प्रा.भारती जोगी
इंद्रधनुष्य
☆ “ग्रंथालयाचे मनोगत” – लेख क्र. १७ ☆ प्रा.भारती जोगी ☆
” मुसळधार पाऊस बघतीयेस ना खिडकीतून… मग असाच साहित्य-संस्कृतीचा ही अखंड पाऊस आहे. आत.. प्रवेश करून पहा की जरा!
हात लांबव, काढ त्या कपाटातील पुस्तकं, झटक त्यांची धूळ, फिरव त्यावर पारखी नजर, आणि मग…
पहा त्या सगळ्यांची आठवण येते का?
पैस, शेला, मृद्गंध, विशाखा,
व. पु, पुल अन् अत्रे,
आंबेडकरांचे ‘राजगृह‘, अन् सावरकरांच्या कविता!
दुर्बोध ग्रेस, अन् सुबोध बहिणाबाई
. .. शांताबाईंच्या शब्द खुणा अन् महानोरांची हिरवी बोली.
प्राचीन ग्रंथांचा सांस्कृतिक ठेवा, धार्मिक, सामाजिक, पौराणिक वारसा…
हे सगळं आणि अशी कितीतरी अफाट, अमाप, अगणित मेळविलेली अक्षरे डोळ्यांनी प्यायलीस ना आजवर… पोहोचवलीस, उतरवलीस ना थेट हृदयांतरी!….
मग… आता…
माझ्या जिरत्या पानांशी तुझी कां न उरली मैत्री?
कां दिवसेंदिवस आम्ही ओस पडत चाललो आहोत. बंद पडायच्या वाटेवर आहोत? अगं, काय सांगू…
“ग्रंथालयातील पुस्तकांचा श्वास रोज येतो कंठी
वाचकहो, तुमच्या साठी, वाचकहो तुमच्या साठी!
मान्य आहे गं मला, आज काळ बदलला. डिजिटल युग आलं. E Book चा जमाना आला. ग्रंथालयातील पुस्तके भ्रमण ध्वनीत एका टचवर मागे पुढे होऊ लागली. किंडल मध्ये नव्या रूपात, नव्या परिवेषात उभी राहिली. पण तुम्ही लोक एक महत्वाची गोष्ट विसरता की, आज माहितीचा प्रचंड स्फोट झालेल्या या युगात… मीच… म्हणजे ग्रंथालयच सत्य आणि असत्य यामधील फरक ओळखून योग्य माहिती मिळविण्याचे योग्य आणि विश्वसनीय साधन आहे. ग्रंथालय हे फक्त पुस्तक घर नसून ते एक संस्कार केंद्र आहे. विचारांची देवाणघेवाण, चिंतन, मनन, सर्जनशीलतेला चालना देणारे आलय आहे.
पुस्तके ही ज्ञानाचा अथांग सागर आहे आणि ग्रंथालय हे त्यांचे बंदर आहे.
हे विसरू नकोस ना!
माझ्या पुस्तकांनी काळानुरूप झालेला बदल ही स्विकारलायं ना… मग तुम्ही ही एक लक्षात घेतले पाहिजे की…
ग्रंथालयांच्या मदतीने, पुस्तकांच्या सहवासात, शांत, स्थिर वातावरणात मानसिक समाधान मिळवत… तुम्ही ग्रंथालय- पुस्तके-वाचक… हे अ-क्षर नाते जपा. कारण Byte मधले शून्य ही तेच, अन् एकेरीचे आखर ही तेच!
म्हणून ग्रंथालये ही वाचनालये कशी बनतील आणि ‘e’ च्या नव्या वेषात ही आपली भेट ग्रेट कशी होईल हा प्रयत्न करू यात! चल बराच वेळ झाला, येतीयेस ना माझ्या पाठोपाठ, पुस्तकांच्या दुनियेत!
आ चल, के तुझे मैं लेके चलूं, एक ऐसे गगन के तले, जहां गम भी ना हो, आंसूं भी ना हो, बस् प्यार और सच्चा ज्ञान ही पले!!! .
© प्रा.भारती जोगी
पुणे.
फोन नंबर..९४२३९४१०२४.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈





