श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ गजमुखाचा मागोवा ☆ श्री दिवाकर बुरसे

प्रास्ताविक

हिंदू धर्मपरंपरेत महादेवता म्हणून मानल्या गेलेल्या देवतांमध्ये महादेव, महाविष्णू, महालक्ष्मी आणि महागणेश यांचे विशेष स्थान आहे. त्यांच्या नित्यपूजेत सूर्यदेवासह या पाच देवतांचा समावेश केला जातो. याला ‘देवपंचायतन’ असे म्हटले जाते.

या पंचदेवतांमध्ये श्रीगणपतीला अग्रपूजेचा मान आहे. कोणत्याही शुभकार्याचा आरंभ गणेशस्मरण आणि गणेशपूजनाने करावा, अशी धर्मशास्त्राची आज्ञा आहे. म्हणूनच आपल्या सांस्कृतिक जीवनात ‘श्रीगणेशा’ हा शब्द केवळ प्रारंभाचा समानार्थी राहिलेला नाही; त्यामागे श्रद्धेची प्रदीर्घ परंपरा उभी आहे.

गणपती अथर्वशीर्षात त्याला—

‘त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि’ असे म्हटले आहे.

ज्ञानदेवही गणेशाची स्तुती करताना म्हणतात—

ॐ नमोजि आद्या । वेद प्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥

गणेशस्तुती, गणेशमहात्म्य आणि गणेशोपासना यांवर विपुल वाङ्मय उपलब्ध आहे. सनातन हिंदू धर्मपरंपरेत तसेच भारतीय अध्यात्मतत्त्वज्ञानात श्रीगणेशाला अनन्यसाधारण स्थान आहे.

हे झाले धर्मशास्त्राचे. पण इतिहास श्रीगणेशाकडे कसा पाहतो?

इतिहास एखाद्या देवतेकडे श्रद्धेच्या दृष्टीने नव्हे, तर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पाहतो. काळ, संदर्भ, शिलालेख, मूर्ती, ग्रंथ, कलावशेष आणि अन्य उपलब्ध साधने यांच्या आधारे तो धागे शोधतो. त्या धाग्यांची सांगड घालतो. तर्क मांडतो. काही निष्कर्ष काढतो—आणि काही प्रश्न अनुत्तरितही ठेवतो.

पुढील लेखन हा श्रद्धेवर प्रश्नचिन्ह उभे करण्याचा प्रयत्न नाही. तो आहे गजमुखाच्या ऐतिहासिक प्रवासाचा मागोवा घेण्याचा एक नम्र प्रयत्न.

या शोधप्रवासातील कोणता धागा ग्राह्य वाटतो, कोणता प्रश्न विचार करायला लावतो आणि कोणता निष्कर्ष पटतो—हे ठरविण्याचा अधिकार अर्थातच वाचकांचा.

एक प्रश्न

गणपतीच्या पायाशी बसलेला तो लहानसा मूषक मला नेहमी एक प्रश्न विचारतो—

‘या गजमुखापर्यंत आपण पोहोचलो तरी कसे?’

प्रश्न साधा आहे, उत्तर मात्र साधे नाही.

आज गणपती म्हटले की आपल्या मनात एकाच वेळी अनेक गोष्टी उभ्या राहतात—मंगलारंभ, बुद्धी, सिद्धी, ऋद्धी, विघ्नहर्ता, उत्सव, भक्ती, कला आणि घराच्या उंबरठ्यावर येऊन विसावलेले एक आपलेपण.

मातीच्या मूर्तीपासून पाषाणातील भव्य शिल्पापर्यंत आणि वैदिक मंत्रापासून लोकमानसातील जयघोषापर्यंतचा त्याचा प्रवास विलक्षण आहे.

पण या प्रवासाचा आरंभ कुठे झाला? गजमुख कधी प्रकटला?

त्याच्या हातात मोदक येण्यापूर्वी, पायाशी मूषक येण्यापूर्वी, तो कोण होता? कसा होता?

या प्रश्नांची उत्तरे शोधताना आपण केवळ एका देवतेचा मागोवा घेत नाही तर भारतीय मनाच्या बदलत्या रूपांचा मागोवा घेतो.

श्रीगणेश

आपल्या कोणत्याही मंगलकार्याचा आरंभ ‘श्रीगणेशा’ने होतो. या एका शब्दातच गणपतीचे स्थान दडले आहे. ‘गणपती’ हा शब्द ऋग्वेदातही आढळतो.

ऋग्वेदातील प्रसिद्ध ऋचा—

गणानां त्वा गणपतिं हवामहे

कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ।

ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत

आ नः शृण्वन्नूतिभिः सीद सादनम् ॥

येथील ‘गणपती’ म्हणजे आज आपण ज्या गजमुख गणेशाची पूजा करतो तोच, असे सरळपणे म्हणता येत नाही.

वैदिक ‘गणपती’चा संबंध ब्रह्मणस्पती अथवा बृहस्पतीशी जोडला जातो. म्हणजे शब्द जुना पण त्याला लाभलेले आजचे गजमुख रूप नंतरचे.

याच ठिकाणी गणपतीच्या इतिहासाचा पहिला धागा हातात येतो.

गण’ कुठला?

‘गण’ म्हणजे केवळ देवांचा समूह नव्हे. प्राचीन समाजजीवनात विविध प्रकारचे समूह होते—गण, व्रात, संघ, पूग इ. त्या समूहाचा अधिपती म्हणजे ‘गणपती’. म्हणून ‘गणपती’ या नावामागे एखाद्या एकाकी देवतेपेक्षा सामूहिक जीवनाची जुनी सावली असावी, असे वाटते.

कदाचित देवतेचा जन्म आधी नावात झाला असेल. रूप नंतर घडले असेल.

पाषाणातील साक्ष

इतिहासाच्या धुक्यातून एखादी प्रतिमा अचानक स्पष्ट होते.

गुप्तकालीन उदयगिरीच्या सहाव्या गुहेतील गणेशप्रतिमा त्यापैकी एक. इ. स. चौथ्या-पाचव्या शतकाच्या उंबरठ्यावरची ही प्रतिमा गणेशाच्या प्राचीन प्रतिमाविकासासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. उदयगिरीतील इतर देवप्रतिमांसह तिचे अस्तित्व त्या काळातील धार्मिक विश्वात गणेशाला मिळू लागलेल्या स्थानाची साक्ष देते.

पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.

गुप्तकालीन धार्मिक विश्वात कार्तिकेय, मातृका आणि इतर देवप्रतिमांचे अस्तित्व अधिक स्पष्टपणे जाणवते. गणपतीचे स्वतंत्र, व्यापक महत्त्व मात्र पुढील काळात अधिक ठळक होत गेले.

मग गणपतीचा उदय नेमका कधी झाला? उदयगिरी आपल्याला पूर्ण उत्तर देत नाही. ती फक्त एक खूण ठेवते.

भूमरेचा गजमुख

इ. स. विसाव्या शतकाच्या आरंभी मध्यप्रदेशातील ‘भूमरा’ येथून प्रकाशात आलेली गणेशप्रतिमा या शोधयात्रेतील आणखी एक महत्त्वाची खूण ठरते.

आजच्या गणपतीची कल्पना डोळ्यांसमोर ठेवली तर या प्रतिमेकडे पाहताना काही गोष्टी वेगळ्या जाणवतात. यात मूषक नाही. आजच्या परिचित अलंकारांची सारीच सजावट नाही. मुकुट आहे, अलंकार आहेत. एकदंत रूपाची छाया आहे, पण आपला परिचित गणपती अजून पूर्ण झालेला नाही. जणू एखादी कल्पना पाषाणात अजून आकार घेत आहे.

शास्त्रातला गजमुख

वराहमिहिराच्या बृहत्संहितेत गणपतीच्या स्वरूपाचा उल्लेख येतो. गजमुख देवतेची ओळख आता अधिक स्पष्ट होत जाते.

यातून एक गोष्ट सूचित होते—

गणपतीची प्रतिमा एका दिवसात सिद्ध झालेली नाही. ती लोकविश्वास, धार्मिक कल्पना, कलावंताची दृष्टी आणि बदलत्या सांस्कृतिक जाणिवांतून हळूहळू घडत गेली. देवता जशी पूजली जाते, तशीच ती घडतही जाते.

दोन प्रवाह

भारतीय संस्कृतीचा इतिहास हा केवळ एका प्रवाहाचा इतिहास नाही. विविध सांस्कृतिक प्रवाहांचा परस्परांशी संपर्क झाला. संघर्ष झाला. देवाणघेवाण झाली. समन्वय झाला.

गणपतीच्या रूपाकडे पाहताना हा विचार दुर्लक्षित करता येत नाही.

लोकदैवतांचे संस्कृतीकरण कसे होते? एखादी ग्रामदेवता व्यापक धार्मिक परंपरेत कशी सामावते?

एखाद्या स्थानिक प्रतीकाला सर्वमान्य देवतेचे रूप कसे प्राप्त होते? गणपतीच्या प्रवासात या प्रश्नांची उत्तरे दडलेली दिसतात.

मातंगांचा धागा

गणपतीच्या गजमुख रूपामागे ‘मातंग’ या प्राचीन समूहाचाही संदर्भ काही अभ्यासकांनी जोडला आहे.

हत्तीशी संबंधित समूहचिन्ह, ‘मातंग’ ही संज्ञा आणि गजमुख देवतेचे रूप—या तिन्हींचा परस्पर संबंध शोधण्याचा प्रयत्न झाला आहे. पण इथे सावध राहावे लागते. इतिहासात काही धागे सापडतात. त्यांना जोडून चित्र उभे करता येते, पण प्रत्येक जोडणी म्हणजे पुरावा नव्हे.

टोटेमची सावली

काही अभ्यासकांनी गणपतीच्या उत्पत्तीचा संबंध टोटेम परंपरेशी जोडला आहे.

मानवसमूह एखाद्या प्राण्याला आपल्या समूहाचे चिन्ह, रक्षक किंवा प्रतीक मानतो. त्या प्रतीकाभोवती श्रद्धा तयार होते. पुढे त्याला धार्मिक रूप लाभते.

हत्ती भारतीय स्मृतीत सामर्थ्याचे, ऐश्वर्याचे आणि वन्य निसर्गाच्या विराटतेचे प्रतीक राहिला आहे.

गजमुख देवतेच्या निर्मितीत या प्राचीन प्रतीकसृष्टीचा काही अंश असावा का? प्रश्न उरतो.

गणपतीचा जन्म एका सूत्राने समजावून सांगता येणार नाही.

त्याच्या मागे अनेक स्मृती आहेत.

मूषक कुठून आला?

गणपतीच्या पायाशी बसलेला मूषक या कथेत आणखी एक गूढ घेऊन येतो.

खारवेलाच्या हाथीगुंफा शिलालेखाच्या काही वाचन-व्याख्यांमध्ये ‘हस्तिगण’ आणि ‘मुषिकगण’ यांसंबंधी उल्लेखांचा संदर्भ घेतला गेला आहे. या संदर्भांवरून काही अभ्यासकांनी प्राचीन गणसमूहांतील संघर्ष किंवा परस्परसंबंधांची शक्यता मांडली आहे. मात्र या वाचनांभोवती विद्वानांमध्ये मतभेदही आहेत.

एक कल्पना अशीही मांडली गेली आहे की हत्तीशी संबंधित गण आणि मूषकाशी संबंधित गण यांच्यातील संघर्षाच्या स्मृती पुढे गणपतीच्या प्रतिमेत रूपांतरित झाल्या असाव्यात आणि मूषक त्याचे वाहन बनला असावा. पण हा निश्चित पुरावा नाही, हे एक अनुमान आहे.

गजमुखाची वाटचाल

गजमुखाला धार्मिक ओळख मिळाली आणि त्याची यात्रा भारतापुरती राहिली नाही.

तो तिबेटमध्ये तो पोहोचला. चीनमध्ये गेला. जपानमध्ये त्याचे वेगळे रूप दिसते. कोरियातही त्याच्या स्मृतींचे ठसे आढळतात.

स्थान बदलले की रूप बदलले.

नावे बदलली. उपासनेच्या पद्धती बदलल्या, पण गजमुखाची मूलभूत ओळख टिकून राहिली.

पुराणांचा काळ

गणेशपुराण आणि मुद्गलपुराण यांनी गणपतीच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक विस्तार दिला. गाणपत्य परंपरेत तो स्वतंत्र उपास्यदेव झाला. तांत्रिक परंपरेत त्याला नवी रूपे लाभली. विविध मंत्र, साधना, स्वरूपे आणि आख्यायिका त्याच्याभोवती विणल्या गेल्या.

आता तो केवळ एखाद्या गणाचा अधिपती राहिला नव्हता. तो विघ्नहर्ता झाला. बुद्धिदाता झाला. मंगलमूर्ती झाला. लोकांच्या दैनंदिन जीवनात प्रवेश करणारा आपला देव झाला.

कैलासातील क्षण

वेरूळच्या कैलास लेण्यात शिव-पार्वतीच्या विवाहाचे भव्य शिल्प पाहताना गणपतीची उपस्थिती लक्ष वेधून घेते.

.. शिव-पार्वतीच्या विवाहप्रसंगातील गजाननाचे अस्तित्व कालक्रमाच्या दृष्टीने प्रश्न उभे करते, पण लोकमानसाला कालक्रमाची फारशी क्षिती नसते. त्याला आपला देव हवा असतो.

जिथे विवाह आहे, तिथे गणपती असतो. जिथे मंगल आहे, तिथे गणपती असतो. कथेला इतिहासापेक्षा भक्तीचे माप मिळते आणि मग शिल्पकारही लोकविश्वासापुढे कालक्रम विसरतो.

घराघरांतला बाप्पा

कधीकाळी राजाश्रय मिळाला.

नंतर पेशव्यांच्या काळात गणपती उपासनेला विशेष महत्त्व आले. पुणे आणि परिसरातील गणेशोपासना अधिक व्यापक झाली. पुढे अष्टविनायक परंपरेने महाराष्ट्राच्या धार्मिक स्मृतीत गणपतीला स्वतंत्र स्थान दिले.

पण गणपतीचे खरे सामर्थ्य राजवाड्यात नव्हते, ते घरात होते, उंबरठ्यावर होते, चुलीजवळ होते, मुलांच्या हातातील मातीच्या गोळ्यात होते. कारण गणपती हा केवळ देव्हाऱ्यातला देव नाही.

तो घराचा सदस्य होऊ शकतो.

सार्वजनिक गजर

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला नवे रूप दिले. _घरातील देव सार्वजनिक झाला. _ उत्सवाला सामाजिक आशय मिळाला. लोक एकत्र आले. परकीय सत्तेच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवाने समाजजागृती, संघटन आणि राष्ट्रीय भावनेला चालना देण्याचे कार्य केले. धार्मिक प्रतीकाला सामाजिक शक्ती मिळाली. गणपती पुन्हा एकदा ‘गणां’चा अधिपती ठरला. यावेळी त्या गणांचे स्वरूप वेगळे होते.

शतकानुशतके बदलत आलेल्या गणपतीच्या प्रतिमेत आधुनिक काळाने स्वतःचे प्रतिबिंब पाहिले.

माती, पाषाण, धातू, आणि आता प्रसारमाध्यमांचे युग. देव तोच. विश्वासाची अभिव्यक्ती मात्र बदलत राहिली.

पुन्हा तोच प्रश्न

गणपती नेमका कुठून आला?

ऋग्वेदातील ‘गणपती’पासून?

प्राचीन गणसंघांच्या स्मृतीतून?

लोकदैवतांच्या प्रवाहातून?

हत्तीच्या टोटेमिक प्रतीकेतून?

मातंगांच्या स्मृतीतून? किंवा 

या साऱ्यांच्या संमीलनातून? कदाचित प्रत्येक उत्तरात थोडे सत्य आहे, आणि म्हणूनच एक उत्तर अपुरे पडते.

गणपतीची कथा ही एखाद्या व्यक्तीची जन्मकथा नाही.

ती भारतीय समाजाच्या स्मृतीची घडण आहे. ज्या समाजाने नवे स्वीकारले, जुने विसरले नाही.

ज्याने विरोधकांना सदैव शत्रू ठेवले नाही, तर कधीकधी त्यांनाही आपल्या देवाच्या पायाशी जागा दिली. ज्याने पाषाणाला देव केले, मातीला रूप दिले आणि त्या रूपाला स्वतःचे मन दिले.

मातीचा गणपती

विसर्जनानंतर दरवर्षी गणपती येतो.

नवी माती, नवे रूप.

नवी सजावट, नवे गीत.

नवा गजर आणि…

 मग विसर्जन.

मूर्ती पाण्यात जाते, पण कथा जात नाही. श्रद्धा जात नाही. स्मृती जात नाही. पुढच्या वर्षी पुन्हा माती हातात घेतली जाते.

पुन्हा गजानन घडतो. पुन्हा मूषक त्याच्या पायाशी घुटमळू लागतो. पुन्हा घरात मंगलध्वनी होतो!

कदाचित म्हणूनच गणपतीची खरी मूर्ती पाषाणात नाही.

ती आपल्या सामूहिक स्मृतीत आहे! गजमुखाचा मागोवा घेत घेत आपण अखेर स्वतःचाच मागोवा घेतो. तो कुठून आला, हा प्रश्न आता तितका महत्त्वाचा राहत नाही. महत्त्वाचे एवढेच—

तो आजही आपल्यात आहे! माती बदलते. रूप बदलते. युगे बदलतात, पण गजमुख पुन्हा उभा राहतो आणि आपण पुन्हा उच्चरवात सहघोष करतो—

गणपती बाप्पा मोरया!

पुढच्या वर्षी लवकर या!

संदर्भ:

गणेश कोश — डॉ. अभ्यंकर

गणेशपुराण — गोरखपूर आवृत्ती

दासबोध, ज्ञानेश्वरी 

भारतीय संस्कृती कोश — वाई

ऋग्वेद मराठी — म. म. चित्रावशास्त्री

गणपतिदेवता — लो. बापूजी अणे

डॉ. अशोक राणा — गणपतिदेवता : शोध, विकास

लोकायत — डॉ. स. रा. गाडगीळ

लोकदैवतांचे विश्व — डॉ. रा. चिं. ढेरे

जानपदगीते — सरोजिनी बाबर

अष्टविनायक देवस्थानांचे स्फुट साहित्य.

©️ दिवाकर बुरसे

पुणे.

संपर्कः ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted