्हणे आता/ काय करणे आम्हा चिंता/
सकळ सिद्धीचा दाता/ तो सर्वथा नुपेक्षी//
कार्तिकीच्या वारीचे वर्णन करताना सोबतच्या भक्तांना उद्देशून म्हणतात,
चला हो आपण हा वारीचा सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहू या. या पंढरपुरात प्रत्यक्ष वैकुंठ आपल्याजवळ आले आहे. हरी नामाचा घोष आसमंतात घुमतो आहे, हेच मोठे पीक पिकले आहे. प्रेम आकाशात मावेनासे झाले आहे. हरीच्या प्रेम भावनेने सर्व पंढरपूर दुमदुमले आहे. घरोघरी परमार्थाचा सुकाळ चालू आहे. वैष्णव जन आनंदाने भजन करत हळूहळू थांबत थांबत चालत आहेत. त्यांनी गरुडचिन्हे असलेले ध्वज धारण केले आहेत. टाळ, मृदुंग, एकतारी, वीणा यांच्या साथीने श्रीहरीच्या नामाची गर्जना चालू आहे. मोठमोठे हत्ती गजदळात जसे डोलत असावेत, तसे एकाहून एक श्रेष्ठ विष्णू भक्त आघाडीवर चालत आहेत. भक्त जन समुदाय हरिनामाच्या अमृतघोशाने न्हाऊन निघाला आहे. विष्णू भक्तांचे हे सैन्य पाहून कली आणि काळ थरथर कापत आहेत. पंढरीच्या वाळवंटातील भजनाचे सुख आपल्याला मिळावे अशी सर्व देवांची इच्छा आहे. मृत्युलोक धन्य आहे, तेथील लोक भाग्यवान आहेत. काशीमध्ये मरण आले तर मुक्ती मिळते, पण या पंढरपुरात सर्व काही रोखीने इथेच मिळते. मग चिंता कशाची?
हा संपूर्ण अभंग वाचताना आपणही त्या वारीचाच एक भाग आहोत अशी भावना दृढ होते आणि देवाच्या द्वारी मुक्ती मिळाल्याचा पराकोटीचा आनंद मिळतो.
हे भू वरील वैकुंठ कसे आहे ते आता तुकारामांच्या वाणीतून ऐकूया.
जया दोषा परिहार/ नाही नाही धुंडीता शास्त्र/
ते हरती अपार/ पंढरपूर देखीलिया//
ज्या दोषांची प्रायश्चित्ते कोणत्याही शास्त्रात सापडत नाहीत, अशी पातके जरी हातून घडली तरी नुसत्या पंढरपुराच्या दर्शनाने ती नाहीशी होतात असा महिमा आहे.
धन्य धन्य भीमातीर/ चंद्रभागा सरोवर/
पद्म तिर्थी विठ्ठल वीर/ क्रीडा स्थळ वेणू नाद//
सकळ तीर्थांचे माहेर/ भू वैकुंठ निर्विकार/
नामाचा गजर/ असूर काळ कापती//
पंढरपूर हे भूतलीचे वैकुंठ आहे, सर्व तीर्थांचे जन्मस्थान आहे, तेथे कोणताही विकार नाही, तेथे हरी नामाचा गजर होतो त्यामुळे असुरांना, कळी काळाला कंप सुटतो.
नाही उपमा द्यावया/ समतुल्य आणिक ठाया/
धन्यवाद जया/ जे पंढरपूर देखती//
या क्षेत्राला दुसरी कशाचीही उपमा देता येत नाही. ज्यांना ज्यांना पंढरपूरचे दर्शन झाले, ते सर्व धन्य होत.
उपजोनी संसारी/ एक वेळ पाहे पा पंढरी/
महादशा कैची उरी/ देवभक्त देखीलिया//
जन्माला येऊन एकदा तरी पंढरीचे दर्शन घ्यावे. येथील पांडुरंग आणि भक्त पुंडलिक यांच्या दर्शनाने महापातके नष्ट होतात.
ऐसी विष्णूची नगरी/ चतुर्भुज नर नारी/
सुदर्शन घरटी करी/ रीघ न पुरे कळी काळा//
ते सुख वर्णावया गती/ एवढी कैची मज मती/
जे पंढरपुरा जाती/ ते पावती वैकुंठ//
अशी ही विष्णूची नगरी आहे. तेथील स्त्री-पुरुष चतुर्भुज संपन्न आहेत. सुदर्शन त्यांचे रक्षण करीत आहे, त्यामुळे काळाला इथे प्रवेश नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या पंढरपुराचे सुख वर्णन करण्याइतकी बुद्धी मजपाशी नाही. जे पंढरपुरास जातात त्याला वैकुंठप्राप्ती होते.
तुका म्हणे या शब्दांचा/ जया विश्वास नाही साचा/
तो अधम जन्मांतरीचा/ जया पंढरी नावडे//
त्यांचे असे म्हणणे आहे की या गोष्टींवर ज्यांचा विश्वास नाही आणि ज्यांना पंढरीची आवड नाही तो पूर्वजन्मीचा अधम होय.
तीर्थ केली कोटीवरी/ नाही देखिली पंढरी/
जळो त्याचे ज्यालेपण/ न देखेची समचरण//
योग याग अनंत केले/ नाही समचरण देखिले/
तुका म्हणे विठ्ठल पाई/ अनंत तीर्थे घडली पाही//
पंढरपूरचा महिमा महाराज सांगत आहेत. कोट्यावधी तीर्थयात्रा केल्या तरी ज्याने पंढरी पाहिली नाही त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही
(आग लागो त्याच्या जगण्याला) कारण विटेवरी पांडुरंगाच्या समचरणांचे दर्शन ज्यांना लाभले नाही त्यांनी कितीही योगयाग केले तरी सारे व्यर्थ आहे. एका पांडुरंगाच्या चरणस्पर्शातच अनंत तीर्थे केल्याचे पुण्य आहे.)
क्रमशः… २७
© अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈



