श्री दिवाकर बुरसे
इंद्रधनुष्य
☆ भावचिन्हांविषयी ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
व्हाटस् ॲप, फेसबुक, इंस्टाग्रम ही प्रभावी प्रसारमाध्यमे आहेतच. जगभर लोकप्रिय आहेत. ती माध्यमे सहसा ‘चटिंग’ म्हणजे गप्पागोष्टी, सुसंवाद करण्यासाठी उपयोगात आणतात. या चटिंगसाठी शब्द हे माध्यम उपयोजिले जावे. लेखकाने, संवादकर्त्याने आपले म्हणणे योग्य आणि मोजक्या शब्दात मांडावे. ते आधिक परिणामकारक व्हावे म्हणून फार तर फोटो, चित्रे व्हिडिओ सोबत जोडावीत असे अभिप्रेत आहे.
आलेल्या संदेशावर/ लेखावर/पोस्टवर प्रतिक्रिया देताना भावचिन्हांचा (इमोजीचा) उपयोग कटाक्षाने टाळावा. शब्दांत कृपणता नसावी. आपला आभिप्राय चार शब्दाने दिल्यास उभय पक्षांमधे आत्मियता, स्नेह, प्रेम, वाटते आणि वाढते.
संदेशाला आलेल्या शाब्दिक प्रतिक्रियेच्या जागी भावचिन्ह पाहिल्यावर प्राप्तकर्त्याच्या मनात सूक्ष्म निराशा उत्पन्न होते. त्याच्या मनात प्रेषकाविषयी हा ‘उठवळ, तुटक, तुसडा, माणूसघाणा, व्यापारी, राजकारणी, धूर्त, स्वार्थी, आढ्य, औपचारिक आहे’ अशा प्रकारचे नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात, नव्हे होतात.
योग्य शब्द नाती जोडतात, वृद्धिंगत करतात, जिव्हाळा वाढवतात. अयोग्य शब्दांनी मात्र नाती दुरावू शकतात.
थोडक्यात प्रतिक्रिया देताना उठवळपणा करू नये. भावचिन्हे शक्यतो टाळावीत, शब्दानेच व्यक्त व्हावे आणि नाती जोडावीत, सांभाळावीत, वाढवावीत. याला म्हणतात सुसंवाद. इतर निव्वळ शिष्टाचार, व्यापार उपचार!
☆
🙏🏻
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





