श्री नागेश शेवाळकर

? विविधा ?

☆ मनाची मनमानी श्री नागेश शेवाळकर

‘मन’ या एका शब्दात सामावलेली ही दोन अक्षरे! एवढीच का यांची ओळख आहे? बाराखडीतील इतर अक्षरांप्रमाणे का ह्या दोन अक्षरांचा समूह आहे? अक्षरे जरी दोन असली तरी सारे ब्रम्हांड यामध्ये सामावलेले आहे. मन म्हटले की, कोणताही आकार आपल्या समोर येत नाही. मोहून टाकणारा गंध जाणवत नाही. कोणताही रंग लेवून एखादी आकृती समोर येत नाही. तरीही त्याची आपल्या शरीरातील उपस्थिती सातत्याने जाणवते. आपल्या सोबत सक्रिय राहून प्रत्येक कार्यात सहभागी होत असते. हवा आपणास दिसत नसली तरीही तिचे अस्तित्व विविध प्रकारातून जाणवते. आत्मा हाही तसा अदृश्य असला तरी त्यामुळे शरीर जिवंत असते असे आपण मानतो. ईश्वरालाही भक्तांनी भावेल, आवडेल तसे रूप दिलेले आहे. त्यामुळे कदाचित ईश्वराला आकार प्राप्त झाला असेल. तो दृश्य झाला असेल. आत्म्याचे तसे नाही. त्याचे अस्तित्व फक्त जाणिवेच्या रूपाने सोबत असते. आकारहीन, गंधहीन असा आत्मा असला तरी त्यामुळे शरीर सचेतन आहे, सजीव आहे. मनाचेही तसेच आहे. आजीवन शरीरात असूनही आपणापासून दूर असल्याप्रमाणे आहे. आपण मनाला पाहू शकत नाही, परंतु त्याच्याशी संवाद मात्र साधू शकतो. ‘मनातल्या मनात’ बोलणे हा संवाद साधण्याचाच एक प्रकार! मनाशी संवाद साधत असूनही आपण आपल्या मनाला पूर्णपणे ओळखू शकत नाही, ओळखू शकणार नाही.

अदृश्य असले तरी कसे आहे मन? हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना नेहमीच पडतो. कधी वाटते मन अथांग सागराप्रमाणे आहे. दुसऱ्याच क्षणी वाटते, मन विस्तीर्ण आकाशाप्रमाणे आहे. कधीकधी मन एवढे चंचल भासते की, जणू पत्नीप्रमाणे, प्रेयसीसम! दुसऱ्याच क्षणी मनाची अस्वस्थता जाणवते, अस्थिरता समोर येते. त्याचवेळी त्याची तत्परता आपल्या लक्षात येते. कधी ते हसतं, डोलतं, गातं, नाचतं तर कधी त्याची घाई-गडबड, धांदल, धांदरटपणाही आपल्या समोर येतो. मध्येच मन हे एखाद्या अणुप्रमाणे भासते तर कधी ते पर्वतासम जाणवते. मन मायाळू, प्रेमळ, लाजरे-बुजरे आहे तसेच ते कोपिष्ट, रागीट, संतापी, आडमुठही आहे. मन जसे कीर्तनात रमते तसेच ते तमाशातही रममाण होते. कधी मन क्रियाशील जाणवते तर बऱ्याचवेळा ते प्रचंड आळशी असल्याचे दिसून येते. मन म्हणजे जणू जवळचा मित्र, बरेवाईट याची जाणीव करुन देणारा पण मधूनच त्याला काय होते ते कळत नाही. एखाद्या वैऱ्यासारखे वागते. समोर जो कुणी असेल त्याच्याशी शत्रुगत् वागते. त्याच्या बद्दल नको नको असे विचार करते. म्हणूनच म्हणतात, ‘मन चिंती ते वैरी न चिंती’!

मन आणि स्वप्न यांचा फार जवळचा संबंध जाणवतो. जागेपणी आपण जे विचार मनातल्या मनात करतो, ते प्राप्त करण्याचा, साध्य करण्यासाठी बरेच काही करतो तसे विचार मनात घोळत असताना अनेकदा ती गोष्ट आपण स्वप्नात मिळवतो, पाहतो, अनुभवतो. ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ ती हिच अवस्था! प्रयत्नांती जागेपणी जे मिळत नाही किंवा एखादी गोष्ट भरपूर प्रयत्न करूनही उपलब्ध होत नाही अशी गोष्ट मिळविण्यासाठी स्वप्न मदतीला धावून येते. म्हणूनच मनाला ‘कल्पवृक्ष’ ही उपमा दिली तर ती अनाठायी ठरू नये. असे म्हणतात की, एकेकाळी या कल्पवृक्षाकडे एखादी वस्तू मागितली तर ती तत्काळ मिळत असे. तसे पाहिले तर आजच्या मानवासाठी कल्पवृक्ष म्हणजे तरी काय तर एक स्वप्नील अवस्था! सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाजवळ असलेला कल्पवृक्ष म्हणजे मन! तुम्हाला काय पाहिजे ते मागा, प्रत्यक्षात जरी मिळाले नाही तरी कल्पनाविश्वात म्हणजेच स्वप्नात ती बाब निश्चितपणे मिळणार. आजकाल स्मार्टफोन आणि गुगलचा जमाना आहे. स्मार्टफोन हे एक शरीर मानले तर गुगल म्हणजे त्याचे मन… कलियुगातील कल्पवृक्ष! गुगलकडे तुम्ही जी माहिती मागाल ती तुम्हाला दुसऱ्याच क्षणी घरबसल्या मिळू शकते.

‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ असे म्हटले जाते. मन प्रसन्न, आनंदी, समाधानी असेल तर तुम्ही जे कोणते काम हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल, कार्यसिद्धीचा आनंद प्राप्त होईल. असा या वचनाचा अर्थ होऊ शकतो. व्यवहारात तरी दुसरे काय आहे? आपले मन प्रसन्न असेल तर आपण करीत असलेल्या कामात चुका होत नाहीत, एकच कृती वारंवार करण्याची गरज पडत नाही. मन आनंदी असेल तर शरीर लवचिक बनून जोमाने, आगळ्यावेगळ्या स्फूर्तीने काम करू लागते. मात्र हेच मन काही कारणास्तव आळसावलेले, दुखावलेले, कष्टी असेल तर दररोजच्या कामालाही वेग मिळत नाही, वारंवार चुका होतात, काहीही करावेसे वाटत नाही. मनाची अवस्था सैरभैर झालेली असते. प्रसंगानुरूप मन नेहमीच जगण्याची दुर्दम्य शक्ती शरीरात चेतवते. परंतु हेच मन कधीकधी मानवाला नको ते पाऊल उचलायला, अनिष्ट अशी कामे करायला भाग पाडते. का होत असावी मनाची ही अशी अवस्था? का मधूनच मन नको त्या गोष्टींंची पेरणी करते आणि ‘जनी निंद्य’ ते करायला भाग पाडते? मन जसे भावनाशील आहे तसेच ते भावनाशून्य आहे. मन दोलायमान असले की मनाची एक वेगळीच अवस्था समोर येते. मनाच्या या रुपाला दुसरे मन असे म्हणतो. शेजारी राहणाऱ्या या दोन मनांचे द्वंद्व आपण नेहमीच अनुभवतो. मुख्य किंंवा पहिले मन कणखर, निर्भय, निर्भीड असले की, दुसऱ्या मनाचे काहीही चालत नाही. परंतु पहिले मन थोडेेसेही कमजोर झालेे की मग दुुसऱ्या मनाचे साम्राज्य पसरते आणि मग बऱ्याचवेेळा नको ते घडून जाते. ही दोन मने म्हणजे नेमके काय? भिन्न, परस्परविरोधी विचारधारेचा समन्वय. सकारात्मक आणि नकारात्मक विचारधारा असेही आपण म्हणू शकतो. चांगले गुण, तशी विचारसरणी असलेले मन म्हणजे सकारात्मक किंवा पहिले मन! त्याउलट वाईट विचार आणि अवगुणांचा समुच्चय असलेले ते दुसरे मन…. नकारात्मक मन! या दुसऱ्या मनानेे केेलेेेलेे कार्य ही ‘मनमानी’ ही असू शकते.

तसे पाहिले तर मन एक गुंता आहे. तो कुणालाही तसा सुटलेला नाही. अगदी समर्थ रामदास महाराजांनी ‘मनाचे श्लोक’ या सर्वोत्तम विचारधारेची निर्मिती केली असली तरी मन हे शेवटी मनच आहे. कधी ते देवाप्रमाणे वागते, कधी त्याची वागणूक मानवाप्रमाणे सरळ-साधी असते तर मधूनच हेच मन राक्षसीवृत्ती धारण करते. म्हणूनच… 

मनाचिये मनमानीतून

सांगा सुटका कुणाची

मनाचिया गुंता सोडविण्या

सांगा सरशी कुणाची?

 ००००

© श्री नागेश शेवाळकर

पुणे

मोबा. ९४२३१३९०७१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted