श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

“होर्मुझचे महायुद्ध” – लेखक : श्री विजय लोणकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली

पुस्तक : होर्मुझचे महायुद्ध

लेखक: विजय लोणकर

पृष्ठ: १९२

मूल्य २९५₹ 

इतिहासाच्या पानांवर नजर टाकली, तर एक सत्य ठळकपणे जाणवते ते म्हणजे, जगातील प्रत्येक मोठ्या युद्धाच्या मुळाशी केवळ भूमी, धर्म वा विचारधारा नसते, तर त्या युद्धाची खरी नाळ असते ती संसाधनांच्या, विशेषता ऊर्जेच्या नियंत्रणाशी हॉर्मुझची सामुद्रधुनी हे त्याचे आजचे जिवंत उदाहरण आहे. जगातील एक तृतीयांश खनिज तेल याच अरुंद जलमार्गातून वाहते, या एका भौगोलिक बिंदूवर जो वर्चस्व गाजवतो, तो जगाच्या अर्थव्यवस्थेचा श्वास नियंत्रित करतो; हे कटू, पण अटक वास्तव आहे.

हॉर्मुझच्या अरुंद जलपट्टीत त्याच एका कारणाने आज एक ऐतिहासिक वादळ घोंघावत आहे. एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ‘अमेरिका फर्स्ट’ची गर्जना, दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची अस्तित्वाची लढाई आणि मध्यभागी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांचा ‘इस्लामी क्रांती’चा अखंड निर्धार, तसेच आता इराणच्या सर्वोच्च नेतेपदी असलेले अली खामेनी यांचे पुत्र मोजताबा अली खामेनी या तीन व्यक्तिमत्त्वांच्या संघर्षामध्ये जगाचा नकाशाच बदलण्याची क्षमता आहे.

थोडक्यात सांगायचे तर, या संघर्षाच्या केंद्रस्थानी केवळ भू-राजकारण नाही, तर व्यक्तिमत्त्वांचेही महत्त्वाचे स्थान आहे. त्यांची आक्रमक आणि सुरक्षिततेकडे झुकणारी भूमिका, त्यांची अनिश्चित पण ठाम धोरणात्मक भाषा आणि यांचे दीर्घकालीन प्रतिकाराचे तत्त्वज्ञान, हेही तितकेच महत्वाचे आहे. या तिघांच्या विचारसरणीने (खामेनी आज नसले तरी त्यांच्या मार्गाने जाणारा इराण) आणि या तिघांच्या निर्णयांनी या संघर्षाला एक वेगळीच धार दिली आहे, हे युद्ध केवळ शस्त्रांचे नाही, तर इच्छाशक्ती, अहंकार आणि राष्ट्रीय स्वाभिमान यांचाही संघर्ष आहे.

याच अभूतपूर्व संघर्षाचे सखोल आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण करणाऱ्या विजय लोणकर यांच्या ‘होर्मुझचे महायुद्ध’ या पुस्तकात केले आहे.

या संघर्षाच्या केंद्रस्थानी केवळ भू-राजकारण नाही, तर व्यक्तिमत्त्वांचेही महत्त्वाचे स्थान आहे. इतिहास हा केवळ घटनांनी नाही, तर निर्णय घेणाऱ्या माणसांनी घडतो आणि या संघर्षात तीन व्यक्तिमत्त्वे सर्वाधिक निर्णायक ठरली आहेत : डोनाल्ड ट्रम्प, बेंजामिन नेतान्याहू आणि अली खामेनी.

अमेरिकेचे माजी आणि पुन्हा सत्तेत आलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका या संघर्षात अत्यंत गुंतागुंतीची आहे. ‘अमेरिका फर्स्ट’ या तत्त्वज्ञानाने चालणारे ट्रम्प एकीकडे युद्धाचे समर्थन करतात, तर दुसरीकडे ‘मी युद्ध संपवणारा माणूस आहे’ असा दावाही करतात. त्यांची धोरणात्मक भाषा अनिश्चित असली, तरी ठाम असते. इराणवर कठोर आर्थिक निर्बंध लादणे, इराणच्या लष्करी नेतृत्वाला थेट लक्ष्य करणे आणि त्याच वेळी वाटाघाटींचे दरवाजे उघडे ठेवण्याचा आव आणणे; हे ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य आहे. त्यांची अनिश्चितताच त्यांचे सर्वांत मोठे धोरणात्मक अस्त्र बनते; कारण शत्रूला पुढचे पाऊल कळत नाही. इराणशी थेट युद्ध नको, पण इराणला सतत कमकुवत ठेवायचे: हीच ट्रम्प यांची रणनीती आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भूमिका या संघर्षात सर्वाधिक आक्रमक कारवाया करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. इराणच्या अणुतज्ज्ञांच्या हत्या, इराणच्या संगणक प्रणालींवर सायबर हल्ले, गाझा आणि लेबनॉनमधील हिझबुल्लांविरुद्ध एकाच वेळी लढत इराणला उत्तर देणे; हे सर्व नेतान्याहू यांच्या दीर्घकालीन रणनीतीचे भाग आहेत. ते युद्धाला केवळ लष्करी समस्या मानत नाहीत, तर ते अस्तित्वाचे एक संकट मानतात. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक सवलत म्हणजे इस्रायलच्या भविष्याशी केलेली तडजोड आहे, म्हणूनच ते अनेकदा आंतरराष्ट्रीय समुदायाच्या विरोधातही आपला मार्ग धरतात.

अली खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते. त्यांचे दीर्घकालीन प्रतिकाराचे तत्त्वज्ञान या संघर्षाला एक वेगळेच परिमाण देते. खामेनी यांनी चार दशकांहून अधिक काळ अमेरिका आणि इस्रायल यांच्या दबावाखाली इराणला टिकवले आहे. त्यांची रणनीती थेट टकरावाची नाही, तर ती ‘हळूहळू थकवण्याची’ आहे. प्रॉक्सी गट, हिझबुल्ला, हमास, हुती हे सर्व खामेनी यांच्या दीर्घकालीन प्रतिकाराचे विस्तारित हात आहेत. अत्यंत कमी खर्चातील ड्रोनने महागड्या अमेरिकन संरक्षण प्रणालींना थकवणे, होर्मुझची सामुद्रधुनी कधीही बंद करण्याची धमकी जिवंत ठेवणे आणि अण्वस्त्र कार्यक्रम हे अंतिम संरक्षणकवच म्हणून जपणे; ही इराणची तीन मुख्य अस्त्रे होती आणि आहेत. त्यामुळे त्यांची हत्या झाल्यानंतरही इराण कडवी लढत देत आहे. इराणला याची जाणीव आहे की, अमेरिका आणि इस्रायल यांना इराणचे पूर्ण पतन परवडणारे नाही; कारण त्यानंतर येणारी अस्थिरता त्यांच्यासाठीही घातक ठरेल. हीच जाणीव खामेनी यांना दशकांनंतरही प्रतिकार करण्याची ताकद देते.

या तिघांच्या विचारसरणी आणि निर्णयांनी या संघर्षाला एक वेगळीच धार दिली आहे. हे युद्ध केवळ शस्त्रांचे नाही, तर इच्छाशक्ती, अहंकार आणि राष्ट्रीय स्वाभिमान यांचाही संघर्ष आहे.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted