?१४ ऑक्टोबर  – संपादकीय  – श्री सुहास रघुनाथ पंडित ?

आज 14 ऑक्टोबर. सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक श्री.सुभाष भेंडे आणि थोर विचारवंत श्री.आ.ह.साळुंखे यांचा आज जन्मदिवस.

श्री.सुभाष भेंडे यांचा जन्म 14/10/1936 ला गोव्यातील बोरी येथे झाला. त्यांचे शिक्षण सांगली व पुणे येथे झाले. कीर्ती महाविद्यालय, मुंबई येथे त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून दीर्घ काळ सेवा केली.अर्थशास्त्रातील डॉक्टरेट संपादन केली असली तरी अंगभूत साहित्यिक गुणांमुळे त्यांच्या कडून विविध विषयांवरील सुमारे पन्नास पुस्तकांची निर्मिती झाली.अदेशी, अंधारवाटा, उध्वस्त, ऐंशी कळवळ्याची जाती, गड्या आपला गाव बरा, हास्यतरंग, दिलखुलास ही त्यातील काही पुस्तके. 2003साली कराड येथे भरलेल्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.तसेच 21 व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 13/12/2010 रोजी त्यांचे निधन झाले.

श्री.आण्णासाहेब हरी तथा आ.ह.साळुंखे यांचा जन्मही आजचाच. खाडेवाडी ता.तासगाव जि.सांगली येथे 1943 ला त्यांचा जन्म झाला. मराठी व संस्कृत या विषयात एम्.ए. व संस्कृत विषयात पी.एच्.डी. त्यांनी संपादन केली आहे. सातारा येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयात 32 वर्षे अध्यापनाचे कार्य केले. सुमारे साठ ग्रंथांचे लेखन त्यांच्या हातून झाले आहे. हे सर्व लेखन सांस्कृतिक परिवर्तनाचा पाया घालून विचारांना दिशा देणारे असे आहे. गौतम बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणारे थोर विचारवंत अशी त्यांची ख्याती आहे. विचारवेध संमेलन, सत्यशोधक संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन, शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद अशा अनेक ठिकाणी त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे.

समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यासंबंधी बुद्धीवादी विचार प्रवर्तन  व प्रत्यक्ष कार्य करणारे थोर विचारवंत कै.रघुनाथ धोंडो कर्वे यांचा आज स्मृतीदिन. (1953) गणित विषयातील प्रावीण्याशिवाय समाज प्रबोधनाचे फार मोठे कार्य त्यांनी केले आहे.त्यांच्या काही कलाकृती… संततिनियमन -विचार आणि आचार, गुप्तरोगापासून बचाव, आधुनिक कामशास्त्र, आधुनिक आहारशास्त्र यावरून त्यांच्या कार्याची कल्पना येईल.

साहित्यसम्राट न. चि. केळकर यांचा आज स्मृतीदिन (1947).केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांचे 41 वर्षे संपादन, नाटक, निबंधलेखन, सुभाषिते, विनोद अशा सर्व प्रांतात त्यांनी विपुल लेखन केले आहे.अमात्य माधव, तोतयाचे बंड, चंद्रगुप्त, यासारखी नाटके,ग्यारीबाल्डीचे चरित्र, लोकमान्यांच्या चरित्राचे दोन खंड, भारतीय तत्वज्ञान,मराठे आणि इंग्रज, ज्ञानेश्वरी सर्वस्व, हास्य विनोद मिमांसा, अशा पुस्तकांची निर्मिती त्यांच्या नावावर आहे.

थोर इतिहास संशोधक सेतु माधवराव पगडी यांचा आज स्मृतीदिनानिमित्त. (1994) ते महाराष्ट्र राज्याचे सचीव म्हणून कार्यरत होते. त्याशिवाय इतिहास संशोधनासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले. विशेषतः शिवकालीन इतिहास हा त्यांचा आवडता विषय होता. त्यांना पद्मभूषण या नागरी किताबाने  गौरवण्यात आले होते.

वरील माहिती विविध लेख,व इंटरनेट वरून उपलब्ध झाली आहे.

सुहास रघुनाथ पंडित

(संपादक मंडळासाठी)

ई अभिव्यक्ती मराठी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments