श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “कालिया-मर्दनासाठी मृत्यूच्या डोहात उडी घेणारा वीर!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
पासष्ट वर्षांच्या आजी श्रीमती रत्ना राय यांना त्यांचा नातू सुट्टीवर घरी येणार आहे, असं वाटतं आहे. घरची कर्ती माणसं त्याला विमानतळावर घ्यायला गेलीत… असं तिला सांगण्यात आलंय. एप्रिल, २००३. याच महिन्याच्या तिस-या आठवड्यात येतो म्हणून त्यानं कळवलं होतं… पण एक तातडीची मोहीम पूर्ण करायचा आदेश आल्याने आता शेवटच्या आठवड्यात ‘येईन’ असं कळवलं आहे. संजोग त्याचं नाव. सिक्कीम राज्यातल्या नामची जिल्ह्यातल्या बूमतार गावात ही राय मंडळी राहतात. रत्ना राय यांची कन्या भारती त्यांच्या धाकट्या सूनबाई. परंतू त्यांच्या धाकट्याचं अकाली निधन झालं होतं. त्यानंतर भारती यांनी नेपाळी वंशाच्या कमल छेत्री यांच्याशी पुनर्विवाह केला. हा आंतरराज्य विवाह म्हणता येईल असा विवाह. रेल्वे कर्मचारी असलेले कमल संजोग आणि मुलगी संजीता यांना भारती यांच्या पदरात टाकून देवाघरी निघून गेले. त्यावेळी संजोग केवळ दोन वर्षांचे होते. संजोग आणि संजीता यांचा सांभाळ सरकारी वकील असलेल्या मोठ्या काकांनी, जे. बी. राय यांनी केला.
संजोग धाडसी खेळांत वाकबगार होते. नामची येथील सरकारी महाविद्यालयात बी. ए. च्या दुस-या वर्षात असतानाच ते काकांच्या विरोधाला न जुमानता वर्ष २००१ मध्ये ११, गोरखा रेजिमेंटमध्ये जवान म्हणून त्यांच्या वयाच्या अठरा-साडे अठराव्या वर्षी भरती झाले… अंगभूत शौर्य, धाडस, साहस या गुणांना लष्करातच वाव मिळेल, असे संजोग यांचे पक्के मत होते… आणि भविष्यात ते खरे ठरले! दोन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर रेजिमेंटमध्ये स्थिरावत असताना त्यांना आणखी काही विशेष करून दाखवण्याची प्रबळ इच्छा झाली. मनात शौर्याचे धगधगते अग्निकुंड पेटते असणा-या आणि शारीरिक, मानसिकदृष्ट्या अतिशय बलवान असलेल्या सैनिकांचे एक स्वप्न असते… स्पेशल फोर्सेस मध्ये कमांडो बनणे. यासाठी अतिशय म्हणजे अक्षरश: अतिशय खडतर परीक्षा, प्रशिक्षण पार करावे लागते… आणि ‘बलिदान’ बॅज ‘कमवावा’ लागतो. संजोग छेत्री यांनी ही कमाई केली! एकतीस मार्च २००१ रोजी संजोग छेत्री ९, पॅराशूट रेजिमेंट, स्पेशल फोर्सेस मध्ये कमांडो म्हणून मोठ्या अभिमानाने रुजू झाले.
स्पेशल फोर्सेस जम्मू-कश्मीरमध्ये अतिरेक्यांविरोधात सातत्याने मोहिमेवर असते. बावीस एप्रिल, २००३चा दिवस होता. काश्मिरात बर्फवृष्टी होऊन गेलेली होती. टेहळणी करणा-या हेलिकॉप्टरला काश्मिरातील, पीर पंजाल पर्वतराजीनजीकच्या पूंछ भागातल्या सुरनकोट येथील एका जंगलातल्या उंच टेकडीवरील एके ठिकाणी एका गुहेपर्यंत उमटलेली असंख्य पावलं नजरेस पडली. काळजीपूर्वक योजना आखली गेली. वीस कमांडोज या SAD (Search & Destroy) मोहिमेसाठी निवडण्यात आले… पॅराट्रूपर संजोग छेत्री या तुकडीत होतेच. काका टॉप नावाच्या जिथून भारतीय सैनिकांच्या हालचाली दिसू शकतील अशा एका गुहेत सुमारे तेरा-चौदा अतिरेकी लपून बसल्याची खबर होती. जणू विषारी सर्पच. यांना शोधून ठेचून काढायला हवेच… मोहिमेचे नाव ठरले… ऑपरेशन सर्पविनाश!
पण या कालिया-मर्दनासाठी सैनिकांना अदृश्य अशा डोहात उडी घ्यावी लागते. अतिरेकी लपले आहेत, अशा ठिकाणापासून खूप अलीकडे वाहने थांबवून पायी त्या जागेकडे निघावे लागते. मोहीम गुप्त ठेवावी लागते. वाटेत लागणारी गावे, त्यांतील अतिरेक्यांचे प्रशंसक, साहाय्यकर्ते यांना गाफील ठेवत मोहीम राबवावी लागते. यात कित्येक किलोमीटर्स बर्फात, अंधारात, डोंगर-दरीतून, घनदाट झाडीतून चालत जावे लागते… सोबत शस्त्रांचे ओझे असतेच! शत्रूच्या लपण्याच्या संभाव्य ठिकाणाला सा-या बाजूंनी वेढा घालावा लागतो…
संजोग छेत्री त्या गुहेच्या दिशेने आपल्या इतर साथीदारांसह सावध पावले टाकीत निघाले. गुहेच्या पुढे बरीच मोकळी जागा होती.. या जागेत दगडधोंडे, गवत होतेच. कमांडोज गुहेपासून शंभरेक यार्ड्स वर पोहोचलेले असतानाच गुहेत लपलेल्या सर्पांना गरुडांचा सुगावा लागला! पाकिस्तानातून प्रचंड शस्त्रसाठा घेऊन आलेले अतिरेकी… त्यांनी तुफान गोळीबार आरंभला… अंदाधुंद. वेढ्यात असलेल्या अन्य कमांडोजच्या जीवाला धोका उत्पन्न झाला… संजोग यांनी स्वत: निर्णय घेतला… थेट भेट गनिमांना! ते कोपर-गुडघ्यांवर रांगत-रांगत ते शंभर यार्ड अंतर गुहेच्या अगदी तोंडाशी पोहोचले… गुहेत बसून आरामात गोळीबार करणा-या अतिरेक्यांच्या समोर संजोग यमराज बनून उभे ठाकले… गुहेतून एक अतिरेकी गोळीबार करीतच बाहेर पडला… बिळातून पहिला सर्प जणू! कमांडो संजोग यांचा नेम चुकणार नव्हताच. त्याच्या पाठोपाठ दुसरा बाहेर निघाला… त्याचीही तीच गत झाली! पण गुहेच्या आतून अकरा रायफली धडाडत होत्या… शेकडो गोळ्या! त्यांतील अनेक गोळ्यांनी संजोग यांच्या देहाचा वेध घेतला… कालिया मर्दनासाठी आलेला बालकृष्ण कोसळला! अतिरेक्यांनी तरीही त्यांच्यावर काही फैरी झाडल्या… निश्चितीसाठी! आतला एक जण आता बाहेर पडला… निपचित पडलेल्या या देहाचा हात हलला… कमरेला लावलेला सुरा (आर्मी नाईफ/खुखरी) उपसला गेला… देह उभा ठाकला… तिस-या अतिरेक्याचा मृत्यूदूत! रक्तबंबाळ झालेल्या या देहानं त्या अतिरेक्यावर मरणाची झडप घातली… त्याच्या नरडीचा घोट घेतला आणि मगच पुन्हा धरणीमातेच्या मांडीवर मस्तक ठेवलं… (२६ जून, १९८२ ते २२ एप्रिल, २००३) आणि त्या केवळ वीस वर्षे, नऊ महिने आणि सत्तावीस दिवसांचे आयुष्य जगलेल्या देहातील आत्म्याने परलोकीची वाट धरली!
उरलेले अकरा अतिरेकी बाहेर पडून पांगले… संजोग छेत्री यांच्या बलिदानाने पेटून उठलेले कमांडोज आता त्यांना काहीही झाले तरी जिवंत ठेवणार नव्हतेच. त्यांनी त्यांपैकी दहा सर्पांचा विनाश केला… अकरावा पाकिस्तान-प्रशिक्षित सर्प जिवंत धरला! एकूण तेरा अतिरेकी त्यांच्या ‘आखरी अंजाम’ पर्यंत पोहोचवले गेले! हे साप देशाच्या आतल्या भागांत शिरले असते तर?
सर्पविनाश मोहिमेत २००३ मध्ये सुमारे १०० अतिरेक्यांचा विनाश करण्यात आपल्या सैनिकांना यश लाभले. पण यांत अनेक सैनिक आणि नागरीकांना आपले प्राण द्यावे लागले. या सर्वांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी एप्रिल महिन्यात या भागात ‘हिल काका स्मृती दिन’ पाळण्यात येतो.
‘अशोक चक्र’… शांतता काळात सैनिक, नागरिक यांना दिला जाऊ शकणारा, परमवीर चक्राच्या दर्जाचा, सर्वोच्च पुरस्कार पॅराट्रूपर संजोग छेत्री यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला तो दिवस होता १५ ऑगस्ट, २००३! संजोग छेत्री यांच्या भगिनी संजीता यांनी भारताच्या तिन्ही संरक्षण दलांचे सुप्रीम कमांडर, तत्कालीन राष्ट्रपती महोदय डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम साहेब यांच्या हस्ते आपल्या शूर भावाच्या वतीने ‘अशोक चक्र’ पदक स्वीकारले!
सैनिकांची दुनियाच न्यारी! इथे जखमा अभिमानाने मिरवल्या जातात! किती शौर्य पदके, पुरस्कार मिळवले यांच्या आकडेवारीचा अभिमानाने उल्लेख केला जातो, हौतात्म्य पत्करलेल्या बहाद्दर सैनिकांच्या स्मृती जतन करून ठेवल्या जातात. ९, पॅराशूट रेजिमेंट (स्पेशल फोर्सेस) ने इतर अनेक सन्मान प्राप्त केलेले आहेतच… पण तब्बल चार ‘अशोक चक्र’ पुरस्कार त्यांनी पटकावलेले आहेत! संजोग छेत्री, मेजर सुधीर वालिया साहेब, कॅप्टन अरुण सिंग जसरोटीया साहेब आणि लान्स नाईक मोहन गोस्वामी साहेब यांना मरणोत्तर हा सन्मान प्राप्त झाला आहे. संजोग छेत्री यांचा आदर्श समोर ठेवून सिक्कीमचा एच. शेर्पा नावाचा तरुण २०२४ मध्ये एन. डी. ए. मध्ये निवडला गेला… त्याने संजोग छेत्री यांच्या बलिदानातून प्रेरणा घेतली! ‘अशोक चक्र’ प्राप्त करणारे सर्वांत कमी वयाचे सैनिक म्हणून संजीव छेत्री यांची आजवरच्या इतिहासात नोंद आहे! आपले हे कोवळे तारुण्य भारतमातेच्या चरणी अपर्ण करणा-या संजोग छेत्री यांना प्रणाम.
हा लेख तरुणांना वाचायला मिळेल, असा प्रयत्न केला गेला तर बरे! जय हिंद.
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





