श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “संभ्रमाचे सांगाती” – लेखक : डॉ. नंदू मुलमुले ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : संभ्रमाचे सांगाती
लेखक : डॉ. नंदू मुलमुले
मूल्य : २५०₹
2017 सालच्या दैनिक लोकसत्ता ‘चतुरंग’ पुरवणीतील वर्षभराच्या लेखांचे हे संकलन आहे. मनोगतात डॉ. नंदू मूलमुले लिहितात, प्रत्येकाला काही ना काही समस्या असतात. पण ह्या लेखमालेमुळे ‘मी एकटाच या जगात नाही’ हे वाचकांना सांगण्याचे आश्वासक काम ह्या लेखातून झाले. शिवाय मला हे नवीन ज्ञान प्राप्त झाले की वाचकांची भाषा, कथन शैली, अनुभव मांडण्याची आपलीशी केली त्यांना त्यात आपलेपण वाटू लागतो. त्यात कित्येकांना आपल्या समस्येची छाया दिसते. आपल्या समस्या कुणा तज्ञ व्यक्तीला नेमक्या समजल्या आहेत असं वाटू लागतं. सगळ्या समस्यांना झटपट उत्तर नसते. काहींना तर उत्तरेच नसतात तर काही वेगळ्या नजरेने पाहिल्यावर त्या समस्याच नाहीत हे कळते.
ताण हे परिस्थितीमुळे नाही तर आमच्या मनस्थितीमुळे निर्माण होतो, हे आपल्या लक्षात येते. परस्पर नातेसंबंधही मानसिक आरोग्याशी निगडीत महत्वाची बाब आहे. आयुष्यात आनंद हवा असेल तर अन्न, वस्त्र, निवारा या सोबतचे तुमचे आप्त, स्वकिय, मित्र यांच्याशी पूरक, संवादी नाते हवे हे जागतिक स्तरावर मान्य केलेले तत्व आहे. त्यासाठी संवाद हवा, त्यात एकवेळ वाद चालेल, थोडा विसंवाद ही चालेल पण असंवाद घातक. त्याच्या अभावी पालक मुलांपासून, पती पत्नी एकमेकांपासून आणि माणूस माणसापासून तुटून जातात. आता एका संवादाने कुणाचं आयुष्य बदलत नाही हे जरी खरे असले तरी त्याबद्दलची दिशा मिळू शकते हेही खरे आहे.
पुस्तकात एकूण 24 कथा आहेत. प्रत्येक कथा साधारण तीन चार पानांची आहे. त्यामुळे एक एक कथा वाचायला फारशा वेळ लागत नाही. शिवाय कथाच असल्याने कोणतीही वाचायला सुरुवात करता येते. प्रत्येक कथेत एखादी समस्या आहे. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला मागायला जेव्हा पेशंट त्यांच्याकडे आला तेव्हाची त्याची मनस्थिती, त्याच्या मनातील विचार ह्याचे निरिक्षण अतिशय बारकाईने, तटस्थपणे डॉक्टरांनी केले आहे. शिवाय कुठेही त्याच्याबद्दल चेष्टेचा सूर त्यांच्या लिखाणात जराही जाणवत नाही. प्रत्येकाला सहृदयतेने समजून घेतात हे फार महत्वाचे.
एक कथा म्हणजे ‘एका रुग्णाची गोष्ट’. कथेतील नायक सामान्य केळी विकणारा माणूस. आपल्या पत्नीच्या औषधासाठी त्यांच्याकडे आला आहे; पण पत्नीला बरोबर न आणता. कारण तिला काम आहे, मुलं घरी आहेत, म्हातारी आईला सोडून येता येत नाही वगैरे अनंत कारणे देणारा. पण बायको थोडीशी शिकलेली असल्याने ती नवर्याबरोबर अगदी त्रोटक चिठ्ठी पाठवून काय होते ते कळवत असते. पण त्यातून डॉक्टरांना तिच्या आजाराचा नक्की अर्थबोध होतो. नवर्याची गुटक्यासारखी व्यसने, चार मुलांचा संसार वगैरे सर्व कारणे न सांगता त्यांना कळत जातात आणि ते प्रत्येक वेळी तिला औषध देतानाच तिच्या नवर्याला गुटका खाणे कसे धोकादायक आहे, मुलांची संख्या वाढू न देण्यासाठी ऑपरेशनचा सल्ला, त्यासाठी लागणारी सर्व मदत करतात आणि पेशंट कधीच न पाहाता ही हळूहळू तिच्यामध्ये कसा बदल होतो हे फार छान सहजपणे वर्णन केले आहे. कारण तिची मूळ समस्या वेगळीच होती.
पत्रकार लेखक अंबरीश मिश्र यांची प्रतिक्रिया – –
माणसाच्या मनाचा थांग लागत नाही. तत्त्वज्ञ, कलावंत, शास्त्रज्ञ, संत-महात्मे माणसाच्या मनाचा गुंता सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात आणि भय, गंड, विकार, एकटेपण, दुभंगलेपण हा ‘धन्याचा माल’ पाठीवर घेऊन आपण सगळे आयुष्याच्या ओसाडीत भटकत असतो. बहुसंख्य तरून जातात; काही मागे घुटमळत राहतात, तडतडत राहतात. ‘दुख की लंबी रात’ असं जिणं जगत असतात.
डॉ. नंदू मुलमुले हे निष्णात मनोव्यथातज्ज्ञ आहेत; परंतु व्यावसायिक फायद्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी या प्रश्नाचा सुजाणपणे, समग्रपणे विचार केलाय. ‘संभ्रमाचे सांगाती’ हे पुस्तक म्हणजे त्यांनी आपखुषीनं स्वीकारलेल्या व्रताची सांगता आहे. मनोव्यथाग्रस्तांच्या केसेसचं निर्जंतुक संकलन, असं या पुस्तकाचं स्वरूप नाहीए. डॉ. मुलमुले जिव्हाळ मनानं देवाच्या लेकरांच्या गोष्टी सांगताहेत. वाचकांना त्या निश्चितच आवडतील. या पुस्तकामुळे आपल्या समाजाची भावनिक साक्षरता वाढीस लागेल, असा विश्वास वाटतो.
लॉकडाउन च्या काळात २०२१ साली या संग्रहातील कथांवर आधारित, प्रसिद्ध रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित “मन सूद्ध तुझं” ही मालिका ‘एबीपी माझा’ वाहिनीवर तेरा भागांत प्रसारित झाली होती. प्रसिद्ध नायक स्वप्निल जोशी या मालिकेत मनोविकारतज्ज्ञाच्या भूमिकेत होते.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





