श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ एक अल्पप्रसिद्ध ‘परमवीर’ योद्धा! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
एक अल्पप्रसिद्ध ‘परमवीर’ योद्धा!
– – रावणाच्या लंकेत पराक्रम गाजवणारे ‘राम’स्वामी परमेश्वरन!
२५ नोव्हेंबर, १९८७. साडे पाच वाजले होते… पहाटेचा अंधार संपत आला होता. रात्री दीड वाजल्यापासून या ठिकाणी अंधारात सापळा रचून, डोळ्यांत तेल घालून बसलो होतो… सर्वांची बोटं ट्रिगरवरच होती. काल संध्याकाळी पक्की खबर आली होती… याच गावात असलेल्या एका घरात अतिरेक्यांनी हत्यारांची मोठी खेप उतरवून घेतलेली आहे. त्यानुसार मी कॅप्टन डी. आर. शर्मांना PATROLING PARTY घेऊन जाऊन खात्री करून घ्यायला पाठवले होते. कॅप्टन शर्मा आणि त्यांचे वीस जवान त्या घराच्या जवळ पोहोचताच, त्यांच्यावर त्या घराजवळ असलेल्या एका मंदिराच्या गच्चीवरून तुफान आणि अचूक गोळीबार झाला! त्यात काही जवान जखमी झाले. कॅप्टन शर्मा तिथून काहीसे मागे आले आणि त्यांनी बटालियन हेडक्वार्टरला संदेश दिला की, ते गाव LTTE अर्थात लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल ईलमच्या ताब्यात असून त्यांचे संख्याबळ अधिक असून त्यांची हत्यारे आधुनिक आणि प्रभावी आहेत!
मी कॅप्टन शर्मांना तिथेच सुरक्षित जागी थांबून राहण्याचे आदेश दिले आणि निवडक सैनिकांची एक मोठी तुकडी घेऊन घटनास्थळाकडे त्वरीत कूच केले. तिथे पोहोचायला मला रात्रीचा दीड वाजला. कारण अंतर बरेच होते, रस्त्यात जंगल होते, त्यामुळे सावधानतेने जाणे गरजेचे होते.
आम्ही तिथे पोहोचलो तर त्या भागात एकदम स्मशान शांतता होती. त्या घराच्या जवळ एक ट्रक उभा होता. आम्ही त्या घराला वेढा घातला आणि सकाळी उजाडताच कारवाई करण्याची योजना आखली. पण सकाळी साडेपाच पर्यंत काहीही झाले नाही. त्या घरातून काहीही हालचाल झाली नाही. त्या घरात कुणीही नव्हते, हत्यारेही नव्हती. त्यामुळे आम्ही तिथून परतण्याचा निर्णय घेतला… काही अंतर चालतो न चालतो तोच… आमच्यावर तिथून अगदी जवळच असलेल्या जंगलातून जोरदार गोळीबार सुरु झाला. HMG अर्थात हेवी मशीन गन, एके-४७, हातगोळे इत्यादी शस्त्रांनी आमच्या तुकडीवर प्राणघातक हल्ला झाला! पहिल्याच फेरीत आमचे सुमारे दहा बारा जवान धारातीर्थी पडले!
मी कॅप्टन शर्मांना तिथूनच गोळीबाराला उत्तर देण्याचे आदेश देत ज्या जंगलातून हल्ला सुरु होत्या त्याच्या मागच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला… कारण अजून तसे उजाडले नव्हते… आहे त्या अंधाराचा फायदा घेत, थोड्या लांबच्या रस्त्याने जाऊन शत्रूवर मागून प्रहार करण्याची माझी योजना होती. त्यानुसार मी माझ्या वीस सैनिकांना घेऊन निघालो. गोळीबाराचा आवाज येत होता, त्या दिशेने गेलो… एवढ्यात अंधारातून माझ्या छातीवर रायफल टेकवली गेली… मोठा आवाज झाला आणि त्या रायफलमधून सुटलेली एक गोळी माझ्या बरगड्या फोडत छातीत घुसली… तो धातूचा लालबुंद तापलेला गोलाकार गोळा… खोलवर घुसला… मांस जाळत, चिरत! रक्ताची चिळकांडी उसळली… डोळ्यांपुढे अंधारी आली… आई, बाबा, पत्नी डोळ्यांसमोर दिसू लागली… आता त्यांची कधीही भेट होणार नाही! लष्करात आलो तेंव्हाच समजलं होतं… कुठल्या तरी गोळीवर आपले नाव निश्चित लिहून ठेवले गेले असेल तर त्या गोळीला रोखू शकणार नाही कुणीच. आणि तशी गोळी बनली नसेलच तर मात्र मला काहीही होणार नव्हतं. मरण तर काय कुठेही, कसेही येतेच. देशसेवेत आले मरण तर सोन्याहून पिवळे! माझ्या हातातली रायफल गळून पडली त्या प्रहाराने… पण त्याच उजव्या हाताने मी ती माझ्यावर डागली गेलेली रायफल, तिची नळी पकडली आणि जोर लावून माझ्याकडे खेचली… ती रायफल धरणारा दचकून मागे सरला… त्याला कल्पनाच नव्हती की ज्याला आपण छातीत गोळी घातली आहे… तो असं काही करेल! मी वायूवेगाने रायफल पेलली… ट्रिगर दाबला आणि समोरच्याच्या छाताडात एक नव्हे, दोन नव्हे… सलग पाच-सहा गोळ्या मारल्या… त्याच्या तोंडून मोठी किंकाळी आणि शरीरातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या… धूर निघाला! आणि तो धाडकन कोसळून पडला!
आता अतिरेक्यांनी हल्ल्याचा वेग वाढवला तसा मी ही आहे त्या जागेवरून माझ्या तुकडीला जोरजोरात सूचना देत राहिलो.. माझ्या महार रेजिमेंटची युद्ध घोषणा दिली… बोल… हिंदुस्तान की जय! श्रीलंकेत माझ्या भारताचे, हिंदुस्तानचे नाव त्या जंगलात गुंजत राहिले… माझे जवान लढत राहिले… काही वेळाने आपल्या मदतीसाठी आणखी सैनिक तिथे पोहोचले… मी रक्तबंबाळ… घायाळ… घरच्या, घरातल्यांच्या… माझ्या मायभूमीच्या आठवणीत डोळे मिटले… ते कायमचेच! १३ सप्टेंबर २०२६ रोजी ८० वर्षांचा झालो असतो!
आमचे मूळ गाव केरळमधल्या कोट्टयमजवळचे रामपूरम. आमचे कुळ किलीमंगलम नावाचे. वडील शंकरनारायनन आणि आई जानकी पोटासाठी मुंबईत येऊन राहिले आणि इथेच १३ सप्टेंबर, १९४६ रोजी माझा जन्म झाला. माझे शालेय शिक्षण आणि विज्ञान शाखेतील पदवी शिक्षण सायन येथील SIES अर्थात साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळा-महाविद्यालयात झाले. घरची लष्करी पार्श्वभूमी नसतानाही मी देशाच्या सेवेसाठी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. आणि The Officers’ Training School, Chennai (जी आता Officers’ Training Academy म्हणून ओळखली जाते) मधून १९७२ या वर्षी लष्करी अधिकारी म्हणून प्रशिक्षित झालो. मला १५, महार रेजिमेंटमध्ये नेमण्यात आले. पुढील आठ वर्षे मी या रेजिमेंटमध्ये राहिलो. आम्हांला भारताच्या ईशान्येकडील राज्यांत देशविरोधी शक्तींचा मुकाबला करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ती मी यथाशक्ती पार पाडली. ‘बोलो, हिंदुस्तान की जय! ’ ही आमची युद्ध घोषणा आणि ‘यश सिद्धी’ हे आदर्श वाक्य आहे. मला माझी मातृभाषा मल्याळम तर येत होतीच, पण माझी जन्मभूमी असलेल्या मुंबईची मराठीही अवगत होती आणि… तमिळ सुद्धा! माझे सैनिक मला ‘पारी साहेब’ म्हणत… परमेश्वरन आडनावामुळे असेल बहुदा! लष्करी अधिका-यांनी नेहमी पुढे राहून नेतृत्व करावे, अशा विचारांचा मी होतो… त्यामुळे ईशान्येत अनेक अतिरेकीविरोधी मोहिमांत मी नेहमी आघाडीवरच राहिलो! ‘१५, महार’ मधून मला पुढे ‘५, महार’ मध्ये पाठवले गेले.
श्रीलंका आपला शेजारी देश… केवळ १८. ६ समुद्री मैल किंवा किलोमीटर्सच्या भाषेत ३४. ५ किलोमीटर्स एवढेच अंतर. या देशाशी आपला संबंध अगदी पुराण काळापासूनचा आहे. पुढे तमिळनाडूमधून मोठ्या संख्येने शेतमजूर श्रीलंकेत स्थायिक व्हायला गेले. श्रीलंकेतील बहुसंख्य ‘सिंहली’ समुदाय आणि मूळच्या भारतीय पण आता श्रीलंकेत कित्येक पिढ्यांपासून स्थायिक झालेल्या समुदायामध्ये संघर्ष पेटला. तमिळ लोकांपैकी काहींनी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल ईलम अर्थात L. T. T. E. ही सशस्त्र संघटना स्थापन केली आणि श्रीलंका सेनेशी गृहयुद्ध सुरु केले. काही राजकीय उद्दिष्ट लक्षात घेऊन भारताने श्रीलंका आणि तमिळ बंडखोर यांच्यात परस्पर शांतता राखण्यासाठी श्रीलंकेत ‘शांतिसेना’ अर्थात IPKF इंडियन पीस कीपिंग फोर्स’ पाठवायचे ठरवले. ५४ व्या पायदळ डिविजनमध्ये ८, महार रेजिमेंटही या शांतिसेनेचा एक भाग बनली… आणि मला या रेजिमेंटमध्ये जबाबदारी देण्यात आली… मला तमिळ भाषा येत होती ही बाबही लक्षात घेतली गेली असावी… श्रीलंकेत तमिळ भाषिक आहेत.. त्यांच्याशी संवाद साधायला माझ्या भाषा ज्ञानाचा उपयोग झाला!
भारतीय लष्कर जो आदेश देईल तो प्राणपणाने पाळण्याची आपल्या सैनिकांची परंपरा आहे… मी ही याला अपवाद नव्हतो! जो देशाविरोधात, देशाच्या लष्कराच्या विरोधात शस्त्र हाती घेईल… तो आमचा शत्रू हे सैनिकांचे धोरण आणि प्रशिक्षण असते… बाकी राजकीय, धार्मिक, सामाजिक बाबी आम्ही शिपाईगडी ध्यानात घेत नसतो!
आरंभी श्रीलंकेतील तमिळ जनतेने शांतिसेनेचे स्वागत केले. परंतु पुढे दुर्दैवाने त्यांनीच भारतीय लष्करावर हल्ले करायला सुरुवात केली. शेजारी राष्ट्रांपैकी काही राष्ट्रं श्रीलंका लष्कराला तर काही राष्ट्रं तमिळ बंडखोरांना शस्त्रपुरवठा करू लागली. शांतिसेनेचे काम असल्याने सुरुवातीला भारतीय लष्कर युद्धाच्या तयारीनिशी श्रीलंकेत गेलेच नव्हते. त्यामुळे आधुनिक, मोठी शस्त्रे सोबत नेण्याचा प्रश्नच नव्हता… आणि इथेच खरी समस्या उभी राहिली!
परंतु उत्तम प्रशिक्षण, शौर्याच्या जोरावर भारतीय सैनिकांनी तमिळ बंडखोरांवर बाजी उलटवली… परंतु त्यासाठी ११७१ सैनिकांना प्राणार्पण करावे लागले आणि ३५०० पेक्षा अधिक सैनिक जायबंदी झाले!
मला माझ्या शौर्याबद्दल भारताचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार ‘परमवीर चक्र’ मरणोत्तर जाहीर करण्यात आला. परकीय भूमीवर भारतीय सैन्यातून कामगिरी करीत असताना एखाद्या सैनिकास दिले गेलेले हे तसे पहिलेच ‘परमवीर चक्र’! १९६१ मध्ये कांगो देशातील कटंगा येथे संयुक्त राष्ट संघाच्या आंतरराष्ट्रीय सैनिकांचा समावेश असलेल्या शांतिसेनेत अतुलनीय पराक्रम गाजवल्याबद्दल कॅप्टन गुरुबचनसिंग सलारिया साहेबांना मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ प्रदान करण्यात आले होते. आपला देश युद्धात सहभागी नसताना परदेशातल्या युद्धभूमीवर पराक्रम गाजवल्याबद्द्ल ‘परमवीर चक्र’ मिळवणारा केवळ दुसराच सैनिक ठरलो होतो. तसेच ‘परमवीर चक्र’ मिळवलेला OTAचा माजी विद्यार्थी म्हणून मी आजवर एकमेव आहे!
परंतु… पण… त्याचं काय झालं… माझ्या शौर्याची देशात फार काय सुरुवातीला तर अजिबातच चर्चा झाली नाही. कुसुमाग्रजांनी नेमकं म्हणून ठेवलं आहे… स्तंभ तिथे ना कुणी बांधला… पेटली न वात!
