श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २७ सप्टेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

कविता महाजन

मराठी साहित्यात वैचारिक बंड करून स्वतःचे निशाण अल्पायुष्यात फडकवणा-या कविता महाजन यांनी काव्यलेखनाने प्रारंभ  करून  पुढे साहित्याच्या विविध प्रांतात लेखन केले. कविता, कादंबरी, कथा, बालसाहित्य व अनुवादित साहित्याची निर्मिती करून त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. त्यांच्या बालसाहित्याचे वैशिष्ट्य असे की त्यांनी ते लेखन, चित्रे, फोटोग्राफी, कॅलिग्राफी अशा विविध माध्यमातून सादर केले आहे. तसेच ‘भारतीय लेखिका ‘या पुस्तकातून त्यांनी अनेक भारतीय भाषांतील लेखिकांचा परिचय करून दिला आहे. त्यामुळे मराठी साहित्यातील हे एक महत्त्वाचे पुस्तक म्हणावे लागेल. त्यांनी आदिवासी प्रदेशात काम करून तेथील समाजजीवनाचा अभ्यास केला होता. त्यातूनच पुढे वारली आणि आदिवासी लोकगीतांचे संकलन त्यांच्या कडून पूर्ण झाले. आणखी एक वेगळा पैलू म्हणजे त्यांनी पाकशास्त्रासंबंधीही लेखन केले व तेही अत्यंत गांभीर्याने लिहीलेले आहे. ‘समुद्रच आहे एक विशाल जाळं’ या दीर्घकवितेने त्यांचे काव्यलेखन उच्च पातळीवर जाऊन पोहोचलो आहे.

‘ब्र’ आणि ‘भिन्न’ या त्यांच्या दोन कादंब-यांनी   त्यांना कादंबरी विश्वात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. ब्र ही कादंबरी महिला सरपंच व त्यांचे अनुभव विश्व या विषयावर आहे. भिन्न या कादंबरीतील त्यांनी एच्. आय. व्ही. बाधित व एडस् ग्रस्तांचे चित्रण केले आहे. अत्यंत वेगळ्या विषयावरील या दोन कादंब-यांमुळे एक बंडखोर लेखिका म्हणून त्या प्रकाशात आल्या.

या लेखना बरोबरच त्यांनी अन्य भाषांतील साहित्यही अनुवादित केले आहे. शिवाय संपादनाचे कामही केले आहे.

कविता महाजन यांची साहित्य संपदा याप्रमाणे :

काव्यसंग्रह:

तत्पुरुष, धुळीचा आवाज, मृगजळीचा मासा

कादंबरी:

ठकी आणि मर्यादित पुरूषोत्तम, ब्र, भिन्न.

बालसाहित्य:

कुहू(मल्टीमिडीया कादंबरी), जोयानाचे रंग, वाचा जाणा करा, बकरीचं पिलू(जंगल गोष्टी)

कथासंग्रह:(अनुवादित)

अनित्य, अन्या ते अनन्या, अंबई:तुटलेले पंख, आग अजून बाकी आहे, रजई, वैदेही यांच्या निवडक कथा  इ.

लेखसंग्रह:

ग्राफिटीवाॅल, तुटलेले पंख(संपादित)

चरित्र: तिमक्का, पौर्णिमादेवी बर्मन.

अन्य:

वारली लोकगीते

पाकशास्त्र:

समतोल खा, सडपातळ रहा

प्राप्त पुरस्कार:

न. चि. केळकर पुरस्कार

काकासाहेब गाडगीळ पुरस्कार

ना. ह. आपटे पुरस्कार

कवयित्री बहणाई पुरस्कार

यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाड्मयनिर्मिती पुरस्कार,

साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार(रजई),

साहित्य अकादमी पुरस्कार. (ब्र या कादंबरीसाठी)

त्यांचे हेही अन्य भाषांत अनुवादीत झाले आहे.

“बायकांचे पाय भूतासारखे उलटे असतात, कुठेही जात असले तरी ते घराकडेच वळत असतात.”

‘ब्र’ या कादंबरीतील हे वाक्य त्यांच्या लेखनातील वेगळेपण दाखवून देते.

भिन्न वृत्तीच्या या लेखिकेचे वयाच्या अवघ्या एकवनाव्या वर्षी 2018मध्ये निधन झाले. आज त्यांचा स्मृतीदिन आहे. त्यांच्या स्मृतीस अभिवादन! 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकिपीडिया, महाराष्ट्र टाईम्स.काॅम, कविता कोश

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments