सुश्री नीलिमा खरे
पुस्तकावर बोलू काही
☆ काव्यानुभूती… (५० कवितांचे रसग्रहण) रसग्रहण : कवयित्री : ज्योत्स्ना तानवडे / अरुणा मुल्हेरकर / नीलिमा खरे / राधिका भांडारकर / अमिता पाटणकर ☆ परिचय – सुश्री नीलिमा खरे ☆
मराठी भाषेला “अभिजात मराठी”चा दर्जा देवून गौरवल्यामुळे मराठी भाषा प्रेमींना आनंद झाला नसता तरच नवल!! पण हे आणि एवढेच करून थांबणे योग्य नव्हे असे सुजाण साहित्यप्रेमी रसिक वाचकांना वाटणे अगदी स्वभाविकच आहे. याच भावनेपोटी “सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन्सचे” श्री. सुरेंद्र गोगटे यांच्या मनात एक अनोखा विचार आला. तो प्रत्यक्षात आणण्याबद्दल त्यांनी श्रीमती ज्योत्स्ना तानवडे यांच्याशी संपर्क साधला, चर्चा केली – – –
हा विचार म्हणजे “साकव्य विकास मंच” या साहित्य समूहातील काही प्रतिभावान कवयित्रींच्या कवितांच्या रसग्रहणाचा संग्रह प्रकाशित करणे. यानुसार दहा कवयित्रींच्या प्रत्येकी पाच अशा एकूण पन्नास कविता आणि त्यांच्या त्या कवितांचे रसग्रहण करणाऱ्या पाच रसग्रहणकर्त्या ज्या प्रत्येकी दहा कवितांचे रसग्रहण करतील असा विचार पक्का झाला. रसग्रहण या जराशा दुर्लक्षित साहित्य प्रकाराला या अभिनव कल्पनेमुळे गती मिळेल अशी मनोमन आशा ठेवून “काव्यानुभूती” हे पुस्तक दिनांक २७ जुलै २०२५ रोजी पुणे येथे प्रकाशित झाले. पुस्तकाची प्रस्तावना प्रसिद्ध साहित्यिक व माननीय डॉक्टर निशिकांत श्रोत्री सरांनी लिहून या पुस्तकाला आशीर्वाद दिले असे आम्ही सारे जण मानतो. या पुस्तकाच्या संकल्पनेबद्दल श्री. गोगटे याचे आभार. तसेच हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी व पूर्णत्वास नेण्यासाठी लागणारा पुढाकार, समन्वय, संकलन व संपादन अशा विविधांगी भूमिका प्रामाणिकपणे करणाऱ्या सौ. तानवडे यांचे ही मन:पूर्वक आभार…
यात ज्या कवयित्रींच्या कविता समाविष्ट केल्या आहेत त्या कवयित्रींचे आणि रसग्रहणकर्त्या लेखिकांचे ही आभार.
साहित्यप्रेमी रसिक जनांनी संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे..
धन्यवाद..
परिचय : सुश्री नीलिमा खरे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