त्यावेळचं भारतातील राजकीय, सामाजिक वातावरण, आंतरराष्ट्रीय संबंध या व अशा अनेक कारणांमुळे अगदी २०२५ पर्यंत माझ्या किंवा श्रीलंकेत भारतीय सैनिकांनी ‘ऑपरेशन पवन’ (१९८७-१९९०) मध्ये दिलेल्या ११७१ बलिदानांचा अधिकृत स्मृतिदिन कुठे पाळला जात नव्हता! श्रीलंकेत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचे, काही अधिका-यांचे मृतदेह भारतात आणले जाऊ शकले नाहीत!
‘परमवीर चक्र’ विजेता म्हणून माझ्या कुटुंबास विशेष आर्थिक लाभही दिला गेला नाही… किंबहुना ‘परमवीर चक्र’ विजेता म्हणून माझे नावही काही फारसे प्रसिद्ध नव्हते! श्रीलंका सरकारने मात्र २००८ मध्ये कोलंबो येथे IPKF Memorial निर्माण केले!
२०१८ मध्ये OTA मधले ३७ सेवानिवृत्त लष्करी अधिकारी-मित्र एकत्र आले. त्यांनी सात लाख रुपयांचा निधी गोळा केला आणि महार रेजिमेंटच्या सैनिक-अधिका-यांनी त्यात एक लाखाची भर घातली आणि माझा ब्राँझ धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारला… रायफल हाती आहे माझ्या! OTA मधल्या Drill Square ला माझे नाव देण्यात आले आहे. मी याच ठिकाणी इतरांची सरावाची वेळ संपली तरी March-Pastचा सराव करीत असे. त्यावेळी नेमके भारत-पाक युद्ध सुरु झाले होते, काही प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण सोडून निघूनही गेले… पण मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम राहिलो! देशासाठी मरण पत्करणे ही एक भावना आहे. मात्र सैनिक युद्धात शत्रूला मारायलाच जात असतात… मरायला नव्हे! परंतु या प्रयत्नांत मरण आलेच तर ते हसत हसत स्वीकारण्याचीही तयारी असते सैनिकांची! अशा सैनिकांच्या बळावरच तर देश टिकून राहतात… देशाच्या सीमा सुरक्षित राहतात! सैनिक होण्यासाठी काही किंमत चुकवावीच लागते… आणि त्याबद्दल सैनिकांची काहीही तक्रार नसते!
२३ जानेवारी, २०२३ रोजी अंदमान-निकोबार मधील एका बेटाचे माझ्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘रामस्वामी बेट’ असे नामकरण करण्यात आले! मागील वर्षी २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये तत्कालीन सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी साहेबांनी भारतीय लष्कराच्या वतीने माझ्या आणि ऑपरेशन पवन मध्ये धारातीर्थी पडलेल्या सर्व सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुष्पचक्र वाहिले! माझी पत्नी लेखिका, कवयित्री श्रीमती उमा परमेश्वरन उपस्थित होती. ही परंपरा आता सुरु राहील! सैनिकांचा राजकारणाशी काहीही संबंध नसतो, ते केवळ पगार मिळतो म्हणून नोकरी करीत नाहीत.. किंबहुना सैन्यातील सेवा ही नोकरी नव्हेच… तो एक करार असतो आत्म्याने देशाशी केलेला… आणि हा करार प्राण देऊनही पाळला जातोच!
(ऑपरेशन पवन मध्ये महाराष्ट्राचे, मराठा लाईट इन्फंट्री, महार रेजिमेंट यांच्या विविध तुकड्यांमधील तसेच अन्य काही विभागातील सुमारे ८५ पेक्षा अधिक सैनिक हुतात्मा झाले. यांपैकी शिपाई प्रभाकर बयाजी पत्रे आणि हवालदार पांडुरंग काकफळे, सुबेदार सीताराम पाटील (गढवाल रायफल्स) यांना मरणोत्तर वीरचक्र पुरस्काराने तर लान्स नायक मिलिंद कांबळे, यांना मरणोत्तर सेना मेडलने सन्मानित करण्यात आले. या यादीत नाईक श्रीधर विठ्ठल कुरणकर(गढवाल रायफल्स) हेही मराठी नाव आढळते ज्यांना मरणोत्तर वीर चक्र आणि सेना मेडल मिळाल्याचा उल्लेख आहे. इंटरनेटवर शहीद उपवन मध्ये ही सर्व नांवे आहेत. असो.
जय हिंद… जय हिंद की सेना.
(हा लेख संपूर्णपणे अराजकीय आहे)
☆
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






