स्वाती मंत्री

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सद्गुरू… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  स्वाती मंत्री ☆

चुकले ते एकाच ठिकाणी… शरणागती ही कृती नाही, ती अवस्था आहे. पाया पडणे ही शरणागतीची सुरुवात असेल, पण ती शरणागती नाही. शरणागती म्हणजे माझे मला कळत नाही, माझ्या मनाचा मला भरवसा नाही, माझ्या बुद्धीची मर्यादा मला माहीत आहे आणि म्हणून मी आता तुमच्यावर सोडतो. हे ओठांवरी येणे सोपे पण मनाने म्हणणे हेच खरे कठीण आहे. कारण आपला अहंकार हे म्हणणे देत नाही. तो म्हणतो अरे, आपण काय कमी आहोत? आपण स्वतः करू.

दत्त महाराजांच्या परंपरेत एक गोष्ट नेहमी सांगितली जाते सद्गुरू हे आपल्याला नको त्या गोष्टी देत नाहीत, पण हव्या त्या गोष्टी आपल्याला तयार केल्याशिवाय देत नाहीत. म्हणजे काय? म्हणजे असे की आपण जेव्हा खऱ्या अर्थाने शरण जातो, तेव्हा सद्गुरू आधी आपल्या आतील अनावश्यक प्रश्न गोष्टी साफ करायला सुरुवात करतात. आणि हे साफ करणे सुखाचे नसते. जुन्या सवयी जातात, जुने आधार सुटतात, जे माझे वाटत होते ते एकेक करून निघून जाते. हे सुरू झाले की माणूस घाबरतो अरे, हे काय होतेय? मी शरण गेलो तर आणखी त्रास?

पण हाच तो क्षण असतो जेव्हा सद्गुरू खरे काम करत असतात. कुंभाराने मडके बनवताना आधी माती मऊ करावी लागते, चांगली तुडवावी लागते, मग आकार द्यावा लागतो, मग भट्टीत टाकावे लागते तेव्हा कुठे ते मडके पाणी धरायला तयार होते. आपले आयुष्यही असेच असते. सद्गुरूच्या हाती स्वतःला सोपवणे म्हणजे त्या मातीसारखे होणे जी स्वतःचा आकार विसरते आणि कुंभाराच्या हातात स्वतःला झोकून देते.

शरणागतीनंतर जे होते ते शब्दांत सांगणे कठीण आहे पण एक गोष्ट नक्की होते. भीती कमी होते. जी माणसे, जी परिस्थिती आधी असह्य वाटायची त्यांच्याकडे बघण्याची नजर बदलते. हे का झाले माझ्यासोबत? हा प्रश्न हळूहळू यातून मला काय शिकायचे आहे? असा होतो. हा बदल लहान वाटतो, पण हाच सर्वात मोठा बदल आहे. कारण प्रश्न बदलला की उत्तर बदलते, उत्तर बदलले की जगणे बदलते.

सद्गुरूला शरण गेल्यावर माणूस परिपूर्ण होतो असे नाही. चुका होतात, अडखळणे होते, मन पुन्हा भरकटते. पण फरक एकच असतो आता एकट्याने भरकटत नाही. सद्गुरू सोबत असतात. अंधारात चालताना दिवा हातात असेल तर वाट चुकत नाही असे नाही पण पडलो तरी उठता येते, कारण काय झाले ते दिसते. सद्गुरू हा असा दिवा आहे जो विझत नाही, जो थकत नाही, जो माघार घेत नाही… अगदी खरं आहे..

संकल्प करायला काय हरकत आहे मी आजपासून सद्गुरूवर विश्वास ठेवतो. माझ्या समजुतीपेक्षा त्यांची कृपा मोठी आहे. इतकेच पुरे आहे. बाकी सारे सद्गुरू पाहतात ना…

ll श्री गुरुदेव दत्त ll

ll दत्तरुप ll

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: स्वाती मंत्री

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted