सौ. अंजोर चाफेकर
विविधा
☆ यश कसे टिकवायचे? ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆
प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी झटत असतो. त्याचे अविरत कष्ट, त्याची हुषारी, नवनिर्मितीची प्रतिभा आणि नवीन शिकत राहण्याची जिज्ञासा या गुणांमुळे तो यशाच्या पाय-रा चढत जातो.
पण यश मिळाल्यावर ते टिकवायचे कसे?
यश मिळाले की त्याची धुंदी चढते.त्यातून अहंकार पोसला जातो. अहंकारातून उर्मटपणा येतो.दुसराला कमी लेखण्याची वृत्ती वाढते. मग जवळची माणसे जी तुमच्या यशात भागीदार होती, ती दुरावतात.
कितीतरी अभिनय सम्राट, सिनेसृष्टीतील यशस्वी तारे यांची उदाहरणे आहेतच.
यश आले की लोकांकडून अपेक्षा वाढतात. आणखी उंच जाण्याचा ताण वाढतो. वेगाने पुढे जाण्यासाठी कधी कधी स्वतःची मूल्ये बाजूला सारून अनैतिकता येते. कधी कधी हा ताण इतका असह्य होतो की आत्महत्येला प्रवृत्त होतो. मोठे बिल्डर्स, सिने प्रोड्यूसर्स कंपनीचे डायरेक्टर्स या ताणाला बळी पडतात.
कधी कधी यशामधे तुमचे भाग्य, तुम्हाला मिळालेल्या संधी यांचाही वाटा असू शकतो.परंतु आपण समजतो की माझ्यातील गुणांमुळेच व माझ्यातील असामान्य हुषारी मुळेच मला हे यश प्राप्त झाले आहे.
कितीतरी नवरे त्यांच्या पत्नीलाही क्रेडिट द्यायला तयार नसतात, जी पत्नी त्यांच्या पडत्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. ईश्वर तर पाठीशी असतोच. मनात नेहमी कृतज्ञता असावी म्हणजे अहम् पोसत नाही.
आणखी आणखी पुढे जाण्यात कधी कधी धोका आहे का याचा विचार करायला हवा.
कधी थोडे थांबून पुन्हा पहिल्यापासून विचार करावा.
उदा. एखादी कंपनी, इंडस्ट्री वाढविण्यासाठी मोठे भांडवल उभे करावे लागते. त्यासाठी लोन घ्यावे लागते. परंतु टेक्नाॅलाॅजी इतक्या झपाट्याने बदलते.
उदा. नोकियासारखी मोठी कंपनी, त्यांनी फोनचे प्राॅडक्शन वाढविण्यासाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली. आणि इंटेल कंपनीने मायक्रोप्रोसेसर आणल्यावर नोकियाच्या मोबाइल फोनची मागणी कमी झाली. शेवटी कंपनी बंद पडली.
म्युझिक क्षेत्रात आधी कॅसेटस होत्या, मग सी.डी. ज आल्या, आता पेनड्राइव.
आता काळा पांढरा टी.व्ही कोण घेणार? सर्वांना स्मार्ट टी.व्ही. हवा.
झेराॅक्स मशीनमधे किती बदल झाले.
त्यामुळे भांडवल घालताना पुढचा विचार हवा.
शिवाय कर्ज घेताना डेट/इक्वीटी रेशिओ तपासायला हवा.
कंपनी कितीही मोठी झाली तरी त्या कंपनीच्या कोअर व्हॅल्यूज, कंपनीची मूल्ये यांना धक्का पोचता कामा नये. याचे उत्तम उदाहरण म्हणजे टाटा उद्योग समूह.
मर्क या औषधांच्या कंपनीचा मोटो होता, “आम्ही हे कधीही विसरणार नाही की औषधे ही लोकांसाठी असतात. नफा कमावण्यासाठी नाही. नफा आपोआप पाठी येईल. “
परंतु कंपनी जसजशी मोठी होत गेली, त्यांची ही फिलाॅसाॅफी डायल्यूट होत गेली.आणि कंपनीचा करिष्मा कमी झाला.
कधीकधी अनेक अडचणी येतात. यशाचा मार्ग काट्यातूनच जातो. अशावेळी कुठलाही निर्णय घेताना शांतपणे घ्यावा. पॅनिक होऊन जर निर्णय घेतला तर तो चुकीचा असू शकतो. आपणच आपल्या पायावर धोंडा मारू नये.
शेवटी पडत पडतच शिकायचे आहे.
© सौ.अंजोर चाफेकर
मुंबई.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






