शालिनी जोशी

? विविधा ?

☆ पाऊस आणि पक्षीजीवन ☆ शालिनी जोशी

४/७/२६. पाऊस आणि पक्षीजीवन

अलीकडे आठ दिवस पाऊस सुरू झाला आहे. प्रतीक्षा करून थकलेल्यांना दिलासा मिळाला. पण माझ्या मनात एक वेगळाच विचार. पक्षी जीवन पूर्णपणे झाडावर अवलंबून. घरा शेजारचे आंब्याचे झाड माझ्या डोळ्यासमोर. त्यामुळे पहाटे तीन साडेतीन वाजल्यापासून सुरू होणारी पक्षी जीवनाची सुरुवात माझ्या परिचयाची. ही सुरुवात सध्या कोकीळ आणि कोकिळेच्या संवादाने. तो अधून-मधून दिवसभर चालूच. कधी सुसह्य तर कधी असह्य, कधी आर्त तर कधी श्राव्य. इतर पक्षांची हालचाल असतेच. बुलबुल आणि नाचण(fan tail) कायमचे रहिवासी. खारुताईची वटवट तर अखंड. शेवटी सांगावे वाटते, बाई आता गप्प बसायला काय घेशील? पुरे कर तो शेपटीचा तुरा घडवणे आणि त्या तालावर आवाज करणे. पोपट दिसत नाहीत पण पोपटपंची मधून मधून ऐकू येते. सुर्यपक्षी कोणाच्या अध्यात ना मध्यात. ते आपल्याच नादात, फुले असलेल्या झाडांच्या आसपास वावर. क्वचित चष्मेवाला, मैना, राॅबिन, टिट यांचेही दर्शन. मी आहे सांगणारी कावळ्यांची कावकाव कधी दूर तर कधी जवळ. अधून मधून भारद्वाजाचा भारदस्त आवाज. असे हे पक्षी जीवन, घरात बसणारी मी त्यामुळे त्यांचा विचार हाच माझा एक छंद.

पण पाऊस सुरू झाला की हे सर्व पक्षी मंडळी कोठे गायब होतात कळत नाही. आवाज नाही, दिसत नाहीत. हिरव्या पानात कसे लपून जातात कळत नाही. आणि पाऊस थांबला की परत जागृती. हालचाल सुरू. यांना पाऊस कसा लागत नाही? भिजणे, थंडी नाही का? कारण घरटे बांधले तरी त्याचा उपयोग अंडी ठेवण्यासाठी. पिल्लूला पंख फुटले उडू लागली की घरटे निकामी. मग भर पावसात पक्षी कोठे झोपतात? काय खातात? आपण छत्री रेनकोट केवढा थाट करतो. गरम चहा, भजाचा आस्वाद घेतो.

पक्षांचे कौतुक कोण करणार? त्यांचे किती हाल होत असतील? पण न कुरकुरता त्यांचे जीवन सुरू असते. असं वाचलं की पक्षांच्या शेपटी जवळ ग्रंथी असतात. त्यातून तेलकट द्रव पाझरतो. आपल्या चोचीने पक्षी तो सर्व अंगाला लावतात. त्यामुळे त्यांचे अंग भिजत नाही. निसर्गाने किती छान योजना केली आहे. त्यालाच सर्वांची काळजी. आपण मात्र मी शहाणाच्या अभिमानात. पण पक्षी काही कुरकुर न करता मिळेल ते खाद्य, पावसाळा असो हिवाळा असो किंवा उन्हाळा, मिळेल त्या आडोशाला निवास, कुणाशी भांडण नाही. अन्नाची साठवण नाही. आनंदाने एकाच झाडावर सर्व राहतात.

पिल्लू उडायला शिकली, स्वावलंबी झाले की त्यांनी कुठेही जावं. आई वडील कर्तव्यातून मोकळे. म्हणून म्हणतात पक्षासारखं जगावं. कर्तव्य करावं पण प्रपंचात अडकू नये. मिळेल त्यात समाधानी असावं. हव्यास तेथे ईर्षा तेथे असमाधान.

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted