विभावरी कुलकर्णी
जीवनरंग
☆ मेजवानी ☆ विभावरी कुलकर्णी ☆
एका शेतकऱ्याच्या गोठ्यात घडलेली ही गोष्ट केवळ दोन जनावरांची नाही, तर मैत्री, भिती आणि जगाच्या अजब न्यायाची एक वेधक कहाणी आहे.
तांबडं फुटायला अजून अवकाश होता. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा गावात थंडीचा कडाका भयंकर वाढला होता. शेतकरी गणपतराव यांच्या प्रशस्त गोठ्यात नेहमीसारखी गजबज नव्हती. तबेल्याच्या एका कोपऱ्यात गणपतरावांचा सर्वात आवडता आणि नखरेल घोडा ‘तुफान’ पडलेला होता.
तुफान हा काही साधा घोडा नव्हता. त्याचा रुबाब, त्याची चाल आणि त्याची चपळाई संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध होती. गणपतरावांच्या शेतीची आणि प्रतिष्ठेची ती एक शान होती. पण गेल्या चार दिवसांपासून तुफानला अचानक कसला तरी आजार झाला होता. त्याच्या अंगात भयंकर ताप होता आणि त्याचे मजबूत पाय त्याला साथ देत नव्हते. तो जमिनीवर असा पडून होता की जणू त्याच्यातील प्राणच निघून गेले आहेत.
तुफानच्या शेजारीच एका खांबाला बांधलेला होता ‘बब्या’.. गणपतरावांचा बोकड. बब्या स्वभावाने अतिशय खोडकर, चतुर आणि प्रेमळ होता. तुफान आणि बब्या यांची मैत्री फार जुनी होती. घोडा जरी आकाराने मोठा आणि ऐटबाज असला, तरी बब्याशी बोलताना तो नेहमी नम्र असायचा. बब्या रोज रात्री तुफानच्या पाठीवर तोंड टेकवून झोपायचा.
पण आज परिस्थिती वेगळी होती. तुफान निपचित पडला होता आणि बब्या चिंतेने त्याच्याभोवती फेऱ्या मारत होता.
सकाळच्या प्रहरी गणपतराव गावातील पशुवैद्यकीय डॉक्टर पाटणकरांना घेऊन गोठ्यात आले. डॉक्टरांनी आपली पिशवी बाजूला ठेवली, स्टेथॉस्कोप लावून तुफानची तपासणी केली, त्याचे डोळे तपासले आणि एक मोठा उदास सुस्कारा सोडला.
गणपतरावांनी चिंतेने विचारले, “डॉक्टर साहेब, काय होतंय माझ्या तुफानला? बरा होईल ना तो? पुढच्या महिन्यात बैलपोळ्याच्या दिवशी मला शहरात जायचंय, त्याच्याशिवाय माझं अडेल. “
डॉक्टर गंभीर चेहऱ्याने म्हणाले, “गणपतराव, परिस्थिती नाजूक आहे. तुफानच्या शरीरात भयंकर विषबाधा किंवा संसर्ग झाला आहे. त्याचे स्नायू अजिबात प्रतिसाद देत नाहीत. मी त्याला काही कडक औषधं आणि इंजेक्शन देतोय. आपण तीन दिवस वाट पाहू. “
“तीन दिवस? ” गणपतरावांचा आवाज कापरा झाला.
“हो, ” डॉक्टर ठामपणे म्हणाले. “आजचा पहिला दिवस. जर येत्या तीन दिवसांत हा स्वतःच्या पायावर उभा राहिला नाही, तर याचा अर्थ याचे शरीर पूर्णपणे निकामी झाले आहे. अशा स्थितीत याला वेदना देत जगवण्यात काही अर्थ नाही. जर तीन दिवसांत तो उठला नाही, तर दयामरण म्हणून त्याला मारून टाकावं लागेल नाहीतर हा आजार गोठ्यातील इतर जनावरांमध्ये पसरू शकतो. “
हे ऐकून गणपतरावांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी होकारात मान हलवली. डॉक्टर औषधे देऊन निघून गेले.
गणपतराव आणि डॉक्टर निघून गेल्यानंतर गोठ्यात स्मशानशांतता पसरली. पण या संभाषणाचा एक-एक शब्द शेजारी उभ्या असलेल्या त्या बोकडाने स्पष्ट ऐकला होता. बब्याचे काळीज धडधडले.
डॉक्टर निघून गेल्यावर बब्याने गणपतरावांनी मारलेली गाठ कशीबशी सोडवली आणि तो धावतच तुफानजवळ गेला. तुफानचे डोळे अर्धे मिटलेले होते आणि तो निपचित पडला होता.
बब्याने तुफानच्या कानाजवळ तोंड नेले आणि त्याला ढकलत म्हणाला, “तुफान! अरे भावा, ऐकतोयस का? उठ! तुला उठावच लागेल! “
तुफानने मंद आवाजात हुंकार दिला, “बब्या, मला त्रास देऊ नकोस रे. माझ्या अंगात अजिबात ताकद उरलेली नाही. माझे पाय लाकडासारखे कडक झालेत. मला वाटतं माझं शेवटचं नक्षत्र जवळ आलंय. “
“अरे वेड्या! ” बब्या ओरडला, “तू काय समजतोयस? डॉक्टर काय सांगून गेलाय माहित्येय तुला? त्यांनी तुला तीन दिवसांची मुदत दिलीये! जर तू या तीन दिवसांत स्वतःच्या पायावर उभा राहिला नाहीस, तर ते तुला मारून टाकतील! औषधाचा डोस देऊन तुझा खेळ खलास करतील! “
तुफानने अंधुक डोळ्यांनी बब्याकडे पाहिले, “मरू दे रे बब्या… या वेदनांपेक्षा मरण सोपं वाटतंय मला. “
“नाही! ” बब्या ठामपणे म्हणाला. “मी तुला मरू देणार नाही. तू तुफान आहेस! वाऱ्याच्या वेगाने पळणारा घोडा! तू असा हार मानू शकत नाहीस. तुला माझ्यासाठी, तुझ्या अस्तित्वासाठी उठावं लागेल. आजचा पहिला दिवस आहे, प्रयत्न कर! “
पहिल्या दिवशी बब्याने दिवसभरात शंभर वेळा तुफानला उठवण्याचा प्रयत्न केला. तो त्याला डोक्याने धक्के देई, त्याच्या कानात ओरडे, त्याला हिंमत देई. पण तुफान अजिबात हलला नाही. संध्याकाळी गणपतराव आले, त्यांनी तुफानची अवस्था पाहून दुःखाने सुस्कारा सोडला आणि निघून गेले. दिवस वाया गेला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर पुन्हा आले. त्यांनी तुफानला दुसरे इंजेक्शन दिले आणि म्हणाले, “गणपतराव, आज दुसरा दिवस संपत आलाय. अजूनही काहीच हालचाल नाही. उद्या शेवटचा दिवस असेल. जर उद्या सकाळी हा उठला नाही, तर मला विषारी इंजेक्शन आणावे लागेल. “
गणपतराव काहीच बोलले नाहीत, त्यांनी फक्त अश्रू पुसले.
डॉक्टर गेल्यावर बब्या अक्षरशः वेडापिसा झाला. काळ वेगाने निघून चालला होता. आपल्या मित्राचे आयुष्य अवघ्या काही तासांचे उरले होते. बब्याने तुफानच्या पाठीवर चढून त्याला शिंगांनी हळूच टोचायला सुरुवात केली.
“तुफान, उठ! अरे मित्रा, बघ बाहेर सूर्य उगवलाय. तू उठणार नाहीस तर उद्या हा सूर्य तुला पाहायला मिळणार नाही! विचार कर, त्या गणपतरावांचा, ज्यांनी तुला लहानसा असल्यापासून पाळलं. विचार कर माझा… तू गेलास तर मी कोणाशी खेळणार? कोणाच्या पाठीवर बसणार? उठ तुफान, ताकद लाव! ” बब्या कळवळून सांगत होता.
बब्याच्या शब्दांतील ती तळमळ, तो त्रास आणि प्रेम तुफानच्या हृदयापर्यंत पोहोचले. तुफानने आपले पुढचे दोन पाय हलवण्याचा प्रयत्न केला.
“हो! असाच! प्रयत्न कर! ” बब्या उत्साहाने ओरडला.
तुफानने संपूर्ण ताकद पणाला लावली, मान वर केली, पण शरीर जड पडल्यामुळे तो पुन्हा धप्पकन खाली कोसळला. तुफानच्या डोळ्यातून अश्रू आले. “बब्या, माझ्याने नाही होत रे… माझे पाय साथ देत नाहीत. “
“होईल! तुला करावच लागेल! उद्या शेवटचा दिवस आहे तुफान, ताकद दाखव तुझी! ” बब्या रात्रभर तुफानच्या शेजारी बसून त्याला जागे ठेवत होता, त्याला सतत प्रोत्साहन देत होता.
तिसरा दिवस उजाडला. थंडी अजूनही तशीच होती. आज डॉक्टरांनी दिलेली अंतिम मुदत होती. गणपतराव आणि डॉक्टर गोठ्याकडे येत असल्याचे पावलांचे आवाज आले.
बब्या मनातून पूर्ण घाबरला होता. त्याने पाहिले, डॉक्टरांच्या हातात एक वेगळीच, मोठी पिशवी होती. ज्यात कदाचित तुफानचा जीव घेणारे औषध होते.
“तुफान! ” बब्या जोरात ओरडला. “बघ, ते आलेत! तुला मारायला आलेत! ही तुझी शेवटची संधी आहे. उठ! उभं राहा! त्यांना दाखवून दे तू अजून जिवंत आहेस! उठ मित्रा, माझ्यासाठी उठ! “
बब्याने तुफानच्या तोंडाजवळ जाऊन त्याला जोराने डोके मारले. बब्याची ती धडपड, त्याचा तो आक्रोश पाहून तुफानच्या आत काहीतरी पेटून उठले. मृत्यू समोर उभा होता आणि मैत्री पाठीशी उभी होती!
तुफानने एक मोठा दीर्घ श्वास घेतला अंगातील उरलीसुरली सर्व ताकद गोळा केली. त्याच्या नसा-नसांमध्ये रक्ताचा प्रवाह वेगाने धावू लागला. त्याने आपले मागचे पाय टेकवले… पुढच्या पायांवर जोर दिला… आणि…
धडपडत, थरथरत, तुफान स्वतःच्या चारही पायांवर उभा राहिला!
बब्याच्या आनंदाचा सीमा उरली नाही. तो आनंदाने गोठ्यात उड्या मारू लागला. “उठला! माझा तुफान उठला! “
तुफानने दोन पावले पुढे टाकली. त्याचे पाय अजून थरथरत होते, पण तो उभा होता! त्याने मान वर केली आणि खणखणीत खिंकाळला.
समोर उभे असलेले गणपतराव आणि डॉक्टर गोठ्याच्या दारातच थांबले. त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
“अरे वा! चमत्कार झाला! ” डॉक्टर आनंदाने ओरडले. “गणपतराव, तुमचा घोडा वाचला! औषधाने काम केलं आणि याच्या अंगातली जगण्याची इच्छा जिंकली. बघा, तो चालू लागलाय! “
गणपतरावांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी धावत जाऊन तुफानच्या गळ्याला मिठी मारली. तुफान आता सावकाश सावकाश बाहेर पडला. मोकळ्या हवेत आल्यावर त्याच्या अंगात नवीन ऊर्जा संचारली. तो मोकळ्या मैदानात हळूहळू पळू लागला. वाऱ्याच्या वेगाने नाही, पण एका आजारातून उठलेल्या घोड्यासारखा तो उत्साहाने पळत होता.
आपल्या मित्राला पळताना पाहून गोठ्याच्या कोपऱ्यात उभा असलेला बब्या समाधानाने हसत होता. त्याची मेहनत, त्याची तळमळ यशस्वी झाली होती. त्याने आपल्या मित्राचा जीव वाचवला होता.
दुपार झाली. तुफानची प्रकृती आता पूर्णपणे पूर्ववत होत होती. गणपतरावांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांचा सर्वात मौल्यवान घोडा मरणाच्या दारातून परत आला होता. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.
गणपतरावांनी मनात विचार केला, “आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे. माझा तुफान वाचला! या आनंदाच्या प्रसंगी देवाला नैवेद्य दाखवायला हवा आणि गावातल्या चार प्रमुख लोकांना, डॉक्टरांना घरी जेवायला बोलवायला हवं. असा मोठा आनंद साजरा करायचा तर घरात काहीतरी विशेष मेजवानी झालीच पाहिजे! “
गणपतराव घरात गेले. त्यांनी आपल्या मुलाला आणि काही गड्यांना बोलावले.
गणपतराव तबेल्याकडे चालत आले. त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद होता. तुफान झाडाखाली शांतपणे घास खात होता. बब्या तुफानच्या शेजारीच बसून आरामात रवंथ करत होता. बब्याला वाटले, गणपतराव तुफानचे कौतुक करायला आले आहेत.
गणपतरावांनी बब्याकडे पाहिले. त्यांच्या मनात एक विचार आला ‘आजच्या या मोठ्या आनंदाच्या आणि उत्सवाच्या दिवशी मटणाचा बेत करायला काय हरकत आहे? ‘
गणपतरावांनी गड्याला हाक मारली, “अरे सोमा, इकडे ये! “
सोमा धावत आला, “हो मालक? “
गणपतराव बब्याकडे बोट दाखवत म्हणाले, “आज आपला तुफान बरा झालाय. एवढा मोठा आनंद झालाय आपल्याला! या आनंदाच्या निमित्ताने आज घरात मटणाची छान मेजवानी झाली पाहिजे. डॉक्टर साहेबांना आणि सरपंचांना जेवायला बोलवायचंय. जा, या बकऱ्याला कापा आणि मस्त मटणाचा बेत करा! “
सोमाने दोरी हातात घेतली आणि तो बब्याकडे वळला.
बब्या स्तब्ध झाला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या मित्राचा जीव वाचवण्यासाठी त्याने तीन दिवस रात्रीचा दिवस केला, ज्याच्यासाठी तो कळवळून ओरडला, ज्याच्या जीवाच्या आनंदासाठी त्याने देवाला नवस बोलले… त्याच मित्राच्या ‘वाचण्याच्या आनंदाचा’ मोबदला म्हणून आज बब्याचा जीव घेतला जाणार होता!
सोमाने बब्याची दोरी घट्ट पकडली आणि त्याला ओढू लागला. बब्याने तुफानकडे पाहिले. तुफान अजूनही अज्ञानीपणे गवत खाण्यात आणि स्वतःच्या नवसंजीवनीचा आनंद घेण्यात मग्न होता. त्याला बहुदा कळतच नव्हते की त्याला मिळालेले हे नवीन जीवन त्याच्या मित्राच्या मृत्यूच्या किंमतीवर आले होते.
बब्याला आता कळून चुकले होते, जगाचा न्याय किती विचित्र आणि क्रूर असतो. ज्याच्यासाठी तुम्ही सर्वस्व पणाला लावता, शेवटी तुमचाच बळी देऊन लोक स्वतःचा उत्सव साजरा करतात.
त्या दिवशी संध्याकाळी गणपतरावांच्या वाड्यात हशा आणि आनंदाचे उधाण आले होते. तुफान सुखरूप बरा झाल्याच्या आनंदात सर्वजण मटणाच्या मेजवानीवर ताव मारत होते… आणि गोठ्यात तुफान, एकाकी उभा राहून आपल्या गायब झालेल्या मित्राची वाट पाहत होता.
© विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.
सांगवी, पुणे
– ८०८७८१०१९७
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





