सौ. सुचित्रा पवार

?पुस्तकावर बोलू काही?

☆ आरबूज… श्री रवी राजमाने ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆

कथासंग्रह : आरबूज

लेखक–  श्री.रवी राजमाने

प्रकाशक : ललित पब्लिकेशन, मुंबई

“ आरबूज“ —अस्सल गावरान मातीच्या कथा – सौ. सुचित्रा पवार

नुकताच रवी राजमाने सरांचा ‘आरबूज ‘ हा कथासंग्रह वाचला. एकूण १४कथा असलेला, मुलखावेगळ्या अस्सल गावच्या माणसांच्या व्यक्तिचित्रणाचा हा संग्रह वाचनीय आहे.

आरबूज म्हणजेच अफलातून, मुलखावेगळी असणारी माणसे, ज्यांना कधी प्रसिद्धी मिळालेली नसते, कधी पैश्यासाठी हापापलेपण नसते की कधी कुणाकडून कसली अपेक्षा नसते. मात्र ही माणसे समाजोपयोगी असतात, समाजहितासाठी झटत असतात, त्यांच्या दररोजच्या सामान्य जगण्यातून, साधेपणातून, जगापुढे आदर्श ठेवत असतात. मात्र त्यांच्या कार्याची वाहवा कुठेच होत नसते. इतकेच काय गावाची वेस सोडून पलीकडे त्यांची महती सुद्धा कुणाला माहीत नसते.अत्यंत निर्लेप, सालस, गोड शहाळीसारखी असतात. जन्मतात अशीच जगातल्या कुठल्या कुठल्या कोपऱ्यात आणि मरतात सुद्धा अशीच कुठंतरी कोपऱ्यात. जशी जिवंतपणी अदखलपात्र असतात तशीच मृत्यूनंतरही ती कुणाच्या लक्षात रहात नसतात. कधी त्यांचा शेवट सुखांत होतो तर कधी करुण दुःखांत.

सरांच्या परिचयातील अशाच साध्या भोळ्या पण अफलातून, सरांना भावलेल्या माणसांच्या जीवनकथा सरांनी आरबूज मध्ये चित्रित केल्या आहेत.

शाळेच्या आवारात मुलांना भडंग, गुलाबजाम विकणारा महादूमामा मुलांच्या आरोग्यासाठी स्वतःच सर्व पदार्थ घरी बनवतो व विकतो.पोटासाठी राबणाऱ्या महादूमामांचे मन साफ आहे.. दररोज मैलोनमैल सायकल मारत जाऊन  संसाराचा गाडा चालवणारे मामा आयुष्याच्या शेवटपर्यंत कष्टच करतात आणि एक दिवस सहजच या जगाचा निरोप घेतात. त्यांच्या प्रेमळ प्रामाणिक वागण्याची दखल जग कधीच घेत नाही.

अंजुम-सायबाची प्रेमकहाणी ही अशीच एकनिष्ठ आहे. आयुष्यभर माहेर तुटलेली सुंदर अंजुम हिंदू सायबाशी एकनिष्ठ राहून पुढं आपल्या मुलांना समाजात त्रास होऊ नये म्हणून निपुत्रिक रहाते, पण समाजाची पर्वा न करता सायबा विवाहित असूनदेखील विनातक्रार आपला पत्नीधर्म निभावते.

असाच ग्रामपंचायत आणि गाव स्वच्छ करणारा चिमा पदरमोड करून छोट्या मुलांना गोळ्या  देऊन खुश ठेवतो.

स्वतःच्या पोटाला कमी पडले तर चालेल पण दारात आलेल्या पक्षांना खाऊ घालणारी सीतामाई पण अशीच भूतदया जपणारी आहे.आयुष्यभर आपले व्रत जपत सहजच झोपलेल्या जागी क्षणात जग सोडून जाते.

स्वतः पालावर भटकंती करत खडतर आयुष्य जगणारा दगड्या गोविंदार्या असो, की पुरुषांच्या बरोबरीने पुरुषी कामे करणारी कल्पनामावशी असो, पोटासाठी राबणारी ही माणसे जगाची पर्वा न करणारी आहेत.दररोजच्या जगण्याच्या प्रश्नाला भिडत आनंदाने दुःख पचवत जगत आहेत.

गांधीवादी विचारसरणीचे, स्वच्छतेचे भोक्ते असणारे,आपल्या तत्वांशी प्रामाणिक, एकनिष्ठ रहात शिक्षणाधिकारी बी.  डी.ओ. बापू एकाकी आयुष्य जगतात आणि एकाकीच मरतात. जगावेगळ्या असणाऱ्या माणसांना जग आपल्यात सामावून घेत नसते हेच खरे.

३० फूट खोल विहीर एकटाच खोदणारा, स्वतःच्या घराचे सर्व सामान दूरवरच्या अंतरावरून सायकलवरून आणून टाकताना स्वतःचे हसे करून घेणारा अरबूज – गुलाब हुसेन भालदार उर्फ बाळू- अचाट ताकदीचा आहे. त्याच्या अचाट ताकदीचा गैरवापर मात्र तो कधीच करत नाही. आपले शेत कसून साधे सरळ जीवन जगत आहे. इतक्या अचाट ताकदीच्या माणसाची खबर कुठल्याच वृत्तपत्राला अथवा टीव्हीलाही नाही !

असाच अचाट ताकदीचा पैलवान परसूदादाही. 

कुटुंबप्रमुख पुरुष कर्तृत्ववान  नसेल तर  कुटुंबाची आबाळ होते, हालअपेष्टा होते. मात्र गृहिणी कर्तृत्ववान असेल तर ती आपल्या कुटुंबाला प्रत्येक अडीअडचणीतून तर सोडवतेच, पण आपल्या मुलाबाळांवर योग्य संस्कार करून, त्याना जीवनाची दिशा देऊन, आपला एक आदर्श निर्माण करणारी गंगू नानी म्हणजेच सरांच्या मातोश्री होत.

मोडलेल्या हाडांचे सांधे जुळवण्याचे कसब अंगी असणारा देवमामा कोणाचेही कसलेही हाड मोडलेले असले तरी आपल्या हातकौशल्याने व कसबीने बिना मोबदला बसवून देतात. खेडोपाडी डॉक्टर ,औषधोपचार मिळेपर्यंत रुग्णाचा आजार बळावायचा, म्हणून लोक देवमामाकडे जाणेच पसंत करत. देवमामा नावाप्रमाणेच देवमाणूस होता. एकदा गावातील एका शेतात धनगराचे पोर बाभळीवरून खाली पडले आणि पाय मोडला. मुलाच्या वडिलांनी त्याला देवमामाकडे आणले. पोटासाठी रानोमाळ भटकणाऱ्या धनगरांकडे शहरात जायला कुठले वाहन आणि पैसे ? तरी पण देवमामाने बिना मोबदला हे काम केले म्हणून एक बकरीचे पिलू तो धनगर देवमामाला देऊ करतो पण देव मामाच्या निःस्वार्थी मनाला ते पटत नाही. म्हणून मामा ते पिलू खांद्यावर टाकून धनगराच्या वस्तीवर चालत नेऊन परत करतात.

साहित्यावर भरभरून प्रेम करणारे ,साहित्य उपासना करणारे, पण प्रसिद्धीपासून नेहमी दूर रहाणारे चंदा जोशी दादा असेच साधे, निगर्वी व्यक्तिमत्त्व.

नेहमीच समाजाच्या  नजरेत तिरस्कृत असणारी, माणूस असूनही समाज जिला जवळ करत नाही असे पायलसारखे कितीतरी शिखंडी आयुष्यभर अवहेलनेच्या आगीत धुमसत रहातात. ना नातेवाईक, ना समाज, कोणीच त्यांना आपलेसे करत नाही की त्यांच्यावर माया करत नाहीत. पायलची कहाणी वाचून खरंच हृदय कळवळून जातं. हा दैवी शाप तर नसेल ना?असे वाटते. पायलसारख्या अनेक उपेक्षितांना माणसात घेणे, त्यांना माणूस म्हणून सहज वागणूक देणे खरेच गरजेचे आहे.

आरबुजच्या माध्यमातून सरांनी आदर्श पण उपेक्षित,अदखल व्यक्तींची दखल आपल्या कथासंग्रहातून घेतली आहे. गावोगावच्या अशा आरबूज लोकांचा सत्कार व सन्मान व्हायलाच हवा.

आरबूज… लेखक – श्री रवी राजमाने

समीक्षक – © सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments