श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतीय लष्कर दिनानिमित्त विशेष – “एकांतात उमलणा-या वेदनेच्या कळ्या!” ☆ श्री संभाजी बबन गायके

(१५ जानेवारी – भारतीय लष्कर दिनानिमित्त विशेष लेख!)

सेकंड लेफ्टनंट राकेश सिंग मल्हन

कर्नल राज सिंग मल्हन… त्यांच्यासाठी मृत्यू आणि छिन्न-विछीन्न झालेले देह, रक्ता-मांसाचा चिखल, जीवाच्या आकांताने मारल्या जाणा-या किंकाळ्या काही नव्या नव्हत्या. एक नव्हे तर दोन-दोन युद्धं लढून ते निवृत्त झाले होते!

दुस-या पिढीतले जातीवंत शिपाईगडी असले तरी त्यांच्या आयुष्याच्या शब्दकोशात भीती आणि शोक हे शब्द होतेच. पण या दोन्ही गोष्टींवर पक्कं नियंत्रण ठेवण्याचं प्रशिक्षण त्यांना मिळालेलं होतं. त्यांचे वडीलही याच अनुभवातून गेले होते. आणि वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकून ते ज्यावेळी फौजेत गेले, त्यावेळी त्यांना निरोप देताना त्यांच्या वडिलांच्या डोळ्यांत त्यांनी एक अनामिक भावना दाटून आलेली पाहिली होती. “काळजी करू नकोस.. आमची. स्वत:ला जप. ” असं म्हणणारा बाप त्यांची गाडी निघाली तेंव्हा तोंड फिरवून मागे कुठेतरी पहात असलेला त्यांनी पाहिला होता… लढाईला जाता जाता!

आणि आता कर्नल साहेबांचा स्वत:चा मुलगाही पलटणीत भरती झाला त्यावेळी त्याला निरोप देताना त्यांची अवस्थाही काही निराळी नव्हती! जन्मत:च देखणेपणा घेऊन आलेलं पोरगं सेकंड लेफ्टनंट झालं तेंव्हा लष्करी अधिका-याच्या गणवेशात मोठं देखणं दिसत होतं… कुणाचीही दृष्ट लागेल असं!

आजही कर्नल कुणासमोर रडून चालणारं नव्हतं. त्यांनी शांतपणे लेकाचा मृतदेह ताब्यात घेतला.. आणि तिरंगा ध्वजसुद्धा! तशी त्याची खबर फौजेने त्यांना सकाळीच मिळाली होती. लेकाच्या पलताणीतून अवेळी येणा-या निरोपाचा अर्थ त्यांना अगदी नीट ठाऊक होता. असे निरोप त्यांनी स्वत: अनेकांच्या घरच्यांना दिले होते… कितीतरी बापांना सांगितले होते… ”आपका बेटा बडी बहादुरीसे लडा… लेकिन उसने देश के लिये अपना सर्वोच्च बलिदान दिया! ”

आज तोच निरोप त्यांना कुणीतरी देत होतं… ”आपका बेटा.. सेकंड लेफ्टनंट राकेश सिंग मल्हन बडी बहादुरी से लडा! ”

राकेश नाव ठेवलं होतं त्याचं. राकेश म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राचा स्वामी असा अर्थ असतो असं कुणीतरी सांगितलं होतं… आज हा चंद्र सकाळचा सूर्य उगवल्या उगवल्या मावळून गेला!

त्या दिवशी राकेशला मोठी कामगिरी मिळाली होती… सोबत असलेल्या सैनिकांची संख्या अतिरेक्यांच्या संख्येच्या तुलनेत दुप्पट आहे हे कारण सांगून तो मोहिमेतून मागे सरकू शकला असता! पण अवघं बावीस साडे एकवीस वर्षांचं वय… नुकताच सेकंड लेफ्टनंट म्हणून ग्रेनेडीयर्स मध्ये रुजू झालेला अधिकारी. सळसळतं रक्त आणि अतीव उत्साह. आठ परदेशी अतिरेकी आपल्या तावडीतून निसटून जाऊ देणं परवडणार नव्हतं देशाला. एन. डी. ए. , आय. एम. ए. मधलं खडतर प्रशिक्षण प्रत्यक्ष उपयोगात आणायची हीच तर वेळ होती. राकेश यांनी सोबतच्या तीन सैनिकांसह त्या जंगलात आत प्रवेश केला. एक मोठा हल्ला करून जंगलात लपण्याच्या ठिकाणाकडे निघालेल्या आठ अफगाणी मुजाहिद अतिरेक्यांची वाट अडवून त्यांना नेस्तनाबुद करण्याचं मिशन होतं.

हे आठही जण अफगाणिस्तानातून पाकिस्तानात आणि तिथून भारतात घुसले होते. त्यांना भारतीय सैनिकांनी हुडकून काढले पण त्यांनी जंगल, अंधार यांचा फायदा घेत त्यांच्या वाटेत असलेल्या एका सैन्य तुकडीला चकवा दिला होता. राकेशसिंग यांना ही खबर मिळताच त्यांनी धोका पत्करत तीन सैनिक आणि स्वत: अशा चार जणांच्या जोरावर त्या आठ जणांची वाट अडवली… त्यांपैकी दोन जणांना अचूक टिपले. उरलेले अतिरेकी गडबडून इतस्त: पांगले. राकेश सिंग आणि त्यांच्या या तीन सैनिकांनी त्यांना चारही बाजूने घेरले. सहा अतिरेकी होते… त्यांपैकी एक-दोघे ज्या बाजूला पळाले होते… नेमके त्याच बाजूला आपला एक सैनिक दबा धरून बसला होता… त्या दोघांच्या गोळीबारामुळे या एका सैनिकाला काही करता येईना… ते दोघे पुढे पुढे जात होते… आता या एकट्या सैनिकाचा जीव धोक्यात आला होता. राकेश यांनी हे पाहताच दुस-या बाजूने मुसंडी मारत त्या दोघांवर गोळीबाराच्या फैरी झाडायला आरंभ केला… आपल्या सैनिकाला कव्हर देण्याचा राकेश यांचा इरादा होता… या प्रयत्नात त्यांच्या हाताला, खांद्याला अनेक गोळ्या लागल्या… कारण अतिरेक्यांचा गोळ्यांचा वर्षाव सुरु होता… त्याच्यामधून राकेश सिंग पळत आले होते!

कोसळलेले राकेश सिंग पुन्हा उठले आणि त्यांनी त्या दोघा अतिरेक्यांना यमसदनी धाडले. आता उरले चार… आपल्या इतर तीन सैनिकांनी राकेश सिंग साहेबांच्या पराक्रमाने प्रेरित होत जोरदार प्रतिकार केला आणि उर्वरीत चारही जणांना ठार मारले… चार जणांनी आठ अतिरेकी संपवले होते. मात्र या दरम्यान प्रचंड रक्तस्राव झाल्याने राकेश सिंग यांचे प्राण वैद्यकीय मदत मिळेपर्यंत निघून गेले होते! १३ जून, १९९२ रोजी सैन्यात दाखल झालेला हा नवतरुण अवघ्या पाच महिने आणि बावीस दिवसांनी, म्हणजे ५ डिसेंबर, १९९२ रोजी देशाच्या कामी आला! … वय होतं अवघं… २२ वर्षे, २ महिने आणि १७ दिवस!

लष्कराच्या गाडीतून हुतात्मा सैनिकाचा देह घराच्या अंगणात आणला गेला. सोबत जबाबदार लष्करी अधिकारी होतेच. हजारोंचा जमाव होता… अमर रहे घोषणा होत होत्या!

तोवर अंधारून आले होते. कुणी महत्त्वाचे नातलग दूर गावावरून येणार असल्याने त्यांना उशीर होणार होता. त्यामुळे अंत्यसंस्कार दुसरे दिवशी करायचं ठरलं! ही रात्र आता सरता सरणार नव्हती!

कर्नल साहेबांनी घरातल्या सर्वांना धीर दिला. चेहरा करारी आणि डोळे कोरडे. हालचाली संयत. इतरांशी बोलताना, त्यांना सूचना देतानाचा स्वर मवाळ. पोटचं पोर गेल्याचं दु:ख चेह-यावर दिसत नव्हतं… उलट अभिमान होता!

राकेश यांचा देह फुलांनी शाकारलेला. त्यांच्या चेह-यावर कापड. सकाळपर्यंत देह त्याच्या आवडीच्या खोलीत ठेवायचं ठरलं. धूप जळत होता… आणि बापाचं काळीजही.. नि:शब्द! . दिवा तेवत होता… पण त्यावर काजळी होती! आई तर दु:खातिशयाने अर्धवट ग्लानीत, पण ती रडू शकत होती… शुद्ध आल्यावर. कर्नल साहेबांना मात्र ही सवलत नव्हती… पुरुषांना तशीही नसतेच!

कर्नल साहेबांनी सर्वांना बाहेरच्या खोलीत विश्रांती घेण्यास सांगितले. राकेशचे मोठे बंधू, बहीण इतर नातलग बाहेरच्या खोल्यांत भिंतीस टेकून बसले… आणि काही वेळाने आडवे झाले… सकाळची वाट पाहत पाहत पडून राहिले… आणि त्यांचा डोळा लागला! मेरे बेटे के साथ मुझे अकेला छोड दो… असं म्हणत कर्नल साहेब स्वत: मात्र शांतपणे राकेशच्या देहाशेजारी बसून राहिले… त्याचं बालपण आठवत! राकेशला लहानपणी बॉबी म्हणत सर्वजण. अत्यंत खेळकर आणि धाडसी. मी मोठेपणी सैन्यातच जाणार हे त्याने ठरवून टाकले होते. अभ्यासात आणि अनेक खेळांत अत्यंत प्रवीण… आज मात्र राकेश केवळ देहाने दिसत होता.. बावीस वर्षे वय… आयुष्य तिथेच थबकलेलं!

मंद मंद पावले टाकीत रात्र पुढे सरकत राहिली… दोन वाजले असावेत. कर्नल साहेबांच्या मोठ्या मुलाला काही जाणवलं… राकेश यांच्या खोलीतून मुसमुसण्याचा आवाज येत होता. त्यानं हलक्या पावलाने खोलीजवळ जात डोकावून पाहिले… कर्नल साहेबांनी राकेशच्या चेह-यावरचे कापड बाजूला केलेलं होतं… त्याच्या केसांतून ते हलकाच हात फिरवत होते… आणि आवाज बाहेर फुटू नये या बेताने रडत होते! एका पाषाणाला पाझर फुटत होता… पण पाषाण प्रयासाने ते पाणी आतल्या आत अडवून धरत होता! एकांतात वेदनेच्या झाडाला कळ्या लगडल्या होत्या… आणि त्यांची फुले होऊन गालांवरून खाली ओघळून त्यांचा सडा पडत होता… पोराच्या चेह-यावर आसवांचे थेंब पडत होते… मोतीच जणू!

चाहूल लागताच कर्नल साहेबांनी राकेशच्या चेह-यावर ते कापड पुन्हा होतं तसं केलं… डोळे पुसले… तोंड भिंतीच्या दिशेला फिरवलं… आणि थोरल्या मुलाला हातानं इशारा केला… तू जा… पड… मी ठीक आहे!

थोरला जाऊन त्यांना पाठीमागून बिलगला… कर्नल साहेबांचा देह थरथरत होता… रात्र पुढं सरकत होती!

या अतुलनीय शौर्याबद्दल राकेश सिंग मल्हान यांना शांतता काळातील प्रथम क्रमांकाचे ‘अशोक चक्र’ पदक मरणोत्तर देण्यात आले.

१९६५ आणि १९७१च्या युद्धांत सहभाग घेतलेल्या आणि चंदिगढ येथील रहिवासी कर्नल राज सिंग मल्हान यांचे आणि सावित्री देवी यांचे राकेश हे धाकटे सुपुत्र. पुण्याच्या सेंट जोसेफ शाळेत सुरुवातीचे शिक्षण घेतलेले राकेश पुढे रोहतक येथे शिकायला गेले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत ७९व्या सत्रासाठी त्यांची निवड झाली. पायदळाचे आकर्षण असल्याने त्यांनी पायदळात प्रवेश घेतला होता. पुलवामा-शोपियां मध्ये अतिरेक्यांशी झालेल्या संघर्षात ते वीरगतीला प्राप्त झाले!

९, PARA SF चे संजोग छेत्री, सेकंड लेफ्टनंट पुनीत नाथ दत्त, कॅप्टन राधाकृष्णन नायर हर्षन, लेफ्टनंट नवदीप सिंग या लष्करी अधिकारी आणि नीरजा भानोत या नागरी हवाई सेवेतील, अगदी कमी वयात अशोक चक्र प्राप्त करणा-या निवडक व्यक्तींमध्ये राकेश सिंग मल्हन हे नाव सामील झाले. युद्धभूमीला तरुण रक्ताची तहान असते जणू! आणि आपल्या देशात हे रक्त सांडणारे सैनिक आहेत, त्यांना फौजेत धाडणारे आई-बाप आहे म्हणून देश सुरक्षित आहे आणि राहील!

सर्व हुतात्मा सैनिकांना वंदन आणि त्यांच्या शूर जन्मदात्यांना प्रणाम!!!

सर्व भारतीयांना भारतीय लष्कर दिनानिमित्त शुभेच्छा! जय हिंद. 🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments