श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “कबुतर…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

सध्या सगळीकडे कबुतरांचाच विषय सुरु असल्याने आमच्याही गप्पांमधे तो आलाच. एखाद्या विषयावर जास्त चर्चा नको असेल तर आपण म्हणतो बास….. आता या विषयाला ऊगाचच खतपाणी घालू नका. हा कबुतरांचा त्यातही न्याय प्रविष्ट असल्याने आता या विषयाला खतपाणी ऐवजी ऊगाचच दाणापाणी घालू नका असं म्हणत विषय थांबवला.

पण एक मित्र होताच. त्याच लग्न झालेलं नाही. आणि आता होणं कठिण आहे. तो मधेच हा विषय परत काढायचा. थोडक्यात तो विषय थांबवा असं ठरल्यावर सुध्दा त्याला अनधिकृृपणे दाणापाणी मिळाल्यासारखं हा परत सुरु व्हायचा. पण हे दाणापाणी म्हणजे चर्चेला घातलेलं खतपाणी हे कबुतरांच्या विरोधासाठीच होतं.

कोणी, कोणावर, किती, कसं प्रेम कराव हे आपण ठरवू शकत नाही. पण शांतीदूत समजल्या जाणाऱ्या, एके काळी एकमेकांची पत्र पोहोचवत होती असा समज असणाऱ्या कबुतरांविषयी त्या मित्राला प्रेम नाही.

कारण एकेकाळी अशाच कबुतराच्या सहाय्याने अनेक वेळा अनेेक ठिकाणी पत्र पाठवण्याचा त्याने केलेला प्रयत्न या कबुतरांनी सफल केला नाही.

अशी कबुतरं त्याच्या घरासमोर, छपरावर बर्‍याचदा बसली. त्याच्या घराच्या वरच्या भागात त्यांनी घरं सुध्दा केली. पण याचं घर बसवायला त्यांची हवी ती मदत झाली नाही.

मी त्याला म्हणालो, अरे अशी पत्र पोहोचवणारी कबुतरे फक्त गोष्टीत नाहीतर सिनेमात असतात. प्रत्यक्षात असतील असं मला वाटत नाही. आणि असली तरी त्यांना तसं शिकवलं जात असेल.

त्यावर त्याच ऊत्तर. अरे शिकवल्यावर ते योग्य त्या ठिकाणी पत्र पोहोचवत असतील कबूल. पण न शिकवल्यामुळे त्यांनी चुकीच्या ठिकाणी पण माझी पत्र पोहोचवली नाहीत. मला पत्र पोहोचवणं महत्वाच होतं. ठिकाण बरोबर का चुकीच हे नंतर ठरवता आलं असत की.

अरे, दोनचार वेळा मी लिहिलेली ती गुलाबी कागदाची सुगंधित पत्रं घेऊन ते उडाले सुध्दा. काही वेळाने दोन कबुतर गुटर घू आवाज करत स्वतः भोवती गोल गोल फिरतांना सुुध्दा मी पाहिलं. मला वाटलं ते मलाच काहितरी सांगायचा प्रयत्न करताहेत. चला कुठेतरी पत्र पोहोचलं असं वाटून त्यांच्याच सारखा मी पण एकटाच माझ्या भोवती फिरलो. अगदी ‘ घालीन लोटांगण वंदिन चरण’ असं म्हणतांना गोल फिरतो, टाळ्या वाजवत नमस्कार करतो, तशाच टाळ्या वाजवल्या, नमस्कार पण केला, त्यांचे चरण पण पाहिले. पण……

पण काय?……. आमच्यातल्या एक दोन जणांनी अधिरतेने विचारलं….. कारण आता आम्हालाही ऊत्सुकता होती…….

अरे काही नाही. काही दिवसांनी मी वरच्या मजल्यावर गेलो तर तिथे यांची घरटी. आणि त्या घरट्यात पाहिलं तर खाली माझी सुगंधित पत्रं. म्हणजे माझं घर बसाव म्हणून लिहीलेल्या पत्रांनी यांनी यांचच घर सजवलं होतं. राग आला मला.

एकदा तर एक कबुतर माझं पत्र घेऊन गेल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं……

मग काय झालं…… परत आमची ऊत्सुकता जागी झाली.

काय झालं?…. दोनचार दिवसांनी एक लग्न पत्रिकाच समोर पडलेली दिसली……

आता त्याला चिडवण्याचा मुड एकाचा झाला. तो म्हणाला छानच झालं. अंधळा मागतो एक डोळा. देव देतो दोन डोळे. तू पत्र पाठवलं, तिकडून पत्रिकाच आली. मग झालं काय?…. का केलं नाहीस लग्न. ?

मुर्खा, पत्रिकेत नवरा दुसराच होता.

याच मित्राला कबुतरांचा दुसरा त्रास होता. तो त्यांच्या घाण करण्याचा. म्हणजे कबुतर बसायची शेजारच्या घरावर. पण घाण करायची याच्या दारासमोर. कुंपणाला आवडीने दिलेला लाल विटांसारखा दिसणारा रंग कबुतरांनी इतका घाण केला होता की तो रंग लाल दिसण्याएवजी आता पांढरा पण काळवंडलेल्या संगमरवरा सारखा वाटत होता. हे सांगतांना त्याने गाण्याची चालच वापरली. बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी. या धर्तीवर बसती कबुतरे शेजारी, घाण मात्र माझ्या दारी. असं म्हणाला. त्याचा राग स्वाभाविक होता.

अनेक कार्यक्रमात, शांतीदूत म्हणून कबुतरं उडवली जातात. अशा कार्यक्रमात तो आवर्जून कबुुतर उडवायला जायचा. न जाणो कबुतर उडवण्यामुळे तरी कोणी आपल्याला पाहिल आणि भेटायला येइल ही अपेक्षा. पण याची ही आशाही कबुतरांसारखीच हवेत उडाली. याला हवी असणारी शांती मिळालीच नाही. पण आता हा मात्र कबुतरांपासून शांती मिळावी म्हणून आलेली कबुतर उडवत असतो. आणि आत्ता कारण काहीही असो. पण हळूच म्हणतो, भगवान के घर देर है| अंधेर नही है|.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted