डॉ. शैलजा करोडे
विविधा
☆ संवाद मुका झाला ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
डोंबिवलीत ९० वे अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून माझी निवड झाली होती. डोंबिवलीलाच माझा मावसभाऊ राहातहोता.
” ईश्वरभाऊ चार तारखेला साहित्य संमेलनात येत आहे काव्यवाचनासाठी ” ” अग माई, माझ्याकडे अवश्य ये. जेवणही सोबतच करू. वर्किंग डे (working day) असल्याने तुझी वहिनी घरी नसेल, पण मी घरीच आहे. मी असं करतो, तुला संमेलन स्थळी न्यायलाच येतो. तुझा कार्यक्रम संपला कि येऊ आपण घरी “.
” ओ. के. भाऊ ” मी फोन ठेवला. मी संमेलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच माझा भाऊ तिथे हजर होता. माझं काव्यवाचन झालं व आम्ही डोंबिवलीतील माझ्या भावाच्या घराकडे निघालो.
हसत खेळत आमची जेवणं झाली तसेच गप्पाही. मामा, मावशी, अगदी जवळचे लांबचे सगळ्या नातेवाईकांविषयी गप्पा झाल्या ” कोण आता कोठे आहे? काय करतंय? सगळी कुशलता, कोणाच्या समस्या गप्पांमधून कळत होत्या. आजकाल एवढा मनमोकळा संवाद माझा कोणाशीच झाला नव्हता. नोकरी, घरकाम, जवाबदार्या पार पाडण्यातच वेळ जात होता. कितीतरी दिवसातून आज मनमोकळ्या गप्पा होत होत्या, संवाद साधला जात होता. कारण भाऊही सेवानिवृत्त झाला होता व मी सुद्धा.
” काय करावं माई, मनमोकळं बोलायलाही कोणी हवं असतं ग. आता तर आम्ही दोघंच. मुले त्यांच्या व्यापात, मुलगी सासरी, तर मुलगा नोकरीच्या गावाला. पूर्वी नोकरी व जवाबदार्यात वेळ नव्हता. जुजबी संवाद पत्नी व मुलांशी व्हायचा. त्यांना काय हवं, काय नको, ते पुरविलं, पण मनमोकळं, मनसोक्त, स्वच्छंदीपणे आम्ही काही जगू शकलो नाही. निलीमाची नोकरी, मुलांच्या शाळा, इतर अॅक्टिव्हीटीज (activities) मध्ये ते व्यस्त.
अनेकदा मनांतील गोष्टी मनांतच राहिल्या ” मी हळूवारपणे त्याच्या हाताच्या तळव्यावर माझा हात ठेवला. त्या स्पर्शातच त्याला खूप काही जाणवलं, तो मंदसा हसला.
” चल माई, आपण चहा घेऊया का अर्धा अर्धा कप “.
” होय, घेऊया की. मी बनविते चहा “
“ ए, नाही हं, मलाही बनविता येतो छानपैकी चहा “
सायंकाळी त्याचा निरोप घेऊन मी परतीच्या प्रवासाला लागले, अंतःर्मुख होऊनच. खरंच आज प्रत्येक घराची हीच कहाणी आहे. विभक्त कुटुंबपध्दती राजा राणीचा संसार, चौकोनी कुटुंब, अर्थार्जनासाठी धाव धाव धावायचं, मुलांना पाळणाघरात ठेवायचं, त्यामुळे मुलेही दुर्मुखलेली, आईबाबा कामावर, शाळेतून मुलांनी यायचं, स्वतःच घराचं कुलूप काढायचं, आईने केलेला स्वयंपाक स्वतःच वाढून घ्यायचा. होमवर्क करायचा. ही आजची जीवनपध्दती.
शाळा सुटल्यावर मस्तपैकी हुंदडत यायचं, घरात आजी आजोबा आहेत, ” आलाग बाई माझा बाळ ” म्हणत स्वागत व्हावं, लाडे लाडे त्यांच्या गळ्यात पडावं, आजीने कपडे बदलून द्यावे, जेवण गरम करून वाढावं “मुलांची ही स्वप्ने, स्वप्नेच राहातात कारण घरात आजी आजोबा नसतात. त्यांची रवानगी वृृध्दाश्रमात झालेली असते. वृृध्दाश्रमात ते कुटुंब सुखाला तरसतात तर इकडे नातवंडे दुर्मुखलेली राहातात.
पूर्वीच्याकाळी लग्न समारंभही चार /पाच दिवस चालायचे. चार मांड्यांची हळद, सात मांड्यांची हळद राहायची. सगळे नातेवाईक गणगोत जमायचे, सगळ्यांच्या भेटीगाठी व्हायच्या, मनं मोकळी व्हायची व सर्वात महत्वाचे प्रेमभावना वाढीस लागायची.
आजची लग्ने चार तासात उरकावी लागतात. कारण तासांनीच मॅरेज हाॅल भाड्याने मिळतात. सगळं काही आज रेडीमेड मिळतं. अगदी आगत स्वागताला माणसे देखिल. पूर्वीच्या लग्नांमध्ये अगदी रुखवताच्या सामानापासून, लाडू, वडे, कुरडई, पापड सगळी कामे समूहातून केली जात होती. हळद, बिदाई, मेहंदी, बांगड्या (चूडा) समारंभासाठी आळीतील सगळ्या स्त्रिया एकत्रित होत असत. आज मात्र तसे नाही. ” केव्हा एकदाचे लग्न लागते व आॅफीस गाठता येईल” हीच सगळ्यांची धावपळ. या धावपळीत मुक्तपणे संवाद होऊच शकत नाही. सगळी च औपचारीकता.
लग्नसमारंभाला न येऊ शकलेली माणसे whats app वरून शुभाशिर्वाद देऊन मोकळी होतात व न येऊ शकल्यामुळे माफी मागितली कि झाले काम.
दुपारच्या वेळी गृहिणी निवांत बसली आहे व चार मैत्रिणी आल्यात असे होतच नाही आजकाल. कारण प्रत्येकजण दुपारच्या मालिका पाहाण्यात गर्क.
किंवा whats app वर बिझी. मग कसा झडणार हो संवाद.?
दुपारी किंवा रात्री सगळा परीवार एकत्रितपणे जेवायला बसलाय असेही घडत नाही दिवसा नोकरी व्यवसाय व मुलांच्या शाळांमुळे ते शक्य होत नाही, पण रात्री ते ही जमत नाही. पतीराजांना महत्वाची मिटींग असते. कधी फाॅरेन डेलिगेटस् आलेलै असतात मम्मीच्याही कधी पार्टीज असतात. मुले मित्रांसमवेत मौजमजा करतात. मग एकमेकांमध्ये संवाद होणार तरी कसा?
पार्टी, मित्रता, whats app, face book, twitter, यावरून संवाद तर झडतो, पण ऐनवेळी, अडी अडचणीत ही माणसे उपयोगाला येतात काय हो? मुळीच नाही. कारण त्यात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा कोठून आणणार हो? तो तर अंतःप्रेरणेतून यायला हवा.
“कालाय तस्मै नमः” आजचे बदलते युग, बदल हा होणारच. तो अपेक्षितही आहे. पण यारोबरच प्रेम, जिव्हाळाही जपावा. कुटुंबातही स्वतःसाठी तर आपण जगतोच, इतरांसाठीही जगावं त्यांच्या समस्या, अडी अडचणींवर मार्ग काढावा. संवाद आपोआपच बोलका होईल. मुका तरी राहणार नाही. पशु पक्षीही आपसात बोलतात, आनंदगाणी गातात, मग आपण का नाही? बघा, विचार करा, उत्तर तुम्हांला गवसेल. कृती तुम्हांला आनंद देईल “
जयहिंद, जय महाराष्ट्र
© डॉ. शैलजा करोडे
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – karodeshailaja@gmail.com





