प्रा. सुनंदा पाटील
विविधा
☆ गोपाळ काला / काल्याचे कीर्तन… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆
बारसे हा आपल्या संस्कृतीच्या सोळा संस्कारांपैकी एक संस्कार आहे. बाळाचा जन्म झाला, त्याचा पाळणा झाला, नाव ठेवलं. श्रीकृष्ण! बाळ हळूहळू मोठं झालं आणि कृष्णाच्या खोड्या वाढल्या. त्याच्या बाललीला वाढल्या. पुढे तो कांबळीवाला झाला आणि काठी घेऊन गोधन चारायला जाऊ लागला. त्याचे अनेक सोबती होते. गरीब – श्रीमंत! सगळेच त्या ठिकाणी सारखे होते. सर्वांची शिदोरी एकत्र करून ते एकत्र खात तोच हा गोपालकाला.
पुढे हा गोपालकाला वारकरी संप्रदायात प्रमुख ठरला. कीर्तन करून हा गोपालकाला केला जाई. काल्याचे किर्तन म्हणजे कृष्णाच्या बाललीला! गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सवाशी संबंधित असलेले कीर्तन कृष्णाच्या विविध कथा भक्ती आणि तत्वज्ञानावर आधारीत – असे हे किर्तन असते. काला हे वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे. श्रीकृष्णाने यमुनेच्या वाळवंटामध्ये गोपाळांबरोबर जो काला केला, अगदी तसाच्या तसा काला वारकरी संप्रदायात केला जातो. जीवा – शिवाचे ऐक्य सांगणारे काल्याचे किर्तन म्हणजे प्रसन्नतेचे कीर्तन. काला हे त्याग, समर्पण, विश्वास, असे परिपूर्णतेचे कीर्तन आहे. सामान्य माणसाला प्रसाद हा काल्याच्या कीर्तनातून मिळत असतो. वाळवंटात केलेला काला, भगवान कृष्णाच्या चारित्र्याचा विचार म्हणजेच काला.
काल्याचे वांङ्मयात तीन प्रकार आहेत. दहिभात अभेद आणि काला! असे हे तीन प्रकार असून काल्याच्या कीर्तनात तीन प्रकारचे अभंग घेतले जातात. बाळक्रीडा, गवळण आणि काला. दुसऱ्यांना खाऊ घालण्याची भारतीयांची संस्कृती यात आहे. भगवान कृष्णाच्या अवतारात परिपूर्णता आहे. कृष्ण म्हणजे काळा, कृष्ण म्हणजे काळ, कृष्ण म्हणजे आकर्षित करणारा असेही कृष्ण शब्दाचे तीन अर्थ होतात.
वैकुंठामधे सर्व काही आहे. परंतु काला नाही, म्हणून तो अवीट असणारा काला खाण्याकरता आम्ही पुन्हा वैकुंठातून मृत्यूलोकात परत येऊ, असं प्रत्यक्ष देव म्हणतात. वाळवंटाचे तीन गुण आहेत. बरे, नीट आणि उत्तम. काल्यात भारतीय संस्कृती बघायला मिळते. स्वतः जेवणे ही प्रकृती, दुसऱ्यांचे हिसकावून घेणे ही विकृती ‘ आणि दुसऱ्यांना जेवू घालणे ही संस्कृती. काल्याचा विषय हा – श्रीकृष्णाचे चरित्र, काल्याचे ठिकाण – वाळवंट, काल्याचा देव – श्रीकृष्ण, काल्याचे भक्त – गोपाळ! देव भक्तीचे आवीट सुख. श्रीकृष्णाने यमुनेच्या वाळवंटात जो काला केला, तो काला देऊन सर्व गोपाल यांना तृप्त केले.
गोपालकाला – ज्याला दहीहंडी असे म्हणतात, हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव आहे. महाराष्ट्रात विशेषत्वाने हा साजरा होतो. तिथे लोक मानवी मनोरा तयार करून दही आणि लोणी असलेले माठ फोडतात.
कृष्ण जयंतीच्या उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादाला सुद्धा गोपालकाला असं म्हणतात. या व्यतिरिक्त वर्षभरात जेव्हा जेव्हा काल्याचे किर्तन होते, तेव्हा तेव्हा कीर्तनानंदात गोपाल काला होतो. म्हणून याला गोपालकाल्याचे कीर्तन असे म्हणतात. ज्ञानेश्वरी किंवा दासबोधाचे पारायण किंवा अनेक दिवस चालणाऱ्या अशाच एखाद्या ग्रंथ वाचनानंतर, एक्का, एकादशीचे पारणे, कीर्तन महोत्सव, अशावेळी शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते. वारकरी संप्रदायात वारीची सांगता गोपालकाला करूनच होते.
गोपाल म्हणजे गाईचे पालन करणारा. काला म्हणजे एकत्र मिसळणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबाचे किंवा आंब्याचे लोणचे, दही – ताक, चण्याची डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी मिळून काला तयार केला जातो. हा कृष्णाला फार प्रिय होता, असे सांगितले जाते. श्रीकृष्ण आणि सर्व सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा काला तयार करीत असत आणि सर्वजण वाटून स्वतः भगवान खात असे मानले जाते.
गोपालकाला म्हणजे पांढऱ्या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीत जास्त प्रमाणात, निर्गुण चैतन्याची संबंध दर्शविणारा व पूर्णावतारी कृष्ण कार्याचे दर्शक असलेला समुच्चय! काला हा शब्द एकसंध व सातत्य असणाऱ्या क्रियेशी संबंधित आहे. श्रीकृष्णाच्या वेदांगी पूर्णकारी कार्याचे प्रतिनिधित्व करतो. पोहे दही दूध ताक लोणी हे प्रमुख पाच घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहेत. पोहे – वस्तुनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक. म्हणजेच श्रीकृष्णाला धरून ठेवणारे त्याचे सवंगडी! दही – वात्सल्य भावातून प्रसंगी शिक्षा करणाऱ्या मातृभक्तीचे प्रतीक आहे. दूध – गोपींच्या सहज, सगुण, मधुरा भक्तीचे प्रतीक तर ताक – गोपींच्या विरोध भक्तीचे प्रतीक आहे. लोणी – सर्वांच्या श्रीकृष्णावरील अव्दैत प्रेमाच्या निर्गुण भक्तीचे प्रतीक आहे. या दिवशी ब्रम्हांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात.
शरीर व मन यांना पोषक असे या दिवशी वायुमंडल आपतत्वाने भारित असल्याने, देहातील पंचप्राणांच्या वहनाला पोषक असल्याने, मनाला उत्साह देणारे व देहाची कार्यक्षमता वाढविणारे असते. सर्व सृष्टी आनंदी असते.
कीर्तनामधे मधोमध एक छोटीशी दहीहंडी टांगली जाते. त्याला एक मातीचे गाडगे बांधले जाते. त्यात थोड्याशा लाह्या आणि दही असतं. कुठले तरी वारकरी आपल्या टाळानेच ते गाडगे फोडतात आणि “गोपालकाला गोड झाला – दैवी होता त्याला मिळाला ” हा गजर करतात आणि त्यानंतर गोपालकाल्याचं भजन होतं एक भजन आपण बघूया.
चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी
मांडीयेल्या काल्या भवती गोपाळांची दाटी ॥
*
आनंदे कवळ देती एका मुखी एक
न म्हणती सानथोर अवघे सकळीक ॥
*
हमामा हुंबरी पोवा वाजविती मोहरी
घेतलासे फेरा माजी घालुनिया हरी ॥
*
लुब्धल्या नरनारी अवघ्या पशुजाती
विसरल्या देहभान शंका नाही चित्ती ॥
*
पुष्पांचा वर्षाव झाला आरतीयांची दाटी
तुळशी गुंफोनिया माळा घाली कंठी ॥
*
यादवांच्या गोपी मनोहर कान्हा
तुका म्हणे सुख वाटे मोहुनिया मना ॥
*
तर असे हे गोपालकाल्याचे कीर्तन किंवा भजन. आजच्या पिढीला किमान काही शब्द कळावेत म्हणून हा लेखनप्रपंच आहे. या संबंधात अनेक कथाही आहे.
मात्र स्वानुभवाने एक गोष्ट इथे सांगते आहे. मंदिरात वगैरे अनेक वेळा मोठ्या प्रमाणात काला कालवण्याचे काम करण्याचे भाग्य मला लाभले आहे. गावातल्या अनेक घरातून काल्याचं सामान येतं. ते काही एकदम एकत्र येत नाही. तेव्हा आलेली प्रत्येक वस्तू / मग ते ताकदही असो, पोहे असूदेत किंवा लोणचे! काल्याच्या चवीत तसूभरही फरक पडत नाही. तो तेवढाच अप्रतिम लागतो.
असो.
पुढेही सण येतच आहेत. सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपालकाल्याच्या शुभेच्छा देते आणि थांबते!
© प्रा.सुनंदा पाटील
गझलनंदा
८४२२०८९६६६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







