श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ हे देवा म्हाराजा… – भाग १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆
प्रभाकर आपल्या पानपाट्टीच्या स्टॉल मध्ये छोटया गादीवर बसला होता, विचाराचे थैमान डोक्यात सुरु होते. गेले दोन तास एक सुद्धा गिऱ्हाईक फिरकले नव्हते मात्र स्वतः प्रभाकरने गेल्या दोन तासात आठ पाने तंबाखू खाऊन मोठया पिचकाऱ्या गादीच्या खाली मारल्या होत्या.
प्रभाकर विचार करत होता, समोरच्या भगवान ने काय जादू केली कोण जाणे, त्याच्याकडे पान खायला भरपूर येत होती. त्याला बनारसी पाने कोण देतो हे कळत नव्हते, लोकांना आता बनारसी पानांची चटक लागली होती.
आपण मुंबई सोडून आलो आणि ही पानपट्टी खोलली, सोबत जर्दा आणि गुठक्याच्या पुड्या ठेवायला सुरुवात केली, त्यावेळी जाणाऱ्या येणाऱ्या शाळेतल्या पोरांपासून, मास्तर आणि गावातील तमाम तरुण म्हातारे गर्दी करत होते. त्यावेळी आपण खुश होतो,आपले बरे चालले होते.
पण दोन वर्षांपूर्वी या कुंभार वाडीतील भगवानने रस्त्याच्या विरुद्ध बाजूला पानपट्टी खोलली. आपल्या दुर्दैवाने रस्त्याच्या त्याच बाजूला एस टी थांबते, त्या मुळे एस टी तुन उतरल्या उतरल्या भगवानची पानपट्टी दिसते, त्या मुळे गिऱ्हाईक त्याच्यकडे गेले, त्यात त्याने बनारसी पाने कुठूनतरी आणायला सुरवात केली किंवा तो पान बरे घोटंतो म्हणून असेल किंवा देवदेवस्की करत असेल, पण आपले गिऱ्हाईक गेले ते गेले.
प्रभाकरच्या डोळ्यसमोर घरातली दहा माणसे आली, आपली बायको आणि दोन मुले भाऊ किरण, त्याची बायको आणि दोन मुलं आणि म्हातारी दोघ, असे आठ जणं. यांना दोन वेळा खायला काय घालायचे?
आपली बायको आणि भावाची बायको कुठं कुठं कामाला जातात म्हणून दोन वेळा अन्न तरी मिळत, पण म्हातारे आई आणि बाबा सतत आजारी, बापाला खोकला रात्रभर तरी विडी सुटत नाही, त्याच्या खोकल्याने रात्रभर झोप नाही, मग भाऊ किरण दोन पेकटात लाथा घालतो, मग म्हातारा रडतो आणि झोपतो.
म्हातारेचे आणि आपल्या बायकोचे एक मिनिट पटत नाही, आपली बायको म्हातारेला घरा बाहेर काढा, म्हणून आपल्याला सांगत असते, पण मला दया येते म्हणून म्हातारी अजून घरात आहें. धाकटा भाऊ ड्रायव्हर आहें, कुणा कुणाच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून जातो पण पैसे दारूत उडवतो.
त्याची बायको मात्र मेहनती आहें, खालच्या मानेने बाहेर आणि घरात मरमर काम करते म्हणून आपण भावाला वेगळे केल नाही.
आपला मुलगा सतीश शाळा सोडून घरी बसला आहें, त्याला काहीतरी धंदा उद्योग बघ म्हणून सांगून आपण थकलो, नाक्यावर वासुगिरी करत फिरत असतो. मुलगी मोहिनी आता वीस वर्षाची झाली, काजू कारखान्यात काजू फोडायला जाते.
ऐकंदरीत एवढ्या दहा माणसांना खाणे, कपडे, औषधं पाणी करताना बँकेचे कर्ज डोकयावर आहें, बँकेच्या नोटीचा येत आहेत जर तीन चार महिन्यात पैशाची तजवीज केली नाही, तर आठ गुंठे जमीन तारण ठेवली आहें, ती बँक जप्त करणार हें निश्चित.
प्रभाकरला काय करावे, कसे पैसे मिळवावे हें सुचेना, त्याच्या वाडीतील देवळीत सहदेव वर वार येत असे, आपल्याला त्याच्या आधार होता, त्याच्या अंगात वार आलं की आपण त्याच्या सोबत असायचो, त्याने अंग सोडल की तो धाडकन पडायचा तेंव्हा आपण त्याला मागून पकडायचो, इतक्या वर्षात त्याच्या मागे उभे राहिल्याने आपल्याला त्याचे वार शांत कस करायचे हें माहित झाल होत..
लांबून लांबून लोक सहदेव कडे अडचणी घालवण्यासाठी येत असत. लोक जमली की आपल्याला निरोप मिळाला की हातात असलेले काम सोडून आपण देवळीत जायचो. आपण आलो हें समजलं की सहदेव अंग धरत असे. मग आपण त्याला गाऱ्हाणं घालत असू
“हें देवा महाराज्यां, बारा पाचाच्या वहीवटीच्या म्हराज्या… म्हणजे सहदेव घुमू लागे.
सू.. सू… सू…
पण गेले सहा महिने सहदेव टी बी ने आजारी, दोन शब्द बोलला की दहा मिनिटे ढास, जीव राहील का जाईल अशी परिस्थिती, डॉक्टर नी सक्त ताकीद दिलेली, अजिबात ओरडायचे नाही, कमीत कमी बोलायचे. त्यामुळे सहदेव चें वारे बंद, म्हणजे लोक सहदेवला पाचशे दिले तर आपल्याला पण पन्नास शंभर देत होती, देही बंद.
प्रभाकर च्या मनात विचारांचे वारूळ उभे राहिले होते. काही तरी करायला हवे. एवढ्यात tyachaमुलगा सतीश सायकलवरून आला.
” बाबानू, एक आयडिया आसा, त्या दिवशी कणकवलीत गेललय, तेवा बघलंय, सगळे पानपाट्टीवले मटको घेतत, म्हणजे काय करूंक नको, लोक सांगतीत तो आकडो आणि तेच्यावर लावतीत ते पैसे लिहून दयायचो, तेचे कागद वसंता देतलो, संबंध दिवसाचो हिशेब वसंतचो माणूस घेऊन जातलो, कोणाक काय पैसे लागले, तेचो हिशेब वसंतचो माणूस देतलो, ते आपण जेका लागलो आकडो, तेका दयायचे, आपणाक धा टक्के कमिशन, म्हणजे पाच हजार दिवसाक जमले तर पाचशे गावातले.
प्रभाकरच्या तोंडाला पाणी सुटले, काही न करता एवढे पैसे मिळणार? हल्ली सगळीच मटको खेळतातं, ड्रायव्हर, कंडक्टर, कामगार, रिक्षावाले, शिक्षक, शेतकरी, दुकानदार सगळे. रोज जर वीस हजार बिट आली तर दिवसाला दोन हजार…
दुसऱ्या दिवशी वसंताचा माणूस येऊन मटक्याच्या स्लीपी देऊन गेला, कल्याण आणि वरळी ओपन आणि क्लोज याची माहिती देऊन गेला, अर्थात प्रभाकरचा मुलगा सतीश हा मटका खेळत होता, त्यामुळे त्याला सर्व माहिती होतीच.
सतीशने रिक्शावाल्याना आम्ही मटका बिट घेतो, असे सांगितल्यावर त्याच्या पानपट्टी मध्ये लोक येऊ लागली, हळूहळू ही बातमी सर्वाना समजली आणि पुन्हा एकदा प्रभाकरच्या पानपट्टी कडे माणसं जमू लागली, तिथे नुसती मटक्याची बीट कशी द्यायची, पान घेऊ लागले. त्यामुळे इतर बारीक सारीक वस्तू पण खपायला लागल्या.
प्रभाकर चे पुन्हा बरे दिवस आले, ही मटक्याची बीट आपण आधीच का नाही घेतली, याची रुख रुख त्याच्या मनाला लागली. आता कधी कधी प्रभाकर घरी थांबू लागला आणि त्याचा मुलगा सतीश आता दुकानात बसू लागला.
आता प्रभाकरच्या पानपाट्टीचे गिऱ्हाईक वाढले, पण समोरच्या भगवानचे गिर्हाईक घटले. भगवान मनातल्या मनात आश्चर्य करू लागला, हल्ली हल्ली पर्यंत माझ्याकडे येणारी गिर्हाईक समोर प्रभाकर कडे कशी जाऊ लागली? त्याने काय देवाची ओवाळणी वगैरे केली की काय? त्याच्याकडे आलेले एक गिर्हाईक त्याला म्हणाले ” तो मटक्याची बिट घेता, वरळी आणि कल्याण, तू घेवंक सुरवात कर म्हणजे तुजकडे माणसा येतली ‘.
भगवान ने वसंताशी संधान बांधले आणि बीट घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे प्रभाकरची निम्मे गिर्हाईक भगवान कडे गेली. त्यात प्रभाकरचा मुलगा सतीश याने हेराफरी केली, शाळेच्या शिपायला 1600 रुपये लागले, वसंताच्या माणसानी ते पैसे सतीशकडे दिले आणि सतीशने ते पैसे जुगारात उडवले.
शाळेचा शिपाई जेव्हा आपले पैसे मागायला आला, तेव्हा सतीश दडून राहू लागला, म्हणून तो शिपाई वसंता कडे गेला, आणि आपली स्लीप दाखवून पैसे मागू लागला. स्वतः वसंता प्रभाकर च्या स्टॉल कडे आला
वसंता – ह्या शिपायचे पैसे कित्या दिलस नाय, आमच्या माणसाने पैसे दिल्ले मा, मग?
सतीश थरथर कापत म्हणाला ” उद्या देतंय, पैसे खर्च झाले. ,’
वसंताने भर बाजारात सतिषच्या तोंडात दोन लाफा चढवल्या.
” तुका म्हाईत आसा मा, हो जरी मटको आसलो तरी सगळ्यात प्रामाणिक धंदो आसा, नुसत्या कागदावर लिहून दिल्ला आसता, पण कोणाचे पैसे बुडानात नाय. तुजामुळेमाजा आणि मटक्याचा नाव खराब झाला, बापाशिक सांग, रात्री पर्यंत पैसे नाय मिळाले तर गोळी मारून ठार मारतलंय ‘.
प्रभाकरला ही बातमी कळली, तू धावत धावत वसंताचे पाय पकडण्यासाठी आला पण तोपर्यंत वसंता घरी गेला होता. प्रभाकरने परत दोन लाथा सतीशच्या पेकटात घातल्या.
प्रभाकरला माहित होते, वसंता बोलल्यापणे करणार, तो गोळी घालायला मागे पाहणार नाही, तो घरी गेला आणि बॅगेत जपून ठेवलेले पैसे काढून वसंताच्या माणसाकडे दिले.
परत प्रभाकर काळजीत पडला, त्याच्या डोळ्यासमोर दहा माणसांचे चेहेरे येऊ लागले, इतक्या माणसांना दोन वेळा जेवण, शिवाय म्हाताऱ्याची औषधे, त्यात मोहिनीचे लग्न…
त्याच्या डोक्यात कल्पना आली, आपल्या गावात आणि आजूबाजूला भाजी पिकते. मुळा, लाल माठ, चवळी, ही भाजी खरेदी करून करून तालुक्याच्या गावात विकली तर?
त्याने मुलाला हाक मारली “झिला, हो धंदो काय चालणा नाय, इतक्या माणसाक दोन वेळा तोंडात घालूक व्हया कायतरी, काय तरी धंदो पाणी करूंक व्हयचं. तू असा कर, मी तुका भाजी घेऊन देताय, तुझ्याकडे होयत्त फुरफ़ुरा आसा, तेच्या पाठी भाजी बांध आणि सगळे बाजार कर. येताना मिरची, कोथिंबीर, टमाटे, आला आणलंस, की हय मी विकीन, तुजा काय मत ‘.
सतीश म्हणाला ” होय बाबानू, मी माज्या गाडयेर भाजी घेऊन जाईन, त्या पैशातून थोडी मिरची, कोथिंबीर आणीन बाकीचे पैसे परत तुमच्यकडे, परत भाजी घेऊक होई मा ‘.
– क्रमश: भाग १
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈





