श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

पर्यावरणाचे सदिच्छादूत : दिलीप आणि डॉ. सौ. पौर्णिमा कुलकर्णी– भाग – २ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

(आपण शहरात राहूनही पर्यावरणस्नेही जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकतो. आपल्या गरजा आणि उपभोगवादी प्रवृत्ती आपल्याला कमी आली पाहिजे. प्लास्टिक, कागद इ सारख्या वस्तूंचा अनावश्यक वापर टाळला पाहिजे. पाणी जपून वापरले पाहिजे.)  इथून पुढे – – 

ते आपल्याला चार R सांगतात. पहिला R म्हणजे ज्या गोष्टी पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहेत, ज्यांचे लवकर विघटन होत नाही, अशा वस्तुंना refuse करा म्हणजेच नाही म्हणा. जर ते शक्य नसेल तर दुसरा R म्हणजे reduce म्हणजे त्या वस्तूचा कमीतकमी वापर करा. तिसरा R म्हणजे reuse. त्या वस्तूंचा पुनर्वापर करा. आणि चौथा R म्हणजे recycle. म्हणजे त्या वस्तूंचा वापर पुनर्निर्माणासाठी करा. उदा. कागदाची रद्दी रद्दीवाल्याकडेच द्या जेणेकरून त्यापासून नवीन कागद निर्मिती होईल. अधिक वृक्षतोड करावी लागणार नाही.

दिलीपदादा आणि पौर्णिमाताई ज्याला आपण लाल डबा म्हणून हिणवतो त्या लाल बसनेच प्रवास करतात. जवळ जायचं असेल तर शक्यतो पायीच जातात. त्यापेक्षा जास्त अंतर असेल तर सायकल वापरतात. लांबच्या अंतरासाठी लाल बसचा वापर करतात. ए सी तर नाहीच नाही. बसच्या प्रवासात काढलेलं तिकीट सुद्धा ते जपून ठेवतात. त्याच्या पाठकोऱ्या भागाचा त्यांना काहीतरी लिहिण्यासाठी उपयोग होतो. ते तिकीट नंतरही ते फेकून देत नाहीत. रद्दीच्या कागदाची एक पिशवी त्यांनी केली आहे. त्यात ते ठेवतात. पुरेशी रद्दी साठल्यावर रद्दीवाल्याला देऊन टाकतात. त्यांना अमेय आणि सृजन अशी दोन मुले आहेत. अमेय पुण्यात बी एस्सी करतो. सृजन दापोलीच्या शाळेत शिकतो. दोघंही सायकल वापरतात किंवा आपल्या आईवडिलांप्रमाणे बसचा वापर करतात. आपल्या आईवडिलांची साधी जीवनशैली त्यांनीही अंगिकारली आहे. ही दोन्ही मुले इतर सर्वसामान्य मुलांसोबत सरकारी मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकली. समाजाच्या सर्व स्तरातील मुलांसोबत त्यांना मुक्तपणे शिकू दिले, खेळू दिले. समाजाच्या, निसर्गाच्या सान्निध्यात ती वाढतील याची काळजी घेतली.

जीवन जगण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतात असे विचारल्यावर दिलीपदादा हसत हसत म्हणतात. आम्हाला महिना पाच हजार रुपये खूप होतात. त्यातूनही पैसे उरतात. शिवाय आता पुस्तकांची रॉयल्टी, व्याख्यानांचे मानधन वगैरे धरून दहा बारा हजार रुपये मिळतात. एवढ्या पैशांचं काय करायचं हा प्रश्नच पडतो. ते म्हणतात, ‘ अर्थार्जन करायचं ते केवळ उदरनिर्वाहासाठीच! अनावश्यक वस्तूंचा संग्रह करायचा नाही. तुम्ही आम्ही तर चपला, बूट, कपडे, फर्निचर इ. वस्तूंचा किती अनावश्यक साठा करतो. निसर्गाच्या सान्निध्यात जीवन जगायचं. बागकाम करायचं. त्यानं आनंद मिळतो. माणूस हा दिनचर प्राणी आहे. निशाचर नाही. त्यामुळे दिवसा काम करावं. रात्री जागत बसून विजेचा अपव्यय करू नये. दिवसाचा प्रकाश डोळ्यांसाठी चांगला असतो. रात्री काम करण्याने संगणक, मोबाईल वापराने डोळ्यांवर ताण पडतो. दिवसा उपलब्ध असलेल्या सूर्यप्रकाशाचा भरपूर वापर करून घ्यावा. कपडे वाळवण्यासाठी वॉशिंग मशीन न वापरता सूर्यप्रकाशात ते वाळवावेत. भांडी घासण्यासाठी राखेचा वापर करावा म्हणजे तेच सांडपाणी बागेला वापरता येते. शहरातील लोक पाण्याची अक्षरशः नासाडी करतात. कपडे, भांडी धुण्यासाठी नळ सुरूच ठेवतात. गाडी धुण्यासाठी मुबलक पाणी वापरतात.

त्याऐवजी बादलीत पाणी घेऊन गाडी ओल्या फडक्याने पुसली तर कमी पाण्यातही स्वच्छ करता येते. अंघोळीसाठी साबण वापरण्याची आवश्यकता नाही. साबण वापरला नाही तर अर्धी बादली पाण्यातसुद्धा छान अंघोळ होते. शिवाय ते पाणी झाडांना वापरता येते. दिलीपदादा आणि पौर्णिमाताई स्वयंपाकासाठी गॅसचा वापर करत नाहीत. ते वाळलेल्या काटक्या किंवा तुटलेल्या फांद्यांचा वापर करून चुलीवर स्वयंपाक करतात. त्याशिवाय सोलर कुकर स्वयंपाकासाठी वापरतात. त्यांच्या घरात टीव्ही नाही, मिक्सर नाही. बातम्या कळण्यासाठी आणि करमणुकीसाठी एक रेडिओ फक्त आहे. ताक रवीने घुसळतात. काही वाटायचे असले तर पाट्या वरवंट्यावर वाटतात. असे करण्यासाठी कष्ट जरूर पडतात, वेळ लागतो पण त्यातून त्यांना एक वेगळा आनंद मिळतो. शिवाय शारीरिक व्यायाम होतो. महिन्याकाठी जेमतेम एक ते दोन युनिट ते वीज वापरतात. त्याचे सत्तर पंचाहत्तर रुपये बिल येते तेवढेच. पण ते गमतीनं म्हणतात, ‘ आम्ही टाटा अंबानींपेक्षा महागडी वीज वापरतो. एका युनिटला सत्तर रुपये! ‘ 

जीवन जगण्याची काही सूत्रे त्यांनी ठरवली आहेत. त्याप्रमाणे आधी ते वागतात आणि मगच लोकांना सांगतात.

सूर्योदवपूर्वी उठावेच. अनेशापोटी काही व्यायाम वा योगासने करावी. ट्रेडमिलवर व्यायाम करणे त्यांना मंजूर नाही कारण त्यासाठी विनाकारण विजेची नासाडी होती. त्यापेक्षा फिरायला जाणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. त्यामुळे निसर्गाचे सान्निध्यही लाभते. दिवसातून एखादा तास तरी थोडा घाम येईपर्यंत काही शारीरिक कष्टाचे काम करावे. त्यामुळे आरोग्य चांगले राहते. झाडं, माती, पालापाचोळा म्हणजे घाण नाही. जे बायो डिग्रेडेबल आहे त्यामुळे रोग होत नाहीत. माती, पालापाचोळा यांना रोज एकदा तरी हात लागलाच पाहिजे. घरात नैसर्गिक खेळती हवा आणि पुरेसा उजेड असावा. पंख्याची गरज भासू नये आणि गरज लागलीच तर अगदी कमीतकमी वापर करावा. ए सी चा वापर तर नकोच. माठातील पाणी प्यावे. फ्रीजचा वापर टाळावा. ताजे अन्न, फळे, भाजीपाला खावा. शक्यतो घरीच जेवावे. बाहेरचे खाऊ नये. प्रवासात जाताना सुद्धा दिलीपदादा आणि पौर्णिमाताई स्टीलचे ग्लास सोबत नेतात. त्यातच ते चहावाल्याकडून चहा घेतात. चहासाठी कागदी वा प्लास्टिकचे मग वापरून पर्यावरणाची हानी करणे त्यांना मान्य नाही. दुपारी सूर्य डोक्यावर आला की जेवावं आणि संध्याकाळी अंधार पडण्याआधी जेवून घ्यावं. रात्र ही विश्रांतीसाठी आहे. दिसामाजी काहीतरी ते लिहावे या समर्थांच्या उक्तीचं ते पालन करतात. ते म्हणतात गरज आणि हाव यात आपल्याला फरक करता आला पाहिजे. निसर्ग आपल्या गरजा भागवू शकतो पण आपली हाव मात्र तो पुरी करू शकत नाही. आपल्या उत्पादन वाढीच्या आणि हावेच्या लालसेमुळे निसर्गाला आपण ओरबाडतो आहोत. पुढच्या पिढ्यांसाठी आपण काही ठेवणार आहोत की नाही?

त्यांचं एकंदरीत वागणं आपल्यासारख्या शहरी जीवनमान अंगवळणी पडलेल्या लोकांना विचित्र वाटेल. उपभोगासाठी विविध वस्तूंचा संचय करणाऱ्या आणि त्यासाठी भरमसाठ पैसा खर्च करणाऱ्या आपल्यासारख्यांना त्यांची जीवनशैली पचनी पडणार नाही. पण हे लक्षात घ्यायलाच हवे की हे दोघे उच्चशिक्षित आहेत. केवळ मी पर्यावरणस्नेही वागून असा कितीसा फरक पडणार आहे असा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी सुरुवात स्वतःपासून केली. गांधीजींचे फोटो लावून व्यासपीठावर त्यांच्यावर बोलणाऱ्या आपल्यासारख्या लोकांपेक्षा गांधीजींच्या तत्वांचे खरे अनुकरण या दोघांनी केले आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. या दोघांची आध्यात्माची बैठकही पक्की आहे. विचारांची बैठक पक्की आहे. एकदा ठरवले की ते निर्धाराने करतात. गेली पंचवीस वर्षे ते ही जीवनशैली जगत आहेत. अनेक मंडळी आवर्जून त्यांचं घर, त्यांची जीवनशैली पाहायला जातात. अशा व्यक्तींचंही ते स्वागत करतात. त्यांचे ‘ स्वप्नामधील गावा ‘ हे पुस्तक त्यांना असे जीवन जगताना आलेले अनुभव आपल्याला सांगते. ‘ *थेंबांनी जर भरते घागर, का उधळावा उगाच सागर*? ‘ हे त्यांचे तत्वज्ञान आपणही एकदा जरूर विचार करावा असे आहे.

 समाप्त

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted