श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “भारतीय सैन्याचा निडर चेहरा!” – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके

(साहेबांचा जीवाभावाचा साथीदार लान्स नायक आवेश कुमार साहेबांसोबत होता… त्या घरावर अधून मधून एक एक फैर झाडत आवेश कुमार पुढे सरकत होते… सायंकाळचे साडेसहा वाजले होते… अंधार झाल्यावर मोहीम आणखी किचकट व्हायची शक्यता होती.) 

इथून पुढे – —- 

आय. ई. डी. अर्थात इम्प्रोवाईज्ड एक्सप्लोजीव डिवाईस घराच्या दरवाजाजवळ लावायचे… रिमोटने त्याचा स्फोट घडवून आणायचा… त्या घराला भगदाड पडले की त्यातून आत शिरायचे आणि अतिरेक्यांना शोधून ठार मारायचे! अर्थात अतिरेकी सुद्धा प्रशिक्षित असतात… त्यांनी भारतीय सेनेची ही चाल ओळखली… त्यांचा गोळीबार एक मिनिट थांबला… याचाच अर्थ ते दोघे जागा बदलण्याच्या प्रयत्नात होते… स्फोटक लावल्यावर साहेब आणि आवेश कुमार तिथून मागे सरले… कानठळ्या बसवणारा मोठा स्फोट झाला… त्या घराचा दरवाजा उध्वस्त झाला… पण या गडबडीत एक अणकुचीदार दगड उडाला तो थेट मेजर साहेबांच्या हेल्मेटच्या अगदी खालच्या भागात डोक्याला लागला… मोठी जखम झाली… कारण दगडाने नेमकी एक रक्तवाहिनी फोडली होती… आवेश कुमार यांनी साहेबांना तेथून औषधोपचारासाठी हलवण्याचा मनोदय बोलून दाखवताच… साहेबांनी त्यास नकार दिला! एका सैनिकाने त्यांच्या डोक्याला मलमपट्टी केली. पंधरा मिनिटे गेली… वरून पुन्हा दोन रायफली धडाडू लागल्या! अंधार झाला होता. आता आणखी काहीतरी करणे भाग होते! यावेळी मेजर ऋषी साहेबांनी एक वेगळे शस्त्र हाती घेतले… पेट्रोल भरलेल्या आणि त्यात घासलेटमध्ये भिजवलेल्या कापडी वाती. जगभरात हिंसक निदर्शनात हे आयुध भलतेच प्रभावी ठरले आहे.. याला मोलोटोव कॉकटेल म्हणतात! या बाटल्या आत फेकल्या की फुटतील आणि त्यातून निर्माण होणारी आग आणि धूर यांमुळे आत थांबणे अशक्य होईल… अशी योजना होती. बिळात लपलेल्या विषारी सापाला असे धुराने बाहेर काढावे लागते! साहेबांनी पुन्हा घराकडे धाव घेतली… किचनमध्ये एक बाटली फेकली… आतमध्ये आणखी काही बाटल्या फेकल्या… घरातील कारपेट, कापडाने पेट घेतला… आता अतिरेक्यांना दुस-या मजल्यावरून उड्या घेतल्याशिवाय गत्यंतर राहणार नव्हते! त्यांच्या स्वागतास भारतीय रायफल्स सज्ज होत्या! पण त्या घराची आग विझली! हा प्रयत्न वाया गेला होता! आता आणखी काहीतरी केलेच पाहिजे!

मध्यरात्र उलटून गेली होती. कर्नल पांडे साहेबही तिथे पोहोचले होते. ऋषीसाहेबांनी त्या घरात घुसून आणखी आय. ई. डी. लावण्याचा निर्धार केला. डोके रक्ताने भिजलेले… बराच रक्तस्राव झालेला… पण साहेब कुठेही थकलेले दिसले नाहीत… दुस-या कुणाला आय. ई. डी. लावायला आत पाठवावे हा सल्ला त्यांनी मानला नाही… म्हणाले… हे माझे मिशन आहे… मीच संपवणार! हे दोघे अतिरेकी निसटून जाता कामा नयेत!

मेजर ऋषी साहेबांनी पंधरा किलोचे दोन आय. ई. डी. नेण्याचे ठरवले… पहिला आय. ई. डी. हातात घेताच… त्यांना त्यांच्या मातोश्रींची आठवण आली… कसे कुणास ठाऊक त्या मध्यरात्रीही मातोश्री राजलक्ष्मी जाग्याच होत्या… साहेबांनी मोबाईलवरून घरचा नंबर डायल केला… पण त्यांचे बोलणे आईच्या कानांना ऐकूच गेले नाही… पण हृदयाला मात्र गेले असावे!

वरच्या मजल्यावरून येणारा फायर आता सातत्याने येऊ लागला… दोघे आलटून पालटून भयावह गोळीबार करीत होते… साहेब दोन्ही हातात पंधरा पंधरा किलोचे आय. ई. डी. घेऊन सावधपणे पोटावर सरपटत त्या उध्वस्त झालेल्या दरवाज्यातून शिरले… आवेश कुमार सोबत येऊ पहात होते… त्याला त्यांनी बाहेरच थांबायला भाग पाडले.. मोहिमेत त्याला काही झाले तर? त्याच्या घरच्यांना काय सांगणार? सोबतच्या कुणाही जवानाच्या जीविताला धक्का लागणार नाही, अशी खात्रीच साहेबांनी मोहीम सुरु करताना दिली होती.. ! लढ्यात सर्वांत पुढे मीच असणार!

ऋषीसाहेब आत शिरले… तळमजल्यावर एका जागी आय. ई. डी. लावले आणि मागे फिरले… तीस सेकंद होताच स्फोट होणार होता… सुरुवातीला लावलेल्या एका आय. ई. डी. पेक्षा या दोन स्फोटकांचा परिणाम दुप्पट होणार होता… वीस सेकंद झाले आणि ऋषी साहेबांच्या मनात आणखी काहीतरी आले… आपण लावलेले आय. ई. डी. त्या घरात आणखी आत लावले तर अपेक्षित परिणाम साधला जाऊ शकेल… त्यांनी स्फोट घडवून आणू नका असा आदेश दिला!

साहेब सरपटत पुन्हा आत शिरले… ती स्फोटके उचलणार इतक्यात त्या अंधारात वरच्या मजल्यावरून खाली सरकणारी एक सावली त्यांना दिसली… तोंडाच्या अगदी जवळ… रायफल धडाडली… एका गोळीने डोक्यावरचे हेल्मेट उडवून लावले… दुसरी गोळी साहेबांच्या नाकाचा डावा भाग भेदून गेली… तिसरीने जबडा तोडला.. नाक राहिलेच नाही… डोळा अगदी थोडक्यात बचावला… पण डोळयांखालचा चेहराच राहिला नव्हता… त्याही स्थितीत साहेबांनी त्या आकृतीवर एक मोठी फैर झाडली… एक अतिरेकी खतम झाला होता!

बाहेर उभे असलेले आवेश कुमार आत धावले… साहेबांनी त्यांना खुणेनेच थांबवले… दुसरा अतिरेकी अजून जिवंत आहे! तो अतिरेकी खाली येऊ शकतो… त्याचा गोळीबार सुरूच आहे… कवर फायर घेत, आपल्या हातात आपला चेहरा घेऊन मेजर ऋषी रांगत, सरपटत बाहेर आले… ! निसर्गाची किमया म्हणावी… मोठी जखम झालेली शरीराला लगेच जाणवत नाही.. वेदना जणू काहीकाळ थबकून राहतात! एका कोपरावर सरपटत साहेब पुढे आले… एक मीटर उंचीच्या कुंपणावरून त्यांनी स्वत:ला खाली लोटून दिले! आणि उभे राहिले! त्यांना सावरण्यासाठी पुढे आलेल्या सैनिकांनी आ वासला… साहेबांचा चेहरा? तिथे फक्त मांसाचा गोळा होता! प्राथमिक उपचार करण्याच्या पलीकडे परिस्थिती होती… वैद्यकीय साहाय्यक हादरून गेले होते… मेजर साहेबांना लष्करी जीपमधून जवळच्या हेलिपॅडपर्यंत नेण्यात आले… रात्रीची वेळ असल्याने लष्करी वाहने अडवून धरणारे दगडफेकी लोक सुदैवाने तिथे नव्हते… रूग्णालयापर्यंतचा प्रवास वेदनेने चिंब भिजलेला होता… लष्करी रुग्णालयात निरोप गेला होता… ९२, बेस हॉस्पिटल, श्रीनगर येथे मेजर सौ. अनुपमा नायर त्या रात्री ड्युटी करून घरी गेल्या होत्या… आणि ऋषी साहेबांच्या गुड नाईट फोनची प्रतिक्षा करीत होत्या… त्यांनी त्वरीत गणवेश चढवला आणि त्या रुग्णालयात पोहोचल्या.. ! मेजर ऋषी चक्क बसलेल्या अवस्थेत रुग्णवाहिकेतून आले होते… त्यांच्या जखमा पाहून डॉक्टर्स विचारात पडले होते… इथे यावर काहीही उपचार करणे अशक्य आहे… अशी त्यांची खात्री होती.. पण त्याहीपेक्षा तो चेहरा पाहून तेही हबकून गेले होते! मेजर साहेबांनी त्यांना थम्स अप केले! आणि डॉक्टरांचा हात हाती घेतला… जणू सांगत होते… मी ठीक आहे.. मी ठीक होईन.. तुम्ही चिंता करू नका!

डोक्याला झालेल्या जखमेतून आधी झालेला रक्तस्राव आणि आता झालेल्या भयावह जखमांतून होत असणारा रक्तस्राव डॉक्टरांना काळजीत पाडणारा होता. हा रुग्ण बेशुद्ध झाला तर समस्या वाढणार होती. त्याला झालेल्या जखमा जर त्याने पाहिल्या असत्या, त्याला समजल्या असत्या तर त्याचा मानसिक ताण येऊन अधिक रक्तस्राव होण्याची शक्यताही अधिक होती. रक्तस्राव थांबवण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न झाले आणि दिवस उजाडताच हवाई दलाच्या विशेष विमानाने मेजर साहेबांना दिल्लीच्या लष्करी रुग्णालयात धाडण्यात आले! याच दिवशी पाकिस्तानी अतिरेकी संघटनांनी त्यांचे दोन खासे जिहादी हाफिज मोहम्मद आकीब उर्फ आकीब मौलवी आणि सैफुल्ला उर्फ उसामा हे भारतीय सैन्याकडून मारले गेल्याचे जाहीर केले… मेजर ऋषी यांनी केलेल्या या शिकारी होत्या… एक मोठे यश होते हे!

दिल्लीच्या रुग्णालयात ऋषी साहेबांनी कित्येक दिवस प्रचंड वेदना सहन केल्या… त्यांच्या चेह-यावर तब्बल २८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. एका मोठ्या शस्त्रक्रियेनंतर किमान दोन महिने लागायचे त्या जखमा ब-या व्हायला… वेदनांचा लांबचा प्रवास होता हा. त्यांच्या शरीरातील एक हाड काढून ते जबड्यात बसवण्याचाही प्रयत्न झाला. पंचेचाळीस दिवस ते एक शब्दही उच्चारू शकले नाहीत. दातांनी चावून अन्न खाण्याची तर सोयच नव्हती… अन्न रबरी नळीतून पोटात घातले जात होते. पण हे सर्व होत असताना साहेबांचा दिसू शकणारा चेहरा कधी उदास दिसला नाही. इतरांना त्यांच्या त्या भगदाड पडलेल्या चेह-याकडे पाहणेही अवघड होते पण साहेब मनातून पुन्हा काश्मीरमध्ये परतण्याचा विचार करीत होते… कारण सैनिक खरा शोभतो तो रणांगणामध्येच.

मातोश्री राजलक्ष्मी त्यांना भेटायला रुग्णालयात आल्या तेंव्हा त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही… डोळ्यांतून आसवे गाळली नाहीत… लेकाला वाईट वाटू नये म्हणून. पण पुढे कधीतरी मॉडेलिंगच्या क्षेत्रात नशीब आजमावून बघण्याची स्वप्ने पाहिलेल्या मुलाच्या चेह-याची अशी दुरवस्था पाहून त्या मनातून खचल्या मात्र असतील… पण आपल्या मुलाचा जीव वाचला याचे समाधानसुद्धा त्यांना होतेच. मेजर साहेबांच्या तब्येतीची चौकशी करणारे शेकडो फोन त्राल गावातून केले जात असत… हमारे खान साहब को वापस भेजो.. हम उन्हें ठीक कर लेंगे! अशी आर्जवे लहान मुलं करीत असत… इतका विश्वास ऋषी साहेबांनी प्राप्त करून ठेवला होता!

भारताचे तत्कालीन सेनाप्रमुख आणि पुढे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी विराजमान झालेले दिवंगत बिपीनजी रावत साहेब मेजर ऋषी यांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले असताना… ऋषी साहेबांच्या डोळ्यांत आसवे तरळली… कारण आपले सेनाप्रमुख उभे आहेत आणि आपण त्यांना उभे राहून सल्यूट करू शकत नाही! मेजर साहेबांची कहाणी समजावून घेतल्यानंतर रावत साहेबांनी उत्स्फूर्तपणे त्यांना ‘सर्वांत नीडर सैनिक’ अशी उपाधी दिली!

ऋषी यांनी या दुखण्यातून सावरण्यासाठी दिवस-रात्र परिश्रम घेतले… आणि सैनिकी सेवेत पुन्हा पाऊल ठेवले… फक्त एकच बदल झाला होता… चेह-याचा हनुवटी ते नाकापर्यंतचा संपूर्ण भाग झाकणारा मुखवटा त्यांनी कायमचा अंगिकारला! हाच मुखवटा परिधान करून त्यांनी सेना मेडल पुरस्कार स्वीकारला!

मेजर साहेबांना बढती मिळून ते लेफ्टनंट कर्नल झाले असून त्यांना काश्मिरात पुन्हा जायची आंतरिक इच्छा आहे… त्राल गाव आणि तेथील नागरीकांवर त्यांचा जीव जडला आहे. सध्या त्यांना त्यांच्या जन्मभूमीची, केरळची राजधानी असलेल्या थिरूवनंतपुरम येथील पान्गोडे लष्करी प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक केली गेली आहे. तिथे ते लष्करी जवानांना प्रशिक्षित करत असतात. गेल्या वर्षी ऑगस्ट, २०२४ मध्ये वायनाड गावात भयावह भूस्ख्लन झाले. त्या गावात बचाव कार्य करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी लेफ्ट. कर्नल ऋषी राजलक्ष्मी साहेबांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पाडली गेली. ऋषीसाहेब स्थानिक जनतेमध्ये, विशेषत: तरुणांमध्ये खूप प्रिय असून ते महाविद्यालये, सामाजिक संस्थांमध्ये अजून स्फूर्तीदायक व्याख्याने देत असतात… त्यांनी त्यांची शरीरसंपदा अतिशय उत्तम राखली असून त्यांच्यापासून युवक प्रेरणा घेत आहेत… काळा मुखवटा (मास्क) परिधान केलेला असला तरी भारतीय सेनेचा हा सर्वांत सुंदर चेहरा राष्ट्रप्रथम भावनेच्या तेजाने लखलखत असतो… जयहिंद साहेब… तुम्ही ऋषी आहात.. तुम्हांला राजलक्ष्मी प्रसन्न आहे… आणि नायर म्हणजे नायक हे कुलनाम तुम्ही यथार्थ ठरवलेले आहे! खूप खूप शुभेच्छा!

– समाप्त –

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted