श्री हेमंत तांबे 

🔅 विविधा 🔅

☆ मूल्य आणि किंमत यात फरक आहे का? ☆ श्री हेमंत तांबे 

मूल्य आणि किंमत यात फरक आहे काय? – तर, हो आहे!

मूल्य म्हणजे किंमत नव्हे, तर जे नैतिकतेशी जोडलं गेलं आहे ते मूल्य. ते सभ्यतेशी पावित्र्याशी जोडलं गेलं आहे आणि जी आर्थिक खर्चाशी निगडित आहे ती किंमत. उदाहरणार्थ — मूल्य व्यवस्था, नैतिक मूल्ये, मूल्याधिष्ठित समाज वगैरे वगैरे. मूल्ल्ये विकत घेता येत नाहीत, तर ती रक्तात म्हणून आचारातच असावी लागतात. मूल्य नागरीकत्वाशी जोडलं गेलं आहे, तर किंमत जाहिरातीशी जोडली गेली आहे. कसं ते पाहूया.

आपण मूल्य म्हणजे किंमत समजू लागलो आणि विचार प्रक्रिया बदलली. विचार बदलले की, आचारात बदल होतो. किंमत दर्जावर आधारित असावी. जेव्हा किंमत जाहिरातीवर ठरवली जाऊ लागली, तेव्हा दिखाऊपणा महत्वाचा झाला. जेव्हा दिखाऊपणा महत्वाचा होतो तेव्हा आदर्श बदलतात. “उस डोंगा परी रस नोहे डोंगा, कारे भुललासी वरलीया रंगा? ” असं चोखामेळा म्हणतो व योग्य काय आहे ते सांगायला लागतो!

आनंदी असणे ही मनाची सर्वोच्च अवस्था आहे. आनंद आतून तयार होतो, तो Absolute असतो. त्याखालची उतरंड अशी आहे. – आनंदाच्या खालची पातळी सुख आहे तर, त्याखाली समाधान ही अवस्था आहे. समाधाना खाली तृप्ती असते आणि तृप्तीच्या खाली गरज असते. गरजा वाढत जातात तेव्हा विवेक कमी होत जातो. गरजेचं रुपांतर मजेत झालं की, विवेक संपून ऐष सुरू होते. ऐष आणि हाव यांच्या सिमारेषा धुसर असतात. हाव अमर्याद असते, ती विधी विधान पायदळी तुडवून अनैतिक अनैसर्गिक कृत्ये करवून घेते!

आपण सध्या हाव या रकान्यात उभे आहोत. याचे परिणाम पाहा. आपल्या आईवडिलांकडे स्वतःचं घर, शेत जमीन, गरजेला चार पैसे व काही सोनं होतं. ते स्वतंत्र होते, समाधानी होते!

आपण मोटारसायकल ते आयफोन ते कार ते घर कर्जावर घेऊ लागलो, कारण आपण जाहिरातीला बळी पडलो. जाहिरातीनं आपलं स्वातंत्र्य नष्ट झालं आणि आपण बेगडी उच्च दर्जाचे गुलाम झालो. आता आपण आर्थिक व्यवस्थापनाचे धडे, आर्थिक सल्लागारां कडून घेऊ लागलो. यासाठी आपण त्यांना सल्ला किंमत देऊ लागलो. थोडक्यात आपण पैसे देऊन आर्थिक जाळ्यात गुंतत गेलो, परिणामी गुलामगिरी आपला स्थायिभाव झाला!

आता मालमत्ता ही आर्थिक जबाबदारी झाली किंवा आर्थिक दायित्व वाढलं. जेव्हा क्षमतेपेक्षा दायित्व वाढतं, तेव्हा गुलामीच्या बेड्या मजबूत होत जातात. आजची आपली तरूण पिढी या गुलामीच्या बेड्या ठोकून घेण्यात फारच आघाडीवर आहे. याचं मुख्य कारण संदर्भ बदलत गेले. गेल्या दिड हजार वर्षांत श्रम व शेती यांची किंमत कमी होत होत, श्रमाला शिक्षेची किंमत दिली गेली आणि शेती हा जगण्याचा निकृष्ट मार्ग झाला. बरं, हे कुणाकडून निश्चित झालं? तर, “अन्न हे पूर्ण ब्रह्म” आहे असं सांगणाऱ्या विद्वान महाभागां कडून. विद्वान महाभाग कोण? तर, जो श्रम न करता ऐषोआरामाचं जगणं जगतो व तसं जगण्याचे सल्ले पैसे घेऊन देतो तो. खरं म्हणजे विद्वान या शब्दाचा अर्थ असा नाही, पण संदर्भ बदलले की अर्थ बदलतात. हल्ली विद्वान हा शब्द उपरोधानं वापरायला लागल्या पासून तो एवढा स्वस्त व गुळगुळीत झाला की मुर्ख लोक चक्क स्वतःला विद्वान समजू लागले!

विद्वान खरं म्हणजे बुद्धीमान नसून हुशार असू शकतो. पण बव्हंशी हुशारी स्वार्थाकडे जाते, तर बुद्धत्व सभ्यतेकडे जातं. जेव्हा श्रम व बुद्धी यांची फारकत होते, तेव्हा प्रगती ते अधोगती असा प्रवास सुरू झालेला असतो. आपल्या संस्कृतीत असं मानलं जात होतं की, राजात विष्णूचा अंश असतो. हे फक्त मानणं नव्हतं, तर आपल्या अनेक राजांचं चारित्र्य तसं होतं. श्रीरामाला तर आपण विष्णूचा अवतार म्हणतो, म्हणून रामराज्य अजरामर झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर सैन्याला व सेनापतीला सक्त ताकीद दिली होती की, शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा हात लावायचा नाही, कारण शेतकरी श्रम करून जगतो म्हणून, त्याचं जगणं जास्त नैतिकतेशी जोडलेलं असतं!

राजवटी गेल्या आणि सरंजामशाह्या आल्या. सरंजामशाह्या गेल्या आणि चक्क पारतंत्र्य आलं. पारतंत्र्य जाऊन कल्याणकारी लोकशाही कागदावर आली. प्रत्यक्षात तिचं रुपांतर घराणेशाहीत झालं. कागदी कल्याणकारी लोकशाहीत आश्वासनांचा पाऊस पडला आणि स्वार्थी घराणेशाहीचे आपण गुलाम झालो. विवेक तर आपल्यातून हजार वर्षांपूर्वीच गायब झाला होता. जेव्हा स्वार्थाच्या परमोच्च शिखरावर सर्व समाजच पोचतो, तेव्हा त्या समाजाचे लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक म्हणून काम करतील काय? विवेक हरवलेला समाज मग अशा सरंजामी वृत्तीच्या लोकांचा गुलाम होतो आणि लोकसेवकांच्या टोळ्या तयार होतात. टोळ्यांच्या जाहिराती सुरूच असतात. टोळी प्रमुखाची जाहिरात जेवढी आकर्षक, तेवढे विवेक हीन स्वार्थांध गुलाम आता त्याचे निष्ठावंत म्हणून पुढे येतात आणि समाज अधःपतनाच्या आणखी खालच्या पायरीवर जातो!

उत्क्रांतीच्या प्रक्रियेत चार पायांवर धावणारा माणूस जेव्हा दोन पायांवर चालायला लागला, तेव्हा ओघानंच तो दूरचं पाहू लागला. (चिंपांझी आणि माणूस काडीमात्र संबंध नाही. डार्विनची थिअरी या बाबतीत पूर्णपणं चुकीची आहे. या विषयावर मी आधी लिहीलं आहे. आणि ते कुणीही खोडून काढलेलं नाही.) जेव्हा तो दूरचं पाहू लागला, तेव्हा त्याला संकटाची चाहूल आधी येऊ लागली. सोबतच आता त्याचे हात मोकळे झाले होते. दूरदृष्टी, वैचारिक क्षमता आणि मोकळ्या हातांनी त्याला निर्मीतीकडे आणलं. अन्नाच्या शोधात भटकंती सोडून, तो हाती नागर धरून शेती करू लागला. नागराचा शोध हा मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील महत्वाचा टप्पा. ज्याच्या हाती नागर तो नागरिक, तो सभ्य समाजाचा प्रतिनिधी!

काळ बदलला तशी माणसं बदलली, माणसं बदलली तसे संदर्भ बदलले. संदर्भ बदलले तसे शब्दांचे अर्थ बदलले. बदललेल्या शब्दांचे अर्थ जाहिरातीतून मनावर बिंबवले गेले. आता सर्व नालायक, स्वार्थी चोर, डाकू, लुटेरे, लफंगे, फुकटे, भ्रष्टाचारी – माननीय, सन्माननीय, आदरणीय, वंदनीय, पूजनीय, प्रात:स्मरणीय झाले. चार पुस्तकं वाचलेले म्हणून शिक्षीत – चक्क सुशिक्षित विचारवंत बुद्धीजीवी झाले!

विवेकाची वानवा आणि जाहिरातीच्या माऱ्यानं आपल्याला सन्मार्गावरून वाममार्गावर केव्हा आणलं कळलंच नाही. दुर्जनांच्या सत्काराची चढाओढ सुरू झाली आणि त्यातील आर्थिक उलाढालीनं नेत्रदीपक यश मिळवलं. हे सर्व आपल्याला मूल्य आणि किंमत यातील फरक न कळल्यानं घडलं!

© श्री हेमंत तांबे

पाटगाव. 

मो – 9403461688

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted