श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ वाढदिवस… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(प्यायला बसले की पाचपाच हजाराची दारु ते पिऊन जातात असं शेठजींच्या कानावर आलं होतं. आणि आता एका चांगल्या कामासाठी दोन हजार द्यायला खळखळ करत होते) इथून पुढे – – 

” मी पवार साहेबांशी सहमत आहे ” पारेख उठून म्हणाले ” गरीबांना अशा गोष्टींची सवय लावायचीच कशाला? अशाने ते शेफारतात. एकदा सेलेब्रेट केल्यावर पुढच्या वर्षीही त्याची तीच अपेक्षा राहिल”

” तसं काही होणार नाही पारेख साहेब. पुढच्या वर्षी तो मोठा होईल त्याला आपोआपच जाणीव होईल ” शेठजी ठामपणे म्हणाले

” मला वाटतं आपण करावा वाढदिवस” वानखेडे उठून म्हणाले ” आपण सगळेच सधन आहोत. काय हरकत आहे दोनदोन हजार द्यायला. अहो तेवढ्या रकमेचं तर आपण जेवणच करणार आहोत. शेठजी बरोबर म्हणताहेत “

आता चर्चा रंगू लागली. प्रस्तावाच्या बाजूने आणि प्रस्तावाच्या विरोधात बोलणारे तावातावाने आपली बाजू मांडू लागले. आपल्या प्रस्तावाला थोडाही विरोध होणार नाही अशी अपेक्षा घेऊन आलेले लोढाशेठ समोरचे वादविवाद पाहून क्षुब्ध झाले. माणूस इतका स्वार्थी कसा होऊ शकतो याचंच त्यांना आश्चर्य वाटत होतं.

” शेठजी मी निघू का? मला शाॅपिंगला जायला उशीर होतोय ” गव्हाणेबाई अस्वस्थ होऊन म्हणाल्या तसे अध्यक्ष पाटील उठले

” दोन मिनिट थांबा गव्हाणे मॅडम. एकमत न झाल्यामुळे आपण मतदान घेऊ. दिनूचा वाढदिवस साजरा करावा असं किती जणांचं मत आहे त्यांनी हात वर करावा”

समोरच्या बारा जणातून फक्त कुलकर्णी, वानखेडे, चव्हाण, गव्हाणेबाई यांनी हात वर केले. पवार, महाजन, जोशी, पारेख, लोखंडे, सुलक्षणेबाई यांनी हात वर केला नाही. फक्त चार हात वर आलेले पाहून लोढाशेठ चिंतातूर झाले

“चार जण. अध्यक्ष आणि मी आमचं मत धरुन सहा जण होताहेत. म्हणजे सहा विरुद्ध सहा असा बिकट मामला झालाय”

” आता यावर उपाय काय? “सुलक्षणे बाईंनी विचारलं

” सोपं आहे. आज जे आले नाहीत त्यांना मी मेसेज पाठवून निर्णय विचारतो. जर नाही म्हणणाऱ्यांची संख्या जास्त झाली तर मी स्वतः सगळा खर्च करुन त्या मुलाचा वाढदिवस करेन “शेठजी थोडेसे चिडूनच दृढनिश्चयाने म्हणाले तसे पवार उठून म्हणाले

“जर तुम्हांला वाढदिवस करायचाच होता तर आम्हांला बोलावलं कशासाठी? फालतू आमचा वेळ घालवला”आणि ते उठून बाहेर चालायला लागणार तेवढ्यात शेठजी म्हणाले

“एक मिनिट. माझी सर्वांना विनंती आहे की निर्णय काहिही होवो, या विषयाचा उल्लेख दिनू किंवा एकनाथजवळ करु नका. आपल्याला त्या कुटुंबाला सरप्राईज द्यायचंय “

“ठिक आहे “सर्व म्हणाले आणि पवारांच्या मागे सर्वजण निघून गेले.

“बघा मी तुम्हांला म्हंटलं नव्हतं की सगळे नमुने आहेत. पैसे देणार नाहीत. ठिक आहे. मेसेज पाठवून बघा सगळ्यांचा काय निर्णय होतो ते आणि मला कळवा”पाटीलसाहेब उद्वेगाने म्हणाले.

शेठजींना काय बोलावं ते कळेना. त्यांनी फक्त मान डोलावली.

घरी येऊन हा विषय त्यांनी बायकोला सांगितला. बायको रागाने मारवाडी भाषेत म्हणाली

“तुम्हांलाही नको त्या उचापत्या सुचतात. खरंच काय गरज आहे त्या पोराचा वाढदिवस करायची. असा कोणता तो मंत्रीसंत्री लागून गेलाय? मान्य आहे तो मेहनती आहे, प्रामाणिक आहे, विशेष म्हणजे तो कुणाच्याही मदतीला धावून जातो पण या लोकांना असं डोक्यावर चढवायचं नसतं हे माझ्यापेक्षाही तुम्हाला चांगलं समजतं कारण एवढं मोठं सुपरशाॅप तुम्ही चालवता ते उगाच नाही. आणि तुम्हांला एवढं त्याच्याबद्दल वाटतंच आहे तर त्याला घरी बोलवा. एखादा ड्रेस आणि मिठाईचा बाॅक्स त्याच्या हातात द्या बस झालं. पुर्ण सोसायटीच्या लोकांना बोलावून आपल्या सनीसारखा वाढदिवस साजरा करायची काहीच गरज नाही. दुसरं तुम्ही प्रत्येकाकडून दोन हजार घ्यायचं म्हणताय. अहो गणेशोत्सवासाठी आणि नवरात्राच्यावेळी वर्गणीचे साधे पाचशे रुपये द्यायलासुध्दा हे लोक त्रास देतात ते तुम्हांला काय दोन हजार काढून देणारेत? “

“वर्गणीची गोष्ट वेगळी आहे. तिथे भावना नसतात. पण इथे हा मुलगा सगळ्या कुटुंबांशी जोडला गेलाय. तू म्हणते तसा त्याचा वाढदिवस तर आपण कधीही करु शकतो. पण त्या पोराने जे स्वप्न बघितलंय ते पुर्ण करावं असं मला मनापासून वाटतंय”

“तुम्ही पण ना!एकदा काही ठरवलं की त्याच्यावरच अडून बसता”असं म्हणत ती तणतणत किचनमध्ये निघून गेली.

दुसऱ्या दिवशी शेठजींनी बाकीच्या छत्तीस परीवारांना मेसेज पाठवला. दिनूचा वाढदिवस साजरा करण्यामागची आपली भुमिका सविस्तर मांडून प्रस्तावाच्या बाजूने मत द्यायचं आवाहन केलं. तीनचार दिवस तर कुणाचीही प्रतिक्रिया आली नाही. त्यानंतर लोकांनी “कशासाठी हा उपद्व्याप करताय? , अशा अनिष्ट प्रथा पाडू नका, इतका खर्च का येतोय त्याचा हिशोब द्या, दोन हजार फार होतात, शंभरदोनशेत जे करायचं ते करा” अशा संतापजनक प्रतिक्रिया नोंदवल्या. प्रस्तावाच्या बाजूने फक्त आठ तर विरोधात सोळा मतं पडली. बाकीच्या बारा जणांनी सर्वसहमतीने जे ठरेल त्याला आम्ही राजी आहोत असं तटस्थ मत नोंदवलं. या तटस्थ लोकांचा शेठजींना भयंकर राग आला. हे तटस्थ लोकच चांगल्या कृत्यांच्या बाजूला उभं न रहाता वाईट कृत्यांना एक प्रकारे समर्थनच देतात हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी परत एकदा या लोकांना मेसेज पाठवून “फक्त हो किंवा नाही एवढंच कळवावे “अशी विनंती केली. पण तिचा काही उपयोग झाला नाही. अशा लोकांना कुणाच्याच नजरेत वाईट व्हायचं नसतं किंवा उघडपणे कोणतीही भुमिका घ्यायचं धैर्य त्यांच्यात नसतं. शेवटी सात दिवस वाट बघून शेठजींनी मतांची गणना केली. चौदा विरुद्ध चोविस मतांनी ते हरले होते. त्यांना खुप वाईट वाटलं. दिनू फुकट सर्वांची कामं करत होता त्याची लोकांनी शुन्य किंमत केली होती. याच कामाकरीता जर नोकर ठेवला असता तर महिन्याला तीनचार हजार त्याने सहज घेतले असते आणि या लोकांनी न कुरकुरता ते दिले असते. एकदम त्यांच्या डोक्यात सणक आली आणि त्यांना वाटलं, जावं आणि दिनूला सांगावं की “तुझ्या उपकाराची या लोकांना जाण नाही. यापुढे कुणाचंही काम करणं बंद कर”. पण त्यांनी मन आवरलं. शेवटी ते सोसायटीचे सेक्रेटरी आणि प्रतिष्ठित व्यापारी होते. त्यांना असं करणं शोभणारं नव्हतं.

दोनतीन दिवसांनी अध्यक्ष पाटिलसाहेबांचा फोन आला

“मग ठरलं का दिनूचा वाढदिवस साजरा करायचं? “

त्यांना काय उत्तर द्यावं ते शेठजींना कळेना. शेवटी त्यांनी खरं सांगायचं ठरवलं

” प्रस्तावाच्या बाजूने फक्त चौदा मतं पडली साहेब. त्यामुळे वाढदिवस कॅन्सल करावा लागणार”

पाटिलसाहेब जोरजोरात हसले

“मी म्हंटलं होतं ना तुम्हांला आपल्या सोसायटीत एकूण एक नमूने आहेत म्हणून. तुम्ही त्यादिवशी म्हंटला होतात की कुणी नाही केला तरी मी करणारच, मग कॅन्सल का करताय? जे तयार आहेत त्यांच्याकडून पैसे घ्या, उरलेले तुम्ही टाका आणि करुन टाका वाढदिवस”

“तसं करता येईल पण ते योग्य दिसणार नाही. ठिक आहे बघतो मी काय करायचं ते ” असं म्हणून त्यांनी पाटिलसाहेब काही म्हणायच्या आत फोन कट केला.

एकेक दिवस निघायला लागला तशी शेठजींच्या मनाची घालमेल वाढली. “कुणी नाही दिले पैसे तर मी माझ्या पैशाने वाढदिवस करीन”असे ते जोशात म्हणून तर गेले होते पण आता त्यांना तेवढे पैसे खर्च करणं जीवावर येत होतं. चौदा जणांनी पैसे दिले तरी उरलेले सत्तर बहात्तर हजार पदरचे

खर्च करायला त्यांच्या मनाची तयारी होत नव्हती. काय दुर्बुद्धी सुचली आणि आपण ते बोलून चुकलो याचा त्यांना आता पश्चात्ताप होऊ लागला.

एक दिवस एक गडबड झाली. संध्याकाळच्या वेळेस जोशींचा मुलगा आपली महागडी बाईक सोसायटीच्या बाहेर लावून घरात गेला. पाचच मिनिटात परत येऊन त्याला बाहेर जायचं होतं. दुर्दैवाने तो गाडीची चावी गाडीलाच विसरुन गेला. घरात गेल्याबरोबर त्याच्या मैत्रीणीचा फोन आला. तिच्याशी गप्पा मारतामारता आपण गाडी बाहेरच लावलीये हे तो विसरला. त्याच सुमारास एक बाईक चोर तिथं आला. बाईकला लागलेली चावी पाहून त्याला आनंदाचं भरतंच आलं. सिक्युरिटीच्या केबिनमध्ये तेव्हा राम नावाच्या सिक्युरिटी गार्डसोबत दिनूही बसला होता. त्याने बाईक स्टार्ट झाल्याचा आवाज ऐकला आणि तो ताठ झाला. जोशींच्या मुलाला त्याने मगाशीच वर जातांना पाहिलं होतं. एका सेकंदात तो गेटच्या बाहेर आला. बाईकवर दुसरा माणूस पाहून सगळा मामला त्याच्या लक्षात येऊन तो त्या बाईकस्वारावर जोरात ओरडला. बाईकचोराने बाईक वळवून मेन रोड वर जशी घातली दिनू जीवाच्या आकांताने त्याच्या मागे पळाला. बाईक आपल्या हातात लागणार नाही हे पाहून त्याने एक झेप घेऊन तीची मागची बाजू पकडली आणि तिला तो खेचू लागला. बाईकचोराने बाईकचा वेग वाढवला. दिनूने ते पाहून पायात घातलेल्या चपला रोडवर ताकदीने दाबून धरल्या. बाईकचा स्पीड कमी झाला पण दिनू आता फरपटत पुढे जाऊ लागला. सुदैवानं समोरुन येणाऱ्या दोन बाईकस्वारांचं लक्ष या प्रकाराकडे गेलं. त्यांना यात काहीतरी गडबड आहे हे लक्षात आलं. एकाने आपली बाईक सरळ बाईकचोराच्या समोर उभी केली. दुसऱ्याने चपळाईने खाली उतरुन बाईकचोराच्या बाईकची चावीच हस्तगत केली.

” हा चोर आहे. गाडी चोरुन घेऊन चाललाय “दिनू ओरडला तसा एका बाईकस्वाराने बाईकचोराच्या मुस्काटात दोन थपडा मारल्या. आता बरेच लोक जमा झाले. सिक्युरिटी गार्डही धावत आला. कुणीतरी पोलिसांना फोन लावला. बाईकचोराला लोकांनी पकडून ठेवलं.

“कुणाची गाडी आहे रे ही? “सिक्युरिटी गार्ड रामने दिनूला विचारलं

“त्या जोशीसाहेबांची आहे”दिनू म्हणाला. तेवढ्यात जोशींचा मुलगा धावत आला. बाईक पाहून त्याला हायसं वाटलं.

घरी जाऊन जोशींच्या मुलाने झालेला सगळा प्रकार त्याच्या वडिलांना सांगितला.

“बाबा त्या दिनूची कमाल म्हंटली पाहिजे. त्याची चप्पल तुटली, पॅंट फाटली तरी त्याने गाडी सोडली नाही. बाबा दिनूला काहितरी बक्षीस दिलंच पाहिजे”

“पाचशे रुपये देऊन टाक”

“बाबा आपली दिड लाखाची गाडी त्याने चोरी जाण्यापासून वाचवली आणि फक्त पाचशे रुपये द्यायचे? “

“अरे गाडी नेली असती तरी आपण चोवीस तासात

शोधून आणली असती. पोलीस खात्यात आपल्या ओळखीच आहेत तशा ” जोशी अभिमानाने म्हणाले

“हो. ते ठिक आहे पण पोलिसांनाही तुम्हांला एकदिड हजार बक्षीस म्हणून द्यावेच लागले असते ना? “

पोरगा ऐकत नाही हे पाहून जोशींचं डोकं तापलं

“हे बघ चूक तुझी आहे. तुला गाडीची चावी काढता येत नव्हती? आता मला उगीच मनस्ताप देऊ नकोस नाहीतर तुझी गाडीच मी विकून टाकेन ” बापाने दम भरल्यावर पोरगा चुप बसला पण कुठेतरी त्याच्या मनाला ते पटलं नव्हतं.

दोनतीन दिवसांनी अजुन एक घटना सोसायटीत घडली. सुलक्षणेबाईंची गांवातच रहाणारी मुलगी माहेरी आईवडिलांना भेटायला आली होती. संध्याकाळी ती आपल्या घरी निघून गेली. रात्री दहा वाजता तिचा सुलक्षणे बाईंना फोन आला.

“आई एक गडबड झालीये. माझं एक कानातलं सापडतच नाहीये. मी तुझ्याकडे आले तेव्हा दोन्ही कानात होते. आता मात्र डाव्या कानातच आहे” ती रडकुंडीला येऊन बोलत होती

 – क्रमशः भाग दुसरा

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted