💐🙏 १२ जून… केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी रसिकांचे अतिशय लाडके आणि आदरणीय व्यक्तिमत्व अशीच ओळख असणारे दिग्गज श्रेष्ठ साहित्यिक ‘पद्मभूषण’ श्री. पु. ल. देशपांडे यांचा स्मृतिदिन. 💐🙏
खरं तर पु.ल. हे एक असं व्यक्तिमत्व जे रसिकांच्या विस्मरणात कधीच जाऊ शकत नाही. मानवी स्वभावाचे अगदी अचूक परीक्षण करून त्यावर नेमकेपणे प्रकाश टाकणारे ‘ व्यक्ती आणि वल्ली ‘, ‘ बटाट्याची चाळ’ सारखे त्यांचे कथासंग्रह, ‘ अपूर्वाई ‘,’ पूर्वरंग ‘ यासारखी त्यांची बोलकी आणि चित्रमय भाषेतली प्रवासवर्णने, ‘ तुझे आहे तुजपाशी ‘, ‘ ती फुलराणी ‘ सारखी समाजातल्या विसंगत मनोवृत्तीवर नेमके बोट ठेवणारी आणि बोधप्रद कथाबीज असणारी त्यांची नाटके, अशी त्यांची साहित्य-क्षेत्रातली अष्टपैलू कामगिरी ‘ कालातीत ‘ म्हणावी अशीच आहे यात दुमत असणारच नाही.
पु.ल. हे केवळ लेखक नव्हते हे तर सर्व रसिक जाणतातच. ते एक उत्तम हार्मोनियम वादक तर होतेच, पण तितकेच उत्तम संगीतकारही होते…. हो, आणि उत्तम अभिनेतेही. ‘ गुळाचा गणपती ‘ सारख्या मोजक्याच चित्रपटातला त्यांचा अभिनय मनाला भिडणारा होता. आणि ‘ बटाट्याची चाळ ‘ सारखे त्यांचे एकपात्री प्रयोग तर प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावणारे .. आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारे.
या असामान्य साहित्यिकाबद्दल आणि त्यांच्या अमर साहित्यकृतींबद्दल बोलावे तितके कमीच. पण या बरोबरच त्यांच्या व्यक्तित्वातला एक असामान्य गुण म्हणजे त्यांचे “ दातृत्व “. “ पु.ल.देशपांडे फाउंडेशन “ या स्वस्थापित संस्थेच्या नावाने त्यांनी आपल्या कमाईतला खूप मोठा हिस्सा वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना आणि शाळांना देणगी म्हणून दिलेला होता.
त्यांच्या अष्टपैलू साहित्यासाठी आणि कलासेवेसाठी अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेले होते, ज्यात प्रामुख्याने १९६५ चा साहित्य अकादमी पुरस्कार (‘व्यक्ती आणि वल्ली‘साठी), १९६६ चा पद्मश्री आणि १९९० चा पद्मभूषण यांचा समावेश आहे. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६७), कालिदास सन्मान (१९८७) आणि महाराष्ट्र भूषण (१९९६) पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.पु.ल. देशपांडे यांना मिळालेले प्रमुख पुरस्कार:साहित्य अकादमी पुरस्कार: १९६५ (‘व्यक्ती आणि वल्ली‘साठी)पद्मश्री: १९६६संगीत नाटक अकादमी पुरस्कार: १९६७संगीत नाटक अकादमी फेलोशिप: १९७९कालिदास सन्मान:
शिवाय १९८७ पद्मभूषण: १९९० पुण्यभूषण: १९९२ महाराष्ट्र भूषण पुरस्कार: १९९६ महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार… असे कितीतरी मानाचे पुरस्कार मिळालेले होते.
१९९९ साली त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांच्या नावाने ‘ पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी ‘ ही त्यांच्या स्मरणार्थ मुंबईत उभारलेली संस्था ही त्यांना दिलेली सर्वात मोठी आदरांजली म्हणायला हवी.
आज त्यांच्या स्मृतिदिनी आपल्या ई-अभिव्यक्ती समूहातर्फे या ‘ग्रेट’ साहित्यिकाला मनःपूर्वक श्रद्धांजली देतांना त्यांचे आत्मचिंतनपर आणि हृद्य विचार नक्कीच विचार करावा असेच – – –
“ मला एकच समाधान आहे. हे जे काही केलं त्यातून कुणाच्या तरी जीवनामध्ये थोडाफार आनंद निर्माण करू शकलो. म्हणूनच …. ‘ तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हांसी । ‘ असे म्हणणारे तुकाराम मला आप्त वाटतात. माझं गणगोत खूप आहे. आता संध्याछायांना केव्हा दाटायचं तेव्हा दाटू देत. ऐलतीरावरचं पाहण्यासारखं इतकं आहे, की पैलतीराची चिंता मी कशाला करायची ? माझी मैफिल चालूच आहे …. “
मनःपूर्वक श्रद्धांजली 💐🙏
– संपादक मंडळ,
ई – अभिव्यक्ति, मराठी विभाग.
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

