मोहिनी हेडावू

? पुस्तकावर बोलू काही ?

“मनातलं” – लेखिका : मोहिनी हेडावू – परिचय : नारायण काळे ☆ प्रस्तुती –  मोहिनी हेडावू

 

पुस्तक : मनातलं…

लेखिका – मोहिनी हेडावू

प्रकाशक : लोकव्रत प्रकाशन

‘मनातलं’: साध्या जगण्यात दडलेले असामान्य सौंदर्य (या लेखातील उपशीर्षके लेखाच्या मांडणीसाठी संक्षिप्त स्वरुपात वापरली आहेत) 

एका प्रसिद्ध साहित्यिकाने म्हटले आहे. आयुष्य हे एक रियाज आहे. या विचारात जीवनाचे सार आहे. कोणतीही व्यक्ती एका दिवसात प्रगल्भ होत नाही. सातत्यपूर्ण प्रयत्न, निरंतर अभ्यास, चिंतन मनन, निरीक्षण आणि जीवनाकडे पाहण्याचा संवेदनशील दृष्टिकोन यांच्या रियाजातूनच व्यक्तिमत्व घडत असते. वस्तू व सेवाकर विभागातील सहायक राज्यकर आयुक्त तथा लेखिका सौ. मोहिनी हेडावू-किन्हीकर यांच्या ‘मनातलं’ या ललित लेखसंग्रहाचे वाचन करतांना हा विचार वारंवार मनात येत राहीला. प्रशासकीय जबाबदा-या सांभाळतानाही लेखिकेने आपल्या संवेदनशील मनाला जपले आहे. त्यामुळे त्यांच्या लेखनात कार्यालयीन अनुभवांपेक्षा माणूस आणि जीवन अधिक ठळकपणे दिसते. या संग्रहातील प्रत्येक लेख हा जीवनाच्या एखाद्या साध्या अनुभवातून मोठा आशय उलगडून दाखवतो. भाषा अत्यंत सुलभ, कुठेही कृत्रिम अलंकाराचा अतिरेक नाही. म्हणूनच हे लेख वाचतांना ते वाचकाच्या मनात सहज उतरतात. या पुस्तकातील काही निवडक लेखांनी माझ्या मनावर उमटविलेला ठसा येथे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘मोनालिसाः सृजनाची अमरता’ या पुस्तकातील पहिल्याच ललित लेखात लेखिकेने मोनालिसा आणि लिओनार्दो दा विंची या फ्रेंच चित्रकारातील काल्पनिक पत्रसंवाद रचला आहे. त्यात मोनालिसा आपले भावविश्व व्यक्त करते. ‘तू तर मर्त्य आहेस; मी मात्र अमर झाले आहे’ हे मोनालिसाचे वाक्य अत्यंत प्रभावी वाटते. कलाकार नश्वर असतो; परंतु त्याची सृजनकृती त्याला अमरत्व प्राप्त करून देते. हा गहन विचार या लेखातून व्यक्त होतो. हा लेख वाचतांना मला विनायक होगाडे यांच्या डिअर तुकोबा या पुस्तकातील काल्पनिक संवादाची आठवण झाली.

‘रिचार्जिंग रिलेशनशीप’ संवाद मनामनांचा आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या माणसांशी संवाद साधायलाच विसरत चाललो आहेत. हा लेख याचे आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो. मी इतका व्यस्त आहो का? की दोन मिनिटेही माझ्या माणसांसाठी वेळ देऊ शकत नाही? हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. लेखिकेच्या जीवनात लोकसंग्रह आणि संवादाला असलेले महत्व या लेखातून जाणवते. हा लेख वाचतांना डेल कानेंगी यांच्या How to win afriends and influence the people या पुस्तकाचे मला स्मरण झाले. आंतरवैयक्तिक संबंध कसे जोपासावेत याचे मार्गदर्शन दोन्ही लेखनातून मिळते. ‘तुर्कनामा- मीना प्रभू’ प्रवासातून घडणारे संस्कार मीना प्रभू यांच्या तुर्कनामा या पुस्तकावरील लेखिकेचे परीक्षण वाचतांना प्रवास म्हणजे केवळ पर्यटन नसून संस्काराची प्रक्रिया आहे हे प्रकर्षाने जाणवते. प्रवासातून इतिहास, संस्कृती, खाद्य संस्कृती आणि समाज समजून घेण्याची दृष्टी विकसित व्हावी हा संदेश या लेखातून मिळतो. तुर्कीतील लोकांनी आक्रमणांच्या काळात जीवितरक्षणासाठी जमिनीखाली उभारलेल्या निवासस्थानांचा उल्लेख वाचतांना प्रतिकुल परिस्थितीतही माणूस जगण्याची आशा कशी जपतो Scanned with OKEN Scanner याची जाणीव होते. त्यामुळे हा लेख वाचतांना मला व्हीक्टर फकल यांच्या ‘मॅन्स सर्च फॉर मिनींग’ (Man’s Search for Meaning) या पुस्तकाची आठवण झाली. संकटातूनही अर्थपूर्ण जीवन जगण्याची प्रेरणा या दोन्ही लेखनातून समानपणे जाणवते. ‘माझी आवड: आंबा’ हा लेख माझ्या विशेष आवडीचा ठरला. कोकणातील हापूस आंब्याचा रंग, सुगंध, स्पर्श आणि चव यांचे लेखिकेने केलेले वर्णन हे फळाचे वर्णन राहत नाही तर जीवनातील आनंदाचा उत्सव बनतो. हा लेख वाचतांना मला एक वैयक्तिक प्रसंग आठवला. एकदा मी माझ्या घरच्या अंगणातील झाडाचे केशर आंबे लेखिकेला दिले होते. त्यावेळी त्यांनी आंब्याचा आनंद अगदी याच संवेदनशीलतेने व्यक्त केला होता. त्यामुळे मला हा लेख अधिक जिव्हाळयाचा वाटला. माझ्या दृष्टीने आंबा हे केवळ फळ नसून लेखिकेच्या बालपणातील आठवणी, साधेपणा आणि जीवनतील आनंदाचे प्रतीक आहे. ‘मनाचे उत्खनन’ आत्मपरीक्षणाचा प्रवास निरंजन घाटे यांच्या फार फार वर्षांपूर्वी या पुस्तकातील उत्खनन या संकल्पनेचा संदर्भ घेऊन लेखिकेने मनाचे उत्खनन ही सुंदर कल्पना उभी केली आहे. या लेखाने मला सर्वाधिक अंतर्मुख व्हायला भाग पाडले. राग, देष, लोभ, मोह, भीती यासारख्या भावनांकडे तटस्थपणे पाहण्याचा संदेश या लेखातून मिळतो. हा लेख वाचतांना तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेली विपश्यना साधना आणि वर्षभरापूर्वी मला आलेला विपश्यनेचा अनुभव पुन्हा जागा झाला. आपल्या अंतर्मनात डोळसपणे डोकावणे कसे गरजेचे आहे हा संदेश या लेखातून वाचकांना मिळतो. ‘रोमान्सः अनुभूतीचा नवा अर्थ’ रोमान्स या शब्दाचा केवळ प्रेमाशी संबंध नसतो. जीवनातील साध्या क्षणांचा मनापासून अनुभव घेणे-वाफाळलेला चहाचा घोट, झाडांचा स्पर्श, फुलांचा सुगंध, स्वैर चालणे, समुद्राची गाज हे ही रोमँटिक असू शकते अशी व्यापाक संकल्पना लेखिकेने मांडली आहे. हा लेख वाचल्यानंतर जीवनातील छोटया छोटया गोष्टींकडे नव्या नजरेने पाहावेसे वाटते. ‘मनातलं’ हा ललित लेखसंग्रह वाचतांना मला सतत एक गोष्ट जाणवत राहिली. जीवनातील साध्या अनुभवाकडे संवेदनशीलतेने पाहिले तर त्यातूनही साहित्य जन्म घेऊ शकते. ‘मनातलं” हा ललित लेखसंग्रह केवळ वाचण्याचा नाही, तर जगण्याचा अनुभव आहे. साध्या अनुभवांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची दृष्टी हा संग्रह वाचकाला देतो. म्हणूनच हा संग्रह केवळ साहित्यप्रेमींनी नव्हे, तर जीवन अधिक समृध्द करु इच्छिणा-या प्रत्येकाने वाचला पाहिजे.

(टीपः हा लेख वाचक म्हणून लिहिलेला वैयक्तिक अभिप्राय आहे.) 

परिचय : नारायण काळे

राज्यकर निरीक्षक, वस्तू व सेवाकर विभाग

प्रस्तुती : मोहिनी हेडावू 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted