सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
पुस्तकावर बोलू काही
☆ शब्दयात्री (ललित लेख संग्रह) – लेखिका : सुश्री जयश्री जयशंकर दानवे ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
पुस्तक परिचय
पुस्तक : शब्दयात्री (ललित लेख संग्रह)
लेखिका : जयश्री जयशंकर दानवे
प्रकाशक : अथर्व प्रकाशन
प्रथम आवृत्ती : मार्च 2025
नामवंत कवी आणि गीतकार यांची माहिती देणारे अतिशय सुंदर पुस्तक!
अनुक्रमणिका वाचतानाच भा. रा. तांबे, बालकवी ठोंबरे, कवी अनिल, बा.भ. बोरकर, कुसुमाग्रज, वा.रा.कांत, इंदिरा संत, विंदा ,अशी नामावली वाचत गेले आणि खूप छान काही वाचायला मिळणार अशी खात्रीच झाली!
प्रत्येक कवी कवयित्रींच्या काव्याबरोबरच त्यांची इतरही माहिती या पुस्तकात वाचायला मिळते काव्य कसे सुचलं, केव्हा सुचलं ह्या गोष्टी सुद्धा त्यामध्ये दिल्या आहेत.
अनुक्रमणिकेच्या पुढील भागात शांता शेळके, पाडगावकर, सुरेश भट, आरती प्रभू, कवी ग्रेस, जगदीश खेबुडकर ,शांताराम नांदगावकर ,कवी ग्रेस,सुधीर मोघे, ना.धो. महानोर अशा कवीं बद्दल आणि त्यांच्या गीतांबद्दल वाचायला मिळणे म्हणजे एक मेजवानीच आहे .या पुस्तकात अशी २० व्यक्तिचित्रणे वर्णन केली आहेत. आपल्या काव्य- कवितांच्या साम्राज्यातील हे सर्व माणिक मोतीच आहेत!
‘जन पळभर म्हणतील हाय हाय..’ हे अतिशय भावपूर्ण गीत तर गदिमांचे ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे गीत कसे जन्माला आले याचे लेखिकेने वर्णन केले आहे. शांता शेळके यांचे ‘ऋतू हिरवा, कवी ग्रेस यांचे ‘भय इथले संपत नाही,’ जगदीश खेबुडकर यांचे ‘देहाची तिजोरी’ सर्वच गाणी मनाला भुलवणारी आणि गेय आवडणारी अर्थपूर्ण अशी गाणी!
गाण्यांचे अर्थ खूपच छान उलगडून दाखवले आहेत. ज्यांना काव्याची आवड आहे त्यांना अगदी भुरळ घालणारे असे हे पुस्तक आहे. जयश्रीताई दानवे यांनी लिहिलेली ही कवींच्या काव्याबद्दलची परीक्षणे अतिशय सुंदर आहेत!
पुस्तकातील भाषा अर्थ प्रवाही भावप्रवाही अशी आहे त्यात वापरलेले शब्द तरल भाव दाखवणारे असे आहेत. कवीच्या, लेखकाच्या मनातील अभिप्रेत अर्थ त्याच्या कवितेत उतरतो तेव्हा तो लेखक किंवा कवी शब्द- यात्रीच असतो!
असे हे पुस्तक वाचणे सर्वांनी जरूर वाचावे असे मला वाटते.
परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
वारजे, पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







